Category: Uncategorized

केंद्र अधिपत्य दोष


विषय : केंद्र अधिपत्य दोष

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : प्रेडिक्तिव्ह स्टेलर अस्त्रोलोजी रीडर

नमस्कार,

आज आपण केंद्र अधिपत्य दोष या विषयी माहिती घेणार आहोत.

ज्योतिष अभ्यास करत असताना अनेकानेक प्रश्न मनात येत असतात. पण त्याची समाधानकारक उत्तरे मात्र मिळायला फार कष्ट पडतात. उलट आपल्या मनात गोंधळाची स्थिती तयार होते.

या विषयाबाबत बोलायचे झाल्यास केन्द्र अधिपत्य काय असते ? नैसर्गिक शुभ ग्रह त्यांचे अधिपती असता ते त्यांच्या दशेमध्ये वाईट असतात का ? ते नेहमी जातकाचे आयुष्याचा अंत करतात का ? केंद्राधिपति आणि केंद्र स्थानात स्थित ग्रह कोण-कोणते विभिन्न परिणाम प्राप्त होतात ई.

केंद्र हा मूळ संस्कृत शब्द आहे. याला चतुष्टय व कंटक पण म्हटले जाते. पारंपारिक पद्धतीनुसार लग्न स्थानी जी राशि स्थित असते, ती राशी व त्या राशी पासून अथवा लग्नापासून ४, ७, १० वी राशींना केंद्र राशी अथवा केंद्र स्थान मानले जाते. तसेच चंद्रापासून अथवा कोणत्याही ग्रहापासून तो ग्रह स्थित राशी व त्या राशी पासून अथवा लग्नापासून ४, ७, १० वी राशींना त्या ग्रहापासून केंद्र राशी अथवा केंद्र स्थान मानले जाते तात्पर्य एवढेच आहे की ते ते ग्रह एकाच राशिमध्ये युतीत अथवा त्या ग्रहा पासून ४, ७, १० व्या राशित आहेत.

लग्न अथवा चन्द्राच्या राशि मध्ये अंशात्मक अंतर पाहिले जात नाही. मग ती राशिस्थित ग्रह ९ अंशावर असो वा 29 अंशावर.  फक्त राशी अंतर मोजण्यासाठी घेतल्या जातात. उदा. एखांदे कुंडलीत मेष लग्न भावारंभ २५ अंशावर आहे तर २५ अंशाच्या अलीकडील भाव १२ वे भावात जात असेल तरी केंद्र रास मेष च धरली जाईल. मग त्यातील ग्रह १ ल्या भावात असो वा मागच्या भावात असो.

म्हणजे या उदाहरणात केंद्र स्थान मेष, कर्क, तुळ व मकर होतील.

समजा चंद्र अथवा कोणताही ग्रह या कुंडलीत वृषभ राशीत असेल तर चंद्र वा त्या ग्रहापासून ती केंद्र स्थाने वृषभ, सिंह, वृश्चिक व कुंभ होतील मग तो ग्रह कितीही अंशात अथवा कोणत्याही भावात असला तरीही.

पण जेव्हा कोणाला एखाद्या ग्रहाच्या बदल जाणून घ्याचे असेल की, तो केंद्र आधिपत्य च्या आधारावर शुभ ग्रह आहे अथवा पापग्रह आहे, तर मात्र त्या ग्रहास लग्न स्थानापासून पासून मोजावयास हवे, चंद्र अथवा अन्य कोणत्याही ग्रहापासून नाही.

गुरु, शुक्र, शुक्ल पक्षाचा चंद्र व अपीडीत बुध हे नैसर्गिक शुभ ग्रह मानले जातात. व असे म्हटले जाते, जर हे शुभ ग्रह १, ४, ७, १० व्या राशिचे अधिपति असल, तर त्यांची अनुकूल प्रवृति बदलून प्रतिकूल प्रवृति होते. असेही सागितले जाते, जर ते २ रे  अथवा ७ वें स्थानात असता जातकास अत्यन्त अशुभ परिणाम व मृत्यु प्रदान करतात. पुन्हा या पण गोष्टीवर जोर दिला गेला आहे की, गुरु, शुक्र व चंद्र हे केंद्राधिपती असतील तर ते बुधापेक्षा जास्त वाईट होतात. नैसर्गिक पापग्रह सूर्य, कृष्ण पक्षातील चंद्र, मंगळ, पीड़ित बुध व शनि हे हे केंद्राधिपती असतील, तर शुभ परिणाम प्रदान करतात.

माझ्या अभ्यासानुसार केंद्राधिपती दोष फक्त एखाद्याचे आरोग्य व दीर्घायू ला प्रभावित करतात. ज्या स्थानाचे ते अधिपति आहेत, त्यांचे द्वारा दर्शित फलास ते अशुभ ठरणार नाहीत. लग्न स्थान हे जातकाचे स्वास्थ्य व आयुष्य दर्शवते. लग्नेश जर ६, ८, १२ व्या स्थानात स्थित नसेल तर, निश्चित पणे त्याचे आरोग्य, वाईट काळ दशेत रक्षण करेल.

चतुर्थेश जातकाची स्थायी संपत्ती, वाहन व आई दर्शवते. सप्तम स्थान पत्नी, विवाहाचा काळ व सप्तम स्थाना द्वारा दर्शित अन्य गोष्टी दर्शविते. दशम स्थान जातकाच्या व्यवसाय, नाव, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पैतृक संपत्ति दर्शवते.

उदा.

मिथुन लग्न असलेल्या जातकाच्या कुंडलीत बुध १ ले व ४ थे व गुरु ७ वे व १० वे केंद्र स्थानाचा अधिपति असतो.

कन्या लग्न असलेल्या जातकाच्या कुंडलीत बुध १ ले व १० वे व गुरु ४ थे व ७ वे केंद्र  स्थानाचा अधिपति असतो.

मिथुन जातकास सामान्यपणे गुरु दशमेश म्हणजेच कर्म स्थानाचा अधिपती असल्याने गुरु द्वारा दर्शित व्यवसाय व समृद्धि देईल. गुरु सप्तमेश म्हणजेच भार्या स्थानाचा अधिपती असल्याने गुरु द्वारा दर्शित जोडीदार व वैवाहिक सौख्य देईल.

कन्या जातकास सामान्यपणे बुध दशमेश म्हणजेच कर्म स्थानाचा अधिपती असल्याने बुध द्वारा दर्शित व्यवसाय व समृद्धि देईल. गुरु सप्तमेश म्हणजेच भार्या स्थानाचा अधिपती असल्याने गुरु द्वारा दर्शित जोडीदार व वैवाहिक सौख्य देईल.

(टीप : इतर घटक विचारात घेऊन त्याप्रमाणे बदल होतील, पण केवळ नैसर्गिक ग्रह केंद्राचा अधिपती म्हणून या स्थानासंबंधी अशुभ फळ मिळणार नाही.)

आपल्याला हे माहित आहे की अष्टमेश हा सर्वात पापग्रह मनाला जातो कारण तो एखाद्यास मृत्यू, दुर्भाग्य ई. दर्शवतो. पण जातक चंद्रिका नुसार याला अपवाद सांगितला आहे की, जर अष्टमेश हा लग्नेश असेल, तर हा दोष नाहीसा होतो. मग आपल्या उदाहरणाप्रमाणे एखादा ग्रह चतुर्थेश किंवा दशमेश असूनही लग्नेश असता केंद्राधिपती दोष नाहीसा व्हायला हवा.

सांगायचे तात्पर्य एवढेच की एखादा ग्रह जो लग्नेश आहे तो वाईट स्थितीत नसता इतर स्थान दर्शित फळांसाठी प्रतिकूल न होता उलट रक्षकच बनेल. व फक्त आरोग्य व आयु साठी अशुभ ठरेल जे फळ लग्न स्थान दर्शवते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

रोहिणी नक्षत्र विचार


विषय : रोहिणी नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण रोहिणी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

रोहिणी हे नक्षत्रचक्रातील ४ थे नक्षत्र आहे. या नक्षत्राचे ४ ही चरण वृषभ राशीत येत असल्याने हे नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र आहे. तसेच ते स्थिर उर्ध्वमुखी व अंधलोचनी आहे. नक्षत्रांचे कारकांश वृषभ राशीच्या १० ते २३ २० पर्यंत आहे. इंग्रजी नाव ‘आल्डेबरान’ आहे. या नक्षत्राच्या ४ चरणांवर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्राचे अधिपत्व आहे.

रोहिणी नक्षत्राचा आकार इंग्रजी V सारखा दिसतो. या नक्षत्रात ५ तारे असून यातील मुख्य तारा थोडा लाल आहे. हे ५ ही तारे ठळक असून अतिशय तेजस्वी, सुंदर व उठून दिसणारे आहेत. तारे रंगाने थोडेसे लाल व पिवळसर आहेत. ब्रम्ह या नक्षत्राचे दैवत आहे. राशी स्वामी शुक्र व नक्षत्राचा स्वामी चंद्र असल्याने या नक्षत्रात शुक्राचा मोहकपणा, सुंदरता, कोमलपणा व चंद्राचा आनंदीपणा, लावण्य, शांती यांचा सुरेख संगम दिसून येतो. हे नक्षत्र चंद्राचे अतिशय आवडते असल्याने साहित्यामध्ये चंद्र- रोहिणीचा संबंध दांपत्यासारखा सारखा केलेला आढळतो. महिन्यातून एकदा चंद्र आपल्या लाडक्या रोहिनीशी जवळीक साधून जातो, हे अतिशय विलोभनीय दृश्य दिसते.

रोहिणी या शब्दाचा अर्थ आरोहण असा आहे. या बाबतीत असे सांगितले जाते की, या नक्षत्रातील मुख्य लाल तारका स्वर्गात जाण्यासाठी एकसारखी वरवर चढत गेली म्हणून तिला रोहिणी म्हटले आहे. दुसरी एक आख्यायिका अशी आहे की, रोहिणीच्या सौंदर्यावर लुब्ध होऊन प्रजापतीने हिचा पाठलाग केला म्हणून ती रागाने लाल झाली.  असेही सांगण्यात येते की, रोहिणीचा प्रियकर चंद्राच्या तिच्यावरील उत्कट प्रेमाने ती lajjiत होऊन आरक्त झाली. रोहित शब्दाचा अर्थ लाल असा आहे.

रोहिणी ही शांत व आनंदी आहे. कारण तिचा चेहरा रागाने लाल नव्हे, तर ते लाजून गुलाबी झालेला आहे.

रोहिणी नक्षत्र अतिशुभ, प्रचंड कार्य करणारे व सिद्धी देणारे मानले जाते. आकृती V सारखी म्हणजेच कोणत्याही कार्यात विजय (Victory) मिळवून देणारी आहे. रोहिणी हे असे नक्षत्र आहे, जे शारीरिक, मानसिक व ऐहिक सौख्य आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करते. रोहिणी नक्षत्रावर जन्मलेल्या जातकाचे व्यक्तिमत्त्व शांत, सालस, आनंदी, रसिक, विलासी, विद्वान, चतुर, मधुर भाष्य, संगीत, कलेची  फुलांची व सुगंधी अत्तरांची आवड असणारे, भावनाप्रधान तरी विचारी व विवेकी असते. जातकाची बुद्धी व विचार स्थिर असतात. प्रेम, प्रणय, वाहनसुख व अलंकार ई.साठी रोहिणी नक्षत्र अनुकूल असते. या नक्षत्रावर जन्मणाऱ्यां जातकांचा बांधा सुंदर असतो. हे जातक मध्यम उंचीचे व सशक्त असतात. चेहरा तेजस्वी व मोहक असतो.

पुरुषांपेक्षाही स्त्रियांना रोहिणी नक्षत्र हे खूप चांगले आहे. या नक्षत्रात चंद्र व शुक्र असता ते स्त्रियांना लावण्यवती बनवतात. या स्त्रिया जन्माने अतिशय सौंदर्यवान किंवा श्रीमंत घराण्यातील असू शकतात. जुन्या ग्रंथात रोहिणीचे केलेले वर्णन फार बोलके आहे. एक अतिशय धनवान व भरल्या घरातील, भव्य वाड्यात राहणारी मालकीण, जिचे घर धन धान्य व फळाफुलांनी भरलेले आहे. जिच्या गोठ्यात अनेक गाई-म्हशी आहेत, दाराशी हत्तीची अंबारी डुलत आहे. घरामध्ये सोने-नाणे व अलंकार आहेत. हाताखाली चोकरचाकर आहेत. घरात मुलेबाळे, सासुसासरे आहेत असे केलेले आढळते. आपण हे वर्णन तारतम्म्याने घेणे गरजेचे आहे. आजची आधुनिक रोहिणीही दिसायला सुंदर, बंगल्यात किंवा फ्लॅटमध्ये किंवा सुखवस्तू कुटुंबात राहत आहे. तिच्या दारात सुंदर मोटार आहे. घरात रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन, उंची वस्त्रे व अलंकार आहेत ई.

या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रि जातकांचा बांधा गोंडस असतो. त्या अंगाने भरलेल्या असतात. शरीर मांसल व गुबगुबीत असू शकते. मांड्या, पोटऱ्या, दंड, मनगटे ई. पुष्ट व घाटदार, गोलाकार, चेहरा गाल रुंद, गोल व भव्य, सुंदर व पाणीदार मोठे डोळे, काळे व लांबसडक केस असे असू शकते. रोहिणी नक्षत्राच्या स्त्रियांना उंची वस्त्रे व सोन्याचे दागिन्याची आवड आणि मोह असतो. अंगभर दागिने, पूरक रंगाचे उंची शालू, पैठण्या, साड्या याची आवड असते. खोट्या व कृत्रिम अलंकारापेक्षा सोन्याचे खरे व खुलून दिसणारे भारी अलंकार समारंभात मिरवणे त्या पसंत करतात. साध्या मंगळसूत्राप्रमाणे गळ्यात चपलाहार, मोहनमाळ किंवा मोत्याचा कंठा, कमरेला कमरपट्टा, दंडाला वाकी, हातात घाटदार बांगड्या किंवा तोडे, सोन्याच्या पाटल्या, घड्याळाला सोन्याचा पट्टा, चष्मा असल्यास त्याला सोनेरी फ्रेम, बोटात दोन-तीन अंगठ्या, लांबसडक केसांचा अंबाडा व अंबाड्यावरही भरगच्च अशा दोन-तीन वेण्या अशी स्त्री रोहिणी नक्षत्र जातक असण्याची जास्त संभावना असते.

रोहिणी ही शांत व आनंदी असली पण रोहिणी जातकाना आपल्या रूपाचा फार गर्व असून आपल्यापेक्षा दुसरे कोणी सुंदर नाही असेच वाटते. सहसा आपल्यापेक्षा कमी सौंदर्यवान स्त्रियांत व गरीबवर्गात त्या मिसळणे टाळू शकतात. रोहिणी ही मालकीण आहे. नोकर नाही. स्वतः काम करण्यापेक्षाही हाताखालच्या हुकुम करून नोकराकडून काम करून घेणे हे जातक पसंत करतात. यांना श्रमाचा थोडा कंटाळा असून जरा सुस्त असू शकतात. रोहिणी जातक स्त्रिया ऑफिसमध्ये नोकरीला असतील, तर घरी आल्यावर स्वयंपाक करणार नाहीत. स्वयंपाक, घरकामासाठी असलेल्या नोकरांनी घरी आल्यावर स्वयंपाक तयार ठेवला पाहिजे. नसेल तर बाहेर जेवणे वा बाहेरून पदार्थ मागवणे अशी मानसिकता असू शकते.

रोहिणी नक्षत्राच्या अधिकारात फुलांचे व्यापारी (चाफा, चमेली, मोगरा, गुलाब वगैरे) धनिक शेतकरी, धान्य सोने-चांदी, अलंकार, उंची रेशमी वस्त्रे, अत्तरे, सुगंधी पदार्थाचे व्यापारी, जवाहिरे, गुरेढोरे पाळणारे, दूध-दुभत्याचे व्यावसायिक, सुशिक्षित समाजवर्ग, शेतकीविषयक व भौतिक शास्त्राचे पदवीधर, सिनेमा व नाटकात काम करणारे नटनट्या येतात. हे नक्षत्र रोख पैसा देणारे असल्याने द्राक्षे, मोसंबी, ऊस, चिक्कू, आंबे अशा बागायतीला अनुकूल आहे. कमी कष्टात भरपूर मोबदला हा या नक्षत्राचे फलादेश आहे.

रोहिणी नक्षत्राचा प्रभाव स्वर, गळा व घशावर आहे. या नक्षत्रावरच्या लोकांना फळे, फळांची सरबते, शीत पेये व गोड पदार्थ फार आवडतात. यामुळेच यांना होणारे आजार गळा किंवा घशाचे रोग, सर्दी, कफ, घसा बसणे, सुजणे, घटसर्प, टॉन्सिल वाढणे, पोटात गॅसेस धरणे, हवामानातील बदलामुळे तब्येत बिघडणे, शरीरात साखर उत्पन्न होऊन मधुमेह (उत्तरार्धात) होणे अशा प्रकारचे असतात. परंतु रोहिणी नक्षत्रावर होणारे आजार फारसे दाहक किंवा तीव्र नसून सौम्य पण सारखे उद्भवणारे असतात. या जातकांनी आहार व वागण्यामध्ये नियमितपणा ठेवल्यास व व्यायामाची सवय लावल्यास ठणठणीत राहतील.

सर्वसाधारणपणे या नक्षत्रात बहुतेक सर्वत ग्रह शुभ फळे व थोडे तरी धन देणारे आहेत.

रोहिणी नक्षत्री रवि उत्तम शरीरप्रकृती देतो. धनिक शेतकरी, बागवान, सरकारी अमलदार तसेच मानमान्यता यांना चांगला.

रोहिणी नक्षत्री चंद्र यश, सौंदर्य, शांतता, ऐश्वर्य, रसिकता, व्यापार, शेती, दलाली व वाहनसौख्य चांगले देतो.

रोहिणी नक्षत्री मंगळ शेतीवाडी, जमीनजुमला, दुभती, गुरेढोरे पाळण्यास किंवा वाहन अथवा वस्त्रासंबंधी यांत्रिक कामाचे शिक्षण ई. प्रदान करतो.

रोहिणी नक्षत्री बुध व्यावहारिकपणा, सर्व वस्तूंची विशेषतः धान्य व वस्त्रांच्या व्यापारातील दलाली, किरकोळ व्यापार तसेच चतुरपणा, हिशेबीपणा देतो. शिक्षणासाठीही बुध अनुकूल.

रोहिणी नक्षत्री गुरु उत्तम बुद्धिमत्ता, वाणिज्य व निरनिराळ्या शास्त्रातील उच्च शिक्षण, लेखन, काव्य, सौंदर्य, ऐश्वर्य, मानसन्मान व संसारसुख देतो.

रोहिणी नक्षत्री शुक्र सौंदर्य, भोग, अलंकार, वाहन सौख्य, ऐश्वर्य, विलास, गायन, वादन ई. कला, समाजप्रियता देतो. चंद्र, शुक्र या नक्षत्रात असल्यास या स्त्रि जातकांना हवाई सुंदरी अथवा मॉडेलिंग क्षेत्रासाठी चांगला असतो.

रोहिणी नक्षत्री शनि असता स्थिर बुद्धी, मोठा व्यापारी विशेषतः कापड, धान्य व लॉटरी, कॉन्ट्रॅक्टर तसेच मोठ्या प्रमाणावर शेतीवाडी, जमीन व गुरेढोरे असणारा असतो. शास्त्र, व्यापार अथवा इंजिनिअरिंग शिक्षणासाठी चांगला.

रोहिणी नक्षत्री राहू गावी शेतीवाडी, जमीनजुमला व इस्टेट देतो. तसेच मेंढपाळ अथवा गुरेढोरे व म्हशी बाळगण्यासाठी चांगला असतो. शास्त्रीय तसेच स्थापत्य शास्त्राच्या शिक्षणासाठी अनुकूल असतो. गावात वजनदार व्यक्ती म्हणून नावलौकिक असू शकतो.

रोहिणी नक्षत्री केतू फारसे नाही, पण उत्तम शरीरयष्टी व गरजेपुरते धन देईल.

रोहिणी नक्षत्री हर्षल असता विलक्षण बुद्धी, संशोधक, जरा रसिक, आनंदी व थोडीफार मालमत्ता करणारा असतो.

रोहिणी नक्षत्री नेपच्यून शांत व आनंदी स्वभाव, संगीताची व सौंदर्याची आवड, तसेच साक्षात्कार व ईश्वरभक्ती यांना अनुकूल असतो.

रोहिणी नक्षत्र सुंदर व तेजस्वी असल्याने हस्ताक्षरही मोठे, गोल, वळणदार व सुरेख असते. या नक्षत्रावर २ व ६ या अंकाचे वर्चस्व आहे. आणि रत्न चंद्राचा मोती किंवा शुक्राचा हिरा आहे. नक्षत्र अंधलोचनी असल्याने या नक्षत्रावर एखादी वस्तू हरवल्यास, ती थोड्याच प्रयत्नाने व जवळच सापडू शकते.

मुहूर्त शास्त्रात रोहिणी हे तर महत्वाचे नक्षत्र आहे. मुंजी, विवाह, बारसे, नवीन वस्त्र नेसल्यास किंवा सोन्याचे अलंकार अंगावर धारण करण्यास, अलंकार करावयास देण्यास, नवीन वाहन किंवा सुखसोयीच्या वस्तू विकत घेण्यास तसेच गायन, वादन व कलाकौशल्याची कामे शिकण्यास फारच चांगले. स्थिर नक्षत्र असल्याने पायाभरणी, शिलान्यास, कोनशिला बसविणे, वास्तुशांती किवा गृहप्रवेश, ई कार्यासाठी शुभ असते. ऊर्ध्वमुखी असल्याने शोभादायक कृत्ये, घरावर मजला चढवणे, देवळावर कळस चढवणे ही कार्ये करणेस चांगले. शेतकरी वर्गाला बी पेरण्यास, बागायतदार, फळाफुलांचे व सुगंधी वस्तूंचे व्यापारी यांना नवीन व्यवसाय किंवा दुकान सुरू करण्यास उत्तम.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

सामुदायिक प्राण संकट आणि ज्योतिष


विषय : प्राणघातक सामुदायिक अपघात आणि ज्योतिष

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : फलज्योतिषातील शंका समाधान

नमस्कार,

जेव्हा जेव्हा एखादी दुर्घटना घडते आणि एकाच वेळीं अनेक जण प्राण गमावतात, तेव्हा तेव्हा या सर्वांची कुंडली मृत्यू योग दाखवते का, त्यावेळी त्या सर्वांचे ग्रहयोग बिघडले होते का? ज्योतिषशास्त्राचे यावर काय उत्तर आहे? असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. विशेषतः ज्योतिषशास्त्राची चेष्टा करणारे तर या गोष्टीचे नेहमीच भांडवल करतात. 

याचे उत्तर ज्योतिषी वि. के. फडके यांनी त्यांच्या एका पुस्तकात थोडक्यात पण तर्क युक्त दिले आहे.

मृत्यूचे एकंदर दोन प्रकार आहेत. अपमृत्यू व महामृत्यू. 

यांपैकी अपमृत्यू हा केव्हाही व कुठेही येऊ शकतो. 

महामृत्यू मात्र असा केव्हाही येत नाही. 

प्रत्येकाच्या महामृत्यूची तारीख व वेळ निश्चित असते. त्या तारखेला व वेळेला हा मृत्यू येणारच. मग तुम्ही त्या वेळी अगदी सुरक्षित ठिकाणी एखाद्या गादीवर लोळत असा वा तुमच्याभोवती संरक्षणासाठी दहा-बारा संरक्षक त्या वेळी असोत! त्या मृत्यूला कोणीही थोपवू शकत नाही.

अपमृत्यूचे मात्र तसे नसते. रस्त्याने चालता चालता मागून स्कूटर किंवा रिक्षाची धडक बसली, तर तो मनुष्य त्या वेळी त्याच्या नशिबात महामृत्यू लिहिलेला नसतानाही मृत्यू पावतो. एखादे विमान किंवा जहाज यामधून प्रवास करताना ते विमान पडले किंवा जहाज पाण्यात बुडाले तर त्यातील बहुतेक प्रवासी अपमृत्यूचे बळी ठरतात. 

अशा वेळी त्या प्रवाशांपेक्षा त्या विमानाची किंवा जहाजाची वा वाहनाची कुंडली काम करीत असते, त्या कुंडलीमध्ये तुम्हाला हे योग आढळून येतील.

मला तरी हे विश्लेषण योग्य वाटले. पण या दृष्टीने सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. खरेच त्यात तथ्यांश आढळला, तर अशा वाहनांच्या उत्पादनाची जन्म टिपण पाहून अनिष्ट काळात त्या वाहनाच्या फेरी रद्द केल्या आणि लोकांचा अपमृत्यू टाळता आला तर, याच्या इतके प्राचीन ज्योतिष शास्त्राचा उपयोग करून केलेलं संशोधन सर्वात अभिनव व मानवोपयोगी ठरेल, असे मला वाटते.

आपल्याला काय वाटते?

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)

संपर्क : 7058115947

(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

गुप्त धन अथवा अकल्पित धन योग


विषय : गुप्त धन अथवा अकल्पित धन योग

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : जातक निदान

नमस्कार,

माणसाला पूर्वापार गुप्त धन अथवा अकल्पित धन योग, लॉटरी अशा धनाचे थोडक्यात विनाकष्ट मिळणार्या धनाचे नेर्हमीच आकर्षण वाटत आले आहे. आज त्या विषयीच काही माहिती आपण घेणार आहोत. जातक निदान या ग्रंथात सायन व परीभ्रमण पद्धतीने यावर विपुल लिखाण आहे. पण निरयन पद्धतीला देखील हि फळे चपखल बसतात, असे मला वाटते.

जन्मकुंडलीतील २ रे स्थान व ११ वे स्थान स्वतःच्या नोकरी व्यवसाय धंद्याच्या द्वारे, कर्तबगारीने मिळणारा पैसा दर्शवते. परंतु गुप्त धन, अकल्पित धन, लाचलुचपतीतून मिळविलेले पैसे, स्त्री धन, वारसा संपत्ती ई. पाहताना ८ वे स्थानाचे परीक्षण केले पाहिजे. २ रे स्थानापासून हे स्थान ७ वे येते. म्हणजे धनस्थानाची पूर्तता ८ वे स्थान करते. ७ वे स्थानापासून हे स्थान २ रे आहे जे स्त्रीचे धनस्थान आहे. म्हणून स्त्री धन, सासऱ्याकडून मिळणारा पैसा ई. दर्शवते. अष्टमेश सप्तमस्थानी किंवा सप्तमेश भाग्यस्थानी असावा लागतो.

८ वे स्थान मृत्युस्थान मानले जाते. म्हणून मृत्यूपासून, मृत्यूपत्रानुसार मिळणारे पैसे, विमा ई. दर्शवते. एखाद्या नातेवाईकाच्या मृत्यूपासून किंवा सासऱ्याकडून पैसा मिळण्याची शक्यता असते. ह्या पैकी कोणताही ग्रह ८ वे स्थानी स्वगृही असेल अगर मित्रगृही असेल, तर अकल्पित धन मिळण्याची शक्यता जास्त बळावते.

गुरु, चंद्र व शुक्र हे ग्रह गुप्तधन देण्यास समर्थ आहेत. जन्मकुंडलीमध्ये ८ वे स्थानी गुरु, चंद्र व शुक्र हे ग्रह, अष्टमेश २ रे स्थानी व पंचमेश ११ वे स्थानी अशी स्थिती असेल, तर अशा जातकास नोकरीमध्ये विशेष श्रम न करता अथवा लाचखोरीने प्राप्ती होते.

अष्टमस्थानी असणाऱ्या ग्रहावर जर शनि, हर्षल, मंगळ यांचा काटकोन योग अगर प्रतियोग असेल, तर वारसा मिळण्याचे अगर अकल्पित धनलाभाचे कामी अडथळे येतील व वारसाची पूर्ण रक्कम अगर संपूर्ण इस्टेट मिळणार नाही. शनि, हर्षल, मंगळ यांपैकी एखादा ग्रह अष्टमातील ग्रहांशी युतित असेल व ती युति स्वगृही अगर मित्रगृही नसेल, तर त्या योगाचा नाश होईल व ही युति अनुकूल राशीत असेल तर वारसा, धन वगैरे मिळेल; परंतु पुष्कळ संघर्षाने मिळेल.

गुरु-चंद्राची युति अगर चंद्र-शुक्राची युति अष्टम स्थानी असेल तर अकल्पित द्रव्यलाभास फार उत्तम असते. या योगावर कोणत्याही ग्रहाची अशुभ दृष्टि नसेल, तर मात्र लॉटरीमध्ये मोठे घबाड हाती लागण्याचा संभव असतो. स्वगृहीचा अगर उच्च राशीचे गुरु, चंद्र, शुक्र हे लॉटरीचे बाबतीत फार अनुकूल असतात.

हे ग्रह केव्हा फल देतील हे फार महत्त्वाचे असते.

अष्टम स्थानी गुरु असेल तर त्याचे फल १२, २४, ३६, ४८, ६० ह्या वर्षी मिळू शकते.

शुक्र असेल तर ८, १६, २४, ३२, ४०, ४८, ५६ ह्या वर्षी मिळू शकते.

शुक्र असेल तर प्रत्येक चवथे वर्षी तसा योग येईल. (चंद्राचा परिभ्रमण योग चार वर्षांचा आहे)

अष्टम स्थानी राहू, केतू असणे गुप्त अगर अकल्पित द्रव्यलाभास फार वाईट. राहू येथे मिथुन राशीचा असेल तर मात्र बरा. इतर राशीचा राहू असेल तर अकल्पित लाभाचे आलेले योग नाहीसे होतील. अष्टम स्थानी राहू असता स्त्री धन मिळण्याची मुळीच आशा नाही.

अष्टम स्थानी केतू असणे दारिद्र्य योग आहे.

अष्टम स्थानी बलहीन अगर अशुभ दृष्टियोगात असलेला शनि गुप्त धन देणार नाही. शनि बलवान असेल तर शेतीचा वारसा मिळेल. बलहीन शनि वृद्धापकाळी दारिद्र्य देईल. स्वतःचे जीवित दुसऱ्यावर अवलंबून असेल.

अष्टम स्थानी मंगळ गुप्त धनास प्रतिकूल. अशा लोकांनी लॉटरीची तिकिटे घेऊ नयेत.

अष्टम स्थानी कन्या अगर मिथुन राशीचा बुध अकल्पित द्रव्यलाभास फार चांगला असतो. स्त्रीधन वगैरे मिळतेच, परंतु सट्ट्याच्या व्यापारात फायदा होतो.

अष्टम स्थानी हर्षल अशा कामास मुळीच अनुकूल नाही. येथे हर्षल मकर, कुंभ अगर मीन राशीच्या जोरदार ग्रहांच्या दृष्टित असेल तर लॉटरीमध्ये अकल्पित लाभ होईल, कोणा नातेवाईकाच्या अकस्मित मृत्यूमुळे फायदा होईल; परंतु सर्वसाधारणपणे हर्षल प्रतिकूल समजावा.

हर्षल अष्टम स्थानी असताना व तो हर्षल शुभदृष्टि संबंधात असेल तर वारसा वगैरे मिळण्याचा संभव असतो. अनपेक्षित लाभ होतील; परंतु हर्षल हा ग्रह विलक्षण गुणधर्माचा असल्याने चांगली अगर वाईट फले केव्हा मिळतील हे निश्चित नसते. अष्टमेश हर्षल असता (अष्टमात मीन राशि असेल तर) अगर अष्टमात हर्षल असता असा प्रसंग येतो, त्यात धोका होण्याचा संभव असतो. त्याप्रमाणेच अशा लोकांनी भांडणाच्यामध्ये जाऊ नये अगर दंगा असलेल्या ठिकाणी देखील जाऊ नये.

नेपच्यून ह्या ग्रहाचा संबंध अष्टमस्थानी असता अकल्पित धनलाभाचा योग येत नाही; परंतु एखादे वेळी असा योग दुसऱ्या ग्रहामुळे आल्यास दुसरा कोणीतरी कपट करून अगर विश्वासघात करून पैसा लाटेल. अष्टमस्थानी नेपच्यून असताना केमिस्ट अगर ड्रगिस्टकडून औषधे घेताना काळजीपूर्वक घ्यावीत. औषधामध्ये प्रामाणिक चूक होऊन प्राण गमविण्याची पाळी येते.

वार्षिक कुंडलीमध्ये जेव्हा रवि, शुक्र, गुरु जन्मतः अष्टम स्थानी असलेल्या ग्रहांशी शुभ योग करतील तेव्हा अकल्पित द्रव्यलाभाचे जन्मत: असलेले योग उत्तेजित होतील.

अष्टम स्थानी रवि अकल्पित द्रव्यलाभास अनुकूल नाही. मात्र इतर ग्रहांमुळे होणारे गुप्त धनयोग रविमुळे भंग पावणार नाहीत.

अष्टमस्थानी चंद्र असून तेथे रवि असेल तर चंद्राचे योगात जास्त भर पडेल.

तसेच रवि, गुरु, शुक्र यांचे समजावे.

अष्टम स्थानातील शुभ ग्रहांशी मंगळाची युति धनयोग भंग करील. युतीच्या गुणधर्माप्रमाणे अनुकूल अगर प्रतिकूल युतीचे निदान करावे.

अष्टमेशावर कोणत्याही ग्रहाची पापदृष्टि असेल तर वारसा वगैरे मिळणार नाही. पापदृष्टि एखादी परंतु शुभदृष्टियोग फार बलवत्तर, तर तसे योग थोड्या प्रमाणात येतील. सरकारी नोकरीत लांचलुचपतीपासून द्रव्य मिळविणाऱ्या लोकांच्या कुंडलीत जन्मतः, चंद्र अगर शुक्र अष्टम स्थानी असतो तो कोणत्याही राशीचा असला तरी चालेल; पैसा मिळेलच. राशिबली असला तर जास्त पैसा मिळेल. ह्या ग्रहांवर हर्षल, रवि, मंगळ यांची अशुभ दृष्टि विशेषतः काटकोनयोग असून शनि ९,१०, १२ वे स्थानी असेल तर मात्र अशा लोकांनी फार जपून असावे. त्यांचेवर चौकशी होऊन खटले होतील.

चंद्र-शुक्रावर अशुभ दृष्टि नसेल तर मात्र असा द्रव्ययोग चांगला पचनी पडेल.

अष्टमेश रवि असून वर सांगितलेल्या स्थानी शुभ दृष्टि असेल तर वारसा दजनि आपल्यापेक्षा जास्त असलेल्या नातेवाईकांकडून मिळेल व तो नातेवाईक वडिलांच्या बाजूचा आपल्या कुळातील पुरुष असेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी की, अष्टमेश म्हणून ह्या रविला काही महत्त्व नाही. त्यामुळे वारसा वगैरे मिळण्याचा फारसा संभव नसतो. अष्टमेश रवि बलिष्ठ असेल तर सासरा मोठ्या दर्जाचा मिळून त्याचेकडून रोख प्राप्ती होते. वारसा वगैरे मिळत नाही किंवा उद्योगधंद्यामध्ये चांगले भागिदार मिळून त्यात पैसा मिळतो. हा योग वयाचे १९ अगर ३८ ते ४२ वर्षेपर्यंत येईल.

अष्टमेश चंद्र असून बलिष्ठ नसेल, तर वारसा, लॉटरीत पैसा वगैरे मिळण्याचा फारसा संभव नाही. नोकरीमध्ये बक्षिसाच्या रूपाने काही पैसा मिळेल. सार्वजनिक संस्थेच्या बाबतीत फायदा होईल. सार्वजनिक हिताची कामे हाती येऊन त्यामध्ये फायदा होईल. असा योग असता तो २०, २४, ३०, ३६, ४०, ४४ वर्षी येईल.

अष्टमेश बुध ‘असेल तर ह्या बाबतीत तो मुळीच अनुकूल नाही. स्त्रीधन वगैरे मिळणार नाही. पैशासंबंधी नेहमी अडचणी येतील. बुध बलिष्ठ असेल तर एखाद्या इस्टेटीचे ट्रस्टी वगैरे नेमण्यात येईल व त्यामध्ये थोडी प्राप्ती होईल. अष्टमेश बुध अष्टम स्थानी असल्यास अकल्पित प्राप्ती होईल.

अष्टमेश शुक्र असेल तर धनाचे कामात उत्तम. त्याच्या योगाने केव्हातरी आयुष्यात वारसा अगर अकल्पित द्रव्यलाभ होण्याचा योग असतो. स्त्री चे नातेवाईकाकडून पैसा मिळेल. मृत्यूपत्राद्वारे अकल्पित धनलाभ होईल, अगर एखादी इस्टेट मिळेल. जेव्हा जेव्हा जन्मशुक्राशी वार्षिक कुंडलीतील ग्रह शुभ दृष्टियोग करतील तेव्हा तेव्हा चांगलाच फायदा होईल. लॉटरीमध्ये पैसा मिळेल. उद्योगधंद्यामध्ये कल्पनेबाहेर लाभ होतील. शेवटचे दिवस शांततेमध्ये जातील. अपघात, धोका वगैरे होण्याची भीति नसते. शुक्राचे परिभ्रमण आठ वर्षांनी असल्यामुळे १६, २४, ३२, ४०, ४८ ही वर्षे फार महत्त्वाची जातील. ह्यावेळी सांपत्तिक स्थितिमध्ये काहीतरी अनुकूल परिस्थिती प्राप्त होईल..

अष्टमेश मंगळ असेल तर वारसा, लॉटरीत पैसा वगैरे मिळण्याची आशा करू नये. तसा योग व्यावहारिकदृष्ट्या असला तरी प्रत्यक्ष वारसा हाती असल्याखेरीज ह्याची खात्री वाटत नाही. मंगळ अतिशय बलिष्ठ असेल तर नातेवाईकाकडून जमिनीच्या रूपाने थोडासा वारसा मिळेल. परंतु पुष्कळ वेळा अष्टमेश मंगळ असता खोटी आशा लावतो. शेवटी ती आशा केव्हाही सफल होत नाही. अष्टमेश मंगळ असता रेल्वे, मोटार अगर सार्वजनिक वाहनांसंबंधी अपघात होण्याचा संभव असतो. मंगळ बलिष्ठ असता थोडासा वारसा मिळण्याचा संभव वयाचे ३० ते ४५ ह्या वर्षी असतो.

अष्टमेश गुरु बलिष्ठ असेल तर ह्या सर्व बाबतीत फार उत्तम असतो. मृत्यूपत्राद्वारे इस्टेट मिळते. नातेवाईकांकडून फायदा होतो. भागिदार अगर कुटुंबाच्या नातेवाईकांकडून फायदा झालाच पाहिजे असा हा योग आहे. हा योग असा आहे की, त्याच्या योगाने प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रीतीने फायदा होतोच. ज्याला नशीब अगर चान्स म्हणतात ते अनुकूल असते. सरकारी नोकरांच्या कुंडलीत असा योग असता असा अनुभव आला आहे की, एखादा मनुष्य सिनिअर वगैरे नसता एखाद्या हंगामी जागी नेमला जातो. काही अडचणीमुळे कायमचा मनुष्य रुजू होऊ शकत नाही. तेव्हा हा मनुष्य त्याचा हक्क नसतानाही त्या जागी पुष्कळ दिवस राहू शकतो किंवा सिनिअर माणसाच्या अकाली मृत्यूमुळे त्याचा फायदा होतो. दुसऱ्याच्या नुकसानीने स्वतःचा फायदा होणे हा ह्या योगाचा मुख्य धर्म आहे. सर्व ग्रहांमध्ये ह्या बाबतीत अष्टमेश म्हणून गुरूला जास्त महत्त्व आहे. शेवटचे दिवस शांततेमध्ये जातील. गुरूची परिभ्रमण वर्षे २४, ३६, ४८, ६०.

अष्टमेश रवि असेल तर या बाबतीत फायदा होणार नाही. निराशा व आशाभंग होईल. दुसऱ्याकडून पैसे मिळण्याची केव्हाही आशा धरू नये. स्त्रीधन मिळणार नाही. उलट स्त्री गरीब घराण्यातील मिळेल. व्यापारधंद्यामध्ये भागिदार चांगले मिळणार नाहीत. शनि अष्टमेश असताना एकच फायदा असतो तो हा की, मनुष्य पुष्कळ वर्षे जगतो व आपल्या आयुष्यातील बऱ्यावाईट कृतींचा विचार करण्यास त्यास भरपूर वेळ मिळतो. शेवटचे दिवस थोड्या विवंचनेत जातात. खिचपत पडणाऱ्या आजाराने शेवट होतो.

सट्टे, जुगार, शर्यती यांचा विचार ५ वे स्थानावरून होतो. पंचमेश ५, ९, ११, १, ३ रे स्थानी शुभ दृष्टिमध्ये असेल, तर अशा बाबतीत पैसा मिळण्याचा संभाव असतो. पंचमेश रवि, मंगळ, गुरु असेल तर अनुकूल असतात. रवि, गुरु यश देतील. मंगळ धाडस देईल, परंतु त्यांत अविचार असेल. शनि, हर्षल, नेपच्यून, बुध हे पंचमेश असून शुभ संबंधित असतील तर साधारण फायदा होईल. मात्र हे ग्रह पंचमेश असून कोणत्याही ग्रहांचे अशुभ दृष्टिसंबंध असतील तर ह्या योगावर जन्मलेल्या लोकांनी सट्टे, जुगार, शर्यती यात नुकसान होईल. शुभ ग्रहांचा अशुभ दृष्टियोग असेल तर नुकसान येईलच परंतु ते ऐपतीबाहेर नसेल. परंतु अशुभ ग्रहांचा दृष्टियोग होईल तर अशा जातकास खूप नुकसान संभवते. हर्षल पंचम स्थानी असल्यास सट्टे, शर्यतीचा नाद जरूर लागतो व त्याचा परिणाम हर्षल मकर, कुंभ, तूला राशीचा नसेल अगर त्यावर रवि-चंद्राचा शुभयोग नसेल तर फार वाईट होईल. इतर वेळी हर्षल, पंचमस्थानी जुगार, सट्टे, शर्यती यास बरा असतो. स्वभाव धाडसी असतो. पंचमस्थानी चंद्र शुभ राशीचा व अशुभ दृष्टिरहित असेल तर सट्टे वगैरे मध्ये चांगली प्राप्ती होईल. मात्र चंद्र पंचमस्थानी असता जुगाराचा नाद फार लागतो. ज्यामध्ये धोका आहे अशा धंद्याकडे लक्ष जाते व पंचमस्थानी चंद्र असलेले लोक अनेक धंदे हाती घेतात.

सट्टे, शर्यती ई. गोष्टी करताना वार्षिक कुंडलीमध्ये रवि-शनि, शनि-हर्षल, रवि-हर्षल, मंगळ-हर्षल यांचे एकमेकांशी त्या वर्षी अशुभ योग नसावेत, ज्या महिन्यात या गोष्टी करावयाचे असतील त्यावेळी चंद्राचा मासिक अशुभ योग नसावा. गुरु अगर शनि गोचर पद्धतीने अशुभ नसावेत व साडेसातीचे अनिष्ट वर्ष नसावे. ज्या दिवशी सट्टे, शर्वती, फरक बगैर कामे करावयाची असतील त्या दिवशीचा चंद्र पंचमेशाशी शुभ योग करीत असावा.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)