Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

ब्रम्हांडाची कुंडली स्वस्तिक


विषय : ब्रम्हांडाची कुंडली स्वस्तिक

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : ज्योतिषतत्व दर्शन

नमस्कार,

आपल्या सर्वांना हे माहित आहेच की बेरीज म्हणजेच ऐक्य हे ( + ) अधिक या धन चिन्हानें दर्शवले जाते आणि वजावट अथवा व्यय ( – ) या ऋण चिन्हानें दर्शवले जाते.

( + ) धन या चिन्हास चार टोके आहेत व त्या प्रत्येक टोकास आपल्या पुर्वाचारींनी विशिष्ट गुणधर्म बहाल केलेले आहेत.

१. वरचें टोक “धर्म” दर्शवते,

२. उजव्या हाताचें टोक “अर्थ” दर्शवते.

३. खालचे टोक “काम” दर्शवते आणि

४. डाव्या हाताचें टोक “मोक्ष” दर्शवते.

या चार टोकांसच मूलाधार असे म्हणतात व हे चार मूलाधार म्हणजेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्व वेद असे अनुक्रमे चार वेद आहेत.

या चार मूलाधारांवरच ब्रम्हांडाचे चलन वलन पूर्वापार चालू आहे. हे चलन वलन ४ तत्वांत (पृथ्वी, आप, तेज आणि वायू), ३ गुणांत (सत्व, रज आणि तम), ३ स्थितीत (चर, स्थिर आणि द्विस्वभाव), आणि ३  अवस्थांत (उत्पत्ति, स्थिति आणि लय) अव्याहतपणे चालू आहे.

१. या धन चिन्हातील वरचे टोक धर्म, तेजतत्व, रजोगुण, चर स्थिति, दर्शवते.

२. उजव्या हाताचे टोक अर्थ, पृथ्वीतत्त्व, रजोगुण, चर स्थिती दर्शवते.

३. खालचे टोक काम, वायूतत्व, रजोगुण, चर स्थिति दाखवितें आणि

४. डाव्या हाताचें टोक हैं मोक्ष, आपतत्व, रजोगुण, चर स्थिति दाखवितें.

अथवा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही बिंदू रजोगुणात्मक स्थिति भिन्न तत्त्वांत दर्शवते.

अशा प्रकारें हे ब्रह्मांड एकदम उत्पन्न झाले म्हणजे स्थिति या अवस्थेंत आलें. जी जी वस्तू मग ती दृश्य असो वा नसो त्या वस्तूंचा कधी ना कधी लय हा निश्चित असल्यामुळे या ब्रह्मांडाचाही लय एकदां होणार आहे आणि हेच दाखविण्याकरतां एक रेषा म्हणजे गति, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार स्थितींच्या बिंदूपासून “लया’ कडे अथवा ‘त्याच्या’ व्यय (ऋण) स्थानाकडे काढली म्हणजे एक विशिष्ट प्रकारची आकृती अथवा चिन्ह तयार होते. या आकृतीस अथवा चिन्हास “स्वतिक” असें म्हणतात आणि हीच ब्रह्मांडाची कुंडली आहे.

हिंदुसंस्कृतींत हें स्वस्तिक अत्यंत पूर्वापार चालत आलेलें आहे व कोणत्याहि शुभ कार्यात मग तें विवाह असो अथवा रोजची रांगोळी असो त्यांत तें प्रथमतः काढले जाते. याला इतकें महत्त्व असण्याचें कारण असे आहे कीं, या चिन्हांत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार मूलाधारांचें सौख्य देण्याचें सामर्थ्य आहे आणि म्हणूनच ज्या हिंदुस्थानांत हें चिन्ह पूर्वापारपासून प्रचलित आहे,

तो हिंदुस्थान देश उन्नतीच्या उच्च शिखरावर पोहोंचलेला होता. इतकेंच नव्हे तर अर्थ न समजताही ते चिन्ह अद्याप ही उपयोगांत आणले जात आहे आणि म्हणून जगाच्या चढाओढींत या देशानें आजपावेतों टिकाव धरला आहे असेंच म्हणावें लागते.

१. कुंडलीतील चार केंद्र स्थाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या मूलाधार म्हणजेच अनुक्रमें कर्ता, कर्म, क्रिया आणि पद दर्शवतात.

२. धर्म अथवा कर्ता, अर्थ अथवा कर्म, काम अथवा क्रिया आणि मोक्ष अथवा पद यांचे विशिष्ट  उद्देश अथवा हेतु दाखविण्याचें समभुज त्रिकोण हे साधन आहे.

३. कोणत्याही स्थानापासून असा त्रिकोण काढिला असतां तो ज्या स्थानास जाऊन मिळेल तीं स्थानें त्या त्रिकोणाचे हेतु असतात. त्यांतील पहिला हेतु ऐहिक असतो व दुसरा पारमार्थिक असतो. 

या नियमांनुसार “धर्म, कर्ता अववा लग्न ” या स्थानापासून असा एक त्रिकोण काढला असतां तो कुंडलीतील ५ वे स्थान व ९ वे स्थान यांना जाऊन मिळेल व त्या स्थानांवरून ज्या बाबींचा विचार केला जातो त्या बाबीच त्या त्रिकोणाचे हेतु दाखवितात.

१. ५ वे स्थानावरून मुख्यतः संततीचा विचार करतात, त्या अर्थी मनुष्यजन्माचा ऐहिक हेतु संतति निर्माण करून वंश चालू ठेवणे हा आहे.

९ वे स्थानावरून धर्म, आत्मोन्नति अथवा ईश्वरोपासनेचा अनुभव या गोष्टींचा विचार मुख्यतः होत असल्यामुळे मनुष्यजन्माचा पारमार्थिक हेतु आत्मोन्नति करून शेवटीं मोक्ष मिळवावा असा आहे.

हा त्रिकोण कार्यापासून निघतो म्हणूनच याला मूळ त्रिकोण असें ज्योतिषशास्त्रात म्हटलें आहे हें लक्षांत येण्यासारखें आहे.

२. मनुष्य सदोदित कर्म करीत असतो त्याचेंही दोनच हेतु आहेत आणि ते हेतु समजण्यासाठी अर्थ त्रिकोण. कर्म अथवा १० वे स्थानापासून एक त्रिकोण काढला पाहिजे. तो त्रिकोण २ रे स्थान ज्याला धनस्थान म्हणतात त्या स्थानास आणि ६ वे स्थान अथवा रिपुस्थानास जाऊन मिळेल. धनस्थानावरून धनाचा अथवा मुख्यतः मोबदल्याचा विचार होतो म्हणून कर्म करण्याला ऐहिक हेतु त्या कर्माचा कांहीं तरी मोबदला मिळाला पाहिजे असा आहे मग तो द्रव्यद्वारा मिळो अथवा अन्य तर्हेने मिळो; व  ६ वे स्थानावरून वासनांचा अथवा षड्रिपूंचा (शत्रूचा) विचार होत असल्यामुळे कर्माचा पारमार्थिक हेतु, वासनांवर अथवा षड्रिपूंवर ताबा राहिला पाहिजे असा आहे. या त्रिकोणास कर्म अथवा अर्थ त्रिकोण असें म्हणतात.

३. गृहस्थाश्रम प्राप्त होण्यास विवाह हा केला पाहिजे हें खरें, पण असा विवाह करण्याचे हेतु माहीत असणें हें अत्यावश्यक आहे. ते हेतु समजण्यास काम, जाया अथवा ७ वे स्थान यापासून एक त्रिकोण काढला असतां तो ११ वे अथवा लाभस्थानास आणि ३ रे अथवा पुरुषार्थाचे स्थानास जाऊन मिळेल. ११ वे स्थानावरून मुख्यतः समाजाचा आणि नीतीचा विचार होतो आणि त्यावरून विवाह करण्याचा ऐहिक हेतु वधूस वरण्यांत अधिकांत अधिक समाजाचा संबंध यावा व वधुवरांच्या नैतिक वर्तनास जास्तीत जास्त अवसर मिळावा असा आहे. ३ रे स्थानावरून पुरुषार्थाचा, मग तो प्रापंचिक असो अथवा पारमाथिक असो, विचार होत असल्यामुळे विवाह करण्याचा पारमार्थिक हेतु त्या वधूनें वराच्या पुरुषार्थात भर घालावी असा आहे. या त्रिकोणास काम त्रिकोण असें म्हणतात.

४. शेवटीं उरलेला जो त्रिकोण त्याला लय अथवा मोक्ष त्रिकोण असें म्हणतात. हा त्रिकोण “मोक्ष” “निष्काम कर्म’ अथवा ४ थे स्थानापासून निघतो व तो ८ वे अथवा मृत्यु अथवा परोपकार या स्थानास आणि १२ वे स्थानास म्हणजेच व्यय अथवा मर्यादा या स्थानास जाऊन मिळतो. या त्रिकोणाचा ऐहिक हेतु मृत्यूस टाळावें असा आहे व पारमार्थिक हेतु मोक्ष मिळवून पुढच्या जन्म-मरणांतून सुटका करून घ्यावी असा आहे.

अशा या चार त्रिकोणांस एकूण १२ कोंपरे आहेत आणि म्हणूनच कुडलीत १२ भाव अथवा स्थानें आहेत. अशाप्रकारे या ब्रह्मांडाचे चलन वलन चार मूलाधार, ८ हेतु, ४ तत्त्वें, ३ गुण, ३ स्थिति आणि ३ अवस्था यांवरच चालले आहे. पिंडाचाही व्यापार तद्वतच चालू असणार हे उघड आहे.

या ब्रह्मांडाचे ७ विभाग आहेत त्यास सप्तपाताळ असें म्हणतात. अशा सात विभागांचे जे ७ स्वामी आहेत, त्यांना ग्रह असें म्हणतात आणि म्हणूनच सूर्यापासून शनीपर्यंत सातच ग्रह आहेत. या प्रत्येक पाताळास अथवा प्रत्येक ग्रहास ब्रह्मांडाप्रमाणेंच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार मूलाधार आहेत.

ही १२ भावांची कुंडली दिली आहे तिलाच कालपुरुषाची कुंडली असें म्हणतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

देव देऊळ मूर्ती प्रतीके भावार्थ आणि उपासना


विषय : देव देऊळ मूर्ती प्रतीके भावार्थ आणि उपासना

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : हिंदू संस्कृती 

नमस्कार,

आज मि एका वेगळ्या विषयावर लिहिणार आहे. जगात दोन प्रकारचे लोक साधारणपणे आढळतात. धार्मिक, श्रद्धाळू व दुसरे अश्रद्ध विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन ठेवणारे. अर्थात या दोन्हीचे सोयीने मिश्रण करणारे लोकसुद्धा आहेतच. काहीवेळेस तथाकथित विज्ञाननिष्ठ ज्या वेळेस इतर लोक मंदिरात जाणा-या भक्तांची चेष्टा करत असतात व सांगत असतात की, तुमचा देव जर सर्व व्यापी आहे, तर मग त्यासाठी त्याला मूर्तीत किंवा देवळात शोधण्याची काय गरज आहे. देव सर्वव्यापक असल्याचे विधान वापरायचे, तर इतरत्र असल्या प्रमाणे तो ईश्वर देवळात, मूर्तीत सुद्धा असणारच हा मुद्दा ती माणसे विसरतात. केवळ या कारणास्तव, दगडाच्या मूर्तीची केवळ पूजा करीत नसून त्यातल्या ईश्वराच्या अस्तित्वाची, जो त्या स्वरूपात आहे, त्याची पूजा करतो. मूर्ति व देऊळ हे आमच्या मनाला ईश्वराच्या अस्तित्वाची जागरूकता आणून देण्यास मदत करीत असतात.

अनेकजन आपल्या कुटुंबाचा फोटो त्यांच्या ऑफिस मध्ये किंवा पाकिटात ठेवतात, ते त्या प्रिय व्यक्तीना विसरतात म्हणून नव्हे. तर त्यांना त्या फोटोमुळे आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम जागृत होत असते व त्यांच्या प्रति आपुलकीचा भाव मनात येत असतो.

कांही लोक एखादा वापरलेल्या वस्त्राचा तुकडा जपून ठेवतात. तसे केल्यांने, त्यांना स्वतःच्या प्रिय असणा-या माणसांची आठवण व त्यांच्या प्रति असणारा जिव्हाळ्याचा व प्रेमाचा एक आनंद मिळत असतो इतरांना तो केवळ तुकडा आहे एवढेच वाटते. हा पण एका प्रकारे श्रद्धेचा व प्रेमाचाच भाग आहे.

एक गोष्ट तुम्हाला सांगतो-

एकदा स्वामी विवेकानंद एका नास्तिक राजाकडे गेले असतांना राजां त्यांना म्हणाला की मूर्ति पूजनात कांही अर्थ नसतो, कारण मूर्ति म्हणजे केवळ एखादा कागद किंवा दगड आहे असे माझे मत आहे. त्या राजाच्या राजवाड्यात बरीचशी वडिलोपार्जित चित्रे भिंतीवर अडकवलेली होती. स्वामी विवेकानंदांनी एका मंत्र्याला त्या राजाच्या आजोबाचे चित्र काढून जमोनीवर ठेवण्यास सांगितले. नंतर ते चित्र तुडविण्यास सांगून त्यावर धुंकण्यास सांगताच, तो राजा भडकला व ओरडला, “हे काय करण्यास आपण सांगत आहात ?”

स्वामी विवेकानंद म्हणाले, मी त्यास त्या चित्रावर युंकण्यास सांगितले.”

तेव्हां तो राजा उद्वेगाने म्हणाला, आपण तसे कसे म्हणता? आपण माझ्या आजोबांचा असा अपमान करत आहात.

स्वामी विवेकानंद शांतपणे म्हणाले, त्यात काय चूक आहे माझी? हे तर केवळ एक चित्र आहे, ते आपले आजोबा तर नाहीत ना?

त्याच क्षणी राजाच्या डोक्यात प्रकाश पडला व त्यांनी तात्काळ स्वामी विवेकानंदांचे पाय धरले व क्षमा मागितली आणि मूर्ति पूजनाचा गूढार्थ ध्यानात आणून दिल्याचे आभार मानले.

सामान्यतः एखाद्याच्या नुसत्या फोटोला किंमत नसते, पण वर दिलेल्या उदाहरणा प्रमाणे तो फोटो केवळ एक फोटोच नसून, त्या राजघराण्याची परंपरा व प्रतिष्ठा दर्शविणारा एक महत्त्वाचा भाग होता. त्या राजाच्या सत्तेचे व राजघराण्याच्या संस्थानाचे, ते चित्र, हे एक साकार प्रतीक होते.

सांगण्याचा उद्देश एवढाच की, इतरांना एखादी वस्तू कितीही गौण वाटली तरी, तीच वस्तू दुस-या व्यक्तीस अगदी निराळा अनुभव व भाव उत्पन्न करण्याचे सामर्थ्य ठेवू शकते. त्याच प्रमाणे वैदिक धर्मात देखील, भौतिक जगांतल्या प्रमाणे मूर्ति-पूजनांत, भक्ताला ती केवळ दगडाची मूर्तिच वाटत नसून, त्यांतून त्या भक्ताला त्याच्या इष्ट देवाच्या अस्तित्वाची जाणीव व अनुभव येत असतो. असा हा अनुभव एकाएकी होत नसून, निरंतर पूजनाने मन इष्टदेवावर एकाग्र केल्यांने, व त्यावर अगाध प्रेम केल्यांने, योग्य वेळ आल्यावर होतो. हे लिहित असताना मला नाशिकचे होराभूषण मनीष गोसावी सरांची आठवण झाली. मध्यंतरी एका झूम मीटिंग मध्ये एकत्र आलो असताना ते बोलताना म्हणाले होते की, ग्रह प्रत्यक्ष बोलतात कुंडली तपासताना, अन्यथा स्थाने आणि नुसती आकडेमोड यातच अडकून पडतो. किती हि एकरूपता त्या ग्रह देवतांशी.

सारांश, देवळामुळे व त्यातल्या मूर्तिमुळे आपल्या अंतःकरणात देवाच्या अस्तित्वा बद्दल भाव निर्माण होत असतात. हे सर्व जरी बाह्य असले, तरी ज्ञान व जागरुकता आपल्या अंतरंगात होत असते. ईश्वराच्या अस्तित्वाचा हा ज्ञानबोध, एका स्वरुपात व एका स्थळी पाहणे हा एक असा अभ्यास आहे, ज्यांने आपले मन पवित्र होते. आणि मग तशा पवित्र व तयार झालेल्या मनात परम सत्यानेच सर्व ब्रह्मांड व्यापलेले आहे, व ते म्हणजेच मी असे आत्मज्ञान विकसित होते.

मंदिराची सांस्कृतिक भूमिका

हिन्दू धर्मात देवस्थानाचे कार्य केवळ प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक अध्यात्मिक गरजा पुरविणे, एवढेच नसून आणखीही जास्त आहे. पूर्वी देवस्थानात धार्मिक शिक्षण, प्रवचने, वार्षिक उत्सव ई. होत असत आणि ते संगीत व इतर कलांचे क्षेत्र देखील मानले जात हा ईश्वराच्या पूजेचाच भाग आहे, असे जाणून कित्येक कलाकार आपल्या चित्रकलेचे, नृत्याचे किंवा संगीताचे अविष्कार  देवळात सादर करीत असत. देवस्थानात सर्व एकत्र येऊन आपले व्यक्तिगत, अध्यात्मिक व सांस्कृतिक अनुभव परस्परांना सांगत आणि एकूण संस्कृतीच्या उन्नतीचा व अभिवृद्धीचा आणि लोक-कल्याणाचा विचार विनिमय करत.

आता देवळात फारशी प्रवचने होत नसल्याने, कर्मकाण्डाच्या मागे काय अर्थ आहे हे जाणून न घेताच लोक केवळ कर्मकाण्डातल्या विधि करण्यातच फार गुंतत असतात. आपली देवळे पुन्हा पूर्ववत व्हावयास हवीत. तिथे सर्वांनी एकत्र येऊन आपला इतिहास व आपली संस्कृति शिकावी व आपला धर्म व तत्त्वज्ञान शिकावे म्हणजेच देवळाचा खरा उद्देश पूर्ण होईल.

देवळाचा आणखी एक गूढ गर्भितार्य आहे, जो अनेक जणांना माहित नसतो. असे म्हणतात की देवळाची बांधणी, माणसाच्या शरिरास अनुसरून असते.

जसे शरिरात एक हृदय (मन किंवा बुद्धि) आहे, ज्यांत देव सामावलेला आहे, त्याचप्रमाणे देवस्थानाच्या आवारातल्या अगदी आंतल्या भागात, गर्भ गृहात, ईश्वराचे वास्तव्य असते. जणूं माणसाचे शरीर म्हणजे देवळाचे आवार, गर्भ गृह म्हणजे त्याचे हृदय, ज्यांत ईश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव आम्हास येत असतो.

दक्षिण भारतातल्या देवळात प्रामुख्याने, देवस्थानाचा सबंध बहिर्मुख आवार अतिशय विस्तीर्ण असतो, परंतु देवाची मूर्ति ज्या ठिकाणी असते ती जागा मात्र फारशी मोठी नसते. गर्भ गृहात बहुधा अंधार असतो आणि ज्या वेळेस दर्शनाकरिता तुम्ही जाता, तेव्हां तिथले पुरोहित दिव्याच्या उजेडांत आणि कापुराच्या प्रकाशात ईश्वराची मूर्ति तुम्हाला दाखवतात.

याचे तात्पर्य असे की, जे ब्रह्म (परमसत्य), तो ईश्वर जो माझ्यात हृदयस्थ आहे, तो अज्ञानाच्या अंधकाराने पूर्णतया झाकला गेला आहे आणि त्याचे अस्तित्व अजून मी जाणून घेतलेले नाही किंवा बघितले नाही. कापूराची आरती पुरोहिताने दाखविली म्हणजे केवळ एक सुगंधाचा गोळा, जो जळाल्यानंतर कांहीच बघण्याचे उरत नाही. (सुगंधाला वास किंवा वासना असे म्हणतात.) तो गंध आपल्या मनातल्या दुर्विचारांना व दुर्गुणांना दर्शवितो आमच्यातल्या एकत्रित झालेल्या वासना म्हणजे अहंकार, जो इच्छा, राग व द्वेष या रूपाने अवतरित होत असतो. देवळात कापूर जाळणे म्हणजे आपल्या हृदयातल्या ज्ञानाग्निला उज्वलित करून अहंकाराला पूर्णपणे जाळणे असे आहे. त्या ज्ञानाच्या उजेडात मग “परमात्म्याचे दर्शन” होते, जो आमच्या हृदयाचा स्वामी आहे.

देवपूजा झाल्यानंतर, कापूराची आरती जेव्हां सर्वांच्या पुढे नेतात, तेव्हां सर्व त्या ज्योतीवर हात ठेवून, ते डोळ्यास लावतात. असे करणे म्हणजे ज्या ज्योतिच्या उजेडात आम्ही ईश्वरास पाहिले, ती ज्योत सदैव आपल्या डोळ्यापुढे असावी असा संदर्भ आहे कारण जे डोळ्यास दिसते, ते हृदयात जाते. तेव्हां, त्या संदर्भाने, जेव्हां आम्ही निर्मित झालेल्या जगास पाहतो, तेंव्हां सर्वत्र ईश्वर रूप झालेले आहे या नवीन दृष्टीने पाहतो.

ईशावास्य उपनिषदातल्या प्रसिद्ध असलेल्या पहिल्या श्लोकातून हाच उपदेश देण्यात येतो –

” ईशावास्यम् इदम् सर्वम्”

म्हणजे संपूर्ण विश्व ज्याने व्यापित आहे किंबहुना जे सर्व अस्तित्वात आहे ते सर्व ईश्वराचेच स्वरूप आहे.

पुढ्यात आलेल्या आरतीच्या थाळीत दान अर्पण करण्याचा सुद्धा एक संदर्भ आहे. तो असा की विश्वदर्शनाच्या भव्यतेची दृष्टी जेव्हां आम्हाला लाभते, तेंव्हां त्या मानानेच आम्ही पण उदार व्हावे. आरतीत घालतांना संकुचितपणा करू नये. कांही लोक मात्र कमीतकमी घालण्यास खिसे तपासतात किंवा थाळीतून मोड काढून घेण्यासदेखील कमी करत नाहीत. देवळात दिलेले पैसे जसे समाज कल्याणाकरिता असतात, त्याचप्रमाणे भगवंताचे अस्तित्वच सर्वत्र असल्याचा ज्यावेळेस आपण अनुभव घेतो, तेंव्हां आपली श्रीमंती व संपत्ति देखील आपण इतरांच्या समवेत भोगू शकतो.

पूजेच्या सर्वात शेवटी ईश्वरास दाखवलेला नैवेद्य “प्रसाद” म्हणून वाटण्यात येतो. सर्व साधारण, प्रसाद म्हणजे खाण्याचा असतो, एवढेच आम्हाला माहित असते. पण प्रसाद याचा खरा अर्थ म्हणजे पवित्रता, आनंद, समाधान, उत्साह व शांति असा आहे. हे सर्व पावणे म्हणजेच पूजेच्या वेळेस सर्वथा आपले मन भगवंताशी एकरूपतेच्या अनुभूतीचा लाभ घेणे. आम्ही जेव्हां अत्यंत प्रेमाने आणि भक्तिभावाने केलेल्या दैनिक पूजे नंतर ईश्वराच्या मूर्तीला न्याहाळतो, तेव्हां आपल्या हृदयात समाधान व शांति अनुभवणे, हाच खरा प्रसाद आहे. पण साधारणतः आम्ही पूजा जरी केली तरी, घाई-गडबडीत एक दोन मिनिटात तो संपवितो व झाली एकदाची असे म्हणतो. त्या कारणाने शांति व समाधानाचा प्रसाद आम्ही अनुभवू शकत नाही कारण देवाशी भावपूर्ण एकाग्र मन कसे करावे तेच ध्यानात घेत नाही.

आतापर्यंत देवळाचा व देवपूजेचा गर्भित अर्थ काय असतो एवढे जरी समजले, तरी पुष्कळ चांगली गोष्ट आहे.

देवाच्या प्रतीकांचीसुद्धा एक निराळीच भाषा आहे, आणि ती पूर्णपणे समजण्यास आपल्याला वेदांचा पुष्कळ सखोल अभ्यास करावा लागतो.

उदा. भगवान विष्णूंना पद्मनाभं असेही म्हटले आहे. भगवान विष्णूंच्या नाभीतून कमळाचे फूल येते असे आपण अनेक चित्रातून पाहत असतो. संस्कृत भाषेत “क” याचा अर्थ पाणी, आनंद व ब्रह्म” आणि “मल” म्हणजे अस्वच्छ किंवा घाण. “कमल” याचा एक अर्थ पाण्यातली घाण असा देखील होतो. पण इये “मल ” म्हणजे आपल्या मधून जी अस्वच्छता किंवा घाण येते, जसा घाम हा आपल्या मधूनच येतो, बाहेरून तो येत नाही, त्याच प्रमाणे, या प्रतीकात्मक भाषेत “ब्रह्म ” यातून जो मल बाहेर आला तो या कमळाच्या रूपाने आला. याचा अर्थ हा की श्रेष्ठ, उदात्त, अनंत ब्रह्मातून, “मी” हा सर्व प्रथम असलेला मनोविकार उगम पावला.

जेव्हां “मी” गाढ निद्रेत असतो, तेव्हां ती अव्यक्त अवस्या असते, ज्यांत सृष्टि किंवा जगत् या दोन्ही स्थिति अवगत नसतात. परंतु ज्या क्षणी जाग येते, तेव्हां पहिला विचार “मी” या जाणिवेचा होतो. जर आपण या अहंकाराचा मळ साफ केला तर ईश्वर प्राप्ती होईल.

ही प्रतीकात्मक भाषा आपल्याला असे दर्शविते की, आपण भगवंताच्या (ब्रह्माच्या) निरनिराळ्या स्वरूपावर त्याचा भावार्थ जाणून जर ध्यान केले, तर या बाह्य स्वरूपातून आपल्याला त्याचे श्रेयस आंतरिक स्वरूप कळेल. नाम व रूपाच्या पलिकडे असलेले ब्रह्मतत्त्व जाणून घेता येईल व संपूर्ण सृष्टीच्या स्थिति लयाचे ज्ञान होईल. यावरून हे पण उमजेल की परब्रह्म जरी विश्वरूपाने दृश्य जगात प्रगट होत असले, तरी ते उपाधिरहित चैतन्य स्वस्वरूपात निरंतर स्थित असते. यालाच खरे ध्यान म्हणतात.

तत्काळ जरी आपल्याला प्रतीकांच्या सूक्ष्म व उदात्त भावार्थाचे ज्ञान नसले, तरी मूर्ति पूजनाने कां असेना सुरुवात करावी. त्यावर मन एकाग्र करून प्रेमभाव जागृत करावा. ध्यान श्लोकावर आधारित असा एका मूर्तीचा हा भावार्थ आहे. हिन्दू धर्मात प्रत्येक मूर्तीचे असे ध्यान श्लोक आहेत. ज्या वेळेस त्या मूर्तिच्या मागचा अपूर्व भावार्थ जाणून आपण त्याची पूजा व त्यावर ध्यान करतो, तेंव्हां एक निराळाच अलौकिक अनुभव आपल्याला येतो.

जशी विद्युतशक्ति बॅटरीतून विजेच्या तारेत वाहते व त्यामुळे मोटार गाडी सुरु करता येते, तसे मंत्र विशिष्ट पद्धतीने म्हटल्याने, दैवी मंत्र शक्ति आपल्याला विशिष्ट निर्धारित परिणामासाठी प्रभावित करते. ध्वनिलहरीचा परिणाम आपल्या मनावर व शरिरावर देखील होतो.

उदा. एक पुरोहित, गृहस्थाश्रमो लोकांच्या घरी पूजा करीत असे व नंतर त्यांनी दिलेले गोडाचे सुग्रण जेवण जेवीत असे. त्यास मधूमेहाची व्याधि असूनही गोड पदार्थ खाण्याची अतिशय आवड होती. त्यास सूर्य सूक्त वैदिक मंत्र माहित होते व तो घरी आल्यावर ते म्हणत असे. ते मंत्र कांही विशिष्टवेळा म्हटल्याने त्याच्या शरिरातून घाम निघत असे. जेव्हां तो डॉक्टरकडे तपासणी करण्यास गेला तेंव्हां गोड खाण्याने कांहीही अपाय झाल्याचे डॉक्टरना आढळले नाही. जेव्हां वैदिक मंत्राचा पूर्ण अर्थ अजाणता जरी कोणी म्हटले तरी, त्याचा सपरिणाम शरिरावर व मनावर’ होत असतो. वैदिक मंत्रांचा असा विलक्षण प्रभाव आहे ।

या सर्व गोष्टींचे ज्ञान आपल्या ऋषी मुनींनी आत्मसात केले होते. ज्योतिषी म्हणूनच तुमच्या  प्रारब्ध स्वरूप जन्म कुंडलीचा अभ्यास करून तुम्हाला योग्य असणारी उपासना, प्रतीके, यंत्रे, मंत्र, तंत्र ई. सुचवत असतो. ते उपाय सश्रद्ध व एकाग्र भावाने व सकारात्मकतेने केले तर त्याचा नक्कीच उपयोग होतो.

अगदीच काही नाही तर तुमचे कुलदैवत अथवा भावपूर्ण श्रद्धा असणाऱ्या देवाची नित्य उपासना दररोज केली, दर्शन घेतले तरी त्याचा चांगला परिणाम दिसून येईल.

आपल्या माहितीसाठी येथे प्रत्येक जन्म नक्षत्रासाठी नित्य उपासना मंत्र देत आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

धनिष्ठा नक्षत्र विचार


विषय : धनिष्ठा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण धनिष्ठा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

धनिष्ठा हे नक्षत्र चक्रातील २३ वे क्रमांकाचे नक्षत्र असून या नक्षत्राला इंग्रजीमध्ये ‘आल्फा डेल्फिनी’ म्हणतात. या नक्षत्राचे पहिले २ चरण मकर राशीत व शेवटचे २ चरण कुंभ राशीत असल्याने हे द्विपाद नक्षत्र आहे. धनिष्ठा नक्षत्र हे अंधलोचन, ऊर्ध्वमुख व चलरूप आहे. नक्षत्र स्वामी मंगळ, राशी स्वामी शनी व दैवत वसु असल्याने या नक्षत्रामध्ये मंगळाचा पराक्रम व निश्चयीपणा, मकरेच्या शनीची चिकाटी व कष्ट करण्याची वृत्ती, कुंभेच्या शनीची स्थिरता व बुद्धीप्रगल्भता व वसु देवतेची परोपकारी वृत्ती यांचा सुंदर मिलाफ आढळून येतो. या नक्षत्राच्या चारही चरणांवर अनुक्रमे रवि, बुध, शुक्र व मंगळाचे स्वामित्व आहे. धनिष्ठा या शब्दाचा अर्थ समशीतोष्ण म्हणजे ऋतुमानाचे ज्ञान देणारा असा आहे. फार प्राचीन काळी संपातबिदू या नक्षत्रामध्ये होता. धनिष्ठा नक्षत्राची आकृती चक्राकृती किवा मृदुंगा सारखी भासते. या नक्षत्रामध्ये एकूण ४ तारे असून ते जरासे काटेरी, तेजस्वी आणि पांढरट रंगाचे आहेत. भाद्रपद महिन्यात धनिष्ठा नक्षत्र रात्रभर आकाशात दिसते.

हे नक्षत्र राक्षसगणी असल्याने त्यात पराक्रम असला तरी, साधारण शुभत्व असून तमोगुण  आढळतात.

धनिष्ठा नक्षत्रावर जन्मणारे जातक चंचल, निलाजरे, गायन वादनाचे शौकीन, छानछोकी, खादाड, निर्दयी, साहसी, अविचारी, मोठमोठ्या उलाढाली करणारे, थोडे स्वार्थी, लोभी, मात्र शूर, पराक्रमी, करारी, कर्तबगारी व कर्तृत्ववान आढळतात.

धनिष्ठा नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातक पुरुषांचा बांधा मध्यम, उंच, थोडा अप्रमाणबद्ध, हाडे मोठी, रुंद, सांध्यातील हाडे जास्त मोठी दिसणारी, जरा अरुंद कपाळ, निमुळती हनवटी, गालाची हाडे जरा वर आलेली, काटक, चिवट, चांगली शारीरिक ऊर्जा व रोगप्रतिकार शक्ती, थोडा प्रौढ चेहरा, उदासीची छटा, जरा स्वार्थी स्वभाव आढळत्तात. हे जातक निश्चयी, शूर, पराक्रमी, कर्तबगार, श्रमिक, कष्टाळू, मेहनती, अंग मोडून काम करणारे, चिकित्सक, चौकस, संशोधक, दीर्घोद्योगी, कोणतेही काम शेवटपर्यंत तडीस नेणारे, प्रतिज्ञा करणारे, किचकट कामाची आवड असणारे, अल्प संयमी व किरकिर करणारे असतात.

धनिष्ठा स्त्री जातकांना हे नक्षत्र साधारण आहे. या नक्षत्राकडे सौंदर्य, रूप व कला, कोमलपणा, नाजूकपणा, हळूवारपणा, संगोपन करण्याची वृत्ती हे स्त्री गुण साधारण असतात. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रियांचा बांधा कणखर, काटक व जरा हाडाळ व थोडा अप्रमाणबद्ध आढळतो. चेहरा थोडा सुस्वरूप असला, तरी त्यावर प्रौढपणा व उदासी ची छटा दिसून येते. स्वभाव कष्टाळू, श्रमिक, संसारी, काटकसरी, कर्तव्यदक्ष, धार्मिक, बुद्धीवान व मेहनती, गरिबीतूनही काटकसरीने संसार करणारा, आज्ञाधारक व सेवावृत्तीचा आढळतो. अलंकार, उंची वस्त्र, आधुनिक फॅशन, दागदागिने यांचा फारसा हव्यास नसतो, पण नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा चांगला असते. 

धनिष्ठा नक्षत्र बुद्धीमत्ता, कर्तृत्व, अधिकारयोग यांना अनुकूल असते. या नक्षत्रावर जन्मणारे जातक स्वकर्तृत्वाने, हुषारीने व कर्तबगारीने श्रेष्ठपद प्राप्त केलेले आढळून येतात.

धनिष्ठा या नक्षत्राखाली बुद्धीमान तसेच कष्ट व कामकरी वर्गही आढळून येतो. या नक्षत्राखाली बँक किंवा खाजगी कंपनीत काम करणारे हिशोबनीस, कायदेपंडित, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट, सेल्स टॅक्स व इन्कमटॅक्सचे काम करणारा वर्ग, कारखानदार, कंत्राटदार, उत्पादक, वितरक, शारीरिक श्रम व कष्ट करणारा मजूरवर्ग, घाऊक व्यापारी, धान्य, तेल, तंबाखू, कोळसा, लोखंड, लोकर यांचे व्यापारी, खाजगी औद्योगिक क्षेत्रात काम करणारा वर्ग हे सर्व येतात.

धनिष्ठा नक्षत्री रवी आरोग्याच्या’ दृष्टीने साधारण चांगला असतो. मेहनतीच्या कामाला चांगला, पण थोडासा अविचार, निर्दयी, मतलबी व सारासार विचार करणारा नसतो.

धनिष्ठा नक्षत्री चंद्र असता शूर, धाडसी, संपन्न, दाता. निश्चयी, अलौ केक, बुद्धीमान, मेहनती, भोजनप्रिय, धनसंचय करणारा असतो.

धनिष्ठा नक्षत्र मंगळाचे स्वतःचे नक्षत्र असल्याने व या नक्षत्रात मंगळ उच्च होत असल्याने फार चांगले, शरीरप्रकृती मध्यम पण काटक, चपळ, मजबूत, सशक्त, शूर, धाडसी, पराक्रमी, पण थोडा हळू गतीचा, मुत्सद्दी, कर्तबगार, इंजिनिअर, कारखानदार अथवा आर्किटेक्ट यांना चांगला, मात्र थोडा खादाड, निर्दय व छानछोकीची आवड असणारा असतो.

धनिष्ठा नक्षत्री बुध असता बांधा जरा अप्रमाणबद्ध पण चपळ, हुशार, बुद्धीमान, चुणचुणीत असतो.

धनिष्ठा नक्षत्री असलेल्या गुरूसाठी हे नक्षत्र साधारण आहे. शरीरप्रकृतीच्या दृष्टीने मध्यम, बुद्धी बरी, पण पैशाचे दृष्टीने साधारण आहे. जातक थोडा दुराग्रही, स्वार्थी व द्रव्याच्या उलाढाली करणारा आढळतो.

धनिष्ठा नक्षत्री शुक्र असता सुस्वरूप, पण बांधा अप्रमांणशीर, पुढचे दात थोडे मोठे, एका रेषेत नाही. थोडा हाडाळ, मात्र छानछोकी, रंगेल, थोडी खर्चिक, विषयसत्ता, स्वार्थी, आर्किटेक्ट व व्यापार यांच्या दृष्टीने बरा असतो.

धनिष्ठा नक्षत्री शनी असता मजबूत, सशक्त बांधा आणि लांब व रुंद हाडांचा, किंचित थोराड, मिशा कल्ले राखणरा, तसा हुशार, कष्टाळू, मेहनती, धडपड्या, अंगमेहनती, कर्तृत्ववान, निश्चयी व चिकाटीकारक पण जरा संयमी, स्वार्थी, किरकिरा व त्रासिक स्वभावाचा व आतल्या गाठीचा आढळतो. मात्र हा शनी कारखानदार, उत्पादक, घाऊक व्यापारी, स्वतंत्र व्यवसायाची आवड देतो.

धनिष्ठा नक्षत्री राहू असता हाडापेराने मजबूत, काटक, सशक्त, पीळदार शरीर, चपळ, शूर, धाडसी, कर्तृत्ववान, मेहनती, थोडाफार अधिकारभोग, आर्किटेक्टला चांगला,

धनिष्ठा नक्षत्री केतूला साधारण असतो. फक्त तब्येतीच्या दृष्टीने चांगला, पण बुद्धी व धनाच्या बाबतीत अनुकूल नाही. थोडाफार धार्मिक व सत्वगुणी असेल.

धनिष्ठा नक्षत्री हर्षल असता बुद्धीला चांगला, हुशार, संशोधक, उत्तम कल्पनाशक्ती, विजेच्या सहाय्याने चालणारी यंत्रे व कारखाने तसेच अधिकारयोग व दर्जा यांना चांगला. तब्येत मध्यम पण थोडा अविचारी, लहरी, अस्थिर मनाचा, उलाढाल्या करणारा आढळतो.

धनिष्ठा नक्षत्री नेपच्यून साधारण असतो. संशोधक वृत्तीचे नक्षत्र असल्याने दैविकविद्या किंवा चमत्कार वगैरेला वाव नसतो. जरा उदासीन प्रवृत्ती असते. मात्र धार्मिक व आध्यात्मिक गोष्टींना बरा.

धनिष्ठा नक्षत्री या नक्षत्राखाली होणारे आजार जरा दाहक व मुरणारे असतात. हे जातक तशा साध्या तापाने किवा सर्दीपडशाने आजारी पडलेले दिसून येत नाहीत. रोग प्रतिकारशक्ती बरी असते. मात्र कापणे, भाजणे, हाड मोडणे, खरचटणे, धडपडणे, फार गुडघे दुखणे किवा संधिवात असला तरी कळा मारणे व सूज दिसते. त्वचेचे रोग, मुखाचे रोग फार होतात. काहीवेळा विलंबीत डांग्या खोकला, दमा यांचा फार त्रास होतो. शिरा सरकणे, सुजणे, अपघात यांची संभावना असते.

धनिष्ठा नक्षत्री जन्मणाऱ्या जातकांचे हस्ताक्षर जरा बारीक, गिचमीड व थोडे जवळजवळ लिहिलेले असते. मात्र अक्षर एका रेषेत असते.

धनिष्ठा नक्षत्र अंधलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्या, तर त्या थोड्या प्रयत्नाने सापडू शकतात. वस्तू पूर्व दिशेला गेलेली असते.

धनिष्ठा नक्षत्र साठी रत्न मंगळाचे पोवळे अथवा शनीचा नीलमणी असला तरी पोवळे जास्त योग्य वाटते. अंकशास्त्राप्रमाणे या नक्षत्रावर ९ या अंकाचा किवा या अंकाचे वर्चस्व आहे. तरी ९ अंक योग्य वाटतो.

धनिष्ठा नक्षत्र राक्षसगणी असले तरी मौंजी, बारसे, पालकारोहण अशा शुभकार्याला चांगले. तर नारदमान्य विवाहालाही ते योग्य आहे. हे नक्षत्र घरे, देवालये, विहिरी खणणे, गलबत बांधण्यास आरंभ करणे, राज्याभिषेक, वहान घेणे व त्यात बसणे, नवीन वस्त्रालंकार करणे, मुलांचे नाक-कान टोचणे, बी पेरणे, नृत्यारंभ, राजदर्शन, प्रथम स्त्री- समागम, मंचकारोहण, विद्यारंभ, गांधर्वविवाह, दत्तक घेणे, प्रयाण, शिक्का सुरू करणे, बाळंतीणीस स्नान घालणे अशा कार्यांना उत्तम असते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)