Category: Uncategorized

हस्त नक्षत्र विचार


विषय : हस्त नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण हस्त नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. हस्त हे नक्षत्र चक्रातील १३ वे क्रमांकाचे नक्षत्र असून त्याचा आकार नावाप्रमाणेच हाताच्या उघडलेल्या पंजासारखा दिसतो. या नक्षत्राचे ४ ही चरण कन्या राशीत येत असल्यामुळे ते चतुष्पादी नक्षत्र आहे. हस्त नक्षत्राचा स्वामी चंद्र, दैवत सूर्य व राशी स्वामी बुध आहे. हे नक्षत्र देवगणी आहे. या नक्षत्रात चंद्राचे वात्सल्य, प्रेम, रवीची उच्च अभिरुची व सात्विक आचारविचार, बुधाचा व्यावहारिकपणा व शहाणपण यांचा सुंदर मिलाफ आढळून येतो. या नक्षत्राच्या ४ चरणावर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्र या चार ग्रहांची सत्ता आहे. तसेच नक्षत्र तीर्यङ्मुख, लघु व मंदलोचनी आहे. हस्त नक्षत्रात एकूण ५ तारे असून ते हाताच्या बोटासारखे दिसतात. तारे पांढऱ्या रंगाचे, स्वच्छ व मध्यम प्रतीच्या तेजाचे आहेत. तारे सुरेख, मोहक व पावसाच्या टपोऱ्या थेंबासारखे दिसतात. चैत्र महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते. आकाशात हे नक्षत्र सहज ओळखता येते. हस्त नक्षत्राचे इंग्रजी नाव ‘डेल्टाकाव्हीं’ असे आहे. कीर्व्हास याचा अर्थ कावळा असा आहे. आपण ज्याला कावळा असे म्हणतो, तो सूर्यदेव अपोलो याचा लाडका होता. परंतु एक त्याने गैरवर्तणूक केली म्हणून त्याला पाणी पिता येणार नाही असा त्याने शाप दिला. तसेच जलप्रलयानंतर नोहाने आपल्या नौकेमध्ये आणलेला कावळा तोच अशा आशयाच्या पाश्चात्य साहित्यात कथा आहेत. भारतीय पुराणात मात्र हे नक्षत्र प्रजापतीच्या उजव्या हाताचा पंजा असेही समजतात.

हस्त नक्षत्र देवगणी असून ते शुभ गुणधर्म युक्त, सत्त्वगुणी आणि सुशील आहे. तसेच ते लक्ष्मीदायक व देवनक्षत्र आहे. या नक्षत्रावर जन्मणारे जातक सुंदर, कलाकुशल, विद्वान, बुद्धिवान, व्यवहारकुशल, आनंदी, सदाचारी, ईश्वरभक्त, समाधानी, संतोषीवृत्तीचे, परोपकारी, कुटुंबवत्सल, सत्यभाषणी, नम्र, विनयशील, सेवावृत्तीचे, आज्ञापालन करणारे, निर्व्यसनी आढळून येतात. हस्त नक्षत्रात शुभग्रह असल्यास त्यांना सुपारीचेही व्यसन नसते. शिवाय हे जातक रसिक, हौशी, कलाप्रिय व सौंदर्याचे भोक्ते असतात. मात्र हे जातक थोरामोठ्याच्या सहकार्यानेच या पुढे येतात.

हस्ताच्या पावसामध्ये जणू काही वसुंधरेने हिरवा शालूच नेसलेला आहे अशी सर्व जमीन हिरवीगार दिसते.

हस्त पुरुष जातकांना हे नक्षत्र सौंदर्य, बुद्धी व शरीरप्रकृतीला ठीक आहे. हस्त नक्षत्रावर जन्मणाऱ्या पुरुष जाताकांचा बांधा मध्यम उंच, प्रमाणशीर व जरा नाजूक असतो. शारीरिक ऊर्जा व रोगप्रतिकारशक्ती मध्यम असते. हे जातक बुद्धिवान व कलाकार असतात, पण अधिकारयोगाच्या दृष्टीने हे मध्यम नक्षत्र आहे. पुरुषांना लागणारे शौर्य, पराक्रम, धाडस, शूरपणा किंवा अधिकारलालसा हे गुण त्यांच्यात साधारण असतात.

हस्त नक्षत्राच्या स्त्री जातकांना हे नक्षत्र शरीर, सौंदर्य, बुद्धी, कला व गुण यांना फार अनुकूल असते. हस्त नक्षत्रावरच्या स्त्रिया या जणू बालकुमारीकाच असतात. प्रौढ वयातही या मुलींसारख्या तरुण दिसतात. त्यांचा बांधा मध्यम उंच, प्रमाणशीर, नीटनेटका व व्यवस्थित असतो. हातपाय, मांड्या, मनगटे, दंड यांचे आकार मध्यम गोलाकार असतात. चेहरा गोल पण फार फुगीर नसून शरीराला शोभेल एवढाच गोल असतो. डोक्यात बरोबर मध्ये भांग पाडायची सवय असते. अवयव फार मांसल किंवा गुबगुबीत नसून प्रमाणशीर व रेखीव असतात. चालणे जरा गजगतीसारखे असते. चेहरा सुंदर, आकर्षक व मोहक असतो व सात्विक तेज असते. त्यांचे दात फार सुंदर असतात. दात दुधासारखे पांढरे स्वच्छ असून पुढील दोन तीन दात जरा मोठे, पांढरे स्वच्छ व सरळ रेषेत असतात. त्या हसताना हे पुढील दात ठळकपणे दिसतात. त्यांचे हसणे साधे, स्मितहास्यही अत्यंत मोहक असते. हस्त स्त्री जातकांचे सौंदर्य त्यांच्या लाजण्यामध्ये आहे. शुभ स्थिती मध्ये असता त्यांना भडक रंगाचे कपडे किंवा फाजील फॅशन प्रिय नसून पांढरा, पिवळा, हिरवा, निळा अशा गढूळ रंगाची व मॅचिंग कलर्स प्रिय असतात. फुलांचे बरेच वेड असते. दागिन्यांचा फारसा हव्यास नसतो. मात्र स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा व व्यवस्थितपणा फार असतो. हस्त नक्षत्र स्त्रिया हस्तकौशल्यात विशेषतः भरतकाम, रांगोळी, कशिदा, विणणे, स्वयंपाक, पेंटिंग, चित्रकला यात फार हुशार, संसाराची फार आवड असणाऱ्या आढळतात. संसाराला अशी पत्नी मिळणे म्हणजे महाभाग्यच.

हस्त नक्षत्राखाली येणारा वर्ग बहुधा समाजातील घरंदाज व प्रतिष्ठित असा मध्यमवर्गच होय. या नक्षत्राखाली डॉक्टर्स, वकील, अॅडव्होकेटस्, शिक्षक, प्रोफेसर्स, बँका, पतपेढ्या किंवा निरनिराळ्या खाजगी कंपन्यात हिशेबी खात्यात काम करणारा वर्ग, आर्किटेक्ट, चित्रकार, कलाकार, लेखक, कवी, निरनिराळ्या वस्तूंचे किरकोळ व्यापार करणारे व्यापारी, पुस्तक विक्रेते, फिरते एजंट, जाहिरातदार, छपाई खात्यात काम करणारा वर्ग, लहान लहान शेतकरी, बातमीदार, वर्तमात्रपत्रात काम करणारे संपादक, काही वेळा नाटकात कामे करणारा वर्ग, शिंपी, कलाकार या व्यक्ती प्रामुख्याने होत. नर्स व गृहिणीही या खाली येतात.

हस्त नक्षत्री रवी असता शरीर प्रकृतीच्या दृष्टीने मध्यम असतो. हे जातक मध्यम बांध्याचे व काटक असतात,तसेच शांत, नम्र, ईश्वरीभक्ती करणारे, देव ब्राम्हणांचे पूजक, मध्यम विद्वान, गुणी असतात. विद्या व धनाच्या दृष्टीने रवि मध्यम असतो.

हस्त नक्षत्री चंद्र बुद्धी, विद्या, सौंदर्य व गुण याच दृष्टीने अनुकूल असतो. बांधा मध्यम, उंच भरलेला, जरा पुष्ट पण प्रमाणशीर असतो. चेहरा सुंदर व मोहक असतो. हे जातक बुद्धीमान व कलाकार असतात. चंद्र असता बुद्धी व कला, विद्या व सौंदर्य यांचा सुरेख संगम दिसून येतो. स्वभावही प्रसन्न, शांत, हौशी, रसिक व आनंदी असतो. धनाच्या दृष्टीने चंद्र मध्यम असतो.

हस्त नक्षत्री मंगळ असता शरीरप्रकृती सडसडीत असते. बांधा उंच, सडपातळ व काटक असतो. चेहरा जरा उग्र असतो. स्वभावही थोडा करारी, स्पष्टवक्ता व मानी असतो. मात्र तरीही हे जातक रसिक, हौशी व लोकप्रिय असतात. हस्त नक्षत्री मंगळ आर्किटेक्ट, ड्रॉइंग, डॉक्टर या विद्येला अनुकूल व  स्वतंत्र व्यवसाय करण्यास चांगला.

हस्त नक्षत्री बुध हा शरीरसंपत्ती, बुद्धी व धनाच्या दृष्टीने चांगला. बांधा मध्यमव थोडा आडवा, अवयव गोलाकार व फुगीर असतात. बुद्धी कुशाग्र असून लेखन, वाचनाची आवड असते. बुध कोणत्याही वस्तूंच्या किरकोळ व्यापाराला चांगला. तसेच तो जाहिरातदार, बातमीदार, फिरते एजंट, विक्रेते यांना चांगला.

हस्त नक्षत्री गुरु सौंदर्य व बुद्धीच्या दृष्टीने चांगला. नाजूक पण उंच बांधा, चेहरा सुंदर, आकर्षक व सात्विक तेजाचा असतो. बुद्धी कुशाग्र असते. हे जातक अतिशय बुद्धीवान व विद्वान असतात. गुरु अर्थी, वाणिज्य, कायदा अशा विषयांना चांगला असतो. हस्त जातक उत्तम शिक्षक किंवा प्रोफेसर्स होऊ शकतात. स्वभावाने हे जातक उत्तम समाजसेवक असतात. स्वभाव नम्र, निगवीं, ममताळू व उदार असतो.

हस्त नक्षत्री शुक्र हा सौंदर्य व कलेच्या दृष्टीने अनुकूल असतो. बांधा मध्यम उंच, प्रमाणशीर व रेखीव अवयव असणारा असतो. चेहरा मोहक, आकर्षक व जरा मादक असतो. शुक्र बरीच वर्षे यौवनावस्था देतो. शुक्र संगीत, नृत्य, हस्तकला, कौशल्य, पेंटिंग, ड्रॉईंग, आर्किटेक्ट, नाटक-सिनेमा कलाकार यांना चांगला असतो. मात्र पैसा व दर्जाच्या दृष्टीने मध्यमच असतो.

हस्त नक्षत्री शनी असता शरीरप्रकृती उत्तम असते. बांधा पुष्ट, भरलेला, गोलाकार अवयव पण जरा शिथिलपणा असतो. चेहरा सावळा, गंभीर पण नाकी डोळी बरा. शनि बुद्धीला चांगला. स्थापत्यशास्त्र व कायदेशास्त्र, वाणिज्यशास्त्र यांना फार चांगला. पण त्यापेक्षा व्यापाराला फार उत्तम. कापूस, तेलबिया, धान्ये, किराणा माल, कागद अशा वस्तूंचा व्यापार चांगला चालेल. धन चांगले मिळेल.

हस्त नक्षत्री राहू रूप, कला बुद्धीला चांगला. बांधा सडसडीत, उंची बांधेसूद, आकर्षक, रेखीव असतो. चेहरा मोहक व डोळ्यांत एक प्रकारची जादू असते. बुद्धी प्रकर्ष व उत्तम स्मरणशक्ती असते. पेंटिंग, डिझाईन, ड्रॉईंग, आर्किटेक्ट, संशोधन व यांत्रिक कामासंबंधीत कला, फोटोग्राफी, सिनेमा-नाटकात काम करणे यांना चांगला.

हस्त नक्षत्री केतू हा शरीरप्रकृतीला साधारण, पण बुद्धीच्या दृष्टीने मध्यम. कला वगैरेत यश नाही. थोडा धार्मिक व आध्यात्मिक प्रकृतीकडे कल.

हस्त नक्षत्री हर्षल शरीरप्रकृतीला बरा व बुद्धीलाही चांगला. उंच व रेखीव बांधा. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज असते. तसेच हे जातक बुद्धिमान, हुशार, संशोधक वृत्तीचे व विद्वान असतात. स्वभाव फारसा लहरी किंवा विक्षिप्तपणा नसतो.

हस्त नक्षत्री नेपच्यून असता शरीरप्रकृती साधारण. चेहरा सुंदर, मोहक, प्रसन्न आनंदी व संतोषी असतो. ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग, अंतःस्फूर्ती, काव्य, गायन कल्पनाशक्ती चांगली असते. वादन यांना चांगला.

हस्त नक्षत्री होणारे आजार फारसे दाहक नसले तरी बराच काळ टिकणारे आढळतात. थंडी, कफ, डोके दुखणे, अर्धशिशी, ओकाऱ्या, पोटात मळमळणे, अपचन, आतड्याचे विकार, पचनशक्ती बिघडणे, चक्कर, भोवळ येणे, कंबर दुखणे, मानसिक विकार, नैराश्य, उतारवयात रक्तदाबाचे विकार, शौचाची तक्रार असणे. अतिश्रमाने ग्लानी येणे हे आजार दिसतात. या जातकांना उगाचच औषधे व रेचके घेण्याची फार सवय असते.

या नक्षत्रावर जन्मणाऱ्यांचे हस्ताक्षर मोठे, मध्यम गोल, वळणदार व जास्त रुंद असते. ओळी सरळ व व्यवस्थित असतात. लिहिताना सहजगत्या लिहितात. नक्षत्रावर २ किंवा ५ अंकाचा प्रभाव आढळतो. २ अंक जास्त भाग्यकारक वाटतो. चंद्राचा मोती अथवा बुधाचा पाचू लाभदायक आहे. नक्षत्र मंदलोचनी असल्याने वस्तू हरवल्यास ती थोड्याशा प्रयत्नाने मिळू शकते व वस्तू दक्षिण दिशेला गेलेली असेल.

मुहूर्त शास्त्रात हस्त नक्षत्राला फार महत्त्व आहे. शुभ देवगणी व सत्वगुणी असल्याने मौजी, विवाह, बारसे, ई. साठी चांगले. तसेच या नक्षत्रावर बी पेरणे, नांगर धरणे, जनावरे घेणे, नाव, जहाज, गलबत चालू करणे, प्रयाण, नवीन दुकान चालू करणे, अलंकार किंवा वस्त्रभूषणे धारण करणे, विद्यारंभ, शिल्पकाम, औषध घेणे किंवा औषधी वृक्ष लावणे, बालकाचे कान टोचणे, अन्नप्राशन, गृहारंभ, वास्तुशांती, विहिर खणणे, राज्याभिषेक, संगीत, नृत्यादी कला शिकणे यांना फारच चांगले. कोणत्याही शुभकार्यास हे नक्षत्र चांगले आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विवाह जमवताना…


विषय : विवाह जमवताना

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : धनुर्धारी मधील व.दा. भट सरांचा लेख 

नमस्कार,

धनुर्धारी दीपावली विशेषांकमधील व.दा. भट सरांचा “वधूवर कुंडली मेलन” हा विस्तृत लेख वाचनात आला. अभ्यास करताना त्यातील काही मुद्दे जे मला भावले, तेवढेच आपल्या माहितीसाठी माझ्या शब्दांत व विचारानुरूप येथे देत आहे.

वधू-वरांचे विवाह ठरवताना शिक्षण, उत्पन्न, स्वत:चे घर, सुस्थिती हा व्यावहारिक भाग, समाज जाती व्यवस्था, अनुरुपता अशा अनेक घटकांना सामोरे जावे लागते आणि शेवटी वधू-वरांच्या कुंडल्या ज्योतिषांपुढे येतात. कुंडली जुळते, कुंडली जुळत नाही, असे एखादा ज्योतिषी म्हणतो, तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निकालासारखे त्याला महत्त्व येते. या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीतून पुढे सरकत असताना ज्योतिषी त्यात अजून, मंगळ, गुणमेलन, कु योग यांची भर घालत असतो.

गुरुवर्य व. दा. भट लेखात म्हणतात की, पति-पत्नी किंवा खरे तर इतर नाती ही गतजन्मीच्या ऋणानुबंधावर ठरलेली असतात. अशा व्यक्तींना एकत्र आणण्याचे काम काळ करत असतो.

कै. म.दा. भट सर कित्येक प्रसंगी एखाद्या तरुणाला नेहमी म्हणत असत, तुला मनापासून मुलगी आवडली आहे ना, तिनेही तुला पसंत केले आहे ना, घरातल्या लोकांना मान्य आहे ना, मग कुंडलीबद्दल विचार न करता सरळ लग्न कर. फक्त तेच असे नाही, तर अनेक ज्योतिष ग्रंथकारानीही असे मत व्यक्त केले आहे.

विवाह वृंदावन या ग्रंथात दिलेले आहे –

अर्चितं वचनम् उच्चतं मनो निर्वेशेष सुखदं वपुर्दशाम् ।

अस्ति चेदधरपडमुखी मतिर्लक्षणैः किमपरैनृयोगिताम् ।।

सुंदर सुभाषण, उदार मन, रुप, दृष्टीस सुख देणारी देहाकृति, पापभीरू इतके गुण जर वधू वर ह्यांत असतीळ तर इतर गोष्टी पाहण्याची आवश्यकता नाही.

आपस्तंभ सूत्रानुसार –

यस्मिन्पत्रने मनः सनयने संतोषमृच्छेत्तथा ।

कन्यायामपि यत्र तत्र सकला ऋद्भिर्भवेदित्यतः।।

नान्यलक्षणमाद्वियेत…..

ज्या वराची वा वधूची आकृति देह पाहिल्याने नेत्रांना व मनाला संतोष होतो तेथे सर्व सिध्दी आहेत…….

असाही एक श्लोक आहे :

कन्या वरयते रुपं । माता वित्तं । पिता श्रुतम् । बांधवः कुलम् इंमिच्वंति । मिष्टान्नं इतरे जनः ।

प्रत्यक्ष व्यवहारांत आपण गुणमेलन करतच असतो. ते ३६ गुण असे सांगता येतील –

१) स्वजातिय : ४ गुण

२) रूप-दिसावयास अनुरूप : ८ गुण

३) शिक्षण अपेक्षेप्रमाणे : ८ गुण

४) आर्थिक स्थिती जबाबदाऱ्या : ८ गुण

५) घर वास्तू रहाण्याचे ठिकाण : ४ गुण

६) कुटुंब – आई- वडिल-बहिणी-भाऊ इ. : ४ गुण

  एकूण : ३६ गुण

अशा व्यावहारिक गोष्टींचे मूल्यमापन प्रत्येक जण करत असतोच. तरीसुद्धा विवाह संस्कार, ही आयुष्यातील अति महत्त्वाची घटना असल्यामुळे, भावी काळाबद्दल साशंकता असल्यामुळे म्हणा, व्यक्तीला निर्णय घेताना आणखी एखादा आधार हवा असतो.

अति प्राचिन काळी सुध्दा असे आधार कसे असत, त्याचे एक उदाहरण आपस्तंभ गृह्य सूत्रात सापडते.

वधू परीक्षेसाठी पांच मडक्यात विविध गोष्टी भरून ठेवून झाकण लावत. वधूला एका मडक्याला स्पर्श करण्यास सांगत १) विविध बियाणे २) शेतातील माती ३) स्मशानातील माती ४) गोशाळेतील वगैरे त्यावरून वधू कोणत्या पायगुणाची ते समजते. स्मशानातील माती नवऱ्याचा मृत्यू, चौकातील माती मुले जुगारी, वाळवंटातील माती मुले दरिद्री, यज्ञातील • मुले अध्यात्मिक ई. पद्धती अवलंबत असत.

हल्लीसुध्दा देवीला कौल लावणे, सत्पुरुषांची गुरुची अनुमती घेणे वगैरे गोष्टी आहेतच. भावी काळांत काय होईल ह्यांचा अंदाज देणारे ज्योतिष हे एकच शास्त्र असल्याने, वधू-वरांच्या बाबतीत लोक ज्योतिषाकडे धाव घेतात. गुणमेलन किंवा इतर पद्धतीने भावी संसाराचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत असतात. बहुतेक ज्योतिषी गुणमेलन कोष्टक – मंगळ अभ्यासून हा निर्णय घेतात.

पूर्वकाल होरा ग्रंथ केवळ कुंडली शास्त्रावर जे पंथ आहेत. उदा. पाराशरी, बृहत्जातक, होराशास्त्र,  फलदिपिका जातक पारिजात वगैरे ग्रंथात वधू-वर पत्रिका मेलन हा भाग आढळत नाही. हा विषय ‘मुहूर्त पंथात आढळतो. दहा गुण ३६ गुणाची वाटचाल एकदम झालेली नाही. कालिदासप्रणीत ज्योतिर्विदाभरणम ग्रंथात, वधूवरांना दहा गुण मिळाले तरी विवाह करावा असा उल्लेख आहे. नक्षत्र (तारा) ३,५,७ नको. नाडी, योनि, वर्ग, विश्य युवा, गण वगैरे गोष्टींचा उहापोह केलेला आहे.

भारतात वेदकालापासून केवळ नक्षत्र विचार होता. त्यामुळे वधूवर कुंडली मेलनात नक्षत्रांचे गुणधर्म एकमेकांपासूनची नक्षत्रे (तारा) योनि, गण, नाडी एवढ्या पुरतेच गुणमेलन होते. वराह मिहीरनंतर राशि आल्या आणि गुणमेलन नक्षत्रापुरते मर्यादित न राहता राशी गुणधर्माचा विचार व त्यांना गुण देण्याची प्रथा आली. त्यानंतर अष्टकूट व त्यातील ३६ गुण संख्येने पुढे संपूर्ण भारतात ह्याचाच विचार होऊ लागला. गुणमेलन कोष्टक सर्वत्र अत्यंत लोकप्रिय झाले. आणि गेली ७००-८०० वर्षे ज्योतिषांच्या वापरात आले. कळायला, वापरण्यास सोपे असल्याने ते अत्यंत लोकप्रिय झाले. मग त्यात अनेक गोष्टी समाविष्ट झाल्या.

गण हे स्वभावाचे निदर्शक आहेत, तर नाडीने व्यक्तिची प्रकृति पित्त-वात-कफ कळते, एकनाड म्हणून वर्ज्य धरली असावी. गण ग्रहमैत्री ह्या तीन घटकांपैकी दोन चांगले असतील तर तिसरा घटक अनुकूल नसला तरी विवाह करण्यास हरकत नाही, असे मत वेगवेगळ्या ग्रंथकारांनी व्यक्त केले आहेत. योनि वर्ग, वर्ण, गण, योनि द्विर्द्वादशक, षडाष्टक ई. दोष असताहि ग्रहमैत्री असेल तर विवाह करावा. इतर सर्व कुटे शुध्द असतील तर एकनाडीचाहि दोष जातो. असे विवाहपटलात म्हटले आहे. नक्षत्रगुणधर्म महत्त्वाचे का राशी ग्रहमैत्री महत्त्वाची हा सतत वादाचा मुद्दा राहिला आहे. पुढे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भटोत्कुलोत्पन दामोदरसुत वसंत शर्मा नावाच्या ज्योतिषाने चंद्राच्या नवमांश राशीचा विचार आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. त्यासाठी त्यांनी अनेक संदर्भ दिले ते असे.

पियुषधारेत – वसिष्ठ – राशिनाथे विरूध्देऽपि सबलावंशकाधिपौ । तन्मैत्र्यैऽपि च कर्तव्यं दंपत्यो शुभमिच्छता ।।

वधूवरांच्या राशीचे स्वामी परस्परशत्रू असताहि (मृत्यूषडाष्टक व इतर) जर नवमांश अधिपति सबल असून मित्र असतील तर विवाह करावा.

पुयुष धारेत अत्रि – राशीशयोः सुहृदभावे मित्रत्ते वा प्रशनाथयो । गणादिदौष्ट्ये अपि पुत्रपौत्रप्रवर्धनः ।

राशीस्वामीची किंवा नवमांश स्वामीची मित्रता असेल तर गण अदि दोष असूनही विवाह केल्याने पुत्रपौत्रांची वृध्दि होते .

असो. ज्योतिष शास्त्र दृष्टीने विचार करण्यासारखे घटक म्हणजे वधू वराच्या १) लग्नराशी २) रवि ३) शुक्र-राशी (स्थान) ४) शुक्र ग्रहयोगांत ५) राप्तमेश ६) आयुर्दाय ७) संतति

शुक्र ग्रहयोगांत शुक्राचे नवपंचम, केंद्र, प्रतियोग, युतीयोग हे अति महत्त्वाचे ठरतात.

कुंडलीच्या सप्तमेशचे असेच मूल्यमापन करता येईल. कुंडलीपैकी एखादी कुंडली आयुर्दायाच्या दृष्टीने धोकादायक असेल तर तसे स्पष्ट सांगावे.

संततिच्या बाबतीतहि आपली मते स्पष्ट सांगावी, ह्या दृष्टीने दोन्ही कुंडलीतील गुरुच्या राशीचे मूल्यमापन करावे. गुरु वृषभ तुळ-मकर-कन्या राशीत असता कमीत कमी दुसऱ्याचा तरी चांगला असावा,

पूर्वीच्या काळातील कांही ज्योतिषी वराच्या कुंडलीत त्या त्या राशीत वधूच्या कुंडलीतील ग्रह मांडत असत. त्यामुळे काही गोष्टीची झटकन कल्पना येते. उदा. सिंह रवि व वधूचा सिंह शनि असेल तर ही गोष्ट चटकन लक्षात येते.

वधू वरांच्या कुंडल्याचा तौलनिक अभ्यास करून अनेकांनी कांही मार्गदर्शक नियम दिले आहेत. स्त्री जातक नावाचा एक ग्रंथ पूर्वी होता त्यात व नवाथे ह्यांनी काही मार्गदर्शन केले आहे.

१) दोघांची लग्ने एका राशीची असणे.

२) एकाची लग्न राशी तीच दुसऱ्याची चंद्रराशी

३) दोघांची चंद्र राशी एक असणे.

४) एकाची चंद्रराशी दुसऱ्याच्या चंद्राच्या सप्तमात

५) एकाची चंद्रराशी ती दुसऱ्याची लग्न राशी

६) एकाची चंद्रराशी शुक्र राशी ती दुसऱ्याची लग्न, सप्तम किंवा चंद्र राशी असणे

७) एकाचा लग्नेश दुसऱ्याच्या सप्तमात किंवा उलट असणे.

८) दोघांचे लग्नेश व सप्तमेश एका राशीत वा समसप्तकात

९) दोघांचा शुक्र एका राशीत व समोरासमोर

१०) एकाच्या लग्नातील ग्रह दुसऱ्याच्या सप्तमात

११) दोघांच्या लग्नात व सप्तमात एकच ग्रह

१२) दोघांचे ग्रह एकमेकांच्या शुभयोगात

१३) दोघांचे कुटुंबेशाचे वरीलप्रमाणे योग असणे

१४) एकाचे लग्न दुसऱ्याचा चंद्र

कुंडल्या अभ्यासतांना एक गोष्ट नक्की लक्षात येते ती म्हणजे मानवी प्रयत्नापेक्षा दैव बलवत्तर असते.  कुंडल्या चांगल्या असून सुद्धा विवाह ठरत नाहीत. एखाद्याला नको असलेल्या ग्रहयोगाच्या कुंडल्याच समोर येतात. ज्योतिषी हा सुध्दा दैवाचे एक माध्यम असते. ज्योतिषाच्या तसेच व्यक्तीच्या प्रयत्नांना मर्यादा असतात. हॉस्पीटल काढले, तर हॉस्पीटल मध्ये काही मृत्यू होणारच. कोणीही ज्योतिषी कोणाचे दैव फारसे बदलू शकत नाही. ह्यांची कल्पना आपण काही वेळा द्यावी लागतेच. आणि ही स्पष्ट कल्पना देऊनच हे कार्य करावे.

वधू-वरांचे विवाह सुखाचे होण्याच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रात ‘हमखास असे नियम करता येणे अवघड आहे, असे मला वाटते. कारण मुळात प्रत्येक कुंडली वेगळी असते. आपण फक्त भावी काळाची दिशा दाखवण्याचा प्रयत्न करून मार्गदर्शन करू शकतो. दैव बदलू शकत नाही.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

कर्म सिद्धांत (Theory of Karma)


विषय : कर्म सिद्धांत (भाग १)

संकलक व स्वैर अनुवाद : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : THEORY OF KARMA (श्री हीराभाई ठक्कर)

नमस्कार,

आज आपण कर्म सिद्धांत या विषयाची क्रमश: व थोडक्यात माहिती घेणार आहोत.भगवान श्रीकृष्णानी भगवद्गीतेत सांगितले आहे की, “गहनो कर्मणो गति” कर्माची गति फार गहन आहे.

श्रीकृष्णांचा मित्र भक्त सुदामा कर्माच्या गहनतेचे वर्णन करताना म्हणतो की,

आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य ॥ श्रीकृष्ण झाला पृथ्वीपति । माझ्या घरांत खायला नाही माती ॥ गोकुळांत त्याने केल्या अलौकिक लीला । माझ्या बरोबर गुरुगृही आणितसे समिधा ॥आज तो बसला आहे सिंहासनावर । माझ्या हाती मात्र एकतारी नि चिपळ्या ॥

मनुष्य जन्म एकंदरीतच गूढ आणि गुंतागुंतीचा आहे. इथे प्रत्येकाची कर्मगती वेगवेगळी. एक माणूस दुःखी, तर दुसरा सुखी असें कां ? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जगांत जे लोक लांडया-लबाडया, काळा बाजार, लांचलुचपत असा अनीतीचा मार्ग बिन-दिक्कत स्विकारतात, ते सुखाने जगताना दिसतात. त्यांचे जवळ बंगला, मोटारी, इत्यादि चैनीच्या वस्तू असतात, त्यांचे जवळ लाखो रुपये असतात व मौज-मजा करताना दिसतात. पण याउलट, जे लोक सदाचारी, पापभीरु, प्रामाणिक पणे आयुष्य जगात आहेत, त्यांच्या आयुष्यात दु:खाचे भोग वाट्यास आलेले दिसतात. असे का ?, हा प्रश्न कधी ना कधी सर्वांनाच पडत असतो. जगांत असा विरोधाभास पाहिला, की देवावरची आपली श्रद्धा डळमळू लागते, वाटू लागते की ईश्वराच्या राज्यांत काही न्याय-नीती आहे का? का सर्व अंधेर नगरीच आहे ? परमेश्वराचे राज्यांत सर्वत्र अंधार भासू लागतो…

पण वस्तुस्थिती अशी आहे कीं ईश्वरी राज्यांत अंधारही नाही व अन्यायही नाही. ही गोष्ट योग्य रीतीने लक्षांत यावयास, कर्म फळ नियमांचा अभ्यास करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

कर्माचा अटळ सिद्धांत :

आपण पाहतो की, राज्य कारभार व्यवस्थित चालविण्यासाठी प्रत्येक सरकारी खात्यांत काही नियम केलेले असतात. पोलीस खात्यासाठी त्यांचे काही नियम (मॅन्युअल) ठरवलेले असतात. पी.डबल्यू.डी. साठीं, त्या खात्याचे काही नियम असतात. न्याय खाते चालविण्यासाठी इंडियन पीनल कोड, व अन्य अनेक कायदे आहेत. त्याच प्रमाणे रेल्वे, रेव्हिन्यू इत्यादि खात्यांचेही खातेनिहाय काही नियम केलेले असतात.

याचप्रमाणे अखिल सृष्टि व ब्रह्मांडाचे संचलन व्यवस्थित राहाण्यासाठी, सूर्य नियमित उगवतो व मावळतो, पृथ्वी, ग्रह, नक्षत्रे याना पण ठराविक गति असते. ठराविक वेळी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू सुरु होतात व संपतात. या सर्व गोष्टी योग्यवेळी घडून विश्वाचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी निसर्गाचे काही नियम आहेत आणि यालाच कर्माचा कायदा म्हणतात.हे सर्व विश्व “कर्म-कायदाच्या” आधाराने व्यवस्थित चालते, आणि त्यांत कधीही घोटाळा होत नाही. या कर्म-कायद्दाचे एक खास असें वैशिष्ठय आहे. जगातील मानव निर्मित कायद्यांत, कांहीना काही अपवाद, पळवाट वगैरे असतात. पण या परमेश्वर निर्मित “कर्म नियमांत” (कायद्यांत) कोठेही, किंचितही अपवाद अथवा पळवाटा नाहीत.

राजा दशरथ हा प्रत्यक्ष भगवान रामचंद्राचा पिता, पण त्यालाही या कर्मसिद्धांतानुसार, पुत्र विरहामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. प्रभू रामचंद्र असे म्हणू शकले नाहीत की, राजे दशरथ माझे वडील असल्यामुळें, कर्म कायद्यांत थोडी सूट देऊन, मी वनवासांतून चौदा वर्षांनी परत येईपर्यंत त्यांचा मृत्यू थोडा पूढे ढकलण्यांत यावा. निर्गुण-निराकार, शुद्ध ब्रह्म पण जेव्हा सगुण-साकार बनून देह धारण करुन, रामचंद्र रुपाने या भूतलावर अवतरित होते, तेव्हां त्यालाही, या कर्म-कायद्याचें (सिद्धांताचे) तंतोतंत पालन करावेच लागते. कर्माचे कायद्यांत कोठेही विलंब नाही की पळवाट नाही.

कर्म म्हणजे काय ? कर्म कशाला म्हणतात ?

आपण जे जे काम (क्रिया) करतो, त्याला ‘ कर्म’ म्हणतात. उदाहरणार्थ खाणे, पिणे, स्नान करणे, धुणे, चालणे, बोलणे, उभे राहाणे बसणे, नोकरी-व्यवसाय करणे, झोपणे जागणे, पाहणे, ऐकणे, न ऐकणे, वास घेणे- वास न घेणे, स्पर्श करणे श्वासोच्छ् वास करणे, जन्मणे, जगणे, मरणे, इत्यादि सर्व शारिरीक व मानसिक क्रिया, या सर्व गोष्टी कर्मामध्ये मोडतात.

या प्रकारच्या सर्व कमांचे मुख्यतः तीन भाग करता येतातः(१) क्रियमाण कर्म, (२) संचित कर्म, (३) प्रारब्ध कर्म.

(१) क्रियमाण कर्म :

आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी काही कर्मे करतो, त्यां सर्वांचा “क्रियमाण कर्मात समावेश होतो. सकाळ पासून रात्री पर्यंत, सोमवार पासून रविवार पर्यंत पाहिल्या तारखे पासून शेवटच्या तारखेपर्यंत, चैत्रापासून, फाल्गुनापर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत, आपण जीं जीं कर्मे (क्रिया) करतो, त्यां सर्वाना, क्रियमाण कर्म म्हणतात.ही सर्व कर्मे केल्यावर, तीं करणारयाला फळ देऊनच शांत होतात. फळ दिल्याविना ती शांत होत नाहीत. क्रियमाण कर्मात त्या कर्माचे फळ भोगूनच सूटका होते.

उदा. : आपण तहान लागल्यावर पाणी पितो पाणी पिण्याचे ‘कर्म’ केले. तहान भागली म्हणजे पाणी पिण्याचे ‘कर्म’ त्याचे फळ त्वरित देऊन शांत झाले. आपल्याला भूक लागली खाण्याचे ‘कर्म’ केले, आपली भूक शमवून, इष्ट फळ देऊन, ते शांत झाले. आपण स्नान करण्याचे ‘कर्म’ केले, शरीर स्वच्छ झाले कर्म आपले फळ देऊन शांत झाले. आपण कोणाला शिव्या देण्याचे कर्म केले, त्याने आपल्या थोबाडीत मारली आणि आपल्याला कर्माचे फळ देऊन ‘कर्म’ शांत झाले.अशा प्रकारे प्रत्येक क्रियमाण कर्म फलद्रूप होतेच, व फळ भोगूनच आपल्याला त्यापासून मुक्ति मिळते.

(२) संचित कर्म :

कित्येक क्रियमाण कर्मे अशी असतात कीं, ती तत्काळ फळ देत नाहीत. त्यांचे फळ मिळण्यास काळ मध्ये जातो. त्या कर्माचे फळ पक्व होण्यास थोडाफार कालावधि लागतो, तोवर तीं कच्च्या स्वरूपात राहतात आणि जोपर्यंत फळ मिळत नाही, तोवर तीं जणू शिल्लक राहातात, संचित होऊन राहातात. अशा फळ न दिलेल्या कर्मानाच “संचित कर्म” म्हणतात.

ऊदा. तुम्ही आज परिक्षेचा पेपर लिहिलात, तरी फळ स्वरूप असा त्याचा परिणाम (Result) मिळण्यास काही कालावधि जावा लागतो.

तुम्ही कोणाला शिवीगाळ, मारहाण करून पळून गेलात, नंतर दहा बारा दिवसानी, संधि साधून तो मनुष्य तुमच्या त्या कर्माची सव्याज परतफेड करतो म्हणजे तुमचे कर्म पक्व होण्यास दहा बारा दिवस लागतात व मग ते तुम्हाला (फळ) देऊन शांत होते.

तुमच्या तरुण वयात तुम्ही आपल्या मातापित्याना दुःख दिलेत, परिणामस्वरूप तुमच्या वृद्धावस्थेत तुमची मुले तुम्हाला दुःख देतात व तुमच्या पूर्व कर्माचे फळ, मध्ये बराच काळ लोटला तरी, याच जन्मांत तुम्हाला मिळतें.

तुम्ही या जन्मी, संगीत साधना केलीत तर कदाचित पुढील जन्मी, लहानपणीच तुम्ही संगीतात नैपुण्य दाखवाल.

अशा प्रकारे कित्येक क्रियमाण कर्मे तात्कालीक फळ न देता कालांतराने ती जेव्हा पक्व होतात, तेव्हा तुम्हाला फळ देऊन शांत-समाप्त होतात आणि तोपर्यंत “संचितकर्म” म्हणून तुमच्या खाती जमा राहातात.

बाजरी पेरल्यानंतर तीन महिन्यानी पीक तयार होते, गव्हाला चार महिने लागतात. आंबा लागवडीस येण्यास ५-६ वर्षे लागतात, अन्य काही फळ झाडे दहा किंवा त्याहून अधिक वर्षांनी फळ देऊ लागतात. ‘क्रियमाण कर्माचे ज्या स्वरूपाचे बीज, त्या प्रमाणे त्याचे फळ मिळण्यास, मध्ये कमी अधिक काळ लोटावा लागतो. जीवात्म्याची अशी अनेक कर्मे संचित म्हणून त्याचे खातेवहीत ‘जमा म्हणून भोगण्यासाठी शिल्लक राहिलेली असतात.

उदा. समजा की आज तुम्ही १००० क्रियमाण कर्मे केलीत, त्यातील ९०० कर्मे अशी होती, की जी तात्कालीक फळ देऊन शांत झाली- समाप्त झाली, परन्तु राहिलेली १०० क्रियमाण कर्मे अशी असतील की ती पक्व होऊन, फळ देण्यास काही काळ लागेल, व तोवर ती संचित कर्म म्हणून तुमच्या खाती जमा राहातील, अशा तरहेने आज १०० कर्मे संचित झाली, उद्या कदाचित १२५ कर्मे संचितात जमा होतील, पर्वाच्या दिवशी, आजच्या व उद्याच्या संचित कर्मा पैकी ८० कर्मे पक्व होऊन, फळ देऊन शांत झाली, व राहिलेली ८०-९० कर्मे संचित म्हणून जमा राहिली अशा प्रकारे, आठवडे अखेर ३००-४०० कर्मे शिल्लक फळ न देवां संचित म्हणून तुमचे खाती जमा राहिली. महिने अखेर, १०००-१५०० क्रियमाण कर्मे फळ न देतां, संचित म्हणून राहिली वर्ष अखेर काही हजार शिल्लक.अशाप्रकारे आयुष्य संपून जाते, पण संचित कर्मे संपत नाहीत. तुम्ही पुढील जन्म घेता-पुन्हा पुढील जन्मी आणखी काही लाखांची शिल्लक वाढली. अशा प्रकारे अनादि काळापासून जमा होत राहिलेल्या कर्माचे, जणू कित्येक हिमालय पर्वतावढे संचित कर्म प्रत्येक जीवात्म्याचे खाती भोगण्यासाठीं जमा होऊन राहिलेले असतात. कोणते ही क्रियमाण कर्म, जे संचितांत जमा होऊन राहिलेले असतें, ते फळ दिल्यावाचून समाप्त होत नाही या नियमानुसार, अर्शी जन्मोजन्मी जमा होत आलेल्या कर्माची फळे, या जन्मी, पुढील जन्मी भोगून संपविल्या शिवाय माणसाची त्या पासून सुटका नाही, या गोष्टीचा माणसाने विचार केला तर त्याचा थरकाप उडेल परंतु अविद्येने, अज्ञानाने व्यापलेला जीव, याचा कधीं विचारच करीत नाही.

राजा दशरथाने श्रवणकुमाराची हत्या चुकून केली तेव्हा त्याच्या वृद्ध माता- पित्यानी “तुझा मृत्यूही पुत्र-विरहाने होईल” असा राजा दशरथाला शाप दिला. पण राजांचे हे हत्या करणाचे क्रियमाण कर्म शापा प्रमाणे तत्काळ फळ कसे देणार? कारण त्यांवेळी राजाला मुलगाच झालेला नव्हता, म्हणून हे क्रियमाण कर्म फळ देऊन शांत न होता त्याच्या संचितात जमा राहिले.कालांतराने राजाला, एकच काय, पण चार पुत्र झाले. ते मोठे झाले. त्यांची लग्ने झाली, आणि जेव्हा राम-राज्याभिषेकाचा दिवस उगवला, त्यां वेळी पूर्वीचे ते क्रियमाण कर्म पक्व होऊन फळ देण्यास सज्ज झाले आणि राज्याभिषेकाच्या मंगल दिवशींच राजाला पूर्व शापानुसार मृत्यूचे फळ देऊन शांत झाले. त्यांत क्षणाचाही विलंब झाला नाहीं. वास्तविक श्रीराम हा भगवंताचा अवतार. प्रत्यक्ष परातत्पर, परब्रहम, राम-रुपाने सगुण साकार रुप धारण करून पृथ्वीतलावर अवतीर्ण झाले होतें. ज्या रामाच्या केवळ चरण स्पर्शीने शापित शीलेची पुन्हा शापमुक्त आहिल्या झाली, ज्याच्या केवळ चरण-रज-स्पर्शाने दगडाचा उद्धार होऊन अहल्येला जीवदान मिळाले, अशा परब्रह्म असलेल्या रामाने स्वतःच्या पित्याला आपण वनवासातून परत येई पर्यंत मृत्यूपासून चौदा वर्षाचे जीवदान देता आले असते. पण कर्मफल-कायद्याचे चोख, तंतोतंत पालन झालेच पाहिजे, त्यांत कोणतीही ढवळाढवळ चालत नाही.

थोडक्यांत सांगायचे म्हणजे परमेश्वराच्या राज्यांत ना अंधार, ना अन्याय ना दिरंगाई. राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धांत मारले गेले, तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारलें की असे कां व्हावे ? माझ्या सबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळया-देखत पाहून, त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावें ? तेव्हा भगवान श्रीकृष्णानी राजाला. आपले पूर्व जन्म पाहाण्याची दिव्य दृष्टि दिली.राजाने दिव्य दृष्टि द्वारा पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्यांने एक वृक्षाला आग लावली होती. आग लागताच वृक्षावरील बरेचसे पक्षी पळून गेले, मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले, तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. राजाचे हे त्या जन्मीचे क्रियमाण कर्म, फळ देण्याची योग्य संधि पाहात संचित रूपांत शिल्लक राहिले, आणि या जन्मांत, राजाला त्याच्या काही अन्य पुण्याईचा फलस्वरूप जेव्हा शंभर पुत्र झाले, तेव्हा ते संचित कर्म पक्व होऊन राजाला फळ देण्यास सज्ज झाले. परिणामतः राजा आंधळा जन्मला, व त्याचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मरण पावल्याचे दुःख राजाला अनुभवावे लागले. पन्नास जन्मापूर्वीच्या क्रियमाण कर्माने, इतका दीर्घकाल लोटला तरी, राजाचा पिच्छा सोडला नाही, राजाची एका जन्मांत शंभर पुत्र होण्याची पुण्वाई होई पर्यंत ते कर्म दबा धरून बसले, संधि मिळाल्याबरोबर त्याला फळ देऊन शांत झाले.

परमेश्वराचा राज्यांत ना अंधार, ना अन्याय… क्रियमाण कर्म ‘संचित रूपाने शिल्लक राहातें, व संधि मिळतांच फळ देऊन शांत होते.

(३) प्रारब्ध कर्म :

जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात (प्रारब्ध सुरु झालेले)अनादि काळापासून, जन्म-जन्मांतरातील संचित कर्माचे असंख्य हिमालयसदृश पर्वत जीवात्मांच्या खात्यांत जमा झालेले असतात. त्या पैकी जी संचित कर्मे पक्व होऊन फळ देण्यायोग्य होतात, तेवढी प्रारब्ध कर्मे भोगण्यास अनुरूप असे शरीर जीवात्म्यास प्राप्त होते, आणि त्या जीवन काळांत भोगण्यासाठी तयार झालेली सर्व प्रारब्ध कर्मे भोगल्यानंतरच त्याचे शरीर सुटते. प्रारब्ध भोगण्यास अनुरूपा असा देह आरोग्य, स्त्री-पुत्रादिक, नातलग, सुख-दुःख ई. त्या जीवनकाळ दरम्यान जीवाला प्राप्त होतात, आणि सर्व प्रारब्ध कर्म पूरेपूर भोगल्यातरंच त्याचा देह सुटतो म्हणजे तो जीवात्मा त्या देहातून सुटतो..

म्हातारपणी एकाद्याला अर्धांग वायु होऊन या कुशीचे त्या कुशीस होता येत नाही, स्वच्छतेच्या अभावी अंगाला दुर्गंधी सुटलेली असते, अशा अंथरूणात पडलेल्या अवस्थेत, भले तो वारंवार परमेश्वराला हाका मारुन देवा सोडव या यातनांतून. तुझ्या पायाशी यावयास मी केव्हाही तयार आहे.” असे वारंवार बोलून देवाची कितीही आळवणी करीत असो, तरीपण, या जन्मी भोगण्याचे निर्धारीत प्रारब्ध जोवर पूर्ण भोगून संपत नाही, तोवर त्याने काहाही केले, तरी त्याचा देह सुटत नाही. पण ज्या क्षणी ते पुरें होतें, त्यानंतर मुलाने तोंडात घातलेल्या गंगाजलाचा एकही थेंब पोटांत न जाता नाकावाटे बाहेर येतो, व एकही ज्यादा श्वास न घेता त्याचा अंत होतो.

व कर्म सिद्धांताप्रमाणे या सर्व हिशोबाचे संचित कर्म घेऊन उरलेले प्रारब्ध भोगण्यासाठी जीवात्म्यास परत नवीन अनुरूप असा नवा देह त्याला पुनः प्राप्त होतो. अशा रीतीने तो जीवात्मा, जन्म मरणाच्या चक्रात सतत फिरत असतो. अनादि काळापासून जन्म जन्मांतरातील संचित कर्मे भोगण्याचे हे चक्र अव्याहतपणे चालत आलेले असते. जोवर तो या चक्रातून सुटत नाही तोवर त्याला मुक्ति नाही.

म्हणूनच श्रीमद् आद्य शंकराचार्य म्हणतात :

पुनरपि जननं पुनरपि मरणं । पुनरपि जननी जठरे शयनं ॥

इह संसारे, बहु दुस्तारे । कृपयापारे पाहि मुरारे ॥

अशा प्रकारे अनेक योनीमध्ये जीव भटकत असतो. मनुष्य योनीत असता केलेल्या क्रियमाण कर्मातील अनेक अपरिपक्व कर्मे संचित म्हणून जमा होत राहातात त्यापैकी काही काळांतराने पक्व होऊन फळ देऊन शांत होतात. पण एकंदरीत जीवाचा संचित कर्म साठा प्रत्येक जन्मात वाढतच राहातो व या कारणे जीवात्मा मोक्षापासून दूर दूर लोटला जातो.

तुम्ही कर्म केलेंत की त्यांचे फळ तुम्हाला चिकटलेच समजा. फळ भोगल्याविना तुमची सुटकाच नाही. परिणामातून सूटण्यासाठी कितीही खटपटी- लटपटी केल्यात, तरी त्याचे परिणाम भोगल्याशिवाय त्यातून तुमची सुटका कदापि नाही.

राजा अंबरीषाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषिच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र जसे तीन लोकांत ते पळाले, तरी त्यांचा सतत पाठलाग करीत राहिले, त्यां प्रमाणे तुमचे कृत कर्म तुम्ही जाल तेथे तुमचा पिच्छा सोडणार नाही, आणि तुम्हाला भोग देऊनच ते शांत होणार.

कदाचित तुम्ही आपल्या द्रव्यबळावर या जगांतील कोणी नामवंत वकील देऊन, निर्दोष सुटका करून घेतलीत, तरी वरील कोर्टात परमेश्वराच्या न्यायालयांत तुम्ही कदापि सुटू शकत नाही. तेथे हुशार, चलाख वकीलाचा युक्तिवाद तुमच्या मदतीस येऊ शकणार नाही.

फार वर्षापूर्वीची सत्यघटना. अहमदाबादला एक विद्वान, अनुभवी सत्र- न्यायाधीश (Session Judge) होते. वेदांताचे गाढे अभ्यासी, कर्मसिद्धांतावर त्यांचा जबर विश्वास होता. एका गावी कोर्टाचे काम चालू असतां, सत्र न्यायाधीश एकदा नदीकांठी फिरावयास गेलेले असताना, जवळूनच एक माणूस पळताना व त्याच्यापाठी सुराधरी दुसरा माणूस त्याचा पाठलाग करताना व त्याचा खून करताना त्यानी पाहिले. खुनी माणसाचा चेहरा जज्ज साहेबानी बरोबर पाहिला. ते घरी आले पण या घटनेसंबंधी कोणाशीही अवाक्षर बोलले नाही.

पुढे पोलीस तपास होऊन, पाच-सहा महिन्यानी तो खुनाचा खटला कोर्टात दाखल झाला व कर्म धर्म संयोगाने त्याच सत्र न्यायाधिशांपुढे सुनावणीस आला. परंतु कोर्टापुढे खुनाचा आरोपी उभा करण्यात आल्यावर न्यायाधीश साहेबांच्या लक्षांत आले की, त्यानी त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाऐवजी, आरोपीच्यां पिंजर्यात संशयित म्हणून उभा केलेला माणूस कोणीतरी भलताच होता.पोलिसानी सदर आरोपी विरुद्ध इतका ठोस आणि सबळ पुरावा दाखल केला, की आरोपीच खरा खुनी होता असे साक्षी पुराव्यावरून सिद्ध झालें.जज्ज साहेब मनोमन निश्चित जाणत होते की पिंजर्यातील बनावट आरोपी खरा खुनी नव्हता, कारण खरूया खुनी माणसाला त्यानी स्वतः चे डोळयानी पाहिलेला होता. न्यायाधिशाला पुराव्याचे आधारावरच निकाल छावा लागतो, पुरावा इतका ठोस होता की त्या आधारावर आरोपीला फाशीची शिक्षांच देणे अपरिहार्य होते.

परंतु प्रस्तुत न्यायाधीश गाढे वेदांती व कर्मसिद्धांतावर त्यांचा गाढा विश्वास होता. ते निश्चितपणे जाणत होते की खरा खुनी वेगळाच होता. पण समोरच्या पुराव्यानुसार एका निरपराध माणसाला फाशीची शिक्षा ठोठावण्याशिवाय त्यांच्या समोर अन्य मार्गच नव्हता. म्हणून शिक्षा फर्माविण्यापूर्वी न्यायाधिशानी सदर आरोपीला आपल्या चेंबर मध्ये खासगीत बोलण्यासाठी बोलावले. बनावटी आरोपी रडूं लागला व म्हणाला, महाराज मी पूर्ण निर्दोष आहे, खून मी केलेला नाही, व मी नाहक मारला जात आहे. न्यायाधीश त्याला म्हणाले, ही गोष्ट मी स्वतः जाणतो, तू या खटल्यातला खरा खुनी नाहीस. परंतु तुला फाशीची शिक्षाच देणे मला भाग आहे, माझ्यापुढे दुसरा पर्याय नाही. परंतु परमेश्वर निर्मित कर्माचा कायदा आहे, त्यांत काही गफलत तर नाहीना याचा मला शोध घ्यावयाचा आहे. त्या कायद्यानुसार माणसाला केवळ त्याच्या कर्मानुरोधाने फळे भोगावीच लागतात. तू निरपराधी असूनही कसा गोवला गेलास हे जाणण्यासाठी मला खासगीत तुला एक प्रश्न विचारावयाचा आहे, त्याचे तू ईश्वराला स्मरून खरे खरे उत्तर दे. मरणा पूर्वी खोटे बोलण्याचे पातक करू नकोस.

माझा प्रश्न असा आहे की “भूतकाळांत तू कोणाचा खून केला होतास का?खुनाच्या आरोपीने रडत रडत सांगितले की त्याने पूर्वी एक सोडून दोन खून केलेले होते, त्याच्यावर दोन्ही वेळा खटला पण भरला गेला होता, परंतु त्या वेळी त्याला पैशाचे पाठबळ असल्याने, त्याने दोन्ही वेळा नामवंत हुशार वकील नेमले होते व पोलीस खात्यांतही खूप पैसा पेरला होता, त्यामूळें त्यां दोन्ही खटल्यांत त्याची निर्दोष म्हणून सुटका झाली होती, पण आतां त्याची सांपत्तिक स्थिति खालावल्यामुळें, तो तसे करू शकत नव्हता, व पूर्ण निर्दोष असूनही या वेळी तोच खुनी असे सिद्ध करण्यात आले आहे.

सेशन जज्जांची पुरी खात्री झाली की परमेश्वराच्यां “कर्म-सिद्धांत” कायद्यात कोणतीही त्रुटी वा गफलत नाही. पूर्वीच्या खटल्याचे वेळी आरोपीची पुण्याई सबळ असल्यामुळे, त्याच्या क्रियमाण कर्माला फळ देण्यास विलंब झाला, व ते “संचित” कर्मात त्याचे खाती जमा राहिले. व आता त्याच्या पुण्याईला ओहोटी लागल्याने, या खेपेस तो पूर्ण निष्पाप असूनही त्याचे पूर्वीचे “संचित कर्म” प्रारब्ध म्हणून फळरूपाने त्याचेसमोर उभे राहिले, आणि आतां त्याला फासावर लटकण्या-शिवाय गत्यंतर नाही.

कर्त्याच्या पुण्याईचा जोर असल्याने संचित कर्म पक्व होण्यास विलंब लागतो, त्यां मुळें जगाच्या दृष्टिने तो दोषी असूनही काही काळ तो प्रतिष्ठित म्हणून उजळ माथ्याने जगू शकतो, पण पुण्याईचा जोर ओसरतांच, त्याचे संचित कर्म फळ देण्यास समर्थ होतें व फळ देऊन, आपला प्रभाव दाखवून शांत होतें.

म्हणून वाईट कर्म करण्यापूर्वी, माणसाने हजार वेळा विचार करावा एकदां कर्म केल्यावर, त्याचे फळ आज नाही उद्यां भोगलेच पाहिजे व त्यां वेळी छाती पुढे करून माणसाने त्यास सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. हसत हसत केलेले पाप, रडत रडत भोगावेच लागते.

आज येथेच थांबतो.

या पुढील विवेचन आपण पुढील भागांत पाहू.

क्रमशः ……….

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

उत्तराफाल्गुनी नक्षत्र विचार


विषय : उत्तराफाल्गुनी नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण उत्तराफाल्गुनी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. उत्तराफाल्गुनी नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील १२ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राला इंग्रजीत ‘डेनिबोला’ असे म्हणतात. या नक्षत्राची आकृती शय्येसारखी असून त्यात दोन सुरेख व ठळक तारे आहेत. ताऱ्यांचा रंग जरा पांढरट निळा असून ते बरेच तेजस्वी आहेत. फाल्गुनी महिन्यात हे नक्षत्र रात्रभर दिसू शकते.

नक्षत्राचा १ ला चरण सिंह राशीत व पुढील चरण कन्या राशीत येत असल्याने हे नक्षत्र त्रिपाद आहे, तसेच ते ऊर्ध्वमुखी, स्थिरमिश्र, मनुष्यगणी व अवलोचनी आहे. नक्षत्र स्वामी रवि, राशी स्वामी रवि व बुध व दैवत सूर्यदेवत असल्याने या नक्षत्रात प्रामुख्याने रवीचे विविध गुणधर्म आढळून येतात. विशेषतः रवीची कर्तबगारी व कर्तृत्व, उदात्तपणा, राजाचे शुभ गुण व बुधाचा चुटचुटीत व चुणचुणीतपणा यांचा सुंदर मिलाफ झालेला दिसून येतो. अग्नीसारखा प्रखर रवि या नक्षत्रात शीतल फलादेश देतो.

उत्तराफाल्गुनी नक्षत्र सात्त्विक प्रवृत्तीचे तसेच थोडे पराक्रमीदेखील आहे. तसेच सेवावृत्तीचे असून आश्रित आहे. थोरामोठ्यांच्या साहाय्यानेच हे जातक पुढे येतात. उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेले जातक सत्वगुणी, सभ्य, शांत, नम्र, विनयशील, उदार व उदात्त आचारविचाराच्या, हौशी, रसिक, विद्याव्यासंगी, टापटीप, नीटनेटकेपणा, स्वच्छता यांची आवड, थोडे शूर, पराक्रमी, आनंदी व संतोषी प्रवृत्तीचे असतात. हे नक्षत्र स्त्री व पुरुष दोघांनाही अनुकूल असते. कारण स्त्री व पुरुषांना लागणाऱ्या गुणाचे मिश्रण या नक्षत्रात दिसून येते. पुरुषांना शरीरप्रकृतीच्या दृष्टीने हे नक्षत्र अनुकूल आहे.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या पुरुष जातकांचा बांधा, उंच, सडपातळ, सडसडीत, अंगाखांद्याने मजबूत व काटक असतो. शारीरिक उर्जा व रोग प्रतिकारक शक्ती चांगली असते. दिसण्यात हे पुरुष जातक साधारण असतात. अधिकार मिळाल्यास त्याचा जनतेसाठी, लोकांसाठी किंवा समाजासाठी चांगला उपयोग कसा करता येईल, याकडे या जातकांचे लक्ष असते. उत्तराफाल्गुनी नक्षत्रावरचे अधिकारी प्रजाहित दक्ष, लोकांच्या अडचणी सोडवणारे, कार्यतत्पर व कर्तव्यनिष्ठ असतात.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्री जातकांसाठी हे नक्षत्र शरीर प्रकृती, सौंदर्य, कला, विद्या, शुभगुण या दृष्टीने अनुकूल असते.  मात्र वैभव, श्रीमंती व राजयोग यांना फारसे अनुकूल नसते. या नक्षत्राची स्त्री मध्यमवर्गीय कुटुंबाची राणी असते. प्रमाणशीर उंच, रेखीव, आकर्षक बांधा थोडासा बारकट, कंबर बारीक पण कमाणीय असतो. हे स्त्री जातक फार काटक किंवा राकट वा नाजूकही नसून मध्यम असतात. चेहरा सुंदर पण मादक नसतो. तेजस्वी असतो पण रागीट नसतो. हे स्त्री जातक  नेहमीच हसरे, आनंदी आणि समाधानी दिसतात. चेहऱ्यावर रवीचे सात्विक तेज व प्रसन्नता दिसून येते. चेहरा थंडीच्या दिवसात पूर्वेला उगवणाऱ्या सूर्यासारखा कोमल, प्रसन्न व ऊबदार असतो. त्यांच्या स्वभावात स्त्री-पुरुषाच्या गुणांचे मिश्रण दिसून येते. त्या शांत, आनंदी, समाधानी, संतोषी, संसारी, कर्तव्यदक्ष, चतुर, व्यवहारकुशल, कष्टाळू व सेवावृत्तीच्या असतात. मनाने कोमल, दयाळू व भावनाप्रधान असल्या तरी प्रसंगी कठोर, शिस्तप्रिय, बाणेदार असतात. रसिक, होशी व कलाप्रिय असल्या तरी चैनी किंवा उधळ्या नसतात. उत्तराफाल्गुनीची स्त्री खेळकर व मिळून मिसळून राहणारी, बोलण्यात मधुरता व नम्र, विनयशील, साधी व हौशी असते. थोडी स्वप्नात रंगणारी अथवा संकटाला घाबरून न रडता धैर्याने तोंड देणारी असते धाडसी व सज्ज असते. उत्तराफाल्गुनी एक आनंद निर्माण करणारी आदर्श गृहिणी आहे. उत्तराफाल्गुनीची स्त्री संसारातील रखरखत्या व तणावाच्या वातावरणात आपल्या सेवेने व गुणाने घरातील वातावरण प्रसन्न व आनंदी करून टाकते.

उत्तराफाल्गुनी नक्षत्र सरकारी किंवा खाजगी कंपनीतील दुय्यम अधिकारीवर्ग, हिशेबनीस, सचिव, लहान लहान व्यापारी, छापखान्यात काम करणारा वर्ग, लेखक, लहान लहान शेतकरी वर्ग, आर्किटेक्ट, कलाकार, वकील, इंजिनिअर्स, धान्य, गवत व कागदाचे व्यापारी, तलाठीवर्ग, म्युनिसिपालटी, ग्रामपंचायती, स्थानिक समित्याचे पदस्थ, समाजसेवक पुढारी ई. दर्शवते

उत्तराफाल्गुनी नक्षत्रात रवि शुभ व चांगली फळे देतो. उत्तराफाल्गुनी नक्षत्रात रवि असता शरीरसौष्ठव उत्तम असते. उंच, हाडापेराने मजबूत, काटक, ऐटबाज बांधा असतो. लहान प्रमाणात अधिकारयोग मिळतो. कीर्ती, प्रसिद्धी, मानसन्मान चांगला मिळतो.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रात चंद्र अनुकूल असतो. शरीरप्रकृती, सौंदर्य व कला यांना अनुकूल असतो. हे जातक देखणे, प्रसन्न, आनंदी, हौशी कलाकार व गुणी असतात. तसेच सधन, बुद्धिमान, उदार व थोड्या ऐषोआरामी असतात.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रात मंगळ मध्यम शरीरप्रकृती देतो पण जातक काटक, शूर, धडपड्या, चळवळ्या असतो. आर्किटेक्टला उत्तम व अधिकार बरा.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रात बुध चांगला असतो. मध्यम, उंच, आडवा, थोडा भरलेला बांधा असतो. हे जातक  चपळ व तरतरीत असतात. बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, प्रतिभाशक्ती चांगली असते. हे जातक थोडे  खोडकर असतात. लेखन, वाचन, साहित्य यांची आवड असते. व्यापाराला बरे.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रात गुरु बांधा प्रमाणशीर, उंच, बारीक, चेहरा सात्विक, सुंदर, प्रसन्न व समाधानी वृत्ति देतो. हे जातक बुद्धिमान, हुशार, विद्याव्यासंगी व शिक्षित असतात. उच्च मध्यमवर्गात मानसन्मान मिळतो. मात्र गुरु सांपत्तिक व अधिकारदृष्ट्या मध्यम असतो.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रात शुक्र रूप, कला यांना अनुकूल असतो. पैसा, मान, विद्येच्या दृष्टीने साधारण  असतो. शुक्र असता बांधा उंच, गोंडम व सुडौल, ललितकला, आर्किटेक्ट यांना चांगला.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रात शनि साधारण असतो. शरीरप्रकृती बरी असते. हाड व शिरा जास्त दिसतात. श्रम, कष्ट, धडपड जास्त, पण त्या प्रमाणात धन मिळत नाही. संकटे भोगणारा व दुःखी असतो.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रात राहू शरीरप्रकृती, कला यांना अनुकूल. बुद्धिमत्ता व हुशारी बरी असते. ड्रॉईंग, फोटोग्राफी व आर्किटेक्ट ई. चांगले जमते. मानसन्मान, साधारण कीर्ती, पण धन चांगले मिळेल.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रात केतू शरीरप्रकृतीच्या दृष्टीने बरा असतो. कला, बुद्धिमत्ता यांसाठी प्रतिकूल.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रात हर्षल असता जातक बुद्धिमान, कर्तबगार व हरहुन्नरी असतो. संशोधन चांगले होते.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रात नेपच्यून असता जाताकास शरीरप्रकृती बरी, आनंदी चेहरा, आनंदी, संतोषी व समाधानी वृत्ति प्रदान करतो. अंतःस्फूर्ती, प्रतिभाशक्ती, अंतर्ज्ञान, आत्मज्ञान, ध्यानधारणा चांगली असते.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर होणारे आजार फारसे दाहक नसून सौम्यच आहेत. यांना उत्तरार्थात जास्त आजार संभवतात. डोके दुखणे, अर्धशिशी, उष्णतेचा त्रास, कंबर दुखणे, पोटाचे विकार, चक्कर किंवा भोवळ येणे, उतार वयात रक्तदाब वाढणे ई या आजार हे नक्षत्र दर्शवते.

उत्तराफाल्गुनी हे त्रिपाद नक्षत्र असल्याने थोडेसे आरिष्टदायक आहे. सीतेचा विवाह या नक्षत्रावर झाल्याने तिच्यावर विवाहानंतर तिच्यावर बरीच आरिष्टे आली. या नक्षत्रावर जन्म झाला व इतर आरिष्ट योग असल्यास शांती करण्यास सुचवले जाते.

उत्तराफाल्गुनी नक्षत्र ठळक व सुंदर असल्याने हस्ताक्षरही मोठे, गोल व ठळक आढळते. लिहिताना हे जातक सरळ व एका रेषेत लिहितात. गति मध्यम असते.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर १ व ३ या अंकाचे वर्चस्व असते. रविचे माणिक किंवा बुधाचा पाचू लाभदायक असू शकतो. अंधलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती लवकरच पूर्व दिशेला सापदु शकते.

उत्तराफाल्गुनी नक्षत्र मुहूर्त शास्त्रात महत्वाचे मानले जाते. हे नक्षत्र शुभ असल्याने विवाह, उपनयन अशा शुभ कार्याला चांगले. स्थिर नक्षत्र असल्याने वस्तू, गृहप्रवेश, घर बांधणे, कोनशिला बसविणे यांना चांगले. ऊर्ध्वमुखी असल्याने घरचा मजला वाढवणे, छप्पर घालणे, देवालयावर कळस चढवणे यांनाही चांगले. तसेच या नक्षत्रावर बारसे, राज्याभिषेक, बी पेरणे, बाग लावणे, औषधी झाडे लावणे, विहिर खणणे, नाक कान टोचणे, शांतिकर्म, शेतकामास आरंभ व विद्याभ्यास या कार्याला योग्य आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)