आज आपण विशाखा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. विशाखा हे नक्षत्र चक्रातील १६ वे क्रमांकाचे नक्षत्र असून नक्षत्राचा आकार दाराला बांधलेल्या तोरणासारखा भासतो. विशाखालाच ‘राधा’ असेही म्हटले आहे. या नक्षत्रामध्ये एकूण ४ तारे असले तरी त्यातील २ च तारे जरा ठळक व एका रेषेत पण आडवे भासतात. नक्षत्रामधील २ तारे तोरणासारखे असून जरा हिरवट पांढऱ्या रंगाचे व बरेच तेजस्वी दिसतात. वैशाख महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते. काहींच्या मते याची आकृती पोवळ्यासारखी आहे. विशाखा नक्षत्राचे इंग्रजी ‘अल्फा लिब्रा’ आहे.
या नक्षत्राचे पहिले ३ चरण तूळ राशीत व ४ थे चरण वृश्चिक राशीत असल्याने हे चतुष्पाद आहे. हे नक्षत्र अधोमुख, मिश्र साधारण व अंधलोचनी आहे. नक्षत्राचा स्वामी गुरु, दैवत इंद्राग्नी व राशी स्वामी शुक्र व मंगळ असल्याने या नक्षत्रात गुरूची अप्रतिम विद्वत्ता, शुक्राचा व्यवस्थितपणा व मंगळाची खलबुद्धी यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. या नक्षत्राच्या ४ चरणावर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्र यांचे स्वामित्त्व दिसते.
विशाखा नक्षत्राला तराजूचा दांडा असेही म्हणतात. हे नक्षत्र राक्षसगणी व तामसी असल्याने जरा अशुभच आहे. तसेच हे आश्रित असून या नक्षत्रावर जन्मलेले जातक थोरा-मोठ्यांच्या सहाय्याने पुढे येतात. विशाखा नक्षत्र जातक विद्वान पण रजोगुणी, तामसी, हट्टी, थोडे चिडखोर, हौशी, रसिक पण उथळ्या व खर्चिक वृत्तीचे, थोडे भांडखोर, लोभी, गोड बोलणारे, स्त्रीलंपट, थोड्या अविचारी, उलट उत्तरे देणारे असू शकतात. फार उच्च ध्येय किंवा महत्त्वाकांक्षा नसून खावे-प्यावे, मजा करावी असा स्वभाव दिसून येतो. विशाखा नक्षत्र धनाच्या दृष्टीनेही साधारण आहे.
विशाखा नक्षत्र पुरुष व स्त्रियांना मध्यमच आहे. पुरुषांना लागणारा स्वावलंबीपणा, पराक्रम, अधिकार गाजवण्याची वृत्ती, धाडस हे गुणधर्मच जास्त प्रमाणात दिसून येतात. विशाखा नक्षत्रावर जन्मणारे पुरुष जातक उंच, सडपातळ, प्रमाणशीर पण लांबट अवयव, उभट चेहरा व हाडापेराने जरा मजबूत, सडसडीत व जरा काटक दिसतात. चेहऱ्यावर मात्र बुद्धीमत्ता व विद्वत्तेचे तेज दिसून येते.
विशाखा नक्षत्र स्त्रियांना हे नक्षत्र साधारण आहे. कारण सौंदर्यकला अथवा धनाच्या दृष्टीने ते कमी प्रतीचेच आहे व अनिष्ट असता सद्गुणापेक्षाही दुर्गुणच जास्त आढळतात. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रियांचा बांधा उंच, सडपातळ, प्रमाणशीर असतो. कपाळ रुंद पण चेहरा त्रिकोणी दिसतो. नाक सरळ असते. सडसडीत असल्या तरी पुरुषीवृत्ती व बांधा दिसून येतो. नाजूकपणा, कोमलपणा, सौंदर्यहानी, हळवेपणा अथवा नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, अथवा कलाकौशल्याची अजिबात आवड दिसून येत नाही. मात्र बुद्धीमत्ता व विद्वत्ता चांगली असते. विशाखा नक्षत्री बुध, गुरु असता त्या उच्च शिक्षण घेतलेल्या असतात. खाणेपिणे, कपडालत्ता, छानछोकीपणा, रंगेलपणा, खर्चिक वृत्ती, उधळेपणा असू शकतो. उपभोग (ऐहिक) व देह सौख्याकडे जास्त प्रवृत्ती असते. चालणे झपझप असले, तरी जरा धांदरट व जरा नीट नेटकेपणाचा अभाव असतो. असतात. फॅशनची आवड असली तरी तारतम्य, रंगसंगती या बाबत कमी आस्था दिसून येते. दागदागिने, उंची वस्त्रे, फुले, वेण्या यांचाही फार शौक नसतो. सिनेमा, नाटके व करमणुकीच्या साधनांची बरीच आवड असते.
विशाखा नक्षत्राखाली येणारा साधारण वर्ग बुद्धीमान लोक, शिक्षक, प्रोफेसर्स, सरकारी किंवा खाजगी कंपन्या क्षेत्रातील सेवक व अधिकारवर्ग, लहान लहान व्यापारी, वकील, इंजिनिअर्स, औषधी कंपनीत काम करणारा वर्ग, प्रवासी व बांधकाम खात्यात काम करणारा वर्ग इ आढळून येतात.
विशाखा नक्षत्री रवि फारसा अनुकूल नसतो. रवि असता बांधा उंच, सडपातळ पण जरा अशक्तच व नाजूक असतात. शारीरिक उर्जा कमी असून बुद्धीमत्ता साधारण असते. अधिकारयोग मिळत नाहीत. विशाखा नक्षत्री चंद्र असता जरा आडवा परंतु प्रमाणशीर बांधा, देखणा पण रागीट चेहरा, विद्या व बुद्धी कमी, गूढ व दुष्ट मनाचा. थोडा द्वेषी, चैनी, खर्चिक व उधळ्या असतो. छानछोकीकडे जास्त लक्ष असते.
विशाखा नक्षत्री मंगळ असता सडसडीत, उंच चपळ असतो. मंगळ मेडिकल लाईनचे शिक्षण किंवा सायन्सला बरा. औषधी वस्तूंचा व्यापार अथवा औषधी वस्तूंच्या दुकानात अथवा कारखान्यात नोकरी मिळेल. अपघात व वारंवार संकटे भोगणारा.
विशाखा नक्षत्री बुध असता शरीरप्रकृती व बुद्धीच्या दृष्टीने बरा असतो. बुद्धी तीष्ण, खोल व कुशाग्र असते. बांधा जरा आडवा पण चपळ व भरलेला असतो. मात्र स्वभावाने हे जातक खलबुद्धी, स्वार्थी, थोडे कुमार्गी व अतिव्यवहारी असू शकतात.
विशाखा नक्षत्री गुरु बुद्धी व विद्येच्या दृष्टीने अनुकूल असतो, पण शरीरप्रकृती व धनाच्या दृष्टीने फारसा अनुकूल नसतो. गुण चांगले पण नशीब प्रतिकूल असते. बांधा उंच, सडपातळ पण जरा नाजूक व अशक्त असतो. पचनशक्ती व रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. दम लागणे किंवा रक्तदाबाचे विकार लवकर होतात. शिक्षक, प्रोफेसर, वकील या शिक्षणाला हा गुरु उत्तम, मात्र त्यांना गुणवत्तेप्रमाणे नोकरीत यश मिळत नाही.
विशाखा नक्षत्री शुक्र प्रमाणशीर व देह व बांधा देतो. मात्र चेहऱ्यावर शुक्राचे सौंदर्य, मोहकपणा अथवा आकर्षकपणा कमी आढळतो. शुक्राच्या शुभ गुणधमपिक्षा अशुभ गुण जास्त दिसून येतो. बुद्धी, विद्या व कला साधारण असतात. व्यवस्थितपणा, नीटनीटकेपणा, टापटीप कमी असून स्वच्छंदी, चैनी, खर्चिक, उधळ्या, विलासी व रंगेल असू शकतो. बिघडलेला असता अविचारी, व्यसनी, वाईट वासनेचा, स्त्री लंपट, स्वच्छंदी व अनीतीच्या मार्गाने जाणारा व त्यामुळे शरीरप्रकृती रोगी व खराब करून घेणारा आढळतो. विशाखा नक्षत्री शनि असता हाडापेराने मजबूत पण हाडाळ, जरा वेडावाकडा बांधा, चेहरा उदास, गंभीर व प्रौढ दिसणारा असतो. स्वभाव कुजका, द्वेषी, कपटी दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानणारा, स्वार्थी, अविचारी, कंजूष, लोभी व गूढविद्येची (पिशाच्च) आवड असणारा असतो. बुद्धीमान, विद्वान व शिकलेला असला तरी त्याचा फार फायदा कमी होतो.
विशाखा नक्षत्री राहू शरीरप्रकृती व बुद्धीमत्ता यांच्या दृष्टीने उत्तम असतो. मात्र अतिसाहसी, धाडसी व जरा पापी वृत्तीचा, चैन, मजा, देहसौख्य, ख्याली- खुशाली यांचेकडे ओढ असू शकतो. बिघडलेला असता तर गुन्हेगारीच्या मार्गाने अथवा अनैतिक धंदे करून द्रव्य मिळविण्याकडे प्रवृत्ती असते. विषारी प्राणी दंशाची भीती असते.
विशाखा नक्षत्री केतू हा फक्त दैविक, आध्यात्मिकदृष्ट्या बरा असतो. शरीरप्रकृती किंवा बुद्धीमत्ता यांच्या दृष्टीने साधारण.
विशाखा नक्षत्री हर्षल असता सडपातळ उंच बांध्याचा, बुद्धीमान पण विलक्षण डोक्याचा असतो. बुद्धी विधायक कायपिक्षा विध्वंसक मार्गाकडे वळू शकते. वागणे विक्षिप्त, लहरी व स्वैर असते.
विशाखा नक्षत्री नेपच्यूनही फारसा अनुकूल नसतो. शरीरप्रकृती मध्यम असून त्या मानाने नेहमी उदास व नैराश्यवादी दिसतात. गूढ रोग होतात.
विशाखा नक्षत्री होणारे रोग फारसे दाहक नसले, तरी बरेच रेंगाळणारे, चिकट व त्रास देणारे असतात. मूत्रपिंडाचे विकार, रक्तदाबाचे विकार, त्वचेचे विकार, रक्तदोष, पित्त, विषबाधा तसेच कंबर दुखणे, लघवीचे विकार, ओकाऱ्या, मळमळणे, मंगळ बिघडलेला असता गुप्तरोग, कावीळ, कापणे, भाजणे, खरचटणे अशा रोगांपासून भीती असते. स्त्रियांच्या कुंडलीत शुक्र बिघडलेला असता चक्कर, भोवळ व दम लागतो.
या नक्षत्राला शाखाहीन नक्षत्र असेही म्हणतात. म्हणून या नक्षत्रात गुरु किंवा शनि असता संतती होण्यात खूप अडचणी येण्याचा संभव असतो.
विशाखा नक्षत्री हस्ताक्षर वेडेवाकडे, तिरके, गचाळ व अव्यवस्थित आढळते. धावत्या लिपीत लिहिण्याची आवड असते. नक्षत्रावर ३ किंवा ६ अंकाचा प्रभाव वाढतो. गुरुचा पुष्कराज लाभदायक वाटतो. अंधलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती पूर्वेला लवकर सापडू शकते. हे नक्षत्र राक्षसगणी असल्याने मुहूर्तशास्त्रात शुभकार्यासाठी फारसे महत्त्वाचे नाही. हे अधोमुखी नक्षत्र विहिर खणण्यास आरंभ करणे, पुरलेले धन काढणे, जमीन नांगरणे, बी पेरणे, द्यूत खेळणे, राज्याभिषेक, बागाईत करणे, अग्निहोमादी क्रिया, दत्तक पुत्र घेणे या गोष्टींना चांगले.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) संपर्क : 7058115947 (सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
विषय : दग्ध राशी आणि पंचांगातील २७ नक्षत्र योग विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : ज्योतिष सिद्धांत सार, ज्योतीर्मयुख
नमस्कार,
हिंदू परिवारात पंचांगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. ‘पंचांग’ जे ‘पाच अंगे’ म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांची माहिती देते. विवाह, उपनयनम, गृहप्रवेश इत्यादी महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी शुभ काळ मुहूर्त निश्चित करण्यासाठी सामान्यत: तिथी आणि वार हे गृहीत धरले जातात. नक्षत्र हा कुंडलीचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि भविष्य कथनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जन्मकुंडलीचे विश्लेषण करताना तिथी, वार, योग आणि करण यांचा क्वचितच विचार केला जातो. पण तिथी आणि योगाचे योग्य मूल्यमापन केल्यास ती फार उपयुक्त साधने बनू शकतात.
उदा. ज्या तिथीस आपला जन्म होतो, त्या तिथीनुसार काही राशी त्या जातकास निष्फळ अथवा निरुपयोगी ठरतात. त्यांना ‘दग्धा’ किंवा जळालेली रास म्हणतात.
आपल्या माहितीसाठी जन्म तिथी व त्यास अनुसरून दग्ध राशी देत आहे.
तिथी व दग्ध राशी
१. प्रतिपदा : दग्ध राशी तूळ आणि मकर
२. द्वितीया : दग्ध राशी धनु आणि मीन
३. तृतीया : दग्ध राशी सिंह आणि मकर
४. चतुर्थी : दग्ध राशी वृषभ आणि कुंभ
५. पंचमी : दग्ध राशी मिथुन आणि कन्या
६. षष्ठी : दग्ध राशी मेष आणि मकर
७. सप्तमी : दग्ध राशी कर्क आणि धनु
८. अष्टमी : दग्ध राशी मिथुन आणि कन्या
९. नवमी : दग्ध राशी सिंह आणि वृश्चिक
१०. दशमी : दग्ध राशी सिंह आणि वृश्चिक
११. एकादशी : दग्ध राशी धनु आणि मीन
१२. द्वादशी : दग्ध राशी तूळ आणि मकर
१३. त्रयोदशी : दग्ध राशी वृषभ आणि सिंह
१४. चतुर्दशी : दग्ध राशी मीन, मिथुन आणि कन्या
१५. पौर्णिमा : दग्ध राशी नाही
१६. अमावस्या : दग्ध राशी नाही
पारंपारिक ज्योतिष शास्त्रात २७ नक्षत्रांसाठी २७ योग सांगितलेले आहेत.
सूर्य रोज जवळपास ५९ कला एवढे अंतर पार करतो, तर चंद्र रोज ७९० कला एवढे अंतर पार करतो. योग म्हणजे चंद्र सूर्याच्या राशी-अंश-कला-विकालात्मक स्पष्ट भोगांची बेरीज. प्रत्येक ८०० कला इतक्या बेरेजेचा एक योग होतो. असे सत्तावीस योग आहेत. पहिला योग विष्कंभ आहे. पंचांगात योगाची समाप्तीची वेळ दिलेली असते. नक्षत्र व योगाची सुद्धा वृद्धी व क्षय होतो. वैधृती व व्यतिपात हे दोन योग शुभकार्यास वाईट समजले जातात. या योगावर जन्म झाल्यास शांती करावी असे सांगितले जाते.
कांही योग असे आहेत कीं, त्यांच्या आरंभापासून कांही घटिकांपर्यंत त्यांचा दोष असतो.
विष्कंभ आणि वज्र या योगांचा दोष आरंभापासून तीन घटिकांपर्यंत असतो.
परिधयोगाचा पूर्वार्ध संपेपर्यंत,
शूल योगाचा पहिल्या पांच घटिकांपर्यंत,
व्याघातयोगाचा नऊ घटिकांपर्यंत
गंड आणि अतिगंड योगांचा पहिल्या सहा घटिकांपर्यंत दोष असतो.
म्हणून तेवढ्या घटिका सोडून त्या त्या योगांवर शुभकार्ये करण्यास कांही हरकत नाहीं.
प्रत्येक योग विशिष्ट व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांशी संबंधित असतो जो त्या विशिष्ट योगाच्या अंतर्गत जन्मलेल्या व्यक्तीमध्ये आढळण्याची शक्यता असते. ज्या नक्षत्रावर हा योग होतो, त्या नक्षत्राच्या उडू दशेत हे फळ प्रकर्षाने जाणवते. २७ योग व फळे खालीलप्रमाणे आहेत.
१. विष्कंभ योग : योग फळ – इतरांवर विजय प्राप्ती व समृद्धी आणि संपत्तीचे वरदान आहे.
२. प्रीती योग : योग फळ – सर्वांचा प्रिय आहे, विभिन्न लिंगी लोकांना आकर्षित करणारा
३. आयुष्मान योग : योग फळ – चांगले दीर्घायुष्य आणि आरोग्य
४. सौभाग्य योग : योग फळ – सुख आणि सुखसोयींनी आशीर्वादित
५. शोभन योग : योग फळ – कामुक, लैंगिक मानसिकता
६. अतिगंड योग : योग फळ – खूनशी स्वभाव, अडथळे आणि अपघातांचा सामना करावा लागणे
७. सुकर्म योग : योग फळ – चांगली आणि उदात्त कृत्ये करणे, श्रीमंती
लहानपणी सर्वात प्रथम काय शिकवले जाते तर अक्षर ओळख. आज आपण अक्षराचे मूळ स्वरूपाचा बोध घेणार आहोत. अक्षरामध्ये अवघे ब्रह्म व देवदेवता वसलेली आहेत, हे पाहणार आहोत. अ क्षर म्हणजे कधी ही नष्ट न पावणारे ते परम तत्व.
सोळा स्वर छत्तीस व्यंजने मिळून बावन्न अक्षरे तयार होतात. या बावन्न अक्षरांना बावन्न मातृका असे म्हटले जाते. बावन्न मातृका संपूर्ण मंत्र शास्त्राचे मूळ आहे. या आपल्या मुखामध्ये असणारे वायू योग्य प्रकारे वळविल्यानंतरच या बावन्न मातृकांचा उच्चार करता येतो. आमच्या बालपणामध्ये लृ या अक्षराचा उच्चार कसा करायचा हे आम्हाला शिकविले गेले नाही व आजकालच्या मुलांना ङ या अक्षराचा उच्चार करता येत नाही. तसेच ञ या अक्षराचाही उच्चार करता येत नाही.
शरीरातील वायुला योग्य प्रकारे वळवून स्वरयंत्राद्वारे बाहेर आणल्यानंतरच मातृकांचा योग्य प्रकारे उच्चार होतो. आमच्या अक्षरांचे आकारही विशिष्ट पद्धतीने ठरविण्यात आलेले आहेत.
उदा. ऐं हे सरस्वती बीज आहे. मोर हे सरस्वतीचे वाहन आहे व ऐं हा आकार मोरासारखा आहे.
लं हे पृथ्वीतत्त्वाचे बीज आहे. मनुष्य मांडी घालून बसल्यानंतर त्या मांडीचा आकार या लं प्रमाणे होतो.
ॐ हे ब्रह्मा, विष्णू, महेश व सर्व देवी-देवता यांचे मूळ आहे. आपल्या शरीराचे जाणीवपूर्वक निरीक्षण केल्यास बऱ्याच ठिकाणी ॐ चा आकार दिसून येईल व ॐ हे सर्व देवी-देवतांचे आदिबीज असे का म्हटले जाते हे लक्षात येईल. राम म्हणाल्याने राम प्रसन्न होईल विष्णू म्हणाल्याने विष्णू प्रसन्न होईल. शिव म्हणाल्याने शिव प्रसन्न होईल. ॐ म्हणाल्याने सर्वच देवता एकदम प्रसन्न होतील. परंतु ही ॐ कार साधना प्रारब्धशुद्धी पूर्ण झाल्याशिवाय प्राप्त होत नाही. दुष्प्रवृत्तींचा समूळ नाश झाल्याशिवाय ॐ कार साधनेचे रहस्य प्राप्त होत नाही. म्हणून प्रत्येक मंत्राच्या अगोदर ॐ लावावा असे सांगितले जाते. यात उद्देश असा की कुठल्या ना कुठल्या रूपाने ॐचे उच्चारण होत राहावे म्हणजे एक ना एक दिवस खऱ्या ॐ चा लाभ होईल.
मातृकांच्या वरती अनुस्वार दिला की त्या मातृकेला शक्ती रूप प्राप्त होते उदाः र हे अक्षर आहे. तर रं हे अग्निबीज आहे. या अग्निबीजाचा जप केला असता अग्नी निर्माण करता येतो. या करिता हे बीज सिद्ध करावे लागते. या बीजमंत्राच्या जपाने सूक्ष्मदेह शुद्ध होतो. जे लोक खूपच अपवित्र असतात दुष्ट विचारांनी भरलेले असतात त्यांनी या बीजाक्षराचा जप केला असता त्यांच्या अंगाची आग होऊ लागते व जवळ जवळ सर्व समाजच अशुद्ध व दुष्ट विचारांनी भरलेला असल्याकारणाने रं या बीजमंत्राला सौम्य करून त्याचे राम या नाममंत्रात रूपांतर करण्यात आले व रामनाम समाजाला दिले गेले
अशा प्रकारे प्रत्येक अक्षरामध्ये प्रचंड शक्ती दडलेली आहे. जप करून या शक्तीला स्वतःच्या अंगात निर्माण करावी लागते. प्रत्येक बीजाक्षराची एक एक देवता असून या देवता विशिष्ट प्रकारच्या मर्यादित सामर्थ्याने युक्त असतात. दोन अक्षरे एकत्र जोडल्यानंतर आणखी एक वेगळ्याच प्रकारची शक्ती निर्माण होते. ही शक्ती एक अक्षरी बीजापेक्षा जास्त शक्तिशाली असते.
उदा. हीं हे भुवनेश्वरी बीज असून या बीजाक्षराच्या जपाने ज्ञान व सामर्थ्य प्राप्त होते. शिव, विष्णू व भुवनेश्वरी देवी अशा तीनही देवता या एकाच बीजाक्षरात राहतात.
श्रीं हे महालक्ष्मीचे बीज असून या बीजमंत्राच्या जपाने महालक्ष्मीची प्रसन्नता प्राप्त होते.
क्लीं हे काली बीज आहे. या बीजाक्षराच्या जपाने अनेक विद्या प्राप्त होतात. क्लीं या बीजाचे सौम्य रूपांतर कृष्ण असे केले गेले व सामान्य लोकांना कृष्णभक्ती करण्यास सांगितले गेले.
गं हे गणपतीचे बीज आहे
द्राम् हे दत्तात्रेयांचे बीज आहे..
छोट्याशा बीजाक्षरामध्ये अद्भुत सामर्थ्य असते. बीजाक्षरे व त्याचा परिणाम यांचा अभ्यास करून दोन-दोन, तीन-तीन बीजाक्षरे एकत्र करून साधक जप करतात व अद्भुत सामर्थ्य प्राप्त करतात. काही काही मंत्रांमध्ये तर दहा-दहा, वीस-वीस बीजाक्षरे असतात व प्रत्येक बीज शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य तयार करते.
ऐं ह्रीं श्रीं या बीजाक्षरांमध्ये सरस्वती, भुवनेश्वरी व लक्ष्मी अशा तीन देवतांचे तेज आहे.
ऐं ॐ ऐं या मंत्रामध्ये सरस्वतीचे तेज असून, या मंत्राच्या जपाने बुद्धी तेजस्वी होते.
ऐं क्लीं सौः हा बाला त्रिपूरा देवीचा मंत्र असून, या मंत्राच्या जपाने समृद्धी व सफलता प्राप्त होते.
ऐं ह्रीं श्रीं क्लीं या मंत्रामध्ये चार देवतांचे तेज असून, या मंत्राच्या जपाने आर्थिक सुबत्ता प्राप्त होते.
ॐ द्राम् ॐ हा दत्तात्रेयांचा बीज मंत्र असून, या मंत्राच्य जपाने दत्तात्रेयांची कृपा प्राप्त होते. तसेच योगातील रहस्यांचे ज्ञान प्राप्त होते व संकटे दूर होतात, तेजस्विता प्राप्त होते.
अपवित्र, स्वार्थी किंवा संकुचित बुद्धीच्या साधका बीजाक्षरांचा जप केला असता त्याला खूप त्रास होतो. बीजाक्षरांच जप करणारा साधक नि:स्वार्थ बुद्धीचा, परोपकारी व मोठ्य मनाचा असावा लागतो. तरच बीजाक्षरांमध्ये असलेली शक्ती त ग्रहण करू शकतो.
एक अपात्र साधक एका बीजाक्षराचा अखंड जप कर असे. त्याचे मन अशुद्ध होते. २५-३० लाख जप झाल्यानंतर त्याला जिकडे-तिकडे आगीचे लोळ दिसू लागले. आकाश लाल दिसू लागले व त्याला पराकोटीची भीती वाटू लागली व त्याने मंत्रजप करणे सोडून दिले. असे प्रकार घडू नयेत म्हणून बीजाक्षराच्या जोडीला देवतेच्या नावाचे संपुट लावून जप करणे चांगले असते.
उदा. ॐ द्राम् दत्तात्रेयाय नमः
ॐ ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा
ॐ दुम् दुर्गायै नमः
ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः
ॐ ऐं सरस्वत्यै नमः
ॐ नहीं भुवनेश्वरी नमः
अशा प्रकारे देवतांच्या नावाने संपुट लावून व शेवटी नमः किंवा स्वाहा पल्लव लाविले असता बीजमंत्राचे तेज सौम्य व सुखकर होते. याशिवाय देवतेची कृपा होते. परंतु काही माणसे अशा जपातील तेजही ग्रहण करू शकत नाहीत. अशा लोकांनी फक्त नाममंत्राचा जप करावा. नाम जपाने कसलेही नुकसान होत नाही. चित्त शुद्ध होते. मन बलवान होते. अंगी सात्त्विकता वाढू लागते, सद्गुण निर्माण होतात व मंत्रजप करण्याची योग्यता प्राप्त होते.
श्री दत्त जय दत्त,
ॐ नमो नारायणाय,
ॐ दत्त दुर्गा ॐ
ॐ नम: शिवाय
अशा विविध नाममंत्रांनी परमेश्वराचे अखंड नामस्मरण केले असता अनेक वर्षांनंतर अंगी सात्त्विकता वाढू लागते. सद्प्रवृत्ती वाढू लागतात व साधना करण्याची पात्रता निर्माण होते.
अक्षर ब्रह्माच्या सहाय्याने असंख्य देव-देवतांची शक्ती आपल्यात निर्माण करता येते, इतकेच नव्हे तर असंख्य प्रकारच्या शस्त्रास्त्रांची निर्मितीही करता येते. उदा. अग्नी अस्त्र, पर्जन्य अस्त्र, ब्र्हमास्त्र ई. या अस्त्र विद्येच्या द्वारा प्रचंड संहार घडवून आणता येतो. एकंदरीत असे म्हणावे लागते, की अक्षरांनी काय होत नाही?
प्राचीन काळामध्ये मंत्राच्या सहाय्याने पाऊस पाडला जात असे. वादळे निर्माण केली जात असत, अग्नीचा वर्षाव केला जात असे, अशा प्रकारे विविध प्रकारच्या अस्त्रांची निर्मिती केवळ मंत्रांद्वारे केली जात असे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या विद्या अस्तित्वात होत्या. परंतु या विद्यांचा प्रचंड प्रमाणात दुरुपयोग झाल्या कारणाने या विद्या लोप पावल्या.
आजही असे साधक आहेत, की जे मंत्राने अग्नी निर्माण करतात, मंत्राने पाऊस पाडतात किंवा मंत्राने वादळे निर्माण करू शकतात,पण ते प्रसिद्धीपासून अलिप्त राहून एकांत स्थळी अखंड साधनेत मग्न असतात. अशा प्रकारे शब्द ब्रह्मामध्ये विविध प्रकारचे सामर्थ्य आहे. त्याचा सदुपयोग केला असता मनुष्य देव होऊ शकतो व दुरुपयोग केला असता माणसाचा राक्षस होतो.
सर्व देवतांचे व सर्व अक्षरांचे मूळ ॐ आहे. ॐ च्या ध्वनीमध्ये बावन्न मातृका सामावलेल्या आहेत. सर्व देव-देवता सामावलेल्या आहेत, सर्व विद्या सामावलेल्या आहेत, सर्व ज्ञान सामावलेले आहे, सर्व कला सामावलेल्या आहेत. फक्त या अक्षर ब्रह्माची साधना करण्याकरिता आवश्यक असणारी पवित्रता व योग्यता आपल्या अंगी असावी लागते. निःस्वार्थ बुद्धीच्या साधकांना ॐ काराच्या साधनेने कुंडलिनी जागृतीचा अनुभव येतो. षड्चक्रे जागृत होतात. विविध प्रकारचे ज्ञान होते. वातावरणातील देव-देवता व सिद्धपुरुष यांची दर्शने होतात, त्यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त होते. ध्यानामध्ये विविध प्रकारची दृश्ये दिसू लागतात. चिदाकाशात प्रवेश प्राप्त होतो. मरणाच्या चक्रातून सुटका होते. जन्म-अक्षर ब्रह्माच्या उपासनेने साधक जीवनमुक्त होतो, सिद्ध होतो, परमेश्वराशी एकरूप होतो. फक्त सद्बुद्धीने अक्षर ब्रह्माचा सदुपयोग करायला हवा. रावण, कुंभकर्णादी राक्षसांनी अक्षर ब्रह्माचा दुरुपयोग करून कुल संहार घडवून आणला होता. असे हे अक्षर ब्रह्म. सदुपयोग केला तर ब्रह्म पद प्राप्त करून देते व दुरुपयोग केला तर भ्रमात भरकटवीत राहते.
‘रं’ या मंत्रामध्ये अग्नी निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे त्याचा मानसिक जप केला असता सूक्ष्मशरीर शुद्ध होण्यास मदत होते.
फार पूर्वी अनेक लोकांनी रं या मंत्राचा जप करून अनेक शक्ती प्राप्त केल्या. कालांतराने मंत्रातील तेज व शक्ती ग्रहण करण्यासाठी जे मनोबल लागते ते मनोबल कमी झाले. माणसे मानसिकरीत्या दुर्बल होऊ लागली. माणसांची मने दुर्बल झाली. रं या बीजाक्षराची साधना केल्यानंतर माणसांना सगळीकडे अग्री ज्वाला दिसू लागल्या. यामुळे तात्कालीन ऋषींनी रं या बीजाक्षराचे रूपांतर राम असे केले व राम मंत्राचा जप करण्यास जनतेला सांगितले. अशा प्रकारे राम नामाचा प्रसार सर्वत्र झाला.
रं हे बीजाक्षर तेजतत्त्वाचे कारक आहे. या बीजाक्षराच्या जपाने तेजतत्त्व (अग्नी तत्व) सिद्ध होते. सूक्ष्म शरीर शुद्ध होते. प्रकाशमय मार्गात प्रवेश प्राप्त होतो. मेष, सिंह, धनु या राशीच्या लोकांनी रं हे बीजाक्षर असलेल्या नामाचा जप करावा. उदा. ॐ रं किंवा राम नामाचा जप. यांचा मार्ग योग हा मार्ग आहे.
लं हे बीजाक्षर पृथ्वीतत्त्वाचे द्योतक आहे. या बीजाक्षराचा जप केल्याने पृथ्वीतत्त्वातून आपतत्त्वाकडे जाणारा मार्ग मिळतो. वृषभ, कन्या मकर या राशीच्या लोकांनी लं हे बीजाक्षर असलेल्या नामाचा जप करावा. उदा. ॐ लं जय माई. यांचा मार्ग कर्म हा मार्ग आहे.
वं हे बीजाक्षर आपतत्त्वाचे (जलतत्व) कारक आहे. या बीजाक्षराचा जप केल्याने आपतत्त्वातून तेजतत्त्वाकडे जाण्याचा मार्ग मिळतो. मीन, वृश्चिक, कर्क या राशीच्या लोकांनी वं (गं) हे बीजाक्षर असलेल्या नामाचा जप करावा. उदा. ॐ वं (गं) गणपये नाम: . यांचा मार्ग ज्ञान हा मार्ग आहे.
यं हे बीजाक्षर वायुतत्त्वाचे कारक आहे. या बीजाक्षराच्या साधनेने विहंगम मार्गाचे ज्ञान होते. मिथुन, तुळ, कुंभ या राशीच्या लोकांनी लं हे बीजाक्षर असलेल्या नामाचा जप करावा. उदा. ॐ यं किंवा विठ्ठल नामाचा जप. यांचा मार्ग भक्ती हा मार्ग आहे.
‘है’ हे बीजाक्षर आकाशतत्त्वाचे कारक आहे. या बीजाक्षराच्या साधनेने आकाशतत्त्वाचे ज्ञान होते.
अशा प्रकारे शब्दसृष्टीमध्ये असंख्य बीजाक्षरे असून या बीजाक्षरांच्या अनुष्ठानाने विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त करता येते. विविध प्रकारच्या विद्या प्राप्त करता येतात. ज्याप्रमाणे विशिष्ट पद्धतीच्या बीजाक्षरांचा जप करून प्रकाशमय देवता प्रसन्न करता येतात, त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारच्या बीजाक्षरांचा जप करून भयानक अंधःकारमय विश्वातील भूत-भैरवांनाही प्रकट करता येते व त्यांचेकडूनही विविध प्रकारच्या विद्या प्राप्त करता येतात.
भूत, भैरव, शाकिनी, डाकिनी लवकर प्रकट होतात किंवा एक दोन दिवस साधना करून बळी दिल्याने एखादी विद्या देतात. यामुळे अंधःकारमय मार्गाच्या साधना करणारे साधक बरेच असतात. क्वचित एखादा साधक प्रकाशमय मार्गाने जातो व आपल्या सूक्ष्मदेहाला प्रकाशमय बनवितो. अंध:कारमय विश्वाची माहिती वाचकांना देणे योग्य नाही. म्हणून प्रकाशमय विश्वाचीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व अंध:कारमय विश्वाचा ओझरता उल्लेख केला आह्रे.
सगुण भक्ती, निर्गुण ब्रह्म, भक्तिमार्ग, योगमार्ग या सर्व गोष्टी प्रकाशमय विश्वात येतात. सद्गुणांचे आचरण, दान, नम्रता, परोपकार या गोष्टी प्रकाशमय मार्गात येतात. निःस्वार्थ प्रेम करणे, प्रेमाने वागणे व इतरांना मदत करणे हे प्रकाशमय मार्गात येते.
स्वार्थीपणा, कुढत राहण्याची प्रवृत्ती, संकुचित वृत्ती, ईर्षा, द्वेष, मत्सर करणे हे दुर्गुण म्हणजे अंध:कारमय विश्व. शब्द ब्रह्माचा म्हणजे नामजपाचा, मंत्रजपाचा आधार घेऊन आपण या अंधःकारमय विश्वाच्या पलीकडे जाऊ शकतो.
ऐं या बीजाक्षराचा जप केला असता सरस्वतीची प्रसन्नता प्राप्त होते व ज्ञान प्राप्त होते.
श्रीम् या बीजाक्षराचा जप केला असता महालक्ष्मीची प्रसन्नता प्राप्त होते.
न्हीम् या बीजाक्षराचा जप केला असता अनेक प्रकारचे ज्ञान होते, भुवनेश्वरी देवी प्रसन्न होते.
अशा प्रकारे शब्दसृष्टीमध्ये असंख्य बीजाक्षरे असून या बीजाक्षरांचा जप केला असता अनेक देवता प्रकट होतात व भक्तांना सन्मार्ग दाखवितात. हिंदू धर्मामध्ये प्रकाशयम मार्गातील देवता म्हणून गणेशापासून दत्तापर्यंत, सरस्वती पासून दुर्गापर्यंत अनेक देवी-देवता प्रसिद्ध आहेत. यापैकी कुठल्याही एखाद्या देवतेची आराधना करून प्रकाशमय मार्गाचे आपण अनुसरण करू शकतो.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) संपर्क : 7058115947 (सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
आज आपण स्वाती नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. स्वाती हे नक्षत्र चक्रातील १५ वे क्रमांकाचे नक्षत्र असून इंग्रजी नाव ‘आर्कटयूरस’ असे आहे. या नक्षत्रामध्ये एकच तारा असून तो सोन्यासारखा पिवळा, टपोरा, ठळक व व्याधासारखा अप्रतिम तेजस्वी आहे. काहींच्या मते याची आकृती प्रवाळासारखी आहे. पूर्व दिशेला उगवताना तर हे नक्षत्र मोठ्या चेंडूसारखे भासते. वैशाख महिन्यात ते रात्रभर आकाशात दिसते.
स्वाती या शब्दाचा अर्थच सु + अति स्वाती. जणू काही सुंदर सरोवरात विहार करणारा दुसरा हंस पक्षी होय. स्वाती याचा अर्थ खोल, खोलात शिरा, खोल संशोधन करा असाच आहे.
स्वाती हे नक्षत्र संपूर्ण तूळ राशीत असल्याने चतुष्पादी तीर्यड्मुखी चर, सुलोचनी व चल आहे. नक्षत्राचा स्वामी राहू, राशीस्वामी शुक्र व दैवत वायुदेवता आहे. नक्षत्राच्या ४ चरणांवर अनुक्रमे गुरु, शनि व शनि आणि गुरु यांचे स्वामित्व आहे. या नक्षत्रात वाऱ्याची अचाट बुद्धीमत्ता, राहूचा चाणाक्षपणा, धूर्तपणा व शुक्राची सौंदर्यदृष्टी व कला यांचा सुंदर संगम झालेला दिसतो.
कुंतीपुत्र महापराक्रमी भीमाचे हे नक्षत्र आहे.
स्वाती नक्षत्र देवनक्षत्र असून शुभ आहे व सत्त्वगुणी व नीतिमान आहे. स्वाती नक्षत्रावर जन्म झाल्यास जातक विद्वान, बुद्धीमान, गुणी, ईश्वरभक्त, सदाचारी, धार्मिक, विनयशील, आत्मसंयमी, व्यवहार कुशल, होशी, रसिक, आनंदी, कलाकुशल व उत्तम सौंदर्यदृष्टीयुक्त, पारखी, चैनी, उपभोगी पण विवेकी असतो. स्वाती नक्षत्र शरीरप्रकृती, सौंदर्य, लक्ष्मी, सरस्वती व कला या सर्वांनाच चांगले आहे. मात्र अधिकार योगाच्या दृष्टीने ते फारसे अनुकूल नाही. या नक्षत्र जातकांना निवड करणे, पारखून घेणे, तोलून मापून बघणे यांची फार सवय असते.
पुरुष व स्त्रिया या दोघांनाही हे नक्षत्र चांगले आहे.
स्वाती नक्षत्रावर जन्मणाऱ्या पुरुष जातकांचा बांधा उंच, सडपातळ, सुडौल, अवयव उंच पण थोडे गोल व भरीव, हातापायाची बोटे जरा लांब व जाड, कपाळ उंच, चेहरा उभट, नाक सरळ, डोके लांबट असते. चेहरा सुरेख पण जरा गंभीर व प्रौढ वाटतो. शारीरिक जीवन व रोगप्रतिकारक शक्ती बरी असते. हे जातक बुद्धीमान, हुशार, हौशी, रसिक, आनंदी, उपयोगी पण रजोगुणी आढळून येतात. वागण्यात समतोलपणा चांगला दिसून येतो. तशा आळशी नसून गतिमान व नेहमी काही उद्योगात व्यस्त असतात. स्वाती नक्षत्र बिघडल्यास या व्यक्ती स्वार्थी व कंजूष वृत्तीच्या होतात.
स्वाती स्त्री जातकांना हे नक्षत्र अनुकूल आहे. सौंदर्य, वात्सल्य, प्रेमभावना, कोमलपणा व संगोपन करण्याची वृत्ती हे गुणधर्म या नक्षत्रात विकसित झालेले आहेत. स्त्रियांना ते रूप, कला, गुण व लक्ष्मी आणि बुद्धी यांची खैरात करणारे आहे. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रिया उंच पण थोडे भारदस्त शरीर असणाऱ्या अवयव लांबट व गोल मात्र प्रमाणशीर, रेखीव, सुडौल असतात. कपाळ जरा गोल पण चेहरा उभट असतो. गाल फुगीर पण फार पुष्ट नसतात. नाक सरळ पण ठसठशीत, डोळे काळेभोर व टपोरे असतात. भुवया कोरीव असतात. चेहरा सुंदर, देखणा, पण थोडी उदासीनतेची झाक असणारा असतो. केस काळेभोर व लांब असतात. शरीर भरलेले असले तरी त्यांच्या हालचाली मात्र वाऱ्याप्रमाणे चपळ असतात. स्वभाव होशी, रसिक, उपभोगी, कलाकौशल्य व जगातील सर्व सुंदर वस्तू, चैन, आराम यांचा हव्यास असणाऱ्या असतात. त्यांना गायन, वादन, उंची कपडालत्ता, अलंकार, फुले, अत्तरे, सुगंधी पदार्थ यांची आवड असून राहणी नीटनेटके व व्यवस्थित असते. त्या आधुनिक विचाराच्या असल्या तरी अति फॅशनेबल नसतात. भडक रंगापेक्षा त्यांना आपल्या वर्णाशी व रंगाशी जुळणारेच कपडे आवडतात. मॅचिंग साडी व ब्लाऊजपेक्षा किंवा प्रिंटिंग वायल्सपेक्षा उंची व तलम साड्या व भरजरी शालूच जास्त प्रिय असतात. लांबसडक वेणी किंवा भरगच्च अंबाडे प्रिय असून त्यावर १-२ टपोरी फुले अथवा वेणी आवडते. तंग किंवा पुरुषी पोषाख फारसा आवडत नाही. रोहिणीप्रमाणे भरमसाट दागिन्यांनी मढण्यापेक्षा एखादी अंगठी किंवा नेकलेस त्यांना प्रिय असतो. वाहनांची फार हौस असते. स्वाती नक्षत्र स्त्री ही आधुनिक व सुधारक आहे. तेजस्वी असते, तसेच. चैनी, विलासी पण चपळ, तरतरीत व चुटचुटीत आहे. स्वातीला श्रीमंतीचा अभिमान असू शकतो. स्वाती स्त्री जातक कलावंत व कलाकुशल असू शकतात. स्वाती जातक स्त्रियांच्या कुंडलीत चंद्र व शुक्र असता या स्त्रिया चित्रकला, रंगकाम, विणकाम, रांगोळी काढणे, फुलांचे दागिने किंवा सुरेख वस्तू तयार करणे, कोरीव काम यांच्यात पारंगत असतात.
स्वाती नक्षत्राखाली बराचसा सघन, श्रीमंत व कलाकार वर्ग येतो. हे नक्षत्र सर्व प्रकारच्या व्यापाराला फार चांगले. या नक्षत्राखालील सर्व ठिकाणच्या घाऊक व्यापाऱ्याच्या जागा शेअरबाजार व ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैशाच्या उलाढाली होतात अशी ठिकाणे येतात. या नक्षत्राखाली धान्य, तेले, डाळी, कापड, सोने, चांदी, हिरे, माणके, सुगंधी पदार्थ व चैनीच्या वस्तूचे घाऊक व्यापारी, सिनेमा नाटके यात काम करणारा वर्ग, नट, नट्या, चित्रकार, पेंटर्स, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, शेअर बाजारातील दलाल, टी.व्ही., फ्रीज, मोटारी, रेडिओ, उंची फर्निचर यांचे व्यापारी, तसेच न्यायसंस्थेत काम करणारा वर्ग, न्यायाधीश, वकील बॅरिस्टर्स, अॅडव्होकेटस् किंवा मोठमोठ्या खाजगी कंपन्या, स्वायत्त मंडळे या ठिकाणी लठ्ठ पगारावर काम करणारा वर्ग ई. सर्वजण येतात.
या नक्षत्रामध्ये सर्व ग्रह निरनिराळे फलादेश देतात. कोणी शिक्षण, कोणी व्यापार, कोणी धन तर कोणी कला देतो.
स्वाती नक्षत्री रवि शरीरप्रकृती व गुणाच्या दृष्टीने साधारण असतो. सत्त्वगुणी, उदार व परोपकारी असतो. अधिकारयोगाच्या दृष्टीने अनुकूल असतो. मात्र विद्या व धनाच्या दृष्टीने मध्यम असतो.
स्वाती नक्षत्री चंद्र अनुकूल असतो. जातक सुंदर, आनंदी व देखणा असतो. विद्वत्ता व बुद्धीमत्ताही चांगली असते. रजोगुण जास्त दिसून येतात. तोलून बघण्याची वृत्ती फार आढळते.
स्वाती नक्षत्री मंगळ असता इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला चांगला. यांचा उंच, सडपातळ, सडसडीत असतो. धनाच्या दृष्टीनेही चांगला.
स्वाती नक्षत्री बुध उत्तम प्रकारची बुद्धीमत्ता देतो. गणित विषय चांगला, स्मरणशक्ती, पाठांतरशक्ती, ग्रहणशक्ती चांगली असते. हे जातक हुशार, चुटचुटीत, व्यवहार कुशल व तरतरीत असतात. शरीरप्रकृतीही उत्तम असते. थोडे बुटके पण चपळ असतात.
स्वाती नक्षत्री गुरु बुद्धी व विद्येच्या दृष्टीने अनुकूल असतो. हे जातक अतिशय हुशार, ज्ञानी, बुद्धीमान व विद्वान असतात. बुद्धी खोल, विचारी, संशोधक असून तुलनात्मक अभ्यासाची बरीच आवड असते. स्मरणशक्ती, पाठांतर, ग्रहण व आकलनशक्ती उत्तम असून त्या सर्व शास्त्रांत पारंगत असतात. शिक्षक व प्रोफेसर्स यांना हा गुरु बरा. धनाच्या दृष्टीनेही बरा. पण शरीरप्रकृतीच्या दृष्टीने मध्यम. सत्वगुणाचा पुतळा असतात.
स्वाती नक्षत्री शुक्र भाग्याचे होय. हे जातक गोंडस, सुडौल व सुंदर शरीर, चेहरा तेजस्वी, आकर्षक, मोहक व टवटवीत असतात. धन भरपूर मिळते व कला कौशल्य पारंगत असतात. शुक्र उंची व चैनीच्या वस्तूंच्या व्यापारास, सिनेमा, नाटकात काम करण्यास फारच अनुकूल असतो. हे जातक फार हौशी, विलासी, शौकीन, शृंगारी, चैनी व उपभोगी असतात.
स्वाती नक्षत्री शनि बुद्धी, विद्या व धनाच्या दृष्टीने चांगला. शरीरप्रकृतीही कणखर व सशक्त असते. हाडापेराने मजबूत, काटक व भारदस्त शरीर असते. जातक बुद्धीमान, संशोधक, चिकित्सक, चौकस, सखोल बुद्धी व विद्येसाठी बरेच कष्ट व श्रम घेणारे असतात. जातक उत्तम संशोधक, शास्त्र, कायदेपंडित, प्रबंध लिहिणारे असू शकतात. व्यापाऱ्याच्या कुंडलीत स्वाती नक्षत्री शनी असता कोणत्याही वस्तूंचे विशेषतः धान्य, तेले, कापूस, कपडे यांचे घाऊक व्यापारी, गिरण्यांचे व कारखान्यांचे मालक असतात. लक्षाधीश व कोट्याधीश होऊ शकतात. स्वभावाने मात्र या व्यक्ती अति कंजूष, अरसिक, चिकित्सक असतात. धन असूनही उपभोग घेण्याची वृत्ती नसते. धनसंचयाकडे विशेष लक्ष असते.
स्वाती नक्षत्री राहू अप्रतिम बुद्धी, संशोधन व कला यांना अनुकूल असतो. स्वनक्षत्र असल्याने तो बलवान असतो. पेंटिंग, ड्रॉइंग, फोटोग्राफी, आर्किटेक्ट, कोरीव काम यांना राहू चांगला असतो. शरीरप्रकृती व बांचा ऐटबाज व आकर्षक असतो.
स्वाती नक्षत्री हर्षलल असता बुद्धी, विद्या, उच्च शिक्षण, स्वतंत्र कर्तृत्व, हुशारी दाखवल्यास तो उत्तम असतो. या जातकामध्ये बुद्धी वैशिष्ट्य दिसून येते. संशोधन करणे, नावीन्यपूर्ण कल्पना, नवीन नवीन शोध लावणे यांना तो चांगला असतो. स्वाती नक्षत्री दशमात हर्षल असता हे जातक धडाडी, कार्यकुशलता व कर्तबगारी असून आपल्या अलौकिक बुद्धी व कार्याने आपली कारकीर्द उज्ज्वल करतात.
स्वाती नक्षत्रावर होणारे रोग फारसे दाहक किंवा क्रूर नसले तरी बराच काळ मुरणारे असतात. विशेषतः मूत्रपिंडाचे विकार (किडनी), लघवीचे विकार, कंबर दुखणे, गुरु अनिष्ट असता रक्ताभिसरण किंवा रक्तदाबाचे विकार. चंद्र शुक्र अनिष्ट असता मधुमेह, वाताधिक्य, सर्दी, कफ यांचा फार त्रास होतो. मंगळ- शुक्र युति असून ते अनिष्ट असता गुप्तरोग व चंद्र शनि युती असता दमा अथवा श्वासोच्छ्वासाच्या विकाराचा संभव असतो. कधी कधी ओकाऱ्या, मळमळ किवा काविळीपासूनही त्रास होऊ शकतो.
स्वाती हे राहूचे नक्षत्र असल्याने काही वेळा यात शनि, राहू, मंगळ असे ग्रह असता काळी विद्या, जादूटोणा, पिशाच्च विद्या, अघोरी विद्या यात यश देते.
स्वाती नक्षत्र सुलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास कितीही प्रयत्न केला, तरी ती परत मिळणे कठीण असते. वस्तू उत्तरेला गेलेली असते. या नक्षत्राचा भाग्यांक ६ किंवा ८ असतो. शुक्राचा हिरा किंवा शनीचा नीलमणी लाभदायक असतो, हस्ताक्षर अतिशय सुरेख, वळणदार, स्पष्ट व ठळक असते. विशेषतः व, ब, क अशा अक्षरातील गोलाकार वळण फारच सुंदर दिसते.
स्वाती नक्षत्र शुभ व देवगणी असल्याने मुहूर्तशास्त्रात या नक्षत्राचे महत्त्व फार आहे. यावर नांगर धरणे, बी पेरणे, सुगंधी पदाचांची झाडे लावणे, जनावरे घेणे, नवीन वाहन विकत घेणे व चालू करणे, नवीन वस्त्रे व अलंकार घालणे, विद्यारंभ, नवीन दुकान सुरू करणे, विहिरी खणणे, मौजी, बारसे, विवाह, गृहप्रवेश, वधू प्रवेश, औषध घेणे इत्यादी कार्यांना फारच चांगले.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) संपर्क : 7058115947 (सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
संदर्भ ग्रंथ : THEORY OF KARMA (श्री हीराभाई ठक्कर)
नमस्कार,
आज पहिल्या भागात आपण कर्म सिद्धांत, क्रियमाण कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म याविषयी जाणून घेतले. आज या विषयाचा पुढील टप्पा क्रमश: व थोडक्यात पाहणार आहोत.
धार्मिंकावर संकटे, तर अधार्मिकाची चंगळ :
कर्माचा अटळ सिद्धांत आहे की ‘जे पेराल ते उगवेल’ ‘जसे कराल तसे नीति- भराल.’ परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपण अनुभवतो, की न्याय-धर्माने वागणार्याला, आयुष्यात खूप दुःखे भोगावी लागतात, आणि अधर्म अनीतीने वागणारे काळाबाजार, तस्करी करणारे आयुष्यात मौज-मजा करत असतात. गाडी बंगला सर्व तरहेच्या सुखसोयी यांची दारी असतात..
हे सतत पाहिले की, देवावरील आपली श्रद्धा डळमळू लागते व कर्म सिद्धांत ही एक भ्रामक कल्पना आहे असे वाटू लागते. आपणही अनीति, अधर्माने पैसा मिळवण्यास प्रेरीत होतो. परंतु ही फार चुकीची समजूत आहे. नेहमी पुण्याचे फळ हे सुख व पापाचे फळ हे दुःख च असते. पाप करणारा माणूस आपल्याला सुख-समृद्धित वावरताना दिसतो, ते त्याच्या पापकर्माचे फळ नसून, त्यांने पूर्वी केलेली काही पुण्यकर्मे त्याच्या संचितात जमा असतात, ती आता पक्व होऊन त्याला सुख-रुपी फळें देत असतात. सध्यां तो करीत असलेली पापकर्मे, त्याच्या पूर्वपुण्याईचा जोर असल्याकारणे, फळ दिल्याविना त्याच्या संचितांत जमा होऊन राहातात, आणि पूर्वपुण्याईचा जोर ओसरतांच, प्रारब्ध बनून त्याच्या समोर उभी राहतात. पूर्वपूण्याईचा जोर असेपर्यंत पाप कर्मे आपला प्रभाव दाखवू शकत नाहीत.
संत कबीर म्हणतात :
कबीरा तेरा पुण्यका जब तक रहो भंडार । तब तक अवगुण माफ है करो गुनाहहजार ॥
या जन्मी न्याय-नीतिने वागणारी कित्येक माणसे दुःख-दारिद्र्यांने गांजलेली दिसतात, याचे कारण त्यांची पूर्वकृत दुष्कृत्यें आता आपला प्रभाव दाखवित असतात. त्यांची या जन्मातील सतकृत्ये कालांतराने या वा पुढील जन्मी त्याना सुख-समृद्धि देणारच यांत तिळमात्र शंका नाही, कारण कर्म- सिद्धांत हा अटळ आहे त्यामुळे कर्म-सिद्धांत कायद्यावर आपला पूर्ण विश्वास ठेवावा आणि निर्धारपूर्वक न्याय-नीतिचा खरेपणाचा राजमार्ग अंगीकारावा.
ग्रामीण भागांत लोकांच्या घरात धान्य साठविण्यासाठी मोठमोठाली कोठारें असतात. त्याना बळद अथवा बळत म्हणतात. ‘बळद’ म्हणजे भिंतीत धान्य साठविण्यासाठी मोठी पोकळ जागा ठेवतात. त्यांत वरील मजल्यावरुन साठवणीचे धान्य ओततात. बळदाच्या तळाशी, खालच्या मजल्यावर धान्य बाहेर काढण्या साठी एक गवाक्ष (छोटा दरवाजा) असते, त्यांतून जरूर पडेल, तेव्हा आवश्यक धान्य काढून घेतां येते. समजा एखाद्या शेतकर्याचें बळद उत्कृष्ट समजले जाणारे धान्य जे गहू (उत्कृष्ट कर्माने, पुण्याने) त्याने भरलेले आहे. आणि दुसरया एकाद्या शेतकारयाचे बळद हलक्या प्रतीचे समजल्या जाणारूया बाजरी अथवा नाचणीने (निकृष्ट कर्माने, पापकर्माने) भरलेले आहे नंतर पहिला शेतकरी, यंदा त्याने बाजरीचे पीक घेतल्याने, आपल्या बळदांत वरुन बाजरी ओतू लागला (हलके पापकर्म), तरी जेव्हा जेव्हा तो खालचा दरवाजा उघडून धान्य बाहेर काढील तेव्हा तेव्हा, जो पर्यंत आंतील गव्हाचा साठा (उत्कृष्ट संचित कर्म-पुण्यकर्म) समाप्त होत नाही तो पर्यंत (तो जरी वरच्या दरवाज्यांतून बाजरी सारखे हलक्या प्रतीचे धान्य (पापकर्म) ओतीत असला तरी) त्याला गव्हाचाच पुरवठा होत राहाणार.
या उलट ज्या दुसऱ्या शेतकऱ्याचें बळद नाचणीने (निकृष्ट संचिताने, पापकर्माने) भरलेले आहे पण यंदाचे हंगामात त्याने गव्हाचे पीक घेतले. आणि आतां तो बळदांत वरील बाजूने गहू साठवू लागला (उत्कृष्ट कर्म- पुण्यकर्म), तरी जोपर्यंत आंतील नाचणीचा साठा (निकृष्ट संचित – पापकर्म) संपत नाही, तो पर्यंत (जरी तो गहू साठवू लागला आहे), तरी जेव्हां जेव्हां तो बळदाचे खालचे द्वार उघडील. तेव्हा तेव्हा त्याला त्यातून नाचणीच मिळत राहाणार.
परंतु असा एक दिवस निश्चित उगवणार, की जेव्हा पाहिल्या शेतकरयाचा गहू- साठा (पुण्यकर्म) संपणार, व त्याला नंतर साठविलेली बाजरी खाण्याची वेळ येणार. या उलट त्याँ दुसऱ्या शेतकरयाची नाचणीही (पापकर्म-निकृष्ट कर्म) संपणार, व मग त्याला मागाहून साठविलेले गहू (उत्कृष्ट-पुण्यकर्म) खाण्याचे भाग्य प्राप्त होणार. फक्त असे होण्यास त्याला थोडा फार काळ धीर धरावा लागणार.
म्हणून परमेश्वरावरील दृढ श्रद्धा, व कर्म सिद्धांत तत्वावरील आपला विश्वास, किंचितही ढळू न देतां. प्रत्येक मनुष्याने, जरी त्याला दुःख, हाल-अपेष्टा भोगाव्या लागत असल्या, तरी नाउमेद न होतां त्यां सहन कराव्या, व न्यायनीतिच्या मार्गावरून न ढळता, अविरतपणे सत्कर्म करीत राहावें.
एकाद्यां बैंकेचा मेनेजर जरी आपला मित्र व नातलग असला, तरी आपल्या बँक खात्यात आपली काही जमा (संचित) नसेल, तर आपण पाठविलेल्या चेकवर, तो आपल्याला काहीही रक्कम देऊ शकणार नाही, उलपटपक्षी सदर बँक मेनेजरच्या शत्रूनेही जरी काही रकमेची चेकद्वारे मागणी केली व त्याचे खात्यांत पुरेशी रक्कम शिल्लक असेल, तर चेक प्रमाणे त्या इसमाला पैसे देण्याशिवाय मेनेजरला पर्याय नसेल. त्यामुळे प्रयत्नपूर्वक आपल्या ख्यात्यातील शिल्लक वाढविणे हेच श्रेयस्कर आहे. त्याच प्रमाणे आपल्या दुःखा बदल ईश्वराला दोष देण्यात शहाणपणा नाही, तर आपले संचित, सत्कर्म करून वाढविणे हेंच आपले कर्तव्य आहे. ते पंर पाडा मग पहा भगवंत तुमच्या हाकेला धाऊन येतो की नाही ?
कोणतेही कर्म फळ देऊनच शांत होतें :
समजा की एकाद्या माणसाने काही पापकर्म केले आहे, की ज्याच्या फलस्वरूप त्याला एक दिवस उपाशी राहाण्याचें प्रारब्ध तयार झालेले आहे. हे प्रारब्ध भोगल्या शिवाय त्याची त्यापासून मुक्तता होणार नाही, कारण कर्मकायद्यानुसार कोणाचीही फळ भोगल्यावाचून सुटका होत नाही.
आतां तो मनुष्य जर सत्वगुणी असेल, तर त्याला एकादशीचा उपवास करण्याची व सर्व दिवस देवाचे चिंतन करत व्यतित करण्याची बुद्धि होईल. अशा तर्हेने तो आपले प्रारब्ध भोगून संपविल.
तो जर रजोगुणी असेल तर एखादे दिवशी त्याची पत्नी वा मुले अचानक आजारी होतील, त्याना होस्पिटल मध्यरे किंवा दवाखान्यात घेऊन जाण्याची त्याच्यावर वेळ येईल तेथे दोन तीन तास खर्च झाल्याने, त्याला ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी, उपाशी पोटीच घरुन निघावे लागेल, नेमका त्याचदिवशी ऑफिस कँटीनमध्ये संप असेल. घरी परत आल्यावर, गृहपरिस्थिति अधिक बिघडल्याने त्याला रात्री उपाशीच झोपावे लागेल. अशा तरहेने धावपळ करीत त्याला आपले प्रारब्ध भोगून संपवावे लागेल.
समजा तो माणूस तमोगुणी असेल, तर अशी एखादी घटना नेमकी जेवणाचे वेळी घडेल, की राग अनावर होऊन तो पुढे वाढलेले ताट रागाने उडवून देईल, व उपाशी पोटींच कचेरीत जाईल. पोटांत अन्ना अभावी त्याचे डोकें अधिकच भडकेल, व आपल्या सहकारयांशी भांडण होऊन त्याला शांति मिळणार नाही. संध्याकाळी घरी आल्यावर, बायकोशी भांडून तिला मारझोड केल्याने ती रात्री जेवणच करणार नाही. अशा तर्हेने खूप मनस्ताप सोसून तो आपले उपाशी राहाण्याचे प्रारब्ध भोगून संपवील.
सत्वगुणी व्रत उपवास करुन शांत मनाने आपले प्रारब्ध संपवील, व तसे करताना ईश्वरचिंतनात त्याचा वेळ व्यतित झाल्याने, तो थोडीशी पुण्याई जोडील व त्याचे नवीन चांगले क्रियमाण निर्माण होईल
रजोगुणी जीव बायको मुलांची सेवा चाकरी आपले कर्तव्य म्हणून करीत, आपले उपोषणाचे प्रारब्ध संपविल व असे करताना, त्याचे कोणतेही नवे पाप-पुण्य निर्माण होणार नाही.
तमोगुणी जीव आपलें उपाशी राहाण्याचे प्रारब्ध स्वतःला व दुसऱ्याना त्रास देत भोगील. व असे करताना नवे वाईट क्रियमाण निर्माण करील, की जे एक दिवस त्याचे प्रारब्ध बनून, त्याला नवीन क्लेश यातना भोगाव्या लागतील
क्रियमाण कर्म पक्व होऊन प्रारब्ध रूपाने भोगल्या शिवाय कोणाचीही सुटका होत नाही, पण वरील उदाहरणाप्रमाणे सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी माणसांची ते भोगण्याची पद्धत भिन्न असते.
समजा एखाद्याचे ५०००० रुपये फायदा मिळण्याचे एखादे संचित आहे. त्याने काही जमीन ५ लाख रुपयांस विकण्याचे ठरवले आहे. एक दिवस एक गरजू माणूस त्याच्याकडे येऊन, ती जमीन घेणे गरजेचे व फायद्याचे असल्यामूळे, आपण होऊन साडेपाच लाख देऊ लागला. जर तो रजोगुण प्रधान असेल, तर आल्या संधीचा फायदा घेऊन साडेपाच लाखास व्यवहार करेल. व अशा रीतीने त्याचे प्रारब्धात असलेले ५०००० रुपये मिळवेल. असे करण्यात त्याचे काही नवीन क्रियमाण तयार होणार नाही. केवळ प्रारब्ध त्याला सुख भोग देऊन शांत होईल.
तो सत्वगुणप्रधान असेल, तर ५०००० रुपये अधिक घेण्याचे नाकारेल आणि सदर माणसाचा लाभ न उठवता, जमीन ५ लाख रूपयाना विकून व्यवहार पूर्ण करेल. या परिस्थितित, त्याचे ५०००० रुपये फायदा मिळण्याचे संचित संधीची वाट पहात फिरत राहील व सत्कर्माचे थोडे पुण्य फळ त्यात वाढेल.
तो तमोगुणप्रधान असेल, तर जास्तीत जास्त किंमत मिळवून देखील, जमिनीचा निकृष्ट भाग त्याच्या माथी मारण्याचा हेतू मनात बाळगेल व निंद्य मार्ग अवलंबिल्यामुळे, नवे पापरूप क्रियमाण निर्माण करेल.
अशा प्रकारे प्रारब्ध भोगण्याचे सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी माणसांचे भिन्न मार्ग असतात, पण प्रत्येकाला त्याचे प्रारब्ध भोगावेच लागते त्या शिवाय पूर्वीचे क्रियमाण समाप्त होत नाही.
सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी या तीन प्रकारच्या जीवांची क्रियमाण करण्याची कल्पना :
सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी या तीन प्रकारच्या जीवांची क्रियमाण करण्याची कल्पना पण वेगवेगळी असते :
(१) सत्वगुणी जीव म्हणतो, फळ मिळो वा न मिळो मी चांगले कर्म करीन.
(२) रजोगुणी जीव म्हणेल, मी कर्म करीन, पण मला त्यांचे फळ मिळालेच पाहिजे.
(३) तमोगुणी जीव म्हणेल, दामदुप्पट फळ मिळणार असेल तरच मी कर्म करीन.
सत्त्वगुणी जीवाला त्याच्या फळा बरोबर देणारयाच्या सदिच्छा व आशीर्वाद मिळतात.
रजोगुणी जीवाला त्याचे फळ मिळते, पण सदिच्छा मिळत नाही.
तमोगुणी जीवाला त्याचे फळ मिळते, पण गरजेचा फायदा घेण्याची त्याची वृत्ति पाहून देणारा मनातून नाराज होतो, तळतळाट देतो..
प्रारब्धांत असतें तेवढेच मिळतें :
क्रियमाण कर्मे जेवढी आणि ज्या प्रकारची कराल, तेवढेच आणि त्या जातीचेच प्रारब्ध तयार होते, आणि तेवढेच आणि त्या प्रकारचेच फळ तुम्हाला मिळते, त्यांत किंचिंतही कमी- जास्त होत नाही. जन्म घेतेवेळी, जेवढे संचित कर्म पक्व होऊन प्रारब्धांत रुपांतरित झालेले असते, तेवढेच भोगण्याला अनुरूप असा जन्म मिळतो. मिळणारे माता-पिता, स्त्री-पुरुष, कन्या नातलग, हे सर्व प्रारब्धानुसार प्रारब्ध भोगण्यापुरतेच मिळतात, त्यांचे तुमचे पूर्व ऋणानुबंध असेपर्यंतच ते लाभतात. प्रारब्धानुरूप उच्च, नीच कुळांत जन्म मिळतो, प्रारब्धानुसार सुख-सोई आयुष्यात लाभतात.
कोणत्या माता-पित्यांच्या उदरी जन्म घ्यायचा हे, आपल्या हातांत असतें, तर आपण प्रत्येकाने टाटा-बिर्ला ई. कुळांतच जन्म घेणे पसंत केले असते, की जेथे जन्म होतांच आपण पांच-पंचवीस बंगले, मोटारी, कारखाने यांचे धनी झालो असतो, पण अशी निवड करणे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. आपल्या प्रारब्धानुसार या जीवनात आपले संबंध घडतात. आपले स्त्री-पुत्रादि, नातलग आपल्या व त्यांच्या पूर्वकर्मानुसारच आपल्याला सुख-दुःख देतात, आपले व त्यांचे ऋणानुबंध असेतोपर्यंतच आपण एकत्र नांदतो. ऋणानुबंध संपले की आपण लाख प्रयत्न केले, तरी कौटुंबिक एकोपा राहू शकत नाही. या जन्मासाठी नेमलेले प्रारब्ध पूर्ण भोगल्याशिवाय आत्महत्याही यशस्वी होत नाहीं. आपण जीं जीं शुभ-अशुभ क्रियमाण कर्मे केलेली असतील, त्या अनुसारच आपले प्रारब्ध बनणार, आणि नेमके तेवढेव सुख-दुःखाचे भोग आपल्याला मिळू शकतात.
सतत वर्षभर चोवीस तास पाऊस पडला, तरी पळसाच्या झाडाला त्रिदळच तीन पानेच फुटणार, तेथे चौथे पान (चौदळ) उगवणारच नाही. वसंत ऋतूत सर्व झाडान नवी पालवी फुटते म्हणून बांबू ला पालवी फुटत नाही आणि न फूटली तर त्यांत वसंत ऋतूचा काय दोष ? सूर्योदयानंतर, सर्वत्र उजेड पडून सर्वाना दिसू लागते, पण घुबडाला दिसणे बंद होते, यांत सूर्यनारायणाचा काय दोष ?
तुमचे जे प्रारब्ध तयार झाले आहे, ते ललाट-लिखित विधाताही पुसू शकत नाही-पालटू शकत नाही. परमेश्वर हा केवळ कर्म-फलदाता आहे त्याचेही हात आपल्याला कर्म फळ देण्यात बांधलेले आहेत.
हिंदू धर्मात अशी एक समजूत आहे की, जन्मानंतर सहावे दिवशी सटवी (प्रारब्ध देवता) कपाळावर या जन्मीचे सुख-दुःखाचे भोग लिहीते. ही कल्पना खरी मानली, तरी एक गोष्ट निश्चित की, तुमचे पूर्व जन्म जन्मांतरातील जे क्रियमाण (संचित) कर्म या जन्मी भोगण्यास प्रारब्ध रुपाने पक्व झाले असेल, तेवढेच ही सटवी तुमचे कपाळी लिहु शकेल, कारण ती केवळ कर्मफळ दाती-देवता आहे.
तुमचे प्रारब्धांत जेवढा पैसा लिहीलेला असेल, तेवढाच पैसा कितीही खटपट लटपट केलीत तरी मिळेल. अधिक धन मिळविण्यासाठी तुम्ही कोणत्याही वाममार्गाचा अवलंब केलात, तरी ते मिळणार नाही. आणि मिळाले तरी अचानक या, ना, त्या मार्गे हातांतून निसटून जाईल, शिवाय कुमार्गाचा आसरा घेतल्याने अनिष्ट क्रियमाण निर्माण होईल ते निराळेच.
फक्त धनासाठी उगाच धावपळ करु नको, कारण केवळ धावपळ केल्याने पैसा मिळत नाही. पूर्वजन्मीचा क्रियमाण कर्मानुसारच या जन्मी सर्व सुख-दुःखे, भोग, एश्वर्य मिळणार.
तर मग माणसाने पुरुषार्थ करूच नये ?
कर्म-सिद्धांताच्या संदर्भात पुरुषार्थाचे स्थान बरोबर न समजल्याने कित्येक कट्टर प्रारब्धवादी असे मानतात की, माणसाला कोणताही पुरुषार्थ करण्याची जरुरीच नाही. जे प्रारब्धांत असेल ते घडणारच. परीक्षेत पास होण्याचे प्रारब्ध असेल, तर आपण पास होणारच व नसेल, तर कितीही अभ्यास केला तरी व्यर्थ. म्हणून अभ्यास करण्याची काहीही आवश्यकता नाही, असा विचार करुन सर्व प्रारब्धावर सोडून देतात. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असे म्हणून स्वस्थ बसतात.
प्रारब्धात असते, तेवढेच मिळते, तेंच घडते, ही गोष्ट निर्विवाद सत्य, पण प्रारब्ध व पुरुषार्थ यांतील सीमारेषा नेमकी कोठे याचा माणसाने विवेकयुक्त विचार केला पाहिजे. नोकरी मिळणे हे प्रारब्ध, पण नोकरीत व्यवस्थित काम करुन ती टिकविणे, बढती मिळविणे, हा पुरुषार्थ आहे. पैसा मिळणे हे प्रारब्ध, पण मिळालेल्या पैशाचा योग्य विनियोग करणे, हा पुरुषार्थ आहे. स्त्री-पुत्रादिक मिळणे हे प्रारब्ध, पण असेल त्या परिस्थितीत संसार नेटका करण्याचा प्रयत्न करणे हा पुरुषार्थ.
धन खूप मिळाले तरच माणूस सुखी होतो ही कल्पना बरोबर नाही. अघर्माने मिळविलेला पैसा हा शेवटी अनर्थकारकच होतो. वाममार्गाने मिळविलेल्या पैशाने, इतराना तो माणूस भले वैभवांत असलेला वाटो, पण तो मनांतून कधीच सुखी संतुष्ट नसतो. त्याला आंतरिक शांती, समाधान कधीच वाटत नाही. वाईट मार्गाने पैसा मिळविलेल्या माणसाची मुले बहुदा उधळी, व्यसनी निपजतात. जसे बीज तशी फळें.
पैसा असेल तर माणसाने त्या परिस्थितीचा लाभ घेवून, त्याचा विनियोग धर्ममार्गाकडे, समाजोपयोगी कार्याकडे करुन आत्मकल्याण साधणे हा त्याचा खरा पुरुषार्थ आहे. प्रारब्धस्वरूप आर्थिक स्थिति बेताची असेल, तर त्या परिस्थितीत सुद्धा मनाची शांती डळमळू न देता, समाधानाने वागून अध्यात्मिक आत्मोन्नति साधणे, यांत त्याचा खरा पुरुषार्थ आहे. कोणाचेही शिव्या शाप न घेता, थोड्याशा लाभासाठी सद्सद्विवेक बुद्धिने वागून जे प्राप्त झाले आहे, ते आपल्या लायकीहून अधिक आहे, अशी मनोभावना ठेवून, संतोषपूर्वक समाधानी आयुष्य व्यतीत करणे हा खरा पुरुषार्थ आहे.
माणसाला आयुष्यांत अनेक वस्तू प्राप्त करण्यांची इच्छा होते. धन स्त्री पुत्रादिक बंगला, मोटार, कीर्ति, दान, ध्यान, मोक्ष धर्म इत्यादि अनेक कामना तो उराशी बाळगून असतो. जीवनातल्या अशा सर्व प्रकाराच्या इच्छांचे आपल्या शास्त्रकारानी चार भाग पाडलेले आहेत.
(१) धर्म, (२) अर्थ, (३) काम (४) मोक्ष. उपरोक्त चार गोष्टी माणसाने जीवनात मिळविल्या पाहिजेत.
धर्माचे आचरण करुन माणसाने अर्थ प्राप्त करावा. धर्माने मिळविळेला अर्थ (पैसा) हा शेवटी अर्थकारकच ठरतो. धर्माने प्राप्त झालेल्या अर्थाचा योग्य उपयोग करुन, जीवनांतील सर्व कामनांची पूर्ती करुन, जीवात्म्याचे अंतिम ध्येय जें मोक्ष, ते प्राप्त करण्यांची आकांक्षा बाळगावी.
या चार पुरुषार्थी पैकी, धर्म व मोक्ष हे दोन प्राप्त करण्यासाठी माणसाने सतत प्रयत्न (पुरुषार्थ) करावा, ते कधी ही प्रारब्धावर सोडू नये. आपण नेमके उलट करतो अर्थ व काम यासाठी माणूस दिवस रात्र प्रयत्नशील असतो, व शेवटी पस्तावतो. अर्थ व काम या साठी जरूर यत्न करा, प्रण ते धर्माचा, नीतिचा राजमार्ग न सोडता, व मोक्षाची प्राप्ती करा.
प्रारब्ध व पुरुषार्थ परस्पर विरोधी नाहीत, पण एकमेकाना पूरक आहेत :
आज आपण जे क्रियमाण कर्म (पुरुषार्थ) करतो त्यातील बरेचसे संचितात जमा होऊन कालांतराने जेव्हां पक्व होतें, तेव्हां प्रारब्ध रूपाने आपणास भोगावयास लागते, आणि ते भोगण्यासाठी आपल्याला अनुरूप शरीर व परिस्थिती प्राप्त होते. आजचा पुरुषार्थच भविष्यकाळांत प्रारब्धात रूपांतरीत होतो. आजचा पुरुषार्थ हा जणू उद्याच्या आपल्या बंगल्याचा वा झोंपडीचा ‘ब्ल्यू प्रिंट’ (रूपरेखा) आहे.
म्हणजे वास्तविक पुरुषार्थ व प्रारब्ध या एकाच वस्तूच्या दोन अवस्था आहेत, आणि या दोहोंची कार्यक्षेत्रेच भिन्न असल्याने, त्यांचा एक दुसर्यार्शी विरोध ही नसतो. प्रारब्ध, शरीराला, त्याच्या चांगल्या वाईट रूपाप्रमाणे, भोग प्रदान करते, तर चालू आयुष्यांत केलेला पुरुषार्थ, कालांतराने प्रारब्धांत रूपांतरीत होऊन, भविष्य कालीन शरीराला चांगला वा वाईट भोग प्राप्त करून देतो. इंग्रजीतील “MAN IS THE ARCHITECT OF HIS OWN LIFE” ही म्हण हेच सूचित करते.
मनुष्य स्वत:चें उद्याचे प्रारब्ध, आजच्या आपल्या पुरुषार्थाने घडवत असतो. प्रारब्ध विरहित पुरुषार्थ पांगळा, तर पुरुषार्थ विरहित प्रारब्ध आंधळें.
आंधळा व पांगळा अशा दोन मित्रांच्या गोष्टीसारखे हे आहे. आंधळ्याला रस्ता दिसत नव्हता, तर पांगळ्याला चालतां येत नव्हते, त्यामुळे दोघेही विवश होते. पण दोघानी विवेकबुद्धिचा वापर केला. आंधळ्याच्या खांद्यावर बसून पांगळ्याने त्याला मार्ग दाखविला, व दोघानी आपली प्रवास यात्रा पुरी केली. आपल्या आयुष्याचा प्रवास सफल करण्यासाठी, प्रारब्ध आणि पुरुषार्थ एकमेकाना पूरक बनतात.
आपल्या प्रारब्धानुसार जीवनांत आपण सुख-दुःख अनुभवतो. दुसरे कोणीही आपल्या सुख-दुखाचे कारण असत नाहीत ते केवळ निमित्त मात्र असतात.
सुख-दुःखाचा कोणी न दाता । दुसरा देतो ही कुबुद्धि रेखा || ‘मी’ करतो हा वृथाभिमान । स्वकर्म-सूत्रे गुंफिले सर्व जन ॥
कर्म करण्यांत आपण स्वतंत्र फळ भोगण्यांत परतंत्र :
भगवद्गीतेतील सर्वपरिचित महावाक्य सांगतें :
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण फळ भोगण्यांत तुझा अधिकार नाही. कर्म करण्याचे कर्तव्य तू कर, पण अमूकच फळ मिळाले पाहिजे असा अट्टाहास करण्याचा तुझा अधिकार नाही. या महावाक्याचा अर्थ समजण्यात थोडी चूक होण्याचा संभव आहे. भगवंत असे सांगत नाहीत, की तू कर्म तर कर, पण फळाची कोणतीही आशा, अपेक्षा ठेवूच नको.
एकाद्यार्ने महिनाभर प्रामाणिकपणे मन लाऊन नोकरी केल्यावर, महिना अखेर तू पगाराची अपेक्षा ठेवू नकोस, पगार घेऊ नकोस असे सांगण्यासारखे हे होईल.
हमालाने स्टेशनात तुमचे सामान उचलून गाडींत ठेवल्यावर, जर तुम्ही त्याला सांगितलेत, की भगवद्गीतेत असे सांगितले आहे की सामान उचलून वाहाण्याची मेहनत करण्याचा तुझा अधिकार आहे त्याचे फळ (मजूरी) तू मागू नकोस, तो तुझा अधिकार नाही, तर तो तुम्हाला ठणकावून सांगेल की माझ्या मेहनतीचा योग्य मोबदला तुम्हाला दिलाच पाहिजे. गीतेचे ज्ञान तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, मला माझी मजूरी द्या. कर्म केले की काहीना काही फळ मिळणारच, फळ दिल्याशिवाय कर्म शांत होणारच नाही.
म्हणजे वरील गीतावचनाचा स्पष्ट अर्थ असा कीं, कर्म करणे वा न करणे हा तुमचा अधिकार आहे, पण एकदा कर्म केलेत की जे फळ मिळेल ते तुम्हाला भोगलेंच पाहिजे. कर्म करणे, न करणे, कसे करणे, कसे न करणे, शुद्ध बुद्धिचा उपयोग करून त्यांत प्रवृत्त होणे अगर न होणे, या गोष्टी तुमच्या अधिकारांत आहेत, पण एकदा कर्म केल्यावर फळ न भोगण्यात तुम्ही स्वतंत्र नाही. म्हणजे जे फळ मिळेल (चांगले वा वाईट) ते तुम्हाला भोगलेच पाहिजे त्यांतून तुमची सुटका नाही, त्यातून कोणतीही पळवाट तुम्हाला काढतां येणार नाही.
उदा. समजा तुम्ही एखाद्या समारंभांत जेवावयास गेला असता जेवताना कोणते पदार्थ किती प्रमाणात खायचे, हे कर्म करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बासुंदी बिलकूल सोसत नाही, पण तुम्ही बासुंदी अधिक आवडीने खात आहात, हे यजमानाच्या लक्षांत आल्यावर तो बासुंदी वाढून, अधिक घेण्याचा अगदीं प्रेमाने आग्रह करतो. आतां आपली पचनशक्ती लक्षांत घेऊन त्याच्या आग्रहाला बळी न पडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बासुंदी प्रमाणाबाहेर “न घेण्याचे कर्म” करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. परंतु आंतरिक वासनेला बळी पडून बासुंदी प्रमाणाबाहेर खाण्याचे कर्म तुम्ही एकदां केलेत (कीं जे न करण्याचाही तुमचा अधिकार होता), तर दुसऱ्या दिवशी पोट बिघडल्यावर तुमच्या कर्माची जी फळे येतील ती न भोगण्यात तुम्ही स्वतंत्र नाही तुम्हाला ती भोगलीच पाहिजेत. –
आज येथेच थांबतो. या पुढील विवेचन आपण पुढील भागांत पाहू.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) संपर्क : 7058115947 (सशुल्क कुंडली मार्गदर्शन)