Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

ॐकार स्वरुपा तुज नमो


विषय : ॐकार स्वरूपा तुज नमो

संकलन व मांडणी : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : दैवत शास्त्र व ओम हा गुरु (स्वरूप बोध)

नमस्कार,

हिंदू संस्कृती हे वैदिक संस्कृती असल्याने आपल्याला अनेक पिढ्यांचा धार्मिक वारसा लाभला आहे. त्यामुळे आजच्या आधुनिक विज्ञान युगात व भौतिक सुखलालसेच्या दुनियेत देखील आस्तिकता टिकून आहे. आपण मनोभावे आपल्या प्रिय व श्रद्धास्थान असलेल्या देवाची आराधना करत असतो. हिंदू धर्मात अनेक देव मानलेले आहेत. गणपती हा एक प्रचंड लोकप्रिय देव. ज्याची महती देश विदेशात पोहोचली आहे.

निर्माण, संचालन व लय दर्शवणारे ॐकार हे जगाचे आदिकारण आहे, त्याची रचना अ, उ, म् व बिंदु आणि अनुच्चारित अर्धमात्रा यांचे संयोगाने झाली आहे. अ हा अविकृत स्वर, उ (ऊ) हा विकृत स्वर, म हा व्यंजनांचा अनुनासिकांचा (इ, ञ, न, म, ण) प्रतिनिधी आणि बिंदू हा शक्तियुक्त उच्चार. म्हणजेच अविकृत स्वर, विकृत स्वर, अनुनासिके आणि बिंदु व अनुस्वार या सर्व शब्दशक्तींचा एकत्रीकरण म्हणजे ॐ कार. हा शब्दांचा अविष्कार म्हणजेच अक्षरब्रह्म. आणि या अक्षरब्रह्माचे प्रकट रूप म्हणजे श्री गजानन.

जगातील सर्व विद्या या अक्षर प्रधान वा शब्द प्रधान असल्यामुळे गजानन ही विद्येची देवता ठरली; व बुद्धिचीही देवता ठरली. जोडाक्षर व गतिचा निदर्शक असे अक्षर ऋत् (गतिदर्शक व सार्वकालिक सत्य ऋतू ) आणि धी म्हणजे बुद्धि ऋ + धी = ऋद्धि यांचा पती म्हणून तो ऋद्धिपती असे हे गजाननाचे अक्षर ब्रह्मरुप आहे.

गणपतीचा टोकेरी दात म्हणजे स्वयंभू शस्त्र. कोठेही शिरण्याची त्याची क्षमता, तीक्ष्ण टोकदार बुद्धिचे प्रतीक आहे.

गणपती आणि हत्ती यांचा अन्योन्य संबंध घनिष्ठ आहे. शक्ती, बुद्धि, विशालत्त्व, स्थैर्य, संवेदनशीलता या गुणांनी हत्ती युक्त आहे. हत्ती श्री लक्ष्मीचाही प्रिय आहे. हत्तीच्या चीत्काराने लक्ष्मीचे आवाहन होते, लक्ष्मीची स्वतंत्र उपासना करावी लागत नाही. लक्ष्मीलाही उपासना शास्त्राप्रमाणे दूर्वा आणि बेल प्रिय आहे. लक्ष्मी-गणेश हेही उपास्य रूप प्रसिद्ध आहे. गजलक्ष्मीचा मद चढू नये म्हणून अंकुशही गरजेचा आहे.

काळ हा सतत चालणारा न थांबणारा आहे. नकळत, गतीशीलतेमुळे तो आयुष्य कुरतडतो याचे प्रतीक म्हणून मूषक. काही वेळा मूषक श्री गजाननाच्या हातातील मोदक खाताना दर्शवतात. श्री. गजाननाने आपल्याला कृपावंत होऊन मोद-क, मोद म्हणजे आनंद, पर्यायाने आनंदमय आयुष्य दिले आहे. पण कालरूपी मूषक ते आयुष्य कुरतडून कमी करत आहे. असा याचा मतितार्थ.

सामुद्रिक शास्त्राप्रमाणे शरीरलक्षणे वर्णन करताना लांब नाक हे प्रखर बुद्धिमत्तेचे लक्षण मानतात. सृष्टीतील सर्व सस्तन प्राण्यात सर्वांत जास्त लांब नाक हत्तीचे आहे. (सोंड किंवा शुंडा) म्हणून महाबुद्धि गणेशाला शुंडा आहे.

देवत्त्व दर्शवण्यासाठी चार भुजा आहेत.

श्री गजानन हा चारी वेदांचा समावेशक आहे.

ऋग मधील ग = ग

यजु मधील ज = जा

सामन् मधील न = न

अथर्वन् मधील न = न

= गजानन

दैवत शास्त्राप्रमाणे पांच महाभूतांपैकी पृथ्वी हे तत्त्व श्री गणपतीचे आहे. व त्याचे बीजाक्षर लं हे आहे. या अक्षराचा गुण गंध आहे. म्हणून गणपतींना गंध-सुगंध अतिशय प्रिय आहे. गजानन पृथ्वी तत्त्वाचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे तो मातीचा (पार्थिव) बनवतात. श्रावण हा शिवाचा महिना. त्यात कोटी लिंगार्चन करतात. ही लिंगे मातीचीच बनवतात. भाद्रपद हा गणपतीचाच महिना. त्यात गणपती पूजतात तो मातीचाच. अश्विन हा जगदंबेचा-पार्वतीचा महिना. त्यात घट स्थापना करतात. घटही मातीचाच.

एवंच शिव-पार्वती-गणपती ही पृथ्वी तत्त्वाची असल्यामुळे व गणपतीच्या प्रामुख्याने या तीनही महिन्यात पृथ्वी तत्त्वाचा उद्घोष होतो. पण शिव-पार्वतीचा आविष्कार गणपती या सगुण रूपाने असल्यामुळे गणपती हा पृथ्वीतत्त्वाचा मानला जातो. (ॐ या अक्षर ब्रम्हात ५ ही तत्वे समाविष्ट आहेत. चंद्रावरील बिंदू आकाशतत्व, अर्ध मातृका वायुतत्व, आकार मातृका भूमी तत्व उकार मातृका जलतत्व, मकार मातृका अग्नीतत्व दर्शवते.) 

गणपती हा निरनिराळ्या लोक समूहांचा (गणांचा) पति मानला गेला, व्रात्य, पिशाच्च, प्रगभ या गणांचा तो अधिपति मानला जातो.

गण म्हणजे मोजणे. तो गणक आहे. (गणक ऋषी).

गण म्हणजे काव्य रचनेतील गण, मात्रा, वृत्ते यांपैकी म्हणून तो काव्यशास्त्रदिकांचाही आधिपति झाला.

ॐ कार हे गणेशाचे ध्वनिचिन्ह रुपाचे प्रतीक आहे. ॐ कारातील वरील भाग मस्तकावर, त्याखाली उदर विस्तार, शुंडा ही नाद (ध्वनी) प्रतीक व मोदक किंवा लाडू हा बिंदू होय.

देवनागरीतील अक्षरे (१) दंडमय (अ, आ) (२) अर्ध दंडमय (इ, ई, ट, ठ-), (३) दंडरहित (उ, ऊ) व सुट्या दंडाचे (ग, ण, श) यापैकी फक्त तीन अक्षरे ग, ण, श हीच सुट्या दंडाची आहेत. ती अक्षरे जर एकत्र केली तरी गणेशाचे रूप तयार होते. त्यातही शुंडा, उदर व पाय हे रूप दृग्गोचर होते.

कोणत्याही दैवताची उपासना किंवा पूजा (१) योग, (२) भोग, (३) वीर आणि (४) अभिचारिक या चार स्वरूपांत होऊ शकते.

मोक्ष किंवा सिद्धिप्राप्तीसाठी योगस्वरुपात, सुख, समृद्धी, शांति, पुष्टि, तुष्टि यांसाठी भोग स्वरूपात, संकटाचे निवारण, आक्रमण करणे, आलेले आक्रमण परतवून लावणे, कठीण कामाला हात घालणे, अप्राप्य वस्तूंची प्राप्ती करुन घेणे अशा कामांसाठी वीर स्वरुपात. जारण, मारण, उच्चाटण, बलिदान, स्वतःची सुरक्षितता व दुसऱ्याचे खंडण या कामांसाठी अभिचारिक स्वरुपात दैवताची पूजा करता येते. 

आपल्या इच्छिताच्या प्राप्तीसाठी देवतेचे ते ते रूप पूजावे लागते.

योग अवस्थेतील रूप पद्यासनात ध्यानमुद्रा असलेले असते.

वीर अवस्थेत एका पायाची दुरमडलेली मांडी किंवा खुरमांडी घातलेली किंवा तो पाय लोंबता सोडून त्या मांडीवरुन दुसरा पाय पलिकडे घेतलेला असतो. या अवस्थेतील मूर्ति आपणास गणेशोत्सवात जास्त करुन दिसतात.

भोग स्वरुपात दैवताची शक्ती (किंवा पत्नी) मांडीवर मनुष्यरूपी बसलेली असून, एक हात वरद मुद्रेत व सोबतीला खाद्य किंवा पेय पात्र असते.

अभिचार स्वरूपात कार्याप्रमाणे रंग, रूप इत्यादी बदलतात. 

श्री गणपतीच्या उपासनेमध्ये डाव्या सोंडेचा व उजव्या सोंडेचा गणपती असे दोन प्रमुख भेद आहेत. त्यात उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा-उपासना-आराधना ही जनमानसात भिती उत्पन्न करणारी आहे. या मूर्तीचे म्हणजे पर्यायाने पूजेचे सोवळे-ओवळे अतिशय कडक मानले जाते. याचे कारण, ॐ गतिचक्राचे स्वरुप आहे. त्याचे उलटे प्रतिबिंब म्हणजे ओंकाराच्या या स्थितीत सोंडेचे वळण उजवीकडे आहे. साहजिकच गणेशाचे हे रुप उजव्या सोंडेचे ठरते. गणपती हे मांगल्य व विघ्नहर्तारूप आहे. आपण जर हे प्रतिबिंब म्हणजे लय कारक शिवरुप विचारात घेतले, तर ते अघोररूप आहे. या अवस्थेत शिवयोग्याने वेड्यासारखे केस वाढवणे, दाढी-नखे वाढवून हिंडणे, रुप यौवन संपन्न स्त्रियांबद्दल निंद्य विचार, आचार, स्वतःचा मानसिक असमतोल ई. बाबी त्याज्य मानली जातात. सामान्य माणसाला या गोष्टींचे पालन नाही करता आले तर, या गोष्टी त्याच्या लयास कारण होऊ शकतात. त्यामुळे हे या गणेश रुपा बाबतीत सावधानी बाळगणे इष्ट असते. पण जो नैतिक, धार्मिक आचरण ठेवतो. त्याला चिंता करण्याचे काही कारण नाही.

गणपतीचे अनेक संप्रदाय आहेत, त्यापैकी काही प्रचलित संप्रदाय येथे देत आहे.  

१) उच्छिष्ट गणपती : तांबडा रंग, चार हात.

२) महागणपती : तांबडा रंग, दहा हात, डाव्या मांडीवर आलिंगनार सिद्धी, हातात मद्यपात्र किंवा अमृतकुंभ, त्रिनेत्र

३) उर्ध्वगणपती : पिवळा रंग, सहा हात, डाव्या मांडीवर शक्ती.

४) पिंगल गणपती : पिंगट (काळपट पिवळा) रंग, सहा हात.

५) लक्ष्मी गणपती : शुभ्र रंग, दोन पत्नी, चार किंवा आठ हात, शक्तीचा रंग पिवळा व शक्तीच्या हातात कमळ.

६) शक्ती गणपती : चार हात, विवाहित, डाव्या मांडीवर शक्ती.

७) सिद्धी गणपती : दोन हात उजवीकडे व तीन डावीकडे असे पाच हात, कमळावर बसलेला.

कार्याचे स्वरुपानुसार देखील गणपतींची काही उपलब्ध वर्णने येथे देत आहे.

१) लक्ष्मी गणपती : श्री, ऐश्वर्य, वैभव यांच्या प्राप्तीसाठी.

२) क्षिप्र गणपती : त्वरित फलदायी, अल्पस्वल्प पण कठीण कामे होण्यासाठी.

३) सिद्ध गणपती : यश प्राप्तीसाठी.

४) शक्ती गणपती : बल आणि प्रभुत्व यांसाठी.

५) उच्छिष्ट गणपती: जारण, मारण, उच्चाटन यांसाठी (तांत्रिक) (पंचमकार युक्त उपासना)

६) एकाक्षर गणपती : आध्यात्मिक शांतीसाठी, केवळ उपासना.

७) चिंतामणी गणपती: चिंता, रोग, अस्वास्थ यांच्या निवारणासाठी.

८) कुमार गणपती : गुरुतत्त्व.

श्री सिद्धीविनायक

उजव्या सोंडेच्या गणपतीला सामान्यतः सिद्धीविनायक म्हणतात. सिद्धीविनायक चार हातांचा, त्रिनेत्र, गजमुख आणि त्याचा रंग माणकाप्रमाणे असतो. प्रात:काळी क्षितिजावर जेव्हा सूर्वस्चि प्रकटते तेव्हा ते अत्यंत तेजस्वी, किरण रहित आणि भडक तांबड्या रंगाचे असते. हा रंग गणपतीचा !

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला सिद्धी विनायकाचे व्रत करतात. पण सर्वच गणेश मूर्ती उजव्या सोंडच्या नसतात किंबहुना या दिवशी सर्वसामान्य माणसे ज्या पार्थिव (मातीच्या) गणपतीची पूजा करतात, तो उजव्या सोंडेचा नसतोच व जोडीला शक्ती किंवा सिद्धीही नसते. पण हे व्रत सिद्धीविनायक व्रत म्हणूनच केले जाते.

या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा गणपतीची २१ नांवे उच्चारुन २१ प्रकारची पत्री वाहतात.

(दैवतशास्त्राप्रमाणे व मंत्रशास्त्राप्रमाणे १, ३, ७, ११ आणि २१ हे महत्त्वाचे आहेत. त्यांपैकी श्रीगणेशाला १, ३, ७ आणि २१ हे अंक आहेत. त्यापैकी १, ३ आणि ७ हे अविभाज्य अंक आहेत व त्यांचा गुणाकार २१ आहे)

भविष्य पुराणात श्री सिद्धीविनायकाची पूजा पद्धत दिली आहे, ती अशी

मूर्तीचे स्वरूप आवडीप्रमाणे असावे. अशी मूर्ती बहुधा घरी असतेच पण उपलब्ध नसल्यास मूर्ती ध्यानात आणावी.

तिची पूजा पुढीलप्रमाणे करावी.

१) आवाहन, आसन व अर्घ्यसमर्पण करुन पंचामृत स्नान घालावे.

२) सर्व प्रदायनमः म्हणून २ तांबडी वस्त्रे वाहावीत. एक वस्त्र नेसूचे व एक उत्तरीय (पांघरण्यासाठी) असावे.

३) गणाध्यक्षाय नमः। म्हणून रक्तगंध वाहावे.

४) विनायकाय नमः म्हणून फुले वाहावीत.

५) उमासुताय नमः म्हणून उदबत्ती किंवा धूप ओवाळावा.

६) विघ्ननाशिने नमः म्हणून नैवेद्य समर्पण करावा. दक्षिणा व विडा वहावा.

७) पुढील नावांनी दुर्वायुग्मे (एकावेळी दोन दुर्वा) वाहावी.

गणाधिपाय नमः। उमापुत्राय नमः । अघनाशनाय नमः। एकदंताय नमः। इभवक्त्राय नमः। मूषक वाहनाय नमः। विनायकाय नमः। ईशपुत्राय नमः । सर्वसिद्धिप्रदायकाय नमः। कुमार गुरवे नमः।

८) गंध, फुले, अक्षता व तीन दूर्वा वाहाव्यात.

९) एक दूर्वा वरील सर्व नावे उच्चारुन वाहावी.

१०) नैवेद्याच्या २१ मोदकांपैकी १ गणपतीला, दहा मोदक ब्राह्मणाला द्यावे व दहा मोदक स्वतःसाठी ठेवावेत.

११) दोन तांबडी वस्त्रे गुंडाळलेली ही गणेश प्रतिमा (जर प्रत्यक्ष प्रतिमा) असेल तर गाणपत्य ब्राह्मणाला दान करावी किंवा स्वतः पूजेत ठेवावी.

शेवटी आपल्या सर्वांच्या मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करो, गणपती बाप्पा तुमच्या आमच्या आयुष्यातील सर्व विघ्नाचे हरण करो व तुम्हाला मंगलमय आयुष्य प्रदान करो, हीच त्या स्वरूपास मनोभावे प्रार्थना.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

शततारका नक्षत्र विचार


विषय : शततारका नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण शततारका नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. शततारका नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील २४ वे नक्षत्र असून इंग्रजीत या नक्षत्राला ‘लांबडा अॅक्लेरियस’ असे नाव आहे. या नक्षत्रालाच ‘शतीभिषा’ असेही म्हणतात. या नक्षत्रात १०० ताऱ्यांचा समूह असून त्याचा आकार वर्तुळाकृती आहे. तारे मात्र जरा बारीक असून जरा पसरलेले आहेत. तारे पांढऱ्या रंगाचे असून मध्यम प्रतीचे आहेत. शततारका नक्षत्रातील तारे जरा फिक्कट असून हे नक्षत्र भाद्रपद महिन्यात रात्रभर आकाशात दिसू शकते. वेदकालीन एक समजुत प्रचलित होती, की हे तारे म्हणजे एकेक वर्षाचे आयुष्य देणाऱ्या शंभर औषधी किंवा अमृतकुंभ आहेत. त्यांच्या योगाने वरुण देव सर्वाना शतायुषी बनवे.

शततारका नक्षत्राचे ४ ही चरण कुंभ राशीत येत असल्याने ते चतुष्पादी नक्षत्र आहे. या ४ चरणांवर अनुक्रमे गुरु, शनि, शनी व गुरुचे स्वामित्व आहे. नक्षत्राचा स्वामी राहू, राशी स्वामी शनी व दैवत वरुण असल्याने या नक्षत्रात राहूची अप्रतिम बुद्धी व कला, शनीची संशोधक वृत्ती व वरुण देवतेचा थंडावा यांचा सुरेख मिलाफ आढळून येतो.

शततारका हे नक्षत्र राक्षसगणी असले तरी तमो गुणापेक्षा ते जास्त रजोगुणी आहे, तसेच हे नक्षत्र मंदलोचनी, उर्ध्वमुख व चलरूप आहे. हे नक्षत्र कल्याणकारक आहे, तसेच हे नक्षत्र अफाट बुद्धीमत्ता, कला, धन व अधिकारयोग देणारे असून मालकी वृत्तीचे आहे..

शततारका नक्षत्रावर जन्मलेले जातक कर्तृत्ववान, कर्तबगार, विद्या व्यासंगी, संशोधक वृत्तीचे, स्थिर बुद्धी, ज्ञानी, चौकस, चिकित्सक, महत्त्वाकांक्षी, धार्मिक पण बरेच व्यवहारी, विवेकी, धीमे, स्वतःला थोड्याशा विशेष समजणारे पण फार मानी नसून फायद्यापुरते किंवा कामापुरते आपल्यापेक्षा कमी प्रतीच्या लोकात मिसळणारे, थोदडेसे धूर्त, व्यवस्थित, शिस्तप्रिय, मेहनती व थोडे ध्येयवादी असतात. सहसा त्यांच्या मनाचा पत्ता लागत नाही. थोडेसे सत्यवादी, निर्भिड, थोडी धन लालसा असलेले आढळून येतात. हे जातक बुद्धीवान व पराक्रमी असून नेहमी अधिकारपद व उच्चपदासाठी धडपडत असतात.

शततारका नक्षत्रावर जन्मलेले पुरुषांना हे नक्षत्र बरेच अनुकूल आहे. शरीरप्रकृती, बुद्धी, कला व अधिकार लालसा हे पुरुषवृत्तीचे गुणधर्म चांगले विकसित होतात. बांधा उंच, सडपातळ पण भारदस्त असतो. अवयव मोठे, लांब व रुंद असतात. बोटे जाड, तत्त्वज्ञानी असतात. नाक ठसठशीत, कपाळ भव्य व डोके चौरस व मोठे असते. चेहरा उदासीन व विचारी, शारीरिक जीवन व रोग प्रतिकारशक्ती उत्तम असते. स्वभावाने या व्यक्ती जरा कर्तृत्ववान, कर्तबगार, महत्त्वाकांक्षा, चौकस व चिकित्सक, संशोधक पण श्रम व कष्ट यांची आवड असणाऱ्या, स्मरण, ग्रहण व आकलनशक्ती उत्तमच असते. मात्र व्यावहारिक वृत्ती जास्त आढळते.

शततारका नक्षत्रावर जन्मलेले स्त्रियांनाही हे नक्षत्र योग्यतेच्या दृष्टीने उत्तम आहे. मात्र या नक्षत्रात स्त्रियांना लागणारे अप्रतिम सौंदर्य, लाजाळूपणा, नाजूकपणा, प्रणयचतुरता, बालसंगोपन- वृत्ती, परावलंबित्व हे गुण कमी आढळून येतात. स्त्रिया वर्णाने सावळ्या असल्या तरी नाकोडोळी सुरेख व तरतरीत असतात. पण चेहऱ्यावर गांभीर्य, उदासीनपणा व पोक्तपणा दिसून येतो. बांधा उंच, सडपातळ, भारदस्त, प्रमाणशीर असतो. शरीरसौष्ठव दुसऱ्यावर छाप पाडणारे असते. प्रवृत्ती जरा आक्रमक व साधेपणाची राहण्याची असते. केस लांबसडक व काळेभोर असले तरी आकर्षक केशरचना किवा केशकला करणे आवडणार नाही. साधी सरळ वेणी किंवा आंबाडा घालून त्यावर एखादेच साधे फूल असते. सौंदर्यप्रसादनांना फार कमी वेळा हात लावतात. देहावरील वस्त्रे उंची असली तर फार भडक नसतात. फार ठळक किंवा उंची दागिना घालत नाहीत. जरा अरसिकता व वास्तव प्रवृत्तीच जास्त आढळते. बुद्धी, स्मरण, ग्रहण, आकलन शक्ती उत्तम असून सर्वच क्षेत्रात कर्तबगारीने अधिकारयोगावर असतात. तसेच थोड्या मनकवड्या, गोड बोलून काम साधणाऱ्या जरा राखीव व आपल्याच बरोबरीच्या वर्गात मिसळणाऱ्या, मोठेपणाची व अधिकाराची फार आवड असणाऱ्या असून श्रमिक, कष्टाळू, संसारी, कर्तव्यदक्ष असतात. मात्र वृत्ती फारच अतिव्यवहारी, जरा हात राखून खर्च करण्याची असते. त्यांच्या साध्या राहणीचे कारण तेच असते.

शततारका नक्षत्र फार बुद्धीमान व हुशार आहे. बुद्धीवैशिष्ट्य जास्त दिसून येते. ज्ञानपिपासू, अलौकिक बुद्धीमत्ता, विद्याव्यासंगी, उत्तम प्रकारची स्मरणशक्ती, गृहशक्ती, आकलन शक्ती, पाठांतर शक्ती, संशोधक वृत्ती असून हे एकच नक्षत्र असे आहे की ते सर्वच क्षेत्रांत उच्च शिक्षण दाखविते.

शततारका नक्षत्रात मोठमोठे स्पेशलिस्ट डॉक्टर्स, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकौन्टंटस्, कायदे पंडित, बरिस्टर्स, मोठे शास्त्र, इंजिनिअर्स, अर्थशास्त्र, लेखक, प्रकाशक असा सर्व बुद्धीवंत वर्ग येतो. मोठमोठ्या क्षेत्रांत व शाखेत कोणत्याही विषयांचा गाढ व सखोल अभ्यास करून त्यावर प्रबंध लिहिणे त्यांना फार आवडते. या नक्षत्रा खाली येणारा वर्ग बराच उच्च समाजातील अतिप्रिय व सघन असतो. तसेच मोठा मोठा अधिकारी वर्ग, व्यापारी वर्ग येतो. केंद्र किंवा राज्य सरकारातील खात्यातील उच्च अधिकारी प्रशासक, खाजगी उद्योगधंदे व औद्योगिक क्षेत्रातील कंपनीतील मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टर, मालक, सेक्रेटरी व अधिकारी वर्ग तसेच खाजगी व्यवसाय करणारे सेल्स व इन्कमटॅक्स कन्सल्टंट, बॅरिस्टर्स, कन्स्टल्टंट, तसेच मोठमोठे कारखानदार, उत्पादक, घाऊक व्यापारी, शेतकरी असा वर्ग येतो. हे नक्षत्र स्वतंत्र कर्तृत्वाने प्रगती देत असून आश्रित नाही.

शततारका नक्षत्री रवी अधिकाराच्या दृष्टीने चांगला, पण तब्येतीच्या दृष्टीने मध्यम. तसा बांधा बाहेरून भारदस्त दिसतो. पण आतून अशक्त असतो. मोठेपणाचा हव्यास असतो व त्यासाठी जास्त श्रम घेतात व आजारी पडतात. अधिकार मात्र चांगले मिळतात.

शततारका नक्षत्री चंद्र असता शरीरप्रकृती व बुद्धीमान व ज्ञानाची आवड असणारा असतो. पण तब्येत व इतर दृष्टीने मध्यम.

शततारका नक्षत्री मंगळ शरीरप्रकृतीच्या दृष्टीने मध्यम, अंगकाठी सडसडीत व बारीक असते. पण तो डॉक्टर, आर्किटेक्ट, कारखानदार यांच्या दृष्टीने उत्तम असतो. शास्त्रीय अभ्यास करणारा असतो.

शततारका नक्षत्री बुध् असता उंच पण मध्यम बांध्याचा मात्र बुद्धीमान, कायदेपंडित, हुशार, चुणचुणीत व चुटचुटीत असतो.

शततारका नक्षत्री गुरु असता उंच पण मध्यम देही, दिसण्यात विद्वान, प्रौढ, गंभीर पण अतिशय हुशार, बुद्धीमान, कायदेपंडित, प्रबंध लिहिणाऱ्या, शास्त्राकडे कल असणारा, उत्तम शिक्षक किवा प्रोफेसर असतो.

शततारका नक्षत्री शुक असता उंच दिसण्यात बरा पण जरा अरसिक, सायन्स व औषधी विषयाकडे बळणारा. शनी असता उंच, हाडापेराने मजबूत, सशक्त, भारदस्त शरीर, अतिशय बुद्धीवान, विद्याव्यासंगी, चिकित्सक, संशोधक, कोणत्याही विषयाचा गाढ अभ्यास करून प्रबंध लिहिणारा (Ph.D.), स्वतंत्र व्यवसाय करणारा, मोठा कारखानदार अथवा घाऊक व्यापारी होतो. शततारका नक्षत्री राहू असता हाडापेराने मजबूत, आकर्षक व मजबूत, बांधा देखणा, बुद्धीवान कलाकार, आर्किटेक्ट व फोटोग्राफी यांना उत्तम. केतू असता फारच चांगले, उंच, भारदस्त शरीर, दिसण्यात बुद्धीवान, विद्वान, हुशार, अकल्पित व अलौकिक बुद्धीचा, उत्तम संशोधक, विमाविद्या, टी.व्ही. इंजिनिअरिंग, रिसर्च व ऊर्जा संशोधन, प्रोफेसर, युनोमधील सभासद, कंपन्यांचे मॅनेजर अथवा डायरेक्टर यांना चांगला. नेपच्यून साधारण शुभ, बांधा उंच मध्यम देही पण जरा उदासीन चेहऱ्याचा असतो.

शततारका नक्षत्री होणारे आजार पण फार दाहक किंवा क्रूर नसले, तरी मुदतीचे व बराच काळ रेंगाळणारे असतात. रक्तदाबाचे विकार, रुधिराभिसरण किंवा रक्ताभिसरण बिघडणे, विशेषतः गुरु बिघडला असता जास्त संभव. तसेच हृदयविकार किंवा हृदयाचे रोग, दमा, श्वासोच्छ्वास करण्यास अडचण येणे. सदर्दी, थंडी, हिवताप (अंगावर काटा येणे) कपाळाच्या शिरा दुखावणे किंवा सुजणे, गुडगे दुखणे, संधिवात, त्वचेचे रोग, डोके दुखणे, एकदम चक्कर येणे तसेच कापणे, भाजणे, हाड मोडणे, खरचटणे, मानसिक विकार यांचा त्रास संभवतो.

शततारका नक्षत्री जन्मणाऱ्या व्यक्तीचे हस्ताक्षर जरा मोठे, उभट, फराटे जास्त, ठळक पण वळणदार नसते. नक्षत्र मंदलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती थोडाफार प्रयत्न केल्यावर मिळू शकते व वस्तू दक्षिणेला गेलेली असते. रत्न राहूचे गोमेद किंवा शनीचा नीलमणी उत्तम. अंकुशाप्रमाणे या नक्षत्रावर ८ किंवा ६ अंकाचे वर्चस्व व कैफियत वाटते.

मुहूर्त शास्त्रामध्ये शततारका नक्षत्र शुभकार्याला फारसे अनुकूल नाही. या नक्षत्रावर घरे, देवालये, गलबते बांधणे, राज्याभिषेक, नवीन वाहनावर बसणे, जनावरे घेणे, मद्य काढण्यास आरंभ करणे, दात बांधणे, औषध घेणे, औषधी वृक्ष लावणे, विहिर खणणे, जमिनी नांगरणे, नृत्यारंभ, प्रथम स्त्रीसंग, मंचका रोहण, मुलांचे नाक-कान टोचणे, मूंजी, वधू प्रवेश, गांधर्व विवाह इत्यादी कृत्ये तसेच ऑपरेशनसाठी हे नक्षत्र अतिशय उत्तम आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

मृत्यू आणि काही ग्रहयोग


विषय : मृत्यू आणि काही ग्रहयोग

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : आनंदी मृत्यू

नमस्कार,

मानवाला सर्वात जास्त भीती कशाची वाटत असते, तर ती मृत्यू ची. माणसाला आपले भोग संपवायला अनेक आयुष्ये पुरत नाहीत आणि त्यात आपल्या वासना, इच्छापूर्ती ची लालसा अजूनच भर घालत आहे. त्यामुळे मध्येच आपले आयुष्य थांबणार तर नाही ना या कल्पनेनेसुद्धा तो गर्भगाळित होतो.

जन्मकुंडलीतील ग्रहयोगांवरुन एखाद्या व्यक्तीचे आयुष्य किती असू शकेल याचा जाणकार ज्योतिषी अंदाज लावू शकतो. व्यक्तीचा मृत्यू कसा आहे? बालमृत्यू आहे का दीर्घायुष्य आहे? अपघातात होईल की व्याधी स्वरूपात मृत्यू समोर येईल यांचे गणित मांडता येते. या संदर्भात वराहमिहीराची कथा प्रसिद्धच आहे.

विक्रमादित्य राजाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक ‘मिहीर’ नावाचा एक प्रसिद्ध ज्योतिषी होऊन गेला. मिहीर याचा अर्थ सूर्य होय. मिहीराने भविष्य वर्तविले होते की, राजपुत्राचा वयाच्या १८ व्या वर्षी डुकरामुळे (वराह) रक्तस्त्राव होऊन मृत्यू होईल.

विक्रमादित्य राजाने १८ व्या वर्षी राजपुत्राला विशेष सांभाळायचे ठरविले. त्याला राजवाड्याबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. राजवाडयात कुणीही डुकराने प्रवेश करता कामा नये, यासाठी कडेकोट पहारा ठेवण्यात आला. ज्योतिषी मिहीरने, मृत्यूची तारीख आणि वेळ देखील काढून दिली होती. त्या दिवशी राजपुत्रावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी अंगरक्षक, दास- दासी, मंत्रिगण, राजपुत्राचा मित्रपरिवार यांना पाचारण करण्यात आले. मिहीराने मृत्यूची सांगितलेली संध्याकाळी ५.०० वा ही वेळ टळून गेली. तेव्हा राजाला आनंद झाला. ६.०० वा त्याने मिहीरास सांगितले, “राजपुत्र व्यवस्थित आहे. राजवाड्यात कुणीही डुक्कर आलेलं नाही. याचा अर्थ राजपुत्राचा मृत्यू टळला आहे. तुझे भविष्य खोटे ठरले आहे.” मिहीर आत्मविश्वास पूर्वक म्हाणाला की हे असंभव आहे. तेव्हा राजा आणि मिहीर राजवाड्याच्या सातव्या मजल्यावर गेले, जेथे राजपुत्र त्याच्या मित्रांबरोबर बुद्धिबळ खेळत होता. राजा विक्रमादित्य आणि मिहीर तेथे गेले तर राजपुत्र तेथे नव्हता. राजपुत्र कोठे आहे? अशी विचारणा केल्यावर त्याच्या मित्रांनी सांगितले की, त्याला जरा अस्वस्थ वाटत होते म्हणून तो मोकळी हवा घेण्यासाठी गच्चीवर गेला आहे. गच्चीवर जाऊन पाहिले असता तेथे राजपुत्र रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. राजचिन्ह ‘वराह’ हे राजपुत्राच्या पोटात घुसले होते व त्याचा मृत्यू झाला होता. विक्रमादित्य राजाने मुक्त कंठाने मिहीराच्या बुद्धीचे कौतुक केले. तेव्हा मिहीर विनयाने म्हणाला, ही माझी बुद्धी नाही, हे ज्योतिषशास्त्रीय ज्ञान आहे. मी फक्त अभ्यास करुन ते वर्तविले आहे.

विक्रमादित्य राजाने मिहीराला ‘वराह मिहीर’ ही उपाधी दिली. केवेढे हे पूर्वीच्या ज्योतिषांचे अगाध ज्ञान.

पण जन्म कुंडलीत मृत्यू शोधणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. अनेक घटकांचा सूक्ष्म विचार व अभ्यास करावा लागतो.

आपल्या माहितीसाठी काही अनुभवजन्य निरीक्षणे आपल्याला सांगतो.

अल्पमृत्यू : जन्म कुंडली मध्ये कर्क-वृश्चिक-मीन यापैकी लग्न रास असेल, तर हे जातक संसर्गजन्य आजारांना लवकर बळी पडण्याची शक्यता राहते. या तिन्ही जलराशी असल्यामुळे शरीरप्रकृती दुर्बल असते. एक वर्षाच्या आत मृत्यू झालेल्या बालमृत्यू बालकांच्या पत्रिकेत या तिन्ही राशीपैकी एक रास लग्नस्थानी आढळली आहे.

मृत्यूचे निदर्शक स्थान

१) जन्मलग्नकुंडलीत अष्टमस्थान हे मृत्यूचे निदर्शक आहे. या स्थानात असलेल्या ग्रहांवरुन अन् राशीवरुन व्यक्तीचा मृत्यू कधी आणि कसा येणार हे समजते.

२) चतुर्थ स्थानावरुन मृत्युसमयी व्यक्तीची शारीरिक-मानसिक स्थिती कशी असेल याचा अंदाज येतो.

षष्ठ स्थान हे रोगाचे निदर्शक स्थान आहे. आयुष्यभर व्यक्ती कोणत्या आजाराने ग्रस्त होती याचाही येथे विचार करावा लागतो.

३) जन्मलग्नकुंडलीतील व्ययस्थान जे मोक्षस्थान आहे त्याचा हि विचार महत्वाचा ठरतो.

४) सप्तम व द्वितीय या मारक स्थानांचा विचार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.

५) चर राशीस ११ वे, स्थिर राशीस ९ वे व द्विस्वभाव राशीस ७ वे या बाधक स्थानाचे परीक्षण सुद्धा महत्वाचे आहे.

६) प्रथम स्थान किंवा लग्न स्थान व चंद्र’ यावरुन व्यक्तीची शारीरिक-मानसिक ठेवण, जीवनाकडे बघण्याची दृष्टी, व प्रवृत्ती याचा अभ्यास करावा लागतो

७) या सर्व स्थानांशी संबंधीत ग्रह, भावेश, यांची स्थिती, दशा, गोचर भ्रमण याचा साकल्याने विचार करून मग निष्कर्षावर यावे लागते.

हे सगळं सांगण्यामागे माझा इतकाच उद्देश आहे की वरवर अभ्यास करुन किंवा अष्टमात एखादा ग्रह आहे म्हणून मृत्यू लवकर अथवा वाईट होईल असा वाचक समज करुन घेतात अन् चिंतेत पडतात, वाचकहो, तज्ज्ञ ज्योतिषाकडून सविस्तर कुंडली समजून घेणे आवश्यक आहे. नंतरच गरजेचे असलेले उपाय करावेत.

ज्योतिषाचा अभ्यास करु पाहणाऱ्या अभ्यासकांसाठी काही महत्त्वाचे ग्रहयोग उपयुक्त ठरतील.

१) लग्नेश षष्ठ स्थानी असून त्यावर कोणत्याही शुभ ग्रहाचा शुभदृष्टि योग नसेल व अष्टमेशा बरोबर पापग्रह अशुभ योग करत असेल तर अल्पमृत्यू योग समजावा.

२) दोन अगर तीन पापग्रहांची रवी अगर चंद्रावर अशुभ दृष्टी असेल आणि त्यापैकी एखादा पापग्रह रवी व चंद्र या दोघावर अशुभ दृष्टियोग करत असेल तर अल्पायू योग.

३) रवि अगर चंद्र केंद्रात असून पापग्रहाबरोबर असतील व त्यावर शुभग्रहाची दृष्टी नसेल तर अल्पायू योग.

४) पापग्रह लग्नी असून अष्टमेशाचा अशुभ दृष्टि योग असेल तर बालमृत्यू योग समजावा.

५) पुरुषाच्या कुंडलीत रवी आणि स्त्रीच्या कुंडलीत चंद्र यांची स्थिती आणि त्यांचे इतर शुभाशुभ ग्रहांशी होणारे योग याचा देखील विचार करावा.

६) जर जातकाच्या कुंडलीत अष्टमात चंद्र+बुध युती असेल तर जातकास वाईट फळे देते. त्यातून आत्महत्या करण्यापर्यंत त्याची मजल जाण्याची शक्यता असते.

७) अष्टमात राहू दुर्बल किंवा क्षीण असेल तर मनोविकार, आत्महत्येचे विचार हा त्रास होतो.

८) अष्टम स्थानात केतू निचीचा किंवा अशुभ असेल तर त्या व्यक्तीच्या तब्येतीस त्रास होतो. चंद्र केतू युती आईस त्रास देते तर मंगळ केतू युती भावंडांना त्रास देते

दीर्घायुष्य प्रदान करणारे ग्रह आणि ग्रहयोगः –

व्यक्तीचे आरोग्य आयुष्यमान पाहताना रवि, चंद्र या ग्रहांचा व लग्न षष्ठ, अष्टम या स्थानांचा प्रामुख्याने विचार केला जातो. विशेषतः पुरुषांच्या कुंडलीत रवि आणि स्त्रियांच्या कुंडलीत चंद्राचा विचार करावा. पुरुषांच्या कुंडलीत रवि मित्रस्थानी, स्वृग्रही आहे का? कुंडलीत कोणत्या स्थानात आहे आणि कोणत्या ग्रहाचे शुभाशुभ दृष्टियोग त्यावर आहेत याचा प्रथम विचार करावा. जर रवि बलिष्ठ राशीमध्ये असून कोणतेही अशुभ दृष्टियोग नसतील व गुरुचे शुभयोग असतील तर अशा पुरुषाचे आरोग्य उत्तम असेल व आयुष्य भरपूर असेल.

शनि आणि मंगळ हे विरुदध धर्माचे ग्रह जरी रविवर अशुभ दृष्टियोग करत असले तरी आरोग्य तितके से वाईट असणार नाही. कारण रवि आणि मंगळ हे एकाच धर्माचे ग्रह असल्याने मंगळाचा अशुभ दृष्टीयोग झाला तरी रविची जीवनशक्ती उत्तेजित होईल व शनिच्या विरुद्ध धर्माचे अशुभयोग ही जीवनशक्ती कमी करेल, परिणाम तितका होणार नाही. रवि मेषेत असेल सिंहेत असेल तर शरीर प्रकृती उत्तम ठेवतो विशेषतः सिंह राशी इतका बलवान रवि कोणत्याच राशीत असत नाही.

स्त्रियांच्या कुंडलीत चंद्राचा विचार प्रामुख्याने करावा. चंद्राचे राशिस्थान, दृष्टियोग याकडे लक्ष दयावे, चंद्रावर जर रवि, गुरु, शुक्र यांचे दृष्टीयोग असतील आयुष्य भरपूर समजावे. शुक्र किंवा गुरु अष्टमात  असतील, तर मृत्यू शांततेने व विशेष यातना, दुःख न होता होतो.

या सर्व योगामधूनसुद्धा एखादी व्यक्ती तारली जाते. जेव्हा गुरु लग्नी असून शुभ ग्रहाबरोबर शुभयोग करीत असेल तेव्हा हे योग टळले जातात आणि आयुष्य वाढते.

पत्रिकेतील गुरुबल हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. जरी पत्रिकेत गुरुबल उत्तम नसले तरी आपल्या या जन्मातील कर्मानुसार पत्रिकेतील अशुभ योग टाळता येतात. आपण गुरुची सेवा करणे खूप आवश्यक आहे, ज्याने कुणाला गुरु मानला नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे. जीवनात सुख शांती-समाधान देण्याचे काम फक्त गुरुलाच करणे शक्य आहे. तसेच, दुःख-चिंता-कष्टी काळापासून देखील फक्त गुरुच आपल्याला वाचवू शकतो.

निःस्वार्थी वृत्तीने दुसऱ्याला केलेली मदत आपल्याला तारत असते. अन्नदान, वस्त्रदान, विदयादान यांसारख्या विविध दानांचे महत्त्व जाणून गरजूंना ते केले पाहिजे. जीवनातील विविध संकटं आणि अपमृत्यू यांपासून आपल्याला आपली सत्कर्म आणि गुरुचा आशीर्वाद हेच तारत असतात.

घरात कोणी आजारी असेल तर श्री महामृत्युंजय यंत्र तांब्याच्या पत्र्यावर उठवावे. या यंत्राला कापूर व उदबत्ती ओवाळून एका पातळ फडक्यात गुंडाळून ते फडके आजारी माणसाजवळ ठेवून दयावे म्हणजे अकाली मरणापासून बचाव होईल .

भगवान शंकर हे लयतत्त्वाचे कारक आहेत. शिव पूजा-अर्चना केल्याने अपमृत्यू टळतो. आजारी, अत्यवस्थ माणसाजवळ महामृत्युंजय जप केल्याने फरक पडतो.

महामृत्युंजय मंत्राचे पठण केल्याने अल्पमृत्यू योग टळतो व शिवकृपा होते असे शास्त्रात सांगितले आहे.

तसेच पद्म पुराणात दिलेल्या श्री मृत्युंजय स्त्रोत्राच्या नित्य पठणाने देखील अकाल मृत्यू टळतो.

यासंबंधी इतरही अनेक ग्रहयोग आहेत पण केवळ या विषयाची आपणांस माहिती व्हावी या उद्देशानेच हा लेख लिहिला आहे. पत्रिकेतील ग्रहस्थितीवरुन व्यक्तीचे आयुर्मान त्याला योणारा मृत्यूचा प्रकार याचे विवेचन करता येते, परंतु त्यासाठी सखोल अभ्यासाची गरज असते. अपवादात्मक परिस्थिती वगळता भविष्य सांगताना व्यक्तीला मृत्युविषयी सांगणे शास्त्रसंमत नाही, व त्याचे हि काही संकेत आहेत, त्यानुसारच सांगणे प्रस्तुत ठरते. मृत्यूचे भय हा भाग तेथे आहेच, तसेच मृत्युविषयी गूढता ठेवण्यामागे ईश्वरी संकेत आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, मृत्यूच्या छायेने जीवन दूषित करणारी प्रवृत्ती असण्याची शक्यता असते, तेव्हा जीवन आनंदाने, परोपकाराने जगावे व शांतपणे मृत्यूच्या स्वाधीन व्हावे, हीच परमेश्वराची इच्छा आहे.

।। श्री महामृत्युंजय मंत्र ।।

ॐ ऱ्ही जूं सः। ॐ भूर्भुवः स्वः

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगान्धिं पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुक मिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीयमामृतात ।

स्वभुवः भूः ॐ । स्वः भुव भूः ॐ । सः – हौ ॐ ।

(अकाली मृत्यू येऊ नये यासाठी या मंत्राचा जप करावा तसेच घरात शिवलिंगाबरोबर श्री महामृत्युंजय यंत्र घरात पूजेसाठी ठेवावे हे यंत्र जाड तांब्याच्या पत्र्यावर उठवलेले असावे.)

श्री पदमपुराणात दिलेले श्री मृत्युंजयस्त्रोत्र –

रत्नसानुशरासनं रजताद्रि शृइ निके तन ।

शिजिनीकृ त पन्नगेश्वरमच्युतानलसायक म् ।

क्षिप्रदग्धपुरत्रयं त्रिदशालयैरभिवन्दिनं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ।।१।।

पंचपादपपुष्पगन्धिपदाम्बुजव्दयशोभितं

भाललोचनजातपावक दग्धमन्मथविग्रहम् ।

भस्मदिग्धकलेवरं भवनाशिनं भवमण्ययं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ।।२।।

मत्तवारणमुख्यचर्मकृतोत्तरीयमनोहरं

पइकं जासन पदमलोचनपूजिता डि घ्रसरोरुहम् ।

देवसिद्धतर डिगणीक रसिक्तशीत जटाधरं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ।।३।।

कुण्डलीकृतकुण्डलीश्वरकुण्डलं वृषवाहनं

नारदादिमुनीश्वरस्तुतवैभवं भुवनेश्वरम् ।

अब्धकान्तकमाश्रिता मरपादप शमनान्तकं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ।।४।।

यक्षराजसखं भगाक्षिरं भुजङ्गविभूषणं

शैलराजसुतापरिष्कृतचारुवामकलेवरम ।

क्ष्वेडनीलगलं परश्वधधारिणं मृगधारिणं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ।।५।।

भेषजं भवरोगिणामखिलापदामपहारिणं

दक्षयज्ञ विनाशिनं त्रिगुणात्मकं त्रिविलोचनम् ।

भुक्तिमुक्तिफलपदं निखिलाघसंघ्निबर्हणं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ।।६।।

भक्तवत्सलमर्चतां निधिमक्षयं हरिदम्बरं

सर्वभूतपतिं परात्परमप्रमेयमनुपमम् ।

भूमिवारिनभोहुताशनसोमपालित स्वाकृति

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ।।७।।

विश्वसृष्टि विधायिनं पुनरेव पालनतत्परं

संहरन्तमथ पपचमशेषलोक निवासिनम ।

क्रीड यन्तमहर्निशं गणनाथयूथसमावृतं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः।।८।।

रुद्रं पशुपतिं स्थाणुं नीलकण्ठमुमापतिम् ।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति ।।९।।

कालकण्डं कलानिं कालनाशनम् ।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्युःकरिष्यति ।।१०।।

नीलकण्ठं विरुपाक्षं निर्मल निरुपद्रवम् ।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्युःकरिष्यति ।।११।।

वामदेवं महादेवं लोकनाथं जगद्गुरुम् ।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्युःकरिष्यति ।।१२।।

देवदेवं जगन्नाथं देवेशमृषभध्वजम् ।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्यूःकरिष्यति ।।१३।।

अनन्तमव्ययं शान्तमक्षमालाधरं हरम्।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति ।।१४।।

आनन्दं परमं नित्यं कैवल्यपदकारणम् ।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्यूःकरिष्यति ।।१५।।

स्वर्गापवर्गदातारं सृष्टि स्थित्यन्तकारिणम ।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति ।।१६।।

विशेष सूचना : जाणकार ज्योतिषास वा अधिकारी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू नये व अर्धवट पद्धतीने उपाय योजना करू नये.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)