Category: Uncategorized

आश्लेषा नक्षत्र विचार


विषय : आश्लेषा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण आश्लेषा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

९. आश्लेषा नक्षत्र :

आश्लेषा नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील ९ वे नक्षत्र आहे. वेटोळे घालून पसरलेल्या सापासारखी किंवा मराठी ९ अकासारखी भासते. हे नक्षत्र अधोमुखी, तीष्ण, दारुण, मंदलोचनी, जीवाग्नि तत्त्वाचे व चतुष्पादी आहे. या नक्षत्राचे ४ ही चरण कर्क राशीत येतात. या ४ चरणांवर अनुक्रमे गुरु शनि, शनि व गुरुचे स्वामित्व आहे. नक्षत्राचा स्वामी बुध, राशीस्वामी चंद्र व दैवत सर्प असल्याने या नक्षत्रात बहुतांशी अवखळपणा, चंद्राचा सुखासक्तपणा व सर्पाचा सुस्त व जागरूकपणा यांचे मिश्रण आढळते. या नक्षत्राचे इंग्रजी नाव ‘झीटा ‘हेड़ी’ आहे.

आश्लेषा म्हणजे डोक्यावर पृथ्वीचा भार घेणारा आदिशेष. भारतात नागाला नाग देवता म्हणतात आणि श्रावण महिन्यातील पंचमीला नागाची पूजा केली जाते.

शेषनाग (विष्णूचा सर्प/विष्णुशाय) आणि वासुकी (शिवाचा सर्प) या दोन्ही सर्पांचे आश्लेषा हे जन्म नक्षत्र आहे. या नक्षत्रापासून कलियुगाची सुरुवात झाली असे मानतात.

दुर्वासाच्या शापामुळे देवतांच्या सान्निध्यात मंदाराचल पर्वत आणि वासुकी नागाच्या मंथनाने असुरांनी दुधाचा सागर मंथन केला, यातून वनौषधी आणि १४ रत्ने प्राप्त झाली अशी कथा प्रसिद्ध आहे.

हे नक्षत्र अंगावर काहीतरी भार टाकणारे आहे. स्व. पंतप्रधान के पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लग्नी चंद्र आश्लेषा नक्षत्री होता. त्यांच्यावर स्वतंत्र झालेल्या भारताचा भार होता. हा भार त्यांनी किती यशस्वीपणे पार पाडला. संकटाला तोंड देऊन देशात लोकशाही टिकविण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या लोकनायक श्री. जयप्रकाश नारायण यांच्या कुंडलीत लग्नी आश्लेषाचाच मंगळ आहे. आयुष्यभर रामाच्या मागे सावलीसारखा असणारा व वनवासात असता डोळ्यात तेल घालून रामाला जपणाऱ्या लक्ष्मणाचेही आश्लेषा नक्षत्रच होते. प्रभू श्री रामचंद्रांचे नक्षत्र पुष्य तर त्यांच्या पाठीवरील लक्ष्मणाचे नक्षत्र आश्लेषा. त्यामुळे या नक्षत्राला लक्ष्मण नक्षत्र असेही म्हणतात. हे नक्षत्र नुसतेच अंगावर भार किंवा जबाबदाऱ्या न देता, त्यास यशस्वीपणाने पार पाडण्याचे सामर्थ्यही देते.

आश्लेषा नक्षत्रात ठळक असे ५ तारे असून ते रंगाने थोडे पांढरट पिवळे, तेजस्वी व थोडेसे काटेरी दिसतात. आकाशात हे नक्षत्र अतिशय ठळकपणे चमकताना दिसते. पौष किवा माघ महिन्यात ते रात्रभर आकाशात दिसते. या नक्षत्राला गंडातर ताऱ्यातील नक्षत्र म्हणतात. विशेषतः नक्षत्राचे शेवटचे २ किंवा २ घटी गंडातरात येतात. कारण हे नक्षत्र व कर्क राशी एकाच ठिकाणी संपून लगेच मघा व सिंह राशीच्या विभागाचा प्रारंभ होतो. या नक्षत्राच्या संधीवर जन्म लग्न बिंदू किवा चंद्र असता या व्यक्तीवर अनेक संकटे व गंडांतरे येतात असे मानले जाते.

आश्लेषा नक्षत्रावर जन्मणाऱ्या (लग्नी असता) जातकाचा बांधा मध्यम उंच व जास्त आडवा असतो. बांधा जरासा अप्रमाणशीर असतो. शरीर अवयव पुष्ट व मांसल असतात. पोट, मान, मांड्या, मनगटे, नितंब व हाताच्या पंजाचे आकार वाटोळे, मोठे व गोलाकार असतात. कपाळ व चेहरा रुंद व अर्थ वर्तृळाकार असतो. नाक जरा लांबट, नाकाचा शेंडा खाली व नाकपुड्या मागे असतात. गाल फुगीर व गोबरे असतात. पावले आतल्या बाजूस वळलेली असून चालणे तिरपे असते. अवयव ढिले असतात. स्वभाव सुस्त, भिडस्त, ऐषारामी, सुखासक्त, चंचल, नाटकी, भावनाप्रधान, विकारवश, मोहाला बळी पडणारा व भित्रा असू शकतो. या जातकांना घराबद्दल व कुटुंबाबद्दल फार ओढ असते. यांचे स्वतःचे मत बदलते असू शकते. त्या दुसऱ्यांच्या तंत्राने चालणाऱ्या व वहावत जाणाऱ्या असु शकतात. हे नक्षत्र राक्षसगणी असले तरी तामसी, निर्दयी किंवा कुटील नाही, तर त्यांच्या आचारविचारात महत्त्वाकांक्षा, ध्येय अथवा तारतम्यता नसून केवळ खावे, प्यावे, मजा करावी व स्वप्नात दंग व्हावे असे वाटू शकते.

आश्लेषा जातक स्त्रियांना हे नक्षत्र फारसे महत्त्वाचे नाही. सौंदर्य, कला अथवा गुणांच्या दृष्टीने ते अनुकूल नसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रियाही आडव्या, थोड्या अप्रमाणशीर बांध्याच्या असतात. अवयव पुष्ट गोलाकार व आकारहीन असतात. अंगात चपळ व तरतरीपणा नसतो. त्या तरुण वयातच अंगाने सुटतात. या स्त्री जातकांना घर व कुटुंबाची ओढ असली तरी घरातील कामापेक्षा आराम प्रिय असतो. त्यांना नाटक, सिनेमा, टीव्ही, रेडिओ, संगीत, वाहनातून प्रवास यांची आवड फार असते. संगीत, गायन, वादन, कलाकौशल्याच्या गोष्टींची आवड असली तरी त्या गोष्टी शिकण्यापेक्षा त्यांच्या आनंद उपभोगण्याची वृत्ती जास्त असते. त्या कलावंत नसून कलाप्रिय असतात. फॅशनची आवड असली तरी आळशीपणामुळे त्यांना ती जमत नाही. स्वभावाने मात्र त्या प्रेमळ, उदार, दयाळू, भावनाशील व कुटुंबवत्सल असतात.

आश्लेषा नक्षत्र मिश्र गुणधर्माचे आहे. ते पराक्रमी, कर्तृबवान, जागरूक व प्रचंड कार्य करणारे आहे. तसेच शांत, सुस्त, व निद्रित पण आहे. आश्लेषा म्हणजे सर्प. या नक्षत्रात रवि, मंगळ, शनि व राहू असे ग्रह असून ते लग्नी, तृतीयात अथवा दशमात असता हा सर्प जागरूक अवस्थेतला, सळसळणारा व चळवळ्या असतो. हे जातक कर्तबगार असून त्यांच्या हातून प्रचंड अलौकिक कार्य घडतील. आश्लेषा नक्षत्रात चंद्र, गुरु व शुक्रासारखे शुभ ग्रह असता हा सर्प वेटोळे घालून सुस्त होऊन पडणाऱ्या निद्रिस्त अवस्थेतला असतो. हे जातक आळशी, सुखासक्त व ऐहिक सौख्याच्या अधीन असतील. या नक्षत्रात रवि मंगळ, शनी व राहूसारखे ग्रह असता त्यांच्याकडे जबाबदाऱ्या किंवा प्रमुखपणा येतोच. त्या व्यक्ती कुटुंबाच्या कोणत्यातरी गावाच्या, पंचायतीच्या, राज्याच्या किंवा संस्थेच्या प्रमुख म्हणून असतात. आश्लेषा नक्षत्रात चंद्र, शुक्र व गुरु यांसारखे शुभ ग्रह असता त्या सुख देण्यापेक्षा सुख भोगण्यासाठी आलेल्या असतात. त्या दुसऱ्यांची सेवा करून घेण्यास अथवा दुसऱ्याकडून सुखोपभोग मिळवण्यास आलेल्या असतात. बऱ्याच वेळा या नक्षत्राचे जातक दुसऱ्याशी कितीही गर्विष्ठपणे किवा तुच्छतेने वागले, तरी त्या व्यक्ती यांच्याशी प्रेमाने व चांगल्या तऱ्हेने वागतात.

या नक्षत्रावरचे आजार फारसे दाहक नसले तरी बराच काळ टिकणारे असतात. प्रकृति सर्द व वातुळ असते. शीत विकारापासून त्रास होतो. थंडी, कफ, थंडीताप, पोटात गॅस धरणे, अपचन, ओकाऱ्या, मळमळणे, हवामानातील बदलामुळे होणारे रोग यापासून जास्त भीती असते. शनि असता डायरिया अथवा पोटात खडे होणे. मंगळ असता रक्तन्यूनता व रक्तदोष, गुरु असता मेदाधिक्य, वात, कॅन्सर, मधुमेह, अपचन यांची भीती तर राहू असता त्वचेचे विकार, केतू असता पोटात गॅसेस धरणे, जलोदर, पोट व पचनक्रिया बिघडणे यापासून त्रास. बऱ्याच वेळा राहू अशुभ असता सर्प, विंचू, फुरसे, कुत्रा अगर इतर विषारी प्राण्यांच्या दंशाची भीती असते. स्त्रियांनाही स्तनाचा कॅन्सर होण्याची भीती असते. मात्र या नक्षत्रात हे ग्रह बिघडलेले असतील तरच वरील रोगांचा संभव जास्त आहे.

आश्लेषा नक्षत्री रवि पुष्कळसा अनुकूल असतो. रवीला शारीरिकदृष्ट्या व अधिकारयोगाच्या दृष्टीनेही हे नक्षत्र चांगले आहे. शरीर अवयव, मांसल असून शारीरिक जीवन व रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. रवि ऐश्वर्य, कीर्ती, मानसन्मान व अधिकारही देईल. मात्र बऱ्याच वेळा स्वभावाने या व्यक्ती स्वार्थी, अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या व ख्यालीखुशालीत दंग होणाऱ्या असतात.

आश्लेषा नक्षत्री चंद्र असता शरीर भरलेले, अवयव मांसल व गुबगुबीत असतात. मात्र अंगात वात जास्त असतो. मध्यम वयातच शरीर सुटते. रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. चंद्र कर्तृत्व व महत्त्वाकांक्षा देणार नाही. या व्यक्ती सुस्त, आळशी, चैनी, सुखासक्त, चंचल, प्रवासाची व वाहनांची भयंकर आवड असणाऱ्या, विकारवश, भिडस्त, भावनाप्रधान, कल्पनासृष्टीत वावरणाऱ्या पण उदार असतात. मात्र ऐहिक सौख्य मिळण्याच्या बाबतीत भाग्यवान असतात.

आश्लेषा नक्षत्री मंगळ बऱ्याच दृष्टीने प्रतिकूल असतो. शरीर फोफसे असून रक्त कमी असते. शारीरिक जीवन व रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. स्वभावाने त्या भांडखोर, द्वेषी, दुष्ट, खर्चिक, उचळ्या व त्यात बिघडलेला मंगळ असता गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना त्रास देण्यात आनंद मानणाऱ्या व फाजील पराक्रमाने स्वतःवर संकटे ओढवून घेणाऱ्या असतात.

आश्लेषा नक्षत्री बुध असता अशक्त, दुर्बल, मंद बुद्धीच्या, खोटे बोलणाऱ्या, नकला, बनावट कृत्ये करणाऱ्या व दुर्भागी असतात.

आश्लेषा नक्षत्री गुरु सर्व प्रकारची सुख भोगण्यास चांगला. शरीर प्रकृती चांगली असते. शरीर भारदस्त, भरलेले, भरदार अवयव, पुष्ट, मांसल व गुबगुबीत असतात. चेहरा गोल व फुगीर असतो. गुरु हा सुखोपभोग, चैन व भाग्याच्या दृष्टीने बरा. मात्र तो उच्चपदे, अधिकार, सत्ता किंवा दर्जाच्या (नोकरीत) अनुकूल नाही. या नक्षत्रात गुरुचे फारसे शुभ गुणधर्म दिसून येत नाहीत. कारण या व्यक्ती स्वभावाने स्वार्थी, अहंकारी, घमेंडखोर, ऐहिक सौख्यात दंग असलेल्या व खादाड प्रवृत्तीच्या असतात.

आश्लेषा नक्षत्री शुक्र असता शरीरप्रकृती व सौदर्यदृष्ट्या साधारण. चेहरा सुंदर व मोहक असतो. मात्र बांधा जरा अप्रमाणशीर व स्थूल असतो. या स्त्रियाही उतार वयात सुटणाऱ्या असतात. स्वभावाने अतिशय चैनी, विलासी, रंगेल, भोगी, विषयासक्त, रसिक, हौशी, कलाप्रिय, सौंदर्यप्रेमी व शुक्र बिघडलेला असता व्यसनी, स्वैराचारी, दुर्गुणी, प्रेमात व मोहात गुरफटणाऱ्या असतात. पिण्याचे व्यसन फार असते. हाडापेरांची बरोबर वाढ होत नाही. शरीरप्रकृती अशक्त व दुर्बल असते.

आश्लेषा नक्षत्री चंद्र शनि युति असता बालपणी मुडदूस व आकडी या रोगांची भीती असते. डोळे मिचमिचे व बारीक असतात. कपाळावर आट्या फार असतात. बिघडलेला शनि असला तर जुनाट रोगाने आजारी पडणाऱ्या व व्यंग असण्याचा संभव असतो. स्वभावाने कपटी, घातकी, विषारी, आतल्या गाठीच्या, क्रूर व आयुष्यभर दगदग, काबाडकष्ट भोगणारा असतो.

आश्लेषा नक्षत्री राहू असता शरीर प्रकृती बरी, पराक्रमी, शूर व कर्तृववान असतो. मात्र बिघडलेला राहू असता पराक्रमी पण चैनी, गुन्हेगारी वृत्तीचा व समाजविघातक धंदे करणारा असतो. शुभ राहू असून तो ३, ६ व १० या स्थानात म्लैश्छ, यवन, जंगली लोक व मजूर वर्गावर प्रभुत्व देईल.

आश्लेषा नक्षत्री केतु मध्यम शरीर प्रकृतीच्या दृष्टीने जास्त खराब, वातापासून व थंडीपासून जास्त त्रास होतो. श्रम, कष्ट, दगदग फार होते. ऐहिक सौख्याच्या बाबतीत खराब असतो.

आश्लेषा नक्षत्री हर्षल शरीर प्रकृतीला चांगला पण स्वभावाने विक्षिप्त वृत्तीचा, विलासी, बुद्धीचा उपयोग वाईट कार्यासाठी करणारा, कपटी, आतल्या गाठीचा व शुक्राबरोबर असता प्रेमाच्या खेळात दंग होणारा व स्वतःचा नाश करून घेणारा असतो.

आश्लेषा नक्षत्री नेपच्यून असता रसिक, हौशी, वाघांची आवड असणारा असतो.

आश्लेषा नक्षत्रात सरकारी खात्यात काम करणारा वर्ग, विशेषतः ज्या खात्यात सत्ता नाही अशी खाती, तसेच नगरपालिका, कॉर्पोरेशन बॉडीज, प्रवासी कंपन्या, औषधी कंपन्यात काम करणारा वर्ग, खलाशी, मीठ व मासळी विकणारा वर्ग, गावातील वैदू, खेडेगावी अधिकार गाजवणारे तसेच नाटक, सिनेमा किंवा इतर करमणुकीच्या अथवा चैनीच्या ठिकाणी काम करणारा वर्ग येतो.

आश्लेषा नक्षत्रावर २ किंवा ९ या अंकाचा प्रभाव आहे. यापैकी २ अंकाचे वर्चस्व जास्त पडते. अनुकूल रत्न पाचू किंवा मोती आहे. पाचू जास्त योग्य वाटतो. हस्ताक्षर मोठे व ठळक असते. त्यात वेलांटी, मात्रा व अक्षरे यामधील पोकळ गोल मोठे काढतात. अक्षर सरळ रेषेत नसून वरखाली असते. लिहिण्याची गती पण बदलती असते. लोचन संज्ञा मंद असल्याने या नक्षत्रावर हरवलेली वस्तू थोड्या फार शोधाने सापडू शकते. वस्तू दक्षिण दिशेला सापडते.

आश्लेषा नक्षत्रात जन्म झाला असता अनिष्ट कालादि दोष मानून शांती करण्याची पद्धत आहे. दोष जन्मापासून ९ महिन्यांपर्यंत राहतो. पहिल्या ५ घटकांत जन्म झाला असता राज्यलाभ, त्यापुढील ७ घटिकात पितृनाश, त्यापुढील २ घटिकांत मातृनाश, त्यापुढील ३ घटिकात कर्मभोग, त्यापुढील ६ घटिकांत त्याग, त्यापुढील ९ घटिकात भोग, त्यापुढील ५ घटिकांत धन असे फलादेश आहेत. आश्लेषाच्या १ ल्या चरणात जन्म झाला असता शुभ, २ ऱ्यात धननाश, ३ ऱ्यात मातृनाश व ४ थ्यात पितृनाश असे चरणपरत्वे फलादेश वैदिक पद्धतीत सांगितले आहेत. आश्लेषाच्या शेवटच्या ३ चरणांवर जन्म झाला असता जन्मणाऱ्याच्या सासूला मृत्युपद फल मिळते. मात्र सासू नसेल तर हा दोष मानू नये.

मुहूर्त शास्त्रात या नक्षत्राचे महत्त्व नाही. ते क्रूर, राक्षस गणी व गंडांतराच्या योगातले असल्याने शुभकार्याला वर्ज्य आहे. ते अधोमुख असल्याने विहिरी खणण्यास आरंभ करणे, पुरलेले द्रव्य काढणे व पुरणे, यांना चांगले, तसेच द्यूत खेळणे, गणितारंभ, यंत्र साधना, मध काढण्यास आरंभ करणे. गलबत चालू करणे, रोग मुक्ती-स्नान, सर्पाचे विष उतरवणे यांना चांगले. याच्या १४ घटिका प्रयाणास वर्ज्य आहेत.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

मन करा रे प्रसन्न, आरोग्य वृद्धीचे साधन


विषय : मन करा रे प्रसन्न, आरोग्य वृद्धीचे साधन

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्व अभ्यास

नमस्कार,

कुंडलीचा थोडाफार अभ्यास असणाऱ्या सगळ्यांना माहित आहे की, कुंडलीतील ६ वे स्थान आजार दर्शवते. ६ वे स्थानास रिपू किंवा शत्रू किंवा रोग स्थान अशी नावे आहेत. खरतर अर्थ त्रिकोणातील हे एक स्थान आहे. अर्थ त्रिकोणात ६ वे स्थान प्रयत्न, संघर्ष वा नोकरी दर्शवते. १० वे स्थान कर्म अथवा व्यवसाय दर्शवते. आणि २ रे स्थान जे धन स्थान मानले जाते (जे आरोग्यासाठी एक मारक स्थान आहे). आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सर्वच जन भौतिक सुख व पैसा अडका मिळवण्यासाठी प्रचंड धकाधकीचे आयुष्य जगत असतात. व ही दगदग शरीरास असह्य झाली की आजार निर्माण होतात. आपण औषधोपचार घेतो व पटकन बरे व्हायचा विचार करत असतो. पण या सर्व रस्सीखेच शर्यतीत आपण आपल्या मनावर प्रचंड ताण निर्माण करत असतो, त्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो.

एखादा पेशंट हास्पिटलमध्ये अॅडमिट असतो. त्याच्या प्रकृतीत काही केल्या सुधारणा दिसत नसते. नातेवाईक डॉक्टरना विनवत असतात की, “काहीही करून आमच्या पेशंटला बरे करा”. तेव्हा डॉक्टर सांगतात, ‘अहो, आम्ही खूप प्रयत्न करतो आहोत. पण पेशंटचा ” ट्रीटमेंटला रिस्पॉन्सच मिळत नाहीये.”

आता पेशंटचा रिस्पॉन्स नाहीये म्हणजे काय ? याचा अर्थ डॉक्टरांनी नुसती औषधे शरीरात पाठवून उपयोग नसतो. पेशंटने त्या औषधांना प्रतिसाद द्यावा लागतो. तरच औषधांचा परिणाम शरीरावर होतो. पेशंट प्रतिसाद देत नाही म्हणजे पेशंटचे शरीर आणि मनही प्रतिसाद देत नसते. कोणत्याही आजारात, कोणत्याही ट्रिटमेंटमध्ये पेशंटच्या शरीर आणि मनाचा प्रतिसाद उत्तम असणे आवश्यक असते. जर आपण आपल्या मनाची शक्ती वाढवली तर आपल्याला आरोग्यप्राप्ती आणि रोगमुक्ती मिळवता येते. यासाठी आपल्या मनाबद्दल आणि त्याच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊ या.

माणसाला मन असते, पण शरीराच्या आतही कुठे मन नावाचा अवयव नाही. कारण, मनाला भौतिक अस्तित्व नाही. म्हणजे मनाला आकार, वजन नाही. ते डोळ्यांनी दिसत नाही, पण तरीही मनाचे अस्तित्त्व असते. मन आपल्या अनुभवाला येते. या मनाची आपल्या आरोग्यामध्ये फार महत्त्वाची  भूमिका असते, कारण व्यक्ती ही मन आणि शरीर दोन्हींची मिळून बनलेली असते. आपल्या आयुष्यात जे काही घडते ते आपल्या मनाच्या इच्छेमुळे. मनाप्रमाणे शरीरात बदल होतो. जरी आपण म्हणतो की शरीराला इच्छा होते. तरी ते पूर्ण सत्य नाही. माझ्या जिभेला गोड खाण्याची इच्छा झालीय, असे आपण म्हणतो. पण ती इच्छा खरी मनाची असते. जिभेला गोड चव आवडत असती, तर सर्वच व्यक्तींच्या जिभेला ती आवडली असती. पण तसे होत नाही. आवड निवड हे मन ठरवत असते. आपल्याला होणाऱ्या आजाराचे मूळ कारण हे कित्येक वेळेला मन असते. मनोकायिक आजार (सायको सोमॅटिक डिसिजेस) हा शब्द आपण ऐकला असेल. मनाचा परिणाम शरीरावर होऊन निर्माण झालेले आजार. सध्या वाढत्या प्रमाणात असलेले आजार म्हणजे मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, त्वचेचे आजार, श्वसनसंस्थेचे आजार, कॅन्सर असे अनेक आजार मनातील नैराश्य, चिंता, ताण यामुळे होतात, असे संशोधन सांगते. त्यामुळे कोणत्याही आजारामध्ये शरीराला ट्रिटमेंट देण्याबरोबरच त्याला मनाची शक्ती वाढवण्यासाठीच्या उपायांची जोड देणे गरजेचे आहे. मनाचा परिणाम शरीरावर होतो आणि ते रोज आपण अनुभवत असतो.

उदा. आपल्याला जो राग येतो, तो आपल्या मनाला येतो का शरीराला? तुम्ही म्हणाल मनाला, पण मन दिसत नाही, मग राग कसा दिसतो? एखादी व्यक्ती रागावली आहे हे आपल्याला कसे समजते? रागावलेल्या व्यक्तीचा चेहरा संतापाने लालबुंद होतो. डोळे मोठे होतात, तो माणूस मोठमोठ्याने बोलत राहतो. हे वर्णन तर शरीराचे झाले ना. याचाच अर्थ राग मनाला आहे पण त्याचा परिणाम शरीरावर दिसतो आहे. रागावलेल्या व्यक्तीचे हे झाले बाह्य वर्णन, पण रागामुळे. व्यक्तीच्या शरीरांतर्गतही अनेक बदल होत असतात. हृदयाचे ठोके वाढतात, नाडीगती वाढते, रक्त तापते इ.

आता मनातल्या रागाचा जो शरीरावर परिणाम झालेला असतो, त्यामुळे शरीरांतर्गत चाललेली अनेक महत्त्वाची कामे थांबतात. रागामुळे जो बिघाड झालेला असतो, तो दुरुस्त करण्यासाठी शरीरातील पेशींना काम करावे लागते. रागावलेल्या व्यक्तीला या सगळ्याची जाणीव नसते. तिला अस वाटत असत की मी रागावून समोरच्या व्यक्तीला कसं गप्प केलं. पण रागामुळे आपण त्या व्यक्तीच थोड आणि स्वत:चं जास्त नुकसान केलं आहे, हे तिला समजत नाही. जस रागाचं आहे तसं इतर भावनांचंही आहे. आपल्या मनातील प्रत्येक भावनेचा परिणाम: आपल्या शरीरावर होत असतो. नकारात्मक भावनांचा नकारात्मक आणि सकारात्मक भावनांचा सकारात्मक परिणाम होतो. नकारात्मक भावनांमुळे आजार निर्माण होतात. आपण रागावलो की शरीरावर जो परिणाम झालेला असतो, तो शरीर काही वेळात दुरुस्त करते. पण आपण सतत रागवत राहिलो तर शरीरावर त्याचे सखोल परिणाम होत राहातात आणि त्यातून पुढे दीर्घ आजारांची निर्मिती होऊ शकते.

माणूस आयुष्यभर इंद्रियांच्या साहाय्याने बाह्य जगातील सुखाची लयलुट करतो. त्या इंद्रियांना सुखाचे साधन म्हणून वापरतो. बाह्य जगातील भौतिक सुख प्राप्तीसाठी गतीशील राहतो. अशा साधनांकडून मिळालेल्या सुखाची सवय, त्याच्या मनाला लागलेली असल्यामुळे, ते मन प्रतीगतीच्या नियमानुसार सतत दुःख भोगत राहाते. अशाप्रकारे भावना आणि सुखगती यांच्याशी गुंफण घातलेल्या माणसाला, दुःखगतीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. रोगाची निर्मिती हा त्याचाच परिणाम आहे. माणूस मरणाला घाबरतो, यामागील सुप्त कारण कदाचित हेच असेल की त्याला जगण्याची आस असते.

६ वे स्थान वासना देखील दर्शवते. रिपू स्थान म्हणजे शरीराचे किंवा आपले शत्रू यात आपले मन भावनांना, विकारांना, वासनेला, मोहाला, बळी पडून आपला शत्रू बनते हे आपण सोयीस्कर विसरतो.हे षड रिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया. या भावना आपण अतिरेकाने वापरतो. आयुष्यात भावना हव्यातच. पण या सहा भावना संयमाने आणि नियमाने वापरल्या तर त्या आपल्या मित्र ठरतात. आपल्या बाबतीत जे काही चांगले आणि वाईट घडत असतं, तो आपणच निर्माण केलेल्या कारणांचा परिणाम आहे. आपण जे वागतो, निर्णय घेतो, कृती करतो याचा परिणाम म्हणून आपल्याला सुख किंवा दुःख येते. आपल्या सुख- दुःखाला आपणच जबाबदार असतो. आपण आपल्या मनाने ठरविल्याप्रमाणे आपण वागत सुटतो. त्याचे परिणाम आपल्याला स्वीकारावे लागतात. आपल्या आजारांना, दुखांना आपण इतर व्यक्तींना जबाबदार समजत असतो. जो पर्यंत आपण जबाबदार आहोत हे आपण मान्य करत नाही. तो पर्यंत आपल्याला आपले प्रश्न सोडविता येत नाहीत.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी माझ्या अभ्यासानुसार आजारी पडण्याआधीच तुमचा धर्म त्रिकोण बळकट केला तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम आयुष्यावर झालेला दिसेल.

१, ५, ९ हि स्थाने धर्म त्रिकोण दर्शवतात.

१ ले स्थान आपले व्यक्तिमत्व दर्शवते. व्यक्तिमत्त्व हे शरीर व स्वभाव या दोन्हीचे मिश्रण आहे.

शरीर उर्जा टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करा.

मानसिक शक्ती टिकवण्यासाठी स्वत:मध्ये कोणत्या नकारी आणि अतिरेकी भावना बिघडल्या आहेत याचे परीक्षण करा आणि जाणिवपूर्वक त्या भावनांचे संयमन करा.

५ वे स्थान खेळ, क्रीडा, कला, उपासना दर्शवते.

शाररीक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही मैदानी खेळाची आवड जोपासू शकता.

मानसिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही संगीत, कला याचा आधार घेऊ शकता. आजकाल रोगमुक्तीसाठी म्युझिक थेरपी चा वापर केला जातो. तसेच उपासना सुचवण्या मागे हे ही एक कारण असते की, मनातील विकार नाहीसे झाल्याने मन शांत होऊन एकाग्रता वाढीस लागते. मनात सकारात्मक भावना निर्माण झाल्याने आत्मसंयमन करता येते. आपले आजार मन अस्थिर झाल्यामुळे तसेच आपली कृती (६ वे व १० वे स्थान) बिघडल्यामुळे होतात. प्रत्येक माणसाला ५०% सुख आणि ५०% दुःख मिळते. कोणीही अतिदुःखी किंवा अतिसुखी नसतो. आपल्याला काय मिळाले नाही हे आठवून रडत बसण्यापेक्षा काय मिळाले याचा विचार करून समाधानी रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे मन शांत, खंबीर, धैर्यशील होते. म्हणून तुम्ही घेत असलेल्या सावधानी/औषधोपचारांना मनाचा समतोल राखणेसाठी कला, क्रीडा, संगीत, उपासना याची जोड द्या.

९ वे स्थान धार्मिकता अध्यात्मिकता, नीती, उपासना, प्रगती ई. दर्शवते.

भौतिक प्रगती करत असताना, कीर्ती मिळवता असताना समतोल साधण्यासाठी त्यात नीती व्यवहार असणे महत्वाचे असते. तसेच मला काय मिळायला पाहिजे यापेक्षा मी कोणाकोणाचे देणे लागतो याचा विचार करायला हवा. आपले आईवडील, कुटुंब, समाज, देश आणि निसर्ग यांच्याकडून खूप काही मिळत असते. त्यांच्या प्रती आपले देण्याचे कर्तव्य जाणून जाणीवपूर्वक आपण निरपेक्ष काम केले पाहिजे. कुटुंबासाठी आपण करतो, पण समाजाप्रती करायचे राहून जाते. आपल्या श्रमाचा आणि धनाचा नियोजित वाटा दर महिन्याला त्यागरूपाने समाजातील दुःख दूर होण्यासाठी द्यायला हवा.

ध्यान म्हणजे जाणीवपूर्वक स्वार्थी बुद्धीला विश्रांती देणे. ध्यानामुळे आत्मविश्वास व शारीरिक क्षमता वाढतात. ध्यानाचे परिणाम आपल्या मनावर मेंदूवर शरीरांतर्गत कार्यावर अतिशय चांगले होतात. रोज संध्याकाळी साडेसात वाजता दिव्याच्या ज्योतीवर १२ मिनिटांचे ध्यान करावे. यामुळे दिवसभरातील ताणतणावाचे स्वतःवर झालेले दुष्परिणाम दूर होतात. मनशांती वाढते.

तसेच उपासना, देवदर्शन आदि गोष्टी देखील मनाचे पावित्र्य आणि शांती टिकवण्यास उपयुक्त ठरतात. भाग्य स्थान तुम्ही अशा पद्धतीने लिहिले तर श्रमदान सार्थकी लागेल. ( १० वे चे १२ वे स्थान जे श्रमाचे दान दर्शवते.) त्याग, दान आणि सत्कृत्याची जोड माणसाला उन्नती प्रदान करते.

शरीर हे जड माध्यम असल्यामुळे प्रकृतीचे नियम लागू असतात. न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे अॅक्शनला रिअॅक्शन असते. रिअॅक्शन ही अॅक्शनच्या सम प्रमाणात आणि विरूद्ध दिशेने असते. शरीराच्या अॅक्शनमधून मन सुख भोगते. त्यामुळे रिअॅक्शन स्वरूपात दुःख त्याच्याकडे येते. यानुसार सुखाचे दुःखात आणि दुःखाचे सुखात रुपांतर होत असते. आजाराचे दुःख घालवायचे असेल तर औषध उपचार याचे दुःख सकारात्मक भावनेने घ्यायला हवे.

या भावनांवर संयमन न करता आपण आजारात नुसते औषधोपचार केले, तर त्याचा परिणाम नीट होत नाही. म्हणून कोणाचाही आजारामध्ये शरीराबरोबर मनालाही ट्रिटमेंट देणे आवश्यक आहे. मनाला ट्रिटमेंट देण्यासाठी प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जावेच लागते असे नाही. आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करून आजाराच्या आणि दुखाच्या मूळ कारणापर्यंत पोहोचणे, मनातील बिघाड जाणून तो दुरुस्त करणे

गरजेचे ठरते व मग त्यावर इलाज करणे सोपे जाते.

सर्वांना आरोग्यदायी सुखी जीवनासाठी शुभेच्छा !

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ग्रह गती आणि वक्री, स्तंभी, मार्गी ग्रह


विषय : ग्रह गती आणि वक्री, स्तंभी, मार्गी ग्रह

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : सुलभ ज्योतिष शास्त्र

नमस्कार,

आज आपण ग्रहांची गती आणि वक्री, स्तंभी व मार्गी ग्रह या बाबत माहिती घेणार आहोत.

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, आपल्या सूर्यमालेत सूर्याभोवती ७ ग्रह व छाया बिंदू राहू आणि केतू गोलाकार मार्गात फिरत असतात. या प्रत्येक ग्रहाची गती ही वेगवेगळी असते. व प्रत्येक ग्रह फिरताना पृथ्वीशी वेगवेगळे कोण तयार करत असतात. ज्योतिषशास्त्र हे भूमध्य पद्धतीवर आधारित असल्यामुळे पृथ्वीवरून जे काही दिसते, जसे दिसते ते तसेच त्याचे परिणाम पृथ्वीवर होणार या आधारे ज्योतिषशास्त्रातील फलिताची रचना करण्यात आली आहे.

ग्रहांच्या विविध गती : अयन म्हणजे गती. ज्योतिष शास्त्रातील सायन व निरयन अशा दोन पद्धती आहेत. सायन म्हणजे गती सह व निरयन म्हणजे गती वजा करून स्पष्ट ग्रह काढण्यासाठी वापरलेली पद्धत. या साठी ग्रहांच्या वेगवेगळ्या गती माहीत असणे आवश्यक आहे.

चंद्र सोडला तर कोणत्याही ग्रहाची गती २ अंश ४० कलेपेक्षा जास्त नसते.

१. शनिची गती : ३ ते ४ कला असते.

२. गुरूची गती : ६ ते ७ कला असते.

३. मंगळाची गती : ३० ते ३५ कला

४. रविची गती : १ अंश

५. शुक्राची गती : १ अंश १० ते १५ कला

६. बुधाची गती. अर्धा अंश ते २ अंश

७. चंद्राची गती १५ अंश.

ग्रह गती व कोनानुसार ग्रंहांच्या ३ स्थिती तयार होतात.

१. मार्गी ग्रह

२. वक्री ग्रह

३. स्तंभी ग्रह

या तीन स्थिती पैकी मार्गी व वक्री ग्रह या स्थिती फलितासाठी महत्वाच्या आहेत.

१) मार्गी ग्रह : प्रत्येक ग्रह अवकाशात रोज आपल्या विशिष्ट मार्गाने पुढे पुढे जात असतो. म्हणून पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये त्यांच्या अंश, कला दररोज वाढताना दिसतात. त्यालाच ‘मार्गी ग्रह’ असे म्हणतात. ग्रह मार्गी असल्याचे पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये मुद्दाम लिहून दर्शविले जात नाही. रवि आणि चंद्र हे दोन ग्रह कायम मार्गीच असतात व कधीही वक्री होत नाहीत.

२) वक्री ग्रह : जे ग्रह अवकाशात रोज मागे मागे जाताना दिसतात, म्हणजे भासतात, त्यांना ‘वक्री ग्रह’ असे म्हणतात. पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये त्यांच्या अंश, कला दररोज कमी कमी होताना दिसतात.प्रत्यक्षात वक्री ग्रह ही भासमान गोष्ट आहे. ज्या वेळी एखादा मंदगती ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ आल्यास, पृथ्वीच्या जास्त गतीमुळे तो ग्रह मागे मागे जाताना दिसतो म्हणजे भासतो. तो ग्रह प्रत्यक्षात मागे जात नसतो. केवळ तो मागे मागे जात असल्याचा भासतो.

ज्या दिवशी ग्रह वक्री होतो त्या दिवशी पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये स्पष्ट ग्रहांमध्ये त्या ग्रहांसमोर वर किंवा खाली वक्री किंवा कंसात (व) असे लिहिलेले असते व ज्या वेळी तो पुन्हा मार्गी होतो त्या वेळी ‘ मार्गी असे लिहिलेले असते.

रवि आणि चंद्र हे दोन ग्रह कधीही वक्री होत नाहीत, तर  राहू व केतू हे बिंदू नेहमीच वक्री म्हणजे उलट्या दिशेने फिरत असतात, म्हणून त्यांना मार्गीच समजतात व पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये ते ग्रह वक्री असल्याचे लिहिले जात नाही.

बुध साधारणपणे वर्षातून दोन ते तीनदा १० ते १३ दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण २४ ते ३० डिग्री असते.

शुक्र साधारणपणे १८ महिन्यातून ४० ते ४३ दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण ५ ते ८ डिग्री असते.

मंगळ साधारणपणे २ वर्षातून ६० ते ८० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण ८ ते १५ डिग्री असते.

गुरु साधारणपणे १३ महिन्यातून १२० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण ९ ते १५ डिग्री असते.

शनि साधारणपणे वर्षातून १४० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण ६ ते १२ डिग्री असते.

हर्शल साधारणपणे वर्षातून १५० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण २ ते १० डिग्री असते.

नेपच्यून साधारणपणे वर्षातून १६० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण १ ते ३ डिग्री असते.

प्लुटो साधारणपणे वर्षातून १६० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण १ ते ३ डिग्री असते.

३ ) स्तंभी ग्रह : मंदगती ग्रह ज्या वेळी मार्गीकडून वक्री होतो किंवा वक्रीकडून मार्गी होतो, त्या वेळी काही काळ एकाच जागेवर स्थिर असल्याचे भासतो. त्यालाच ‘ स्तंभी ग्रह ‘ असे म्हणतात. पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये त्याच्या अंश, कला स्थिर असतात.

कुंडलीतील वक्री ग्रह फलादेशाच्या दृष्टीने विशेष बलवान समजले जातात, कारण त्या ग्रहांचे वास्तव्य एकाच राशीत किंवा एकाच नक्षत्रात बराच काळ असते, तर स्तंभी ग्रहाच्या कारकत्वात न्यूनता निर्माण करतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)