Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

आजचा विचार क्र. १३७९ (गुरु पौर्णिमा)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

हे दु:ख येते कुठून ?


विषय : हे दु:ख येते कुठून ?

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : मनशक्ती मासिक

सौजन्य : स्वामी विज्ञानानंद

नमस्कार,

आपल्या आयुष्यातला बहुतांशी प्रत्येक क्षण सुख मिळवण्यासाठी खर्च होतो. मनात काही अपेक्षा असतात, तेव्हाच अपेक्षाभंग होऊन दु:ख वाट्याला येते. तसे पहायला गेलो, तर आपले सबंध आयुष्य सुख-दुःखानी भरलेले आहे. पण आपण दुःख मिळविण्यासाठी धडपडतो काय ? मुळीच नाही. मग हे दुःख येते कुठून ? जे आपणाला नको असते, ते आपल्या नशीबी का येते? ते कोण देते ?

आपण एक उदाहरण पाहू. समजा तुम्हाला जिलेबी आवडते. कल्पना करा की, तुमच्या मित्राचे लग्न आहे. लग्नानंतर खूप मोठी पगंत बसली आहे. चेष्टामस्करी चालू आहे. बाहेर सनई वाजते आहे. माणसांची धावपळ सुरु आहे. सगळीकडे आनंद ओसंडून जात आहे. तुमची आवडती जिलेबी तुमच्या पानात आहे. सुरवातीला पानांत एक दोन जिलेबी वाढलेली दिसते. तुम्ही मनातल्या  मनात म्हणता, काय हे निदान तीन चार तरी वाढायच्या? पहिला राउंड संपतो. पुन्हा जिलेबी वाले येतात. तुम्ही वाटच पहात असता. एक, दोन, तीन, चार-पाच, सहा… आठ. दहा बारा जिलेबी फस्त होत जातात. तुम्ही मनोमन सुखावता, जेवणही सुंदर झालेले असते. तुम्ही तृप्त होता. आता पुरे उठूया, असे तुमच्या मनात येते. आणि एवढ्यात नवरा नवरी आणि दोन्ही घरची माणसे लाडूने भरलेली ताटे घेऊन येतात. नवरा नवरी वाढतात त्यांना नाही कसे म्हणायचे म्हणून आग्रहाखातर तुम्ही आणखी दोन जिलेबी खाता. त्या पहिल्या जिलेबीची आता चव उरली नसते, कारण हव्यासाची ती तृप्ती संपली असते. नाईलाज म्हणून खायचे. तुम्ही कंटाळता, पण वाढणारे नाही. मुलाचे किंवा मुलीचे वडील तुमच्या पानात आणखी दोन जिलेबी टाकतात, तुम्ही नको नको म्हणत असताना. जिलेबीचा तुकडा तोंडात फिरु लागतो. एक तुकडा जिलेबीचा आणि एक घोट मठ्ठा असे चालू असते. आता तुमचे मित्र येतात आणि म्हणतात, बाळासाहेब आता आणखी एकच बरं का, पुन्हा तुम्ही मागितली तरी मिळणार नाही. आग्रहाची एक म्हणत वाढलेल्या ४ जिलेबी पाहून तुमचे डोळे पांढरे होतात. जिलेबी पाहूनच पोटात दुखायला लागते.

मग जिलेबी खाणे हे सुख की दुःख ? पहिली जिलेबी खातांना जे सुख होते, त्या नानातारच्या  प्रत्येक घासानजिक दुःख कारण बनत गेले.

म्हणजेच पहिल्या तृप्ती नंतरच्या हव्यासातच दुःख भरलेले आहे. इच्छा पुरती झाल्यावर देखील अजून जिलेबी म्हणून घेण्यासाठी तुम्ही हात पुढे केलात त्यावेळी त्याबरोबरच दुःखही घेतलेत. म्हणजेच कुठे थांबायचे किंवा मनाच्या इच्छेला आवर घातला असता, तर पुढचे दु:ख टळले असते.

असे आहे सुख दुःखाचे गणित. सुखासाठी केलेली आपली प्रत्येक अतिरेकी कृती दुख घेऊनच येते.

आपण लहानपणापासून अनेक म्हणी, बोध वाक्ये ऐकत असतो, पण त्यातून शिकत काहीच नाही. गती प्रतीगती चा नियम आपल्याला परीक्षेत गुण मिळवण्यासाठी फक्त उपयोगी ठरतो.

उदा. अति तिथे माती, पेराल तसे उगवेल ई. म्हणजेच आपण एखादे रोपटे पेरण्यासाठी कष्ट घेतो. त्याची काळजी घेतो. तेव्हा कुठे कालांतराने ते रोपटे छान फळ आल्याने आणि आनंद देते. म्हणजेच कष्टाचे दु:ख आनंदाने स्वीकारले, तर त्याच्या विरुद्ध आनंद निर्माण होतो.

मूल जन्माला येताना रडत असते. मातेला खूप वेदना होत असतात. घराची मंडळी चिंतेत असतात. मूल जन्मते आणि घरातील सर्व माणसांना आनंद होतो. क्षणांत दुःखाचे रूपांतर सुखात होते. माता आपल्या उदरांत नऊ महिने गर्भाचा सांभाळ करते. त्याला वाढविते, त्यासाठी तिला किती प्रयास पडतात. दुःख होते, प्रसुती वेदना सुरु होतात. त्यावेळी त्या दुःखाचा कळस होतो. आणि प्रसूती होताच दुःखाची जागा सुखाने घेतलेली आढळते. या सुखाच्या क्षणासाठी सारी धडपड.

कुंडली सुद्धा पदोपदी हेच सांगत असते.

कुंडलीतील लग्न स्थान तुमचे शरीर, व्यक्तिमत्व दाखवते. त्यासाठी तुम्ही लहान असल्या पासूनच नियमित व्यायामाची आवड जोपासली, तर ऊर्जा टिकून राहील. नाहीतर त्याच्या विरुद्ध सप्तम स्थान दर्शित आरोग्यास व वैवाहिक सौख्यास मारक फळ प्राप्त होऊन दु:ख दायक ठरेल.

कुंडलीतील धन स्थान तुमचा पैसा दाखवते. ते मिळवण्यासाठी योग्य प्रकारे कष्ट घेऊन इच्छांवर ताबा ठेवून त्याचा संचय केला, तर घरात लक्ष्मी राहील. नाहीतर पैसा येऊन सुद्धा मनावर ताबा न ठेवता आहे म्हणून उधळेगिरी केली, तर त्याच्या विरुद्ध अष्टम स्थान दर्शित धनहानी, मानहानी, दुर्भाग्य वाट्यास येऊन पश्चात्तापाचे दु:ख वाट्यास येईल.

तिसरे स्थान कर्तुत्व, साहस दाखवते. या जगात योग्य नियोजन करून स्वत:स सिद्ध करण्याचे दु:ख स्वीकारले तर, भाग्य वृद्धी होईल. अन्यथा त्याच्या विरुद्ध नवम स्थान दर्शित गोष्टींची नकारात्मक फळे प्राप्त होतील. जसे की, भाग्यास दोष देत राहाल. वडिलांच्या जीवावर जगावे लागेल ई.

चौथे स्थान तुमचे सुख, घर गाडी, बंगला ई. दाखवते. ते तेव्हाच शाश्वत रूपाने प्राप्त होते, जेव्हा त्याच्या विरुद्ध दशम स्थान दर्शित कर्म करण्यासाठी म्हणजेच नोकरी व्यवसायासाठी घरातून बाहेर पडून कष्ट उपसता. घरी लोळत राहिलात, तर सुरुवातीला जे सुख वाटले, त्याची जागा आईची बोलणी खाऊन सुखाचे दु:खात रुपांतर होईल.

पंचम स्थान तुमचे शिक्षण, उपासना दाखवते. ते योग्य प्रकारे कष्टाने प्राप्त केले, तर त्याच्या विरुद्ध अकरावे स्थान दर्शित लाभ मिळेल. अन्यथा तो वेळ फक्त मनोरंजन मौज मजेसाठी घालवलात, तर लाभ हानीचे दु:ख नंतर वाट्यास येईल.

सहावे स्थान तुमचे आयुष्यातील संघर्ष, प्रयत्न दर्शवते. ते योग्य वेळी उपसले, तर कालांतराने तर त्याच्या विरुद्ध बारावे स्थान दर्शित दान धर्म, पर्यटन, परदेश वारी, निवृत्ती चा काळ यासाठी अवसर मिळेल. अन्यथा महत्वाकांक्षेची जागा वासना आणि व्यसनांनी घेतली, तर आजारपण मागे लागेल, कर्ज बाजारी व्हाल. जोडीदाराशी वाद, तंटे सुरु होतील.

मला वाटते मला काय सांगायचे आहे, त्यासाठी एवढी उठाठेव पुरे आहे.

जाता जाता बच्चन च्या मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातील प्राण च्या तोंडी असलेला मला पुसटसा आठवत असलेला एक उतारा सांगतो.

दुख को अपनाओ, दुख को गले लगाओ

तकदीर तेरे कदमोमें होगी, और तू बनेगा —

मुकद्दर का बादशाह

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

वारी


वारी
लागता जेष्ठा ची चाहूल
लागे पालखीची आस
हरीनामा च्या घोषात
मनी विठूचाच ध्यास
नाही कोणा आवतण
ना पत्रिका अक्षत
विठुराया च्या भेटीसाठी
वेड जीवा लागत
निघता माऊलींची पालखी
कसा कळस डोलतो
ज्ञानियाला निरोप देता
कंठ का ग दाटतो
पंढरी च्या वाटेवरी चाले
भक्त जनांचा हो मेळा
दिंड्या पताका झळकती
कधी दिसेल विठू डोळा
भजन कीर्तनाची गोडी
साखरेहूनी गोड
विठू च्या नामघोषाला
त्या फुगडी ची जोड
अश्व घालती रिंगण
सोहळा तो वाखरीत
वारकरी होती दंग
भक्ती भावा च्या रंगात
विठू च्या नामघोषात
दुमदुमली पंढरी
हरिनामा च्या गजरात
रंगली वैखरी
विठुराया च्या दर्शनाने
होई वारी ची सांगता
माहेरा च्या भेटीने होते
मनास शांतता
विठू आमची माऊली
आम्ही तिची लेकरं
कृपावंत हो विठाई
घाली मायेची पाखर.

सौ मंजिरी

(संग्रहित कविता)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिषीचा दृष्टीकोन एक रूपक कथा


विषय : ज्योतिषीचा दृष्टीकोन एक रूपक कथा

स्वैर लेखन : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : ओशोंची एक फोरवर्डेड पोस्ट

सौजन्य : अभ्यासक शिवाजी कणसे

नमस्कार,

मिडीयावर अनेक पोस्ट फिरत असतात. त्यातील अशीच एक पोस्ट समोर आली व चांगली वाटली. त्याच छोट्याशा रूपक कथेचा स्वैर अनुवाद येथे देत आहे.

फार पूर्वी एका राज्यात एक ज्ञानी व अनुभवी राज ज्योतिषी रहात होते. त्यांचा मुलगासुद्धा  ज्योतिर्विद्येत त्यांच्याइतकाच प्रवीण होता. एकदा राजाची तब्येत खालावल्याने त्यांना दरबारात पाचारण करण्यात आले. दोघे दरबारात गेले. दोघांनी राजाच्या कुंडलीचे सूक्ष्म परीक्षण केले.

मुलगा म्हणाला, हे राजा तुम्हाला वाईट वाटेल, पण सत्य सांगणं हे माझं काम आहे. तुम्ही फार काल जगाल असे वाटत नाही. माझ्या अभ्यासानुसार तुमचं आयुष्य आता सात दिवसांचं उरलेलं आहे.

भर दरबारात ही क्लेशदायक भविष्यवाणी ऐकून त्यास अपमान झाल्याचे वाटले आणि हे ऐकून राजा भयंकर संतापला. त्याने त्या ज्योतिष्याच्या मुलाला अभद्र भविष्य वाणी केल्याबद्दल चाबकाचे फटके मारून हाकलून देण्याचा आदेश दिला.

आता वडील पुढे सरसावले. ते म्हणाले, हे राजन माह्या कुंडली निरीक्षणानुसार तुमचं साम्राज्य लवकरच विस्तारणार आहे आणि तुमच्या सगळ्या चिंता-विवंचनांमधून तुम्ही लवकरच मुक्त होणार आहात. तुमच्या कुलदेवतेची उपासना करून पुढील मार्ग सुकर होवो असा आशीर्वाद घ्या.

हे ऐकून राजा प्रसन्न झाला व वडिलांचा सुवर्णमुद्रा देऊन सत्कार केला.

दरबारातून बाहेर पडल्यानंतर पाठ चोळत वडिलांबरोबर निघालेला मुलगा रागाने म्हणाला,  तुम्हालाही माहिती आहे की, सम्राट सात दिवसांच्या वर जगणार नाही. तुम्ही त्याला ते का नाही सांगितलंत? खोटं का बोललात?

वडील म्हणाले, मीही त्याला तेच सांगितलं, पण त्याला रूचणाऱ्या भाषेत.

सांगायचे तात्पर्य ज्योतिषी कितीही पारंगत असला, तरी भविष्य कथन करताना जातकाचा स्वभाव, भावना, आजुबाजूची परिस्थिती लक्षात घेऊन योग्य व सकारात्मक रीतीने सत्य कथन करून त्यावर शक्य असल्यास उपाय सुचवणे खूप महत्वाचे आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)