Category: Uncategorized

मंगळ बुध त्यांच्या राशी व काही कुयोग


विषय : मंगळ बुध त्यांच्या राशी व काही कुयोग

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : असे ग्रह अशा राशी

नमस्कार,

विवाह हा एक संवेदनशील विषय आहे. त्यामुळे पालक मंडळी मुलगा मुलगी उपवर झाली की ज्योतिषाकडे धाव घेतात. गुणमेलन बघितले जातात. मांगलिक कुंडली आहे का तपासली जाते. वैवाहिक सौख्यकारक ग्रह शुक्र, मानसिकता दाखवणारा चंद्र कसा आहे पहिला जातो, संततीकारक गुरु ची स्थिती बघितली जाते. शुक्र मंगळ युती कुयोग, सप्तम स्थान ई. तपासले जाते. पण त्याच बरोबर बुद्धी कारक बुधाची स्थिती देखील तपासणे हे तितकेच महत्वाचे असते. अन्यथा काही वेळा फसवणुकीचे प्रसंग नशिबी येतात.

मध्यंतरी व.दा. भट सरांचे “असे ग्रह अशा राशी” हे पुस्तक वाचनात आले. त्यांची पुस्तके वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहते, ती म्हणजे, त्यांचा दांडगा व्यासंग, प्रचंड कुंडली संग्रह आणि, नेहमीच्या योगांचे पलीकडे जाऊन ग्रह स्थितीचा आणि त्यांच्या परिणामांचा मूळ तत्वे, कारकत्वे, स्वभाव यांचा मेळ घालून इतर ग्रह स्थिती तेच इंगित करत असेल तर त्याची सांगड घालून एखाद्या घटनेचे भाकीत करणे. कुंडलीवरून भविष्य सांगताना ज्या काही प्राथमिक गोष्टींचे ज्ञान असावे लागते, त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ग्रहाचे प्रत्येक राशीतून होणारे परिणाम, बारा राशींचे गुणधर्म व ग्रह कारकत्व चांगले समजलेले असेल, तर प्रत्येक ग्रह कोणकोणत्या राशीत कशी फले देईल याचा अंदाज करता येतो. असे असले तरी ग्रहांच्या शत्रू मित्रत्वाच्या संबंधाने ग्रहाला लाभणारी राशी त्याच्या शत्रूची किंवा मित्राची आहे, यावर त्याच्या कारकत्वाचा आविष्कार अवलंबून असतो. त्यांच्या पुस्तकातील एक एक परिच्छेद म्हणजे ज्योतिष खवय्याना खाद्याची जणू पर्वणीच.

व. दा. भट सर त्यांच्या अभ्यासात मंगळ, बुध, शुक्र, चंद्र ह्या ग्रहांची राशिगत स्थानगत स्थिती जास्त महत्वाची मानतात. शनि, गुरु, राहु वगैरे ग्रहांच्या परिणामांचा विचार ह्या लहान ग्रहांच्या सहकार्यांवर किंवा असहकारातून बघावा लागतो. कुंडलीतील कांही ग्रहांची कांही राशीं मधील स्थिती ही विशेष ठळक परिणाम करणारी असते. कुंडलीतील निर्णायक घटक मनाशी ठरवताना अशी एखादया ग्रहाची राशीगत स्थिती तुमच्या लक्षांत चटकन आली तर तुम्ही कांही उत्तम भाकीते उत्तम रीत्या करु शकता. “असे ग्रह अशा राशी” या पुस्तकात त्यांनी बुध, मंगळ व त्यांच्या राशी यांच्या काही स्थिती विषयी माहिती दिलेली आहे, जी इतर ग्रहांच्या पार्श्वभूमीवर जातकास अनिष्ट फलदायी ठरू शकते. आपल्या माहितीसाठी काही संक्षिप्त संकलित रुपात देण्याचा हा छोटासा प्रयत्न. ज्यांना जास्त उत्सुकता असेल त्यांनी जरूर हे पुस्तक आणून वाचावे. ज्यात असे अनेक योग, कुंडल्या दिल्या आह्र्त. जिज्ञासूंनी जरूर त्याचा अभ्यास करावा.

(१) कन्येचा मंगळ :

कन्या रास ही नैसर्गिक कालचक्र कुंडलीत षष्ट स्थान ची द्योतक आहे. ह्या राशीचे कांही महत्वाचे गुणधर्म आहेत. कन्या ही रास स्त्री रास आहे. निसर्गतः ही रास पुरुष राशिपेक्षा अशक्त आहे. षष्ठस्थानची निदर्शक असल्याने निसर्गतः ही रास रोग, रोगाशी-शारीरिक पीडा तसेच मानसिक क्लेश ह्या गोष्टींशी संबंधित आहे. कन्या राशीचा अंमल लहान आतडी, पचनसंस्था, अपचन विकार, पोटाच्या खालचा बेंबीजवळचा भाग ह्यावर आहे. कन्या राशीचे चिन्ह हातात भाताची लोंबी-कणिस घेतलेली स्त्री असे आहे. अन्न आणि कन्या रास ह्यांचा घनिष्ट संबंध आहे.

कन्या राशीचा अधिपति बुध आहे. बुद्धिमान रास आहे, ते परिणाम आपण नंतर पाहू. कन्या रास आणि पोट ह्या तत्वाची अनुभूति प्रथम पाहू. ही अनुभूति नाना तन्हेची असते हे प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे. पण पोटाचे आजार, विकार एवढ्या पुरतीच आपली कल्पना मर्यादित करू नका. त्याचे व्यापक स्वरूप प्रथम समजावून घ्या.

उदा. सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन ह्यांचे कुंभ लग्न व अष्टमात कन्या राशीत अनेक ग्रह. टेबलाचा कोपरा पोटाला लागून अपघात होऊन जीवावरचा प्रसंग येणे हा प्रकार कन्या रास आणि पोट ह्यांचे समीकरण योग्य आहे हेच दर्शवितो.

कांहीच्या डोक्याला मार लागला आहे त्यांच्या कुंडल्यात मेषेत रवि, मंगळ आढळून आले आहेत. ज्यांच्या कुंडल्यात कन्या राशीत पापग्रह आहेत, त्यांच्या पोटावरून वाहन गेल्याने मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. पोटदुखी, पोटाचे विकार, पोटावर ऑपरेशन, अॅमेबिक डिसेंट्री, पोटाचा आंतड्याचा कॅन्सर, क्षय ई. बहुतांशी कुंडल्यात कन्या राशीचा संबंध आढळून येतो..

मंगळाचे कारकत्व :

मंगळ हा ग्रह शारीरिक पीडा, क्लेश, आघात, अपघात, मार, जखम ई. दृष्ट्या पष्ठ स्थानाचा मूळातच कारक ग्रह आहे. कन्या रास ही नैसर्गिक कालचक्र कुंडलीत षष्ट स्थान ची द्योतक रास त्याच्या शत्रुची रास आहे. तेव्हा ह्या राशीत त्याचे परिणाम ठळकपणे दिसणारच.

मानसिक – दृष्ट्या कन्या मंगळ

मंगळ कन्या राशीत असणे हा जातकाची मानसिक जडण घडण जाणून घेण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचा परीणामकारक ग्रह ठरतो. कन्या ही रास मुळातच षष्ठस्थानची द्योतक, क्लिष्ट, द्विस्वभाव रास आहे. या राशीत मंगळासारखा शत्रू ग्रह असता स्वभावात भावनाशीलता, तसेच मनाची द्विधा अवस्था निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. संशयीवृत्ति तसेच संशोधक वृत्तिहि असते. इतर कुंडलीतील ग्रहमान मानसिकदृष्ट्या कमकुवतता निर्माण करणारे असेल, विशेषतः चंद्र बुध शुक्र हे भावनाबुद्धि ग्रह हर्षल नेपत्यून, शनि हा ग्रहांच्या प्रथम दर्जाच्या कुयोगांत असून मंगळ कन्या राशीचा असेल, तर मनोविकृति, भग्न व्यक्तिमत्व, मानसिक असंतुलन, नैराश्य हा गोष्टी देतो. अनेक  मानसिक रुग्णांच्या कुंडलीत हा योग आढळतो.

उदा. १. (मूळ पुस्तकातील पान क्र. ३८, कुंडली क्र.५३) एक अत्यंत हुशार २-३ पदव्या घेतलेले गृहस्थ, पण मनोरुग्ण. प्रेमसंबंधात अपयश, गृहत्याग. मिथुन लग्नाच्या या कुंडलीत चतुर्थात मंगळ नेपच्यून युती कन्या राशीत आहे. त्या बरोबर शुक्र हर्षल यूती लग्नी आहे. कन्या राशीत मंगळ असता तो ज्या दोन स्थानांचा भावेश होतो, त्यापैकी एक स्थानचा भावेश या दृष्टीनें तो हमखास एखादे अशुभ फल देतोच.

२. बालगंधर्व हयांच्या कुंडलीतहि मिथुनेचा शुक्र सप्तमांत व कन्येचा मंगळ दशमांत. दशमातील मंगळामुळे त्यांच्या जीवनांत अनेक चढ उतार जसे झाले, तसेच धनु लग्नास पंचमेश मंगळ या  कन्या राशिस्थ असल्याने त्यांना एक कन्या संतती झाली.

३. एका स्त्रीची जन्मतारीख १९-८-१९३१ धनु लग्न दशमांत कन्येचे मंगळ केतु युतीत. एक संतति अपंग.

४. तुळ लग्नाच्या कुंडलीत कन्येचा मंगळ व्ययांत हा एक जबरदस्त योग होतो. अशावेळी शुक्र किंवा सप्तमस्थान पापग्रह युक्त असेल तर वैवाहिक जीवनांत मोठे त्रास संभवतात. अत्यंत उशिरा विवाह होणे, पत्नीस मोठे आजार, वैधव्य, द्विभार्या योग अशी फलें मिळतात. अशा परिस्थितीत लग्नांत किंवा लाभ स्थानांत शनि असेल, तर अशी फले हमखास आढळतात. अशा जातकांना सांसारिक सुख लाभत नाही. कारक ग्रह शुक्र कितपत अनिष्ट त्याप्रमाणे फलाची तीव्रता अवलंबून असते. एका स्त्रीस तीस वयाच्या सुमारास वैधव्य आले.

कुंडलीत कोणत्याही एखादया घटनेसंबंधी अनेक ग्रहयोगांचा सहभाग असतो. येथे सप्तमेश मंगळ व्ययांत कन्या राशीत आहे. अनेक कुंडल्यांत असतो. केवळ पतिपत्नीची भांडणे हया पलीकडे कित्येक वेळा तो महत्वाचा नसतो, पण कारक ग्रह बिघडला की त्याची तीव्रता वाढते.

(२) वक्री बुध :

वक्री बुध हा असाच एक अति महत्त्वाचा योग व.दा. भट सर मानतात. बुध वक्री असेल तर, त्याच्या फलिताची व्याप्ती बऱ्याच प्रमाणांत निश्चित असते

१) एक बुधाच्या कारकत्वाच्या दृष्टीने कांही वैगुण्य आढळते.

उदा. बोलण्यांत दोष, मेंदूसंस्थेसंबंधी किंवा बुद्धिच्या दृष्टीने कांहीं चांगले अगर वाईट वैशिष्ट्य आढळते. वक्री बुध ज्या दोन स्थानाचा भावेश होतो, त्या दोन स्थानांपैकी एका स्थानासंबंधी निश्चित अशी कांहीतरी कटकटीची त्रासाची फळे मिळतात.

उदा. मिथुन, कन्या लग्न असेल व बुध कोठेहि वक्री अवस्थेत असेल, तर आरोग्याच्या दृष्टीने हमखास, कांहीं तरी त्रास जातकाला जीवनांत होतात. समजा बुध सप्तमेश होऊन वकी असेल तर विवाह ठरतांना अडचणी येतात. ठरलेला विवाह फिसकटणे, बरेच दिवस विवाह ठरून सुद्धा, केव्हा होईल हया बद्दल चिंता उद्भवणे, ऐनवेळी विवाहाची तारीख पुढे ढकलावयास लागणे, मानसिक गोंधळ, द्विधा मनःस्थिती होणे असे प्रकार आढळतात. सप्तमस्थान बिघडले असेल तर विवाह सुखाचा होत नाही. बुध वक्री असता अनेक वेळा मेंदूसंस्थेशी संबंधित आजार संभवतात.

२) जन्मदिवशी बुध स्तंभी अगदी गतिशून्य असणे हा तर एक अति शक्तीशाली योग असतो. तो ज्या स्थानाचा भावेश असेल, त्या स्थानासंबंधी एखादे अशुभ फल मिळते. कन्या व मिथुन लग्नास स्तंभी बुध मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने काही व्यथा, विकृती देण्याची शक्यता असते. लग्नेश हया दृष्टीने स्तंभी, वक्री बुधाला अति महत्त्व देऊन तो अभ्यासावा लागतो.

बुध मंगळामुळे त्वचा विकार, अॅलर्जिक त्रास, निद्रा नाश, तसेच मानसिक चिंता करण्याचा अभाव, प्रतियोग वक्री शनि वगैरेमुळे इतर फलेहि कुंडलीस मिळतात.

बुध जेव्हा शनि सारख्या ग्रहांबरोबर युतीत असतो, तेव्हा इतर पूरक योगात मानसिकदृष्ट्या कमकुवत करतो. मनावर ताबा राहात नाही. त्यातून मानसिक आजार, व्यसनाधिनता आढळते.

(३) मेष राशीतील बुध :

प्राचीन ज्योतिषांनी ग्रहाचे शत्रूमित्रत्व फार व्यवस्थित ठरवले आहे असे आढळून येते. बुध हया ग्रहाचा, मंगळ हा पहिल्या नंबरचा शत्रू ग्रह आहे. तेव्हा त्यांचे परिणाम हथा मंगळाच्या राशीत निश्चितच, ज्याला आपण विशेष उल्लेखनीय म्हणू असे आढळतात.

कोणत्याही ग्रहाची राशीगत स्थिती अभ्यासताना त्या राशीचे गुणधर्म विशेष विचारात घ्यावे लागतात आणि नंतर त्या राशीच्या अधिपतिचे गुणधर्म बघावे लागतात. मेषेचा बुध या  बाबतीत मेष ही चर रास आहे, आक्रमक रास आहे. तिचा निसर्गतः अंमल डोके हया भागावर आहे. तसेच बुध हया ग्रहाचा बुद्धि, मन, मज्जासंस्था, मेंदू, वाणी, जीभ, बोलणे, ग्रहणशक्ती, त्वचा, मामा हयाच्याशी संबंध आहे. मेष राशीचा अधिपति मंगळ आहे. तेव्हा आपण जेव्हा बुध मेषेत आहे असे म्हणतो तेव्हां बुध व मंगळ हयाचा संबंध अध्याहृत असतो. बुध हा शुक्राच्या राशीत असेल तेव्हा बुध-शुक्र नाते आलेच. म्हणजे त्या राशीतील बुधाचा कलात्मक दृष्टीकोण, बुद्धिचा कलेकडे ओढा वगैरे आपण मनात धरूनच भविष्यकथन करत असतो.

त्यामुळे बुध-मेष या स्थितीत मंगळाचे गुणधर्म निश्चितपणे आढळतात. मंगळ शक्तीदायक आहे. त्यामुळे असे लोक बुद्धिच्या दृष्टीने चंचल असले तरी चलाख असू शकतात. मंगळ हा ग्रह विघटन करणारा असल्याने मेषेच्या बुधाचे जातक हा दुसऱ्यांच्या दृष्टीने वादग्रस्त ठरतात. नको तेथे स्पष्टवक्तेपणा, चुकीची शब्दयोजना, वितंडवाद घालण्याची वृत्ती,

चटकन् विचार न करता मतप्रदर्शन करण्याचा स्वभाव. इत्यादीमुळे हे जातक इच्छा नसताही वादविवाद उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात. मंगळ हा टीका करणारा ग्रह आहे, तसेच लढाऊ आहे. त्यामुळे मेषेचा बुध असणारे जातक सर्वसाधारण दुसऱ्यावर टीका करण्यात,  कुरघोडी करण्यात स्वतःला धन्य समजतात.

मंगळाची दुसरी रास वृश्चिक आहे. पण मेषेत व वृश्चिकेत जमीन अस्मानाचे अंतर आविष्कारात आहे. वृश्चिक रास अंतस्थ आहे, तर मेष बर्हिगत आहे. मेष रास राग, मतभेद समोरासमोर व्यक्त करून मोकळे होतील तर वृश्चिक रासवाले तो आंत दाबतील, सूड उगवतील.

मेष डोक्यावर अमंल करते व बुधाचा संबंधही मेंदूवर आहे, मज्जासंस्थेवर आहे त्यामुळे मेंदू विकृति, मेंदूचे आजार, मॅनेजायटीस, ब्रेन हेमरेज, फिटस् डोकेदुखी असे प्रकार मेषेच्या बुधात आढळतात. (या संबंधीच्या कुंडल्या क्र. ७५ ते ८५ मूळ पुस्तकात अभ्यासण्या सारख्या  आहेत.) मुख्यतः मज्जातंतू, मज्जासंस्थे संबंधित तक्रारीतून निर्माण होणारे आजार, पोलिओ, अंपगत्व अशा योगांत आढळण्याची शक्यता जास्त असते.

चंद्र हा मनाचा कारक असला तरी बुध व शुक्र हथा ग्रहांचाही बुद्धि, भावना, मन, हया दृष्टीने परिणाम जबरदस्त असतो त्यामुळे मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने मेष-बुध हा योग मनावर ताण निर्माण करणारा असल्याने अभ्यासावा लागतो. असे जातक इतर कुयोगात मनोरुग्ण किंवा मानसिक दृष्ट्या काही विकृति निर्माण झालेले आढळतात. अत्यंत हट्टवादीपणा, चिडखोर, तिरस्कार, द्वेष, अंहकार परिस्थितीशी सामावून न घेण्याची वृत्ति हयामुळे मेष बुध असलेले जातक मानसिक तणावाखाली वावरत असतात. कित्येक वेळा कुंडलीत इतर कुयोग असता आत्महत्या, आत्मघातकी वृत्ति, अतिरेकी अविचारी कृत्ये अशा स्वरुपाची फलें मिळतात.

नुसता मेष राशीचा बुध हा अगदी वरील स्वरुपाची फळे देईलच असे नाही. साधारण अशा  बुधाबरोबर रवि शुक्र असण्याची शक्यता जास्त असते. नुसती रवि-बुध युति जातकास अत्यंत हुशार, चलाख, बुद्धिमान करते किंवा बुध-शुक्र युति सुद्धा. पण अशा परिस्थितीत बुध वक्री असता किंवा एखाद्या पापग्रहाशी बुधाचा कुयोग होत असता चित्र पूर्ण पालटते. असा बुध हर्षल, नेप., शनिच्या युति, केंद्र, प्रतियोगांत असता तो अत्यंत प्रतिकुल फले देतो.

मंगळाच्या राशीतील बुध हा त्वचाविकाराच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. अॅलर्जीमुळे ताचा विकार उद्भवणे, कोड उठणे वगैरे प्रकार आढळतात. हा शिवाय महत्वाचे म्हणजे बुध ज्या दोन स्थानांचा अधिपति होतो त्या दोन स्थानांचा भावेश हया दृष्टीने तो हमखास अशुभफलदायी झालेला आढळतो. एवढेच नव्हे तर बुध मेषेत असता त्याच्या मिथुन व कन्या राशीतील जे ग्रह असतात त्यांच्या फलितात काही उणिवा तो निर्माण करतो. त्या राशीतील ग्रहांचे जोरदार शुभ असे फल मिळत नाही.

मेषेत बुध असताना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या राशीचा अधिपति मंगळ कोणत्या राशीत आहे ते पाहून भविष्य वर्तवावे लागते. असा मंगळ नीच राशीत, दुःस्थानांत, शत्रू राशीत असेल तर अशावेळी मेष बुध अत्यंत प्रतिकुल फले देतो. सर्वसाधारण मंगळाच्या राशीचे लग्न असेल म्हणजे मेष किंवा वृश्चिक तर हा बुध जास्त तीव्र परिणाम देतो. मेषेत कृत्तिका नक्षत्रांत असणारा बुध जोरदार अशुभफलदायी होतो.

उदा. १) मूळ पुस्तकातील कुंडली क्र. ११२ श्री. जन्म दिनांक १३ एप्रिल १९४५. पोलीओ

मिथुन लग्न असलेल्या या व्यक्तीचे शिक्षण उत्तम झाले आहे. स्वतः डॉक्टर आहेत. रवि बुध शुक्र तिन्ही युतीतच आहेत. अशा वेळी रवि गुरुचा अनोन्य योग आहे. शुक्र पंचमेश स्वनंवमांशी आहे. शनि राहु लग्नी व लग्नेश बुध मेषेचा वक्री आहे. लग्नेश हया दृष्टीने वक्री बुधामुळे लहानपणी पोलीओ, त्यामुळे पायात दोष. मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग आहे. मंगळ कुंभेचा, रवि मीनेचा मीन नवमांशी आहे. मिथुन लग्नास बुध लग्नेश होतो. असा मेष राशीतील बुध शनि मंगळाने बिघडला तर तीव्र अशुभ परिणाम करतो.

२) मूळ पुस्तकातील कुंडली क्र ११३ श्री. ज. ता. २४ मे १९२४. मेंदूची वाढ झालेली नाही, वेडसर आहे. मिथुन लग्नाच्या या कुंडलीत बुध तीन दिवसापूर्वीच स्तंभीचा मार्गी झालेला आहे. चंद्र मंगळ युति मकरेत अष्टमांत आहे. चंद्र मंगळ युति बुध किंवा शुक्र बिघडले असता मतिमंदता निर्माण करताना दिसते. येथे बुध नुसता गतिहीन अवस्थेत नाही, तर त्याचा मंगळाशी केंद्र योग आहे. मेषेचा बुध, शनि मंगळ दृष्ट आहे. मंगळाचा शुक नेपच्यूनशी प्रतियोग आहे.

३) मेषेत बुध असतानाच मंगळ जर कर्क, मिथुन, कन्या राशीत असेल, किंवा अशावेळी किंवा चंद्रचा कुयोग असेल तर कुंडली मानसिक दृष्ट्या अत्यंत नाजूक होते. काही मनोविकृति असू शकतात. पुढील कुंडलीवरून असे योग कळून येतील.

(मूळ पुस्तकातील कुंडली क्र ११४ अभ्यासावी)

ज्या ज्योतिषांना ग्रहयोगावरुन भविष्य सांगण्याची कला अवगत असते, त्याना कुंडलीचा ढाचा  लगेच कळून येतो. काही कुंडल्या केवळ ग्रहयोगांच्या दृष्टीने बलवान असतात.

एका स्त्रीस मानसिक विकृती आहे. काही वेळा अगदी भूतबाधा झाल्यासारखी स्थिती होते. या कुंडलीत महत्त्वाचा योग म्हणजे चंद्र केतु युक्त आणि तो परत हर्षलच्या प्रतियोगांत चंद्र-हर्षल प्रतियोग असतानाच बुध मेष राशीत, मेष राशीचा अधिपति कर्क राशीत मंगळ, त्याचा बुधाशी अंशात्मक केंद्रयोग आहे.

(मूळ पुस्तकातील कुंडली क्र ११५ अभ्यासावी)

मेष-बुध व इतर संबंधित कुयोग असल्यास मानसिक दृष्ट्या नाना तन्हेच्या विकृती असू शकतात, कोणास आपल्या मागे कोणी पळत ठेवत आहे असे वाटणे, कोणास संशयाचे, कोणास चोरीची प्रवृत्ती वगैरे वगैरे. हमा काही काळ स्वच्छतेच्या मॅनियाने पछाडले होते. सतत घरातील भांडी स्वच्छ करणे, फरशी पुसणे ई.

बुध मेष राशीत असता मेंदूला रक्तपुरवठा कमी प्रमाणांत होतो. अशा लोकांना मोठी उशी न घेता झोपण्याचा सल्ला उपयुक्त ठरेल. चक्कर येणे, अंधारी येणे, डोकेदुखी अशा तक्रारी मेषेत बुध असता असण्याची शक्यता असते, तेव्हा वरील उपाय सुचवावा.

.कुंडलीत मेषेचा बुध असला की तो अगदी अशुभच अशी कल्पना हया लिखाणावरून मात्र कोणी करून घेऊ नये. मेषेत बुध असलेल्या अनेक मोठ्या व्यक्तीच्या कुंडल्याही आहेत. रविंद्रनाथ टागोर, सोनोपंत दांडेकर, महर्षी धोंडो केशव कर्वे अशी अनेक उदाहरणे आहेत. पण तेथेहि बुध भावेश या दृष्टीने फलदायी झालेला आहे. रविंद्रनाथांच्या कुंडलीत चतुर्थेश म्हणून आईवडील लवकर वारले, तर मोनोपंत दांडेकरांच्या कुंडलीत तो कुटुंबेश त्यामुळे त्यांचा विवाह नाही ई.

(४) वृश्चिक राशीचा बुध :

वृश्चिकेत बुध असताना तो निश्चित व नजरेत भरण्यासारखे परिणाम केल्याशिवाय रहात नाही. साधारण वृश्चिकेत बुध असता, तो ज्या स्थानाचा भावेश होतो त्या दृष्टीने एखादे जबरदस्त अशुभफल दिल्याशिवाय राहात नाही. अशा वेळी मंगळ जर सुस्थितीत असेल तर मात्र सामान्यफले मिळतात. वृश्चिकेच्या बुधाचे जातक जास्त कारस्थानी, लपवा छपवी करणाऱरे, स्वार्थी आपमतलबी व असतात. हा बुध तसा राजकारणी व धूर्त आहे. कोणत्याही  गोष्टीतील उणिवा काढणे, नापसंती दर्शविणे, टीका करणे हा स्थायीभाव असतो. वृश्चिकेत बुध असणारे जातक बुद्धिमान असतात. शैक्षणिक दृष्ट्या हा बुध फारसा अशुभ नाही.

शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा बुध चांगला नाही. सर्वसाधारण गुंतागुंतीची मनोवृत्ति असते. मानसिक सहनशीलता अत्यंत कमी असते. अनेक गोष्टी अशा लोकांना असहय होतात. मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हा योग वाईटच. प्रकृतीच्या दृष्टीने हा बुध बिघडला असेल तर मोठी जीवावरची दुखणी आणतो. गुहयेंद्रियाचे, मूत्राशयाचे, घशासे त्रास जास्त संभवतात. आयुष्मान कमी करणारा ग्रह आहे. वृश्चिकेत बुध असणे हा प्रकार मिथुन लग्नास जास्त अशुभफलदायी होतो. मकर लग्नासही अशी फले मिळतात. थोडक्यात असा बुध लग्नेश षष्ठेश, अष्टमेश असेल तर जास्त महत्व देऊन अभ्यासावा.

एका कुंडलीत शेजाऱ्यापाजान्याकडून मनःस्ताप, अनेक चिंता काळज्या अनेक प्रकारचे त्रास, उपासना केल्या पण मानसिक स्वास्थ्य लाभत नाही. सतत व्यग्रता, त्रस्तता. येथे मिथुन लग्न असून लग्नेश बुध षष्ठात वक्री शत्रूराशीत. त्याचवेळी चंद्राचा मंगळाशी योग आहे. शुक्र मुळ नक्षत्रांत, षष्ठेश अष्टमेश शनिमंगळ अनोन्य योग,

मिथुन लग्न व वृश्चिकेचा बुध इतर कुयोगात मनोविकार, मानसिक असंतुलन, आत्मविश्वास गमावणे, पत्नी उत्तम चारित्र्याची असूनही पत्नीबद्दल सतत संशय, खिन्नता, सतत निरुत्साह, नैराश्य अशा अनेक बारीक बारीक व मोठ्या मानसिक त्रास आढळून येतात. चंद्र, शुक्र ज्या प्रमाणात इतर ग्रहांनी बिघडलेले असतील त्या प्रमाणे तीव्रता आढळते. वृश्चिकेच्या बुधाचा तेथे तीव्रतेने परिणाम दिसून येतो.

एका कुंडलीत बुध हा शनि व मंगळ दोन्ही ग्रहांच्या अंशात्मक केंद्रयोगांत शनि मंगळ चंद्राच्या चतुर्थात आहे. हया गृहस्थांना आईबद्दल अत्यंत द्वेष, मानसिक तसेच नैतिक आचरणही चांगले नाही. येथे चतुर्थेश शनि शत्रू राशी स्वस्थानापासून मंगळाच्या युतीत, चंद्राकडून चौथा. तुळ लग्नास गुरु षष्ठेष होतो तो चतुर्थात आहे. 

पंचमेश बुध वृश्चिकेचा असेल तर पंचमस्थानाला अनन्य साधारण महत्व येते

(मूळ पुस्तकातील कुंडली क्र १२९ अभ्यासावी) : या स्त्रीस प्रथम एक कन्या संतति झाली त्यानंतर इच्छा असूनहि पुढे मुलगा अगर मुलगी कोणतीच संतति औषध उपाय योजना करूनही झाली नाही. येथेहि पंचमेश बुध वृश्चिकेत आहे. गुरु त्याच वेळी कुंभ राशीत आहे. मंगळ हर्षल प्रतियोग पंचम लाभातून आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

भृगू नंदी नाडी रहस्य


विषय : भृगु नंदी नाडी रहस्य

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : प्रेडिक्शन सिक्रेट्स ऑफ नाडी अस्त्रोलॉजी 

नमस्कार,

आपल्याला नाडी ग्रंथ व त्यांच्या भविष्य कथन पद्धती याबद्दल कायमच उत्सुकता वाटत आली आहे. जसे भृगु, अगस्ती आदी अनेक नाडी ग्रंथ प्रचलित आहेत, तसे त्यातील रहस्य जाणून घेण्याच्या देखील अनेक पद्धती आहेत. हस्त सामुद्रिक, फेस रीडिंग, कुंडली ई.

आज आपण अशाच प्रकारातील भृगु नंदी नाडी तंत्राची थोडक्यात माहिती घेणार आहोत. या तंत्रात ज्योतिषाचार्य आर.जी. राव सरांनी अत्यंत भरीव आणि मोलाचे कार्य केल्रे आहे.

या तंत्रात लग्न स्थानाचा उपयोग फक्त ग्रहांची ठराविक दिवसाची प्रत्यक्ष स्थिती ठरवण्यासाठी केला जातो, ग्रह कोणत्या स्थानात, भावात आहे हे महत्वाचे धरले जात नाही.

त्या ऐवजी प्रत्येक ग्रहास जे ठराविक कारकत्व दिले आहे व दोन ग्रहांमधील साधला जाणारा ठराविक कोनानुसार फलिताची दिशा ठरवली जाते.

भृगु नंदी नाडी तंत्रात खालील प्रमाणे प्रत्येक ग्रहांस कारकत्व दिलेले आहे.

(१) गुरु हा पुरुषांसाठी जीवकारक व शुक्र स्त्रीसाठी जीवकारक मानतात.

(२) शिक्षणासाठी बुधाला बुद्धीकारक मानतात

(३) व्यवसायासाठी शनीला कर्मकारक मानतात

(४) मोठ्या भावासाठी शनि ग्रहाचा विचार करा

(५) धाकट्या भावासाठी (२ नं. चा भाऊ) मंगळाचा विचार करा

(६) लहान भावासाठी (३ नं. चा भाऊ) बुधाचा विचार करा

(७) मोठ्या बहिणीसाठी चंद्र ग्रहाचा विचार करा

(८) धाकट्या बहिणीसाठी (२ नं. बहिण) शुक्राचा विचार करा

(९) धाकट्या बहिणीसाठी (३ नं. बहिण) बुध ग्रहाचा विचार करा

(१०) पत्नीसाठी शुक्राचा विचार करा

(११) पतीसाठी मंगळाचा विचार करा

(१२) वडिलांसाठी सूर्याचा विचार करा

(१३) आईसाठी चंद्राचा विचार करा

(१४) आजोबांसाठी राहुचा विचार करा

(१५) आजोबांसाठी केतूचा विचार करा

(१६) मामासाठी बुध ग्रहाचा विचार करा

(१७) मुलगी/मुलगा मित्रासाठी बुध ग्रहाचा विचार करा

(१८) सासूसाठी चंद्राचा विचार करा

(१९) सासरच्यांसाठी बुध ग्रहाचा विचार करा

(२०) पैशासाठी शुक्र ग्रहाचा विचार करा

(२१) वाहनासाठी शुक्राचा विचार करा

नाडी नियम

(१) बलहीन ग्रह तेव्हा मानले जातात, जेव्हा :

१) ग्रह शत्रूगृही आहे

२) ग्रह दोन शत्रू ग्रहांच्या मधोमध आहे

३) ग्रह राहू आणि केतू यांच्या युतीत आहे

४) ग्रह अस्तंगत आहे

५) ग्रह शत्रू ग्रहांच्या युतीत आहे

६) ग्रह शत्रू ग्रहांच्या दृष्टीत आहे.

(२) बलवान ग्रह तेव्हा मानले जातात, जेव्हा :

१) ग्रह मित्र गृही आहे

२) ग्रह दोन मित्र ग्रहांच्या मध्ये आहे

३) ग्रह स्वतःच्या राशीत आहे

४) ग्रह मित्र ग्रहांच्या युतीत आहे

५) ग्रह मित्र ग्रहांच्या दृष्टीत आहे.

(३) एक ग्रह नेहमी एकाच दिशेने मार्गक्रमण करत असलेल्या ग्रहांचे कारकत्व परिणाम देईल.

(४) एखादा ग्रह कोणत्या राशीत असला तरीही तो लाभदायक परिणाम देईल, जर अनुकूल ग्रह खालील ठिकाणांहून मित्र मानल्या गेलेल्या ग्रहाकडे पाहत आहेत.

१-५-९ (समान दिशा)

३-७-११ (विरुद्ध दिशा) ( सप्तमापासून १-५-९)

२-१२ (पुढे आणि मागील).

शत्रू ग्रहाकडे पाहत असल्यास ते वाईट परिणाम देईल.

(५) जर एखादा ग्रह इतर कोणत्याही ग्रहाशी वरीलप्रमाणे जोडलेला नसेल किंवा त्याच्याशी संबंधित नसेल, तर राशीस्वामीचे कारकत्वप्रमाणे परिणाम देईल ज्यामध्ये तो ग्रह स्थित आहे.

(६) अनुकूल ग्रहाशी परिवर्तन योग असेल आणि अनुकूल ग्रहाशी जोडला गेला असेल, तर तो शुभ परिणाम देईल. शत्रू ग्रहाशी परिवर्तन योग करत असल्यास आणि शत्रू ग्रहाशी जोडल्यास किंवा अनिष्ट परिणाम देईल.

(७) एखादा ग्रह अस्तंगत असतो, तेव्हा तो ज्वलनात असतो असे म्हणतात. ग्रह फारसे फळ देणार नाही. जर अस्तंगत ग्रह अनुकूल ग्रहाशी वरीलप्रमाणे जोडला असेल तर फायदेशीर परिणाम देईल किंवा शत्रू ग्रहाशी जोडला असेल तर वाईट परिणाम देईल.

(८) वक्री ग्रहापासून १२ व्या राशीमध्ये अनुकूल ग्रह असल्यास फायदेशीर परिणाम देईल. शत्रू ग्रह वक्री ग्रहापासून १२ व्या राशीमध्ये असल्यास वाईट परिणाम देईल.

(९) जर राहु सोबत ग्रह युतीत असेल, तर तो ग्रह उच्च ग्रह असला तरीही आपली शक्ती गमावतो.

(१०) राहू आणि केतू एकाच दिशेने पडतील (१,५,९). ते उलट दिशेने पाहतील. राहू आणि केतू नेहमी वक्री असल्याने ते मागील (१२ वी रास) देखील पाहतील.

(११) कोणताही ग्रह १ ल्या दृष्टीने पहात असेल तर अनुकूल वा प्रतिकूल १००% परिणाम देतो.

(१२) कोणताही ग्रह २-५-९ दृष्टीने पहात असेल तर अनुकूल वा प्रतिकूल ७५% परिणाम देतो.

(१३) कोणताही ग्रह ३-७-११ दृष्टीने पहात असेल तर अनुकूल वा प्रतिकूल ५०% परिणाम देतो.

(१४) कोणताही ग्रह १२ व्या दृष्टीने पहात असेल तर अनुकूल वा प्रतिकूल २५% परिणाम देतो.

(१५) सूर्य चे मित्र ग्रह चंद्र मंगळ बुध गुरु आणि शत्रू ग्रह शुक्र शनि राहु केतू मानले जातात.

(१६) चंद्र चे मित्र ग्रह रवी, मंगळ, गुरु आणि शत्रू ग्रह बुध, शुक्र शनि राहु मानले जातात.

(१७) मंगळ चे मित्र ग्रह रवी, चंद्र, गुरु, शुक्र, केतू आणि शत्रू ग्रह बुध, शनि राहु मानले जातात.

(१८) बुध चे मित्र ग्रह शुक्र शनि राहु, रवी आणि शत्रू ग्रह चंद्र, मंगळ, गुरु, केतू मानले जातात.

(१९) गुरु चे मित्र ग्रह रवी, चंद्र, मंगळ, शनी, राहू, केतू आणि शत्रू ग्रह बुध, शुक्र मानले जातात.

(२०) शुक्र चे मित्र ग्रह बुध शनी, राहू, मंगळ, केतू आणि शत्रू ग्रह मानले जातात.

(२१) शनि चे मित्र ग्रह बुध, शुक्र, गुरु, राहू आणि शत्रू ग्रह रवी, चंद्र, मंगळ, केतू मानले जातात.

(२२) राहू चे मित्र ग्रह बुध, शुक्र, शनी, गुरु आणि शत्रू ग्रह रवी, चंद्र, मंगळ मानले जातात.

(२३) केतू चे मित्र ग्रह मंगळ, शुक्र, गुरु आणि शत्रू ग्रह रवी, चंद्र, बुध शनी मानले जातात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

राहू केतुचा आगामी काळातील राशी बदल २०२३


विषय : राहू व केतूच्या आगामी राशी बदलाचे राशीनिहाय परिणाम

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्व अभ्यास

नमस्कार,

आपल्याला कल्पना आहेच, की नोव्हेंबर, २०२३ पासून राहू केतूचे राशी बदल मीन व कन्या राशीमध्ये होत आहे. ही स्थिती त्यापुढे १८ महिने राहणार आहे. ह्या कालखंडामध्ये लग्नस्थान अनुसार राहू केतूच्या स्थितीनिहाय परिणामांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. प्रकर्षाने मूळ जन्म कुंडलीत राहू, केतू व संबंधित ग्रहांच्या दशा अंतर्दशा असतील, तेव्हा ही फळे प्रकर्षाने जाणवू शकतात. कुंडलीतील इतर ग्रह स्थिती संबंधाचे अनुरोधाने यात बदल होऊ शकतात.

१. मेष :

मेष लग्नास राहू व्यय स्थानी आणि केतू षष्ठ स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे विवाह  जुळवताना, अडचणी, विवाहितांमध्ये वादविवाद, आरोग्याच्या तक्रारी, प्रवासामध्ये अडचणी, कर्जात वाढ, संतान संबंधी समस्या, दृष्टी दोष, पापाचरण, अपंगांची सहाय्यता,  ई. फळे मिळू शकतात.

२. वृषभ :

वृषभ लग्नास राहू लाभ स्थानी आणि केतू पंचम स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे काही शुभ फले देऊ शकतो. शत्रूवर विजय, पंडित, कानाची समस्या, मात्र त्याच वेळेस केतु पंचम स्थानात असल्यामुळे निर्णय चंचलतेमुळे चुका, नोकरी व्यवसायात नुकसान, शिक्षणात अडथळे, संतती विषयक समस्या, ई. फळे मिळू शकतात. एकंदर हा काळ संमिश्र आहे.

३. मिथुन :

मिथुन लग्नास राहू दशम स्थानी आणि केतू चतुर्थ स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे हा काळ कसोटीचा जाऊ शकतो. आई वडिलांचे अनारोग्याच्या समस्या, कुटुंबात महत्त्वाच्या स्थावर मालमत्ते   विषयक प्रश्नावर मतभेद, नोकरी- व्यवसायात ताणतणाव, वाढेल आणि धंद्यात स्पर्धकांचे आव्हान,  संघर्ष ई. फळे मिळू शकतात.

४. कर्क :

कर्क लग्नास राहू भाग्य स्थानी आणि केतू तृतीय स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे त्यामुळे संमिश्र फळे मिळतील. आलेल्या संधीमध्ये अडचणी आल्यामुळे विलंबाने फायदा, प्रवासात वादविवाद किंवा अडचणी, विलंब, भावंडांशी मतभेद ई. फळे मिळू शकतात.

५. सिंह :

सिंह, लग्नास राहू अष्टम स्थानी आणि केतू द्वितीय स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे कसोटीचा काळ, अचानक आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेला बाधा, कौटुंबिक अडीअडचणी. पंचमाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे निर्णयशक्ती बाधित, स्पर्धात्मक परीक्षात अपेक्षाभंग, संतती विषयक समस्या, ई. फळे मिळू शकतात.

६. कन्या :

कन्या लग्नास राहू सप्तम स्थानी आणि केतू लग्न स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे मानसिक मानसिक अस्वस्थता, जोडीदाराशी मतभेद सांसारिक जबाबदाऱ्यामध्ये वाढ, संबंधात ताणतणाव, चतुर्थ स्थानाच्या केंद्रात राहू असल्यामुळे मातुल घराण्यातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी, स्थावर मालमत्तेसंबंधी योग्य निर्णय न होणे ई. फळे मिळू शकतात.

७. तूळ :

तूळ लग्नास राहू षष्ठ स्थानी आणि केतू व्यय स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे संमिश्र कालखंड आहे. षष्ठातील राहू उत्साह वाढवू शकतो, समोर येणाऱ्या कठीण प्रसंगांना विरोधाला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता निर्माण करू शकतो. मात्र व्ययातील केतूमुळे उत्साहावर पाणी, बंधू-भगिनींशी मतभेद, प्रवासात विलंब अथवा अडचण ई. फळे मिळू शकतात.

८. वृश्चिक :

वृश्चिक लग्नास राहू पंचम स्थानी आणि केतू लाभ स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे एकीकडे नोकरी-व्यवसायात चांगले आर्थिक लाभ आणि संधी, वाढता उत्साह तर दुसरीकडे निर्णयामधील चंचलता असा विरोधाभास अनुभवाला येईल. संततीविषयक महत्त्वाचे निर्णयात चूक, धनस्थानाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे आर्थिक अडचणी. कौटुंबिक वादविवाद ई. फळे मिळू शकतात.

९. धनु :

धनु लग्नास राहू चतुर्थ स्थानी आणि केतू दशम स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे दोन केंद्र स्थानात राहू-केतू या कालखंडात येत असल्यामुळे स्थावर मालमत्तेसंबंधी कटकट, नोकरी-व्यवसाय साठी संघर्ष युक्त, आईवडिलांसाठी अनिष्ट, प्रतिकूल परिस्थिती ई. फळे मिळू शकतात.

१०. मकर :

मकर लग्नास राहू तृतीय स्थानी आणि केतू भाग्य स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे उत्साहात वाढ, रेंगाळलेली महत्त्वाची कामे पूर्ण, प्रवास लाभदायक, जबाबदाऱ्या पार पाडने, केतू भाग्यस्थानात असल्यामुळे भाग्योदयाच्या फारशा अपेक्षा नको. नोकरी व्यवसायासाठी साधारण. भावंडांकडून थोडा त्रास  किंवा मतभेद ई. फळे मिळू शकतात.

११. कुंभ :

कुंभ लग्नास राहू धन स्थानी आणि केतू अष्टम स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे आर्थिक चणचण, खर्चात  वाढ, आर्थिक नुकसान, कौटुंबिक जबाबदाऱ्यात वाढ, असमाधान, आरोग्याच्या तक्रारी, संतती होण्यात अडचणी ई. फळे मिळू शकतात.

१२. मीन :

मीन लग्नास राहू लग्न स्थानी आणि केतू सप्तम स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे महत्त्वाचे विचार करताना संभ्रम, चुकीचे निर्णय, वैवाहिक संबंधात वितुष्ट, जोडीदाराशी मतभेद, दशम स्थानापासून राहु चौथा असल्यामुळे व्यवसायाय संघर्ष ई. फळे मिळू शकतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

वाईट संगतीला लागणे व घरातून निघून जाणारे सुखरूप घरी परत येण्याकरिता तोडगे


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

कर्म सिद्धांत भाग ३


विषय : कर्म सिद्धांत (भाग ३)

संकलक व स्वैर अनुवाद : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : THEORY OF KARMA (श्री हीराभाई ठक्कर)

नमस्कार,

आज आपण आपल्या आयुष्याच्या रस्सीखेच मध्ये इतके रममाण झालो आहोत की, कशासाठी आपण मनुष्य जन्मास आलो, याचे साधे भान देखील आपल्याला उरलेले नाही. हे मी माझे परम भाग्यच समजतो की, श्री हीराभाई ठक्कर यांचे हे पुस्तक वाचनात आले आणि या विषयाकडे किमान लक्ष तरी गेले. त्यांना माझा साष्टांग दंडवत. आणि हे विचार सर्वाना पोहोचणे आवश्यक वाटले म्हणून हा प्रपंच.  पहिल्या भागात आपण कर्म सिद्धांत, क्रियमाण कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म याविषयी जाणून घेतले. भाग २ मध्ये कोणतेही कर्म फळ देऊनच शांत होतें, सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी या तीन प्रकारच्या जीवांची क्रियमाण करण्याची कल्पना, प्रारब्धांत असतें तेवढेच मिळतें, माणसाने पुरुषार्थ करावा की नाही, प्रारब्ध व पुरुषार्थ एकमेकाना पूरक, कर्म करण्यांचे स्वातंत्र्य फळ भोगण्यांत परतंत्र ई. विषयांचा आढावा घेतला. आज या विषयाचा पुढील टप्पा क्रमश: व थोडक्यात पाहणार आहोत.

कर्म भोगण्यासाठी देह धारणा आवश्यक – कर्मात बेरीज वजाबाकी नाही :

शुभकर्माचे फळ सुख, अशुभ कर्माचे फळ दुःख, पण ही दोन्ही भोगण्यासाठी, देह धारण करण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण देह हे कर्म-फळ-भोग भोगण्याचे साधन आहे. या मुळे कोणीही जन्म-मरणाच्या चक्रांतून सुटूच शकत नाही. आणि जोपर्यंत जन्म-मरणाच्या चक्रात जीवात्मा अडकलेला आहे, तोपर्यंत त्याला मोक्षप्राप्ति नाही. देहच धारण करण्यापासून मुक्तता, या अवस्थेचे नाव ” मोक्ष”. जोपर्यंत शुभ व अशुभ कर्माचा साठा संचितात शिल्लक आहे, तोपाफ्र्यंत जन्म-मरण चक्र अव्याहतपणे चालूच राहाणार. देह धारण करावयास लागणे, हेंच खरे तर बंधन आहे. शुभ कर्माचे फळ स्वरूप सुख भोगण्यासाठी देह धारण करणे ही जणू सोन्याची बेडी, आणि अशुभ कर्माचे फळ स्वरूप दुःख भोगण्यासाठी देह धारण करणे ही जणू लोखंडाची बेडी. परंतु दोन्ही प्रकारची कर्मे भोगण्यासाठी देह हा धारण करावाच लागतो. म्हणजे कर्म शुभ असो वा अशुभ असो, जीवात्म्याला जन्म-मरण रूपी बेडयांत अडकवून ठेवते. बेडी  सोन्याची असो वा लोखंडाची, दोन्हीही बंधनकारकच. सत्पात्री दानाचें फळ सुख, पण ते ही उपभोगण्यासाठी देह धारण करावा लागतोच.

सुपात्र दानात् च भवेत् धनाढ्यो । धन प्रभावेन करोति पुण्यम् ॥

पुण्य प्रभावात् सुरलोकवासी । पुनर् धनाढ्यो पुनरेव भोगी ।।

सत्पात्री दान केल्याने माणूस धनवान होतो. धन प्रभावाने आणखी दान धर्म केला की त्याला पुण्य शरीर प्राप्त होते. त्यामुळे पुन्हा तो धनवान होतो आणि पुन्हा पुण्य करतो. अशा रीतीने शरीर धारणेचे चक्र सतत चालूच राहाते.

कुपात्र दानात् च भवेत् दरिद्रो ।

दारिद्र्य दोषेण करोति पापम् ।।

पाप प्रभावात् नरकं प्रयाति ।

पुनर् दरिद्रो पुनरेव पापी ।।

कुपात्री दान केल्याने दरिद्री होतो आणि परिणाम स्वरूप दारिद्रय दोषाने मग तो माणूस पापकर्मे करू लागतो, पाप प्रभाव वाढला की तो नरकात जातो. अशा रीतीने पाप क्षालनार्थ पुनः पुनः देह धारणेचे चक्र सतत चालू राहाते.

माणूस पाप करो वा पुण्य करो, दोन्ही बाबतीत संसारचक्र उलट वा सुलट दिशेने चालूच राहातें, त्यांत प्रत्येक जीव भरडून निघतो, त्याला मोक्ष (जन्म- मरणापासून सुटका मिळतच नाही, कारण प्रत्येक नवीन जन्मांत जीवात्मा नवनवीन क्रियमाण कर्मे करीतच राहातो, आणि सर्व कर्मे, तात्कालिक फल देऊन समाप्त न होता ती संचितरूपे जीवाच्या खात्यात जमेत राहातात, आणि त्यातील जीं फळे पक्व होऊन प्रारब्ध बनतात, ती भोगण्यासाठी जीवात्म्याला अनुरूप देह धारण करावा लागतो, आणि पुनः त्या जीवनदरम्यान पुढे अनेक जन्म ध्यावे लागतील अशी नवी कर्मे करतो. अनादि काळापासून हे दुष्ट चक्र चालत आलेले आहे व ते अनंत काळ चालू राहाणार.

महर्षि पतंजली सांगतात : सति मूले तव्दिपाकः जातिः आयुः भोगाः ।

जोवर कर्मरूपी मूळ आहे, तोवर शरीररूपी वृक्ष उगवणारच व त्याला, जात, आयुष्य व भोगरूपी फळे चिकटणारच.

कर्मात वजाबाकी नाही, केवळ बेरीज :

बरेच लोक असें समजतात की, पाप-पुण्याची वजाबाकी होऊ शकते. म्हणजे असे की, आपण समजा पांच मण पाप केले, व नंतर आठ मण पुण्य केलें, तर पुण्यातून पाच वजा जाता, तीन मण पुण्य  आपल्या खाती उपभोगण्यास जमा होईल व पापाचे फळ मला भोगावे लागणार नाही. सामान्य व्यवहारातील हे गणित कर्म-नियमात लागू होऊ शकत नाही. तेथे वजाबाकी नाही केवळ बेरीज होते. म्हणजे असे की तुम्ही ५ माप पाप केलेत, नंतर ८ माप पुण्य केलेत, तर तुम्हाला ५ अधिक ८ अशा एकूण १३ माप कर्म फळ भोगावेच लागेल. ५ माप पाप कर्माचे फळ जे दुःख भोगासाठी व ८ माप पुण्य कर्माचे फळ जे सुख भोगासाठी पाप पुण्याची बेरीज करून होणारे एकूण १३ माप कर्म फळ भोगण्यासाठी देह धारण करावा लागेल.

मात्र जसजशी फळे पक्व होतील, तसे फळ भोगावे लागत असल्याने एकाच देहांत सर्व पाप कर्म वा पुण्य कर्म फळ भोगावे लागतें असे नाही. तर पाप-पुण्याचे मिश्रण प्रत्येक देहात लाभते, म्हणूनच माणूस एकाच देहांत काही वेळा दुःखी तर काही वेळा सुखी आढळतो.

तर मग मोक्षप्राप्ति कधीं ?

प्रत्येक माणूस मोक्षाचा अधिकारी आहे, आणि ८४ लक्ष योनी फिरत, मानवी शरीर हे मोक्ष मिळण्यासाठींच प्राप्त झालेले आहे. मानव देह प्राप्त झाल्यानंतर मोक्ष न मिळविल्यास, पुन्हा विविध योनीत फिरणे क्रमप्राप्त होतें. केवळ मनुष्यच या जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटून, परब्रह्मात लीन होण्यास पात्र आहे, मात्र त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत आणि असे करण्याचे सामर्थ्य व स्वातंत्र्य दोन्ही त्याच्यात आहे, कारण तो परात्पर परब्रह्माचाच अंश आहे.

परंतु जोंवर या जन्मातील सर्व प्रारब्ध भोगून तो संपवित नाही, आणि जन्मजन्मांतरांत त्याचे खाती जमा झालेला महाकाय ‘संचित’ साठा तो नष्ट करीत नाही, तोपर्यंत अनंतकाळ पर्यंत, त्याला परत परत  निरनिराळे देह धारण करणे क्रमप्राप्तच आहे.

जर त्याला मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा असेल, तर त्याला ज्ञानाग्निद्वारें समस्त पूर्वकमांचा साठा भस्म करणे क्रम प्राप्त आहे.

“ज्ञानाग्निः सर्व कर्माणं भस्मसात् कुरुते.”

या जन्मीचे प्रारब्ध तर भोगून संपविलेच पाहिजे, पण या जन्मी करावी लागणारी क्रियमाण कर्मे अशा  खुबीने करावी लागतील, की जी या आयुष्य काळातच पक्व होऊन आपले फळ देऊन शांत होतील, आणि त्यांतील एकही त्याच्या संचितात जमा होऊन, त्यांच्या भोगासाठी त्याला नवा जन्म घ्यावा लागणार नाही. सर्व कर्मे अशी कुशलतापूर्व करणे याचेंच नाव ‘योग’.

“योगः कर्मसु कौशलम् ”.

पण कोणी कर्मच नाही केलें तर ?

क्रियमाण कर्म संचितात जमा होण्याचा धोका टाळण्यासाठी, काही लोक असा युक्तिवाद करतात की कर्म करणेच सोडून द्यावे, की ज्या योगे संचिताचे प्रारब्ध बनून त्याच्या भोगार्थ जन्म घेण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. म्हणजे आपोआप मोक्ष मिळेल-देह बंधनातून सुटका होईल.

हा युक्तिवाद करणे सोपे, पण आचरणात आणणे अशक्य कोटीतले आहे, कारण कोणीही क्षणभर ही कर्म करणे टाळू शकत नाही.

भगवान गीतेत अर्जुनाला स्पष्ट बजावतात :

न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत। – गीता, अ. ३/५

शरीरयात्राऽपिच ते न प्रसिध्येत् अकर्मणः । – गीता, अ. ३/८

कोणीही मनुष्य, कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कर्माविना त्याची शरीर यात्रा (जीवन) क्षणभरही चालू शकत नाही. खाणे, पिणे, उठणे, बसणे, झोपणे, चालणे, इतकेच काय श्वासोच्छ्वास करणे, या क्रिया हीं कर्मेच होत. निर्वाहासाठी नोकरी-धंधा करणे, शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम करणे,  शरीर धारणार्थ अन्न प्राशन करणे, या गोष्टी निरंतर कराव्याच लागतात. म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत, काही ना काही कर्म करावेच लागते. काही ना काही कर्म आपली इच्छा असो वा नसो, अव्याहतपणे चालूच राहते.

परंतु पूर्वी सांगितल्याप्रमाणे खाणे, पिणे, इत्यादी जीवनावश्यक क्रिया (कर्मे), तात्काळ फळ देऊन शांत होतात, संचितात जमा होत नाहीत. मनुष्याने अन्य क्रियमाण कर्मेही अशा कौशल्याने करावी की जी याच जन्मात फळ देऊन शांत होतील, संचित बनून पुढल्या जन्मांचे कारण बनणार नाहीत. ‘योगः कर्मसु कौशलम्’.

कोणती क्रियमाण कर्मे संचितात जमा होत नाहीत ?

(१) बाल्यावस्थेत केलेली कर्मे.

(२) अजाणतेपणी घडलेली कर्मे.

(३) मनुष्येतर योनीत केलेली कर्मे.

(४) कर्तृत्वाभिमान रहित कर्मे (ज्यांत ‘मी करतो’ हा अभिमान नाही).

(५) समष्टिच्या (सर्व लोकांच्या) हितार्थ निष्काम भावनेने केलेली कर्मे.

(६) निष्काम भावनेने फलेच्छा विरहित केलेली कर्मे.

(१) बाल्यावस्थेत आणि अभान अवस्थेत केलेली कर्मे :

बालपणी, अगर अभान अवस्थेत केलेली कर्मे, प्रीती द्वेष रहित असतात, त्यामुळे ती संचितात जमा होत नाहीत. एकाद्या बालकाने अग्नित हात घातला, तर भाजण्याचे तात्कालिक फल देऊन तें, शांत होईल, संचितात जमा होणार नाही. समजा, एखादे तीन-चार वर्षांचे मूल खाटल्यावर चढून उड्या मारित असेल, आणि तेथे असलेल्या दोन-तीन महिन्यांच्या धाकट्या भावंडाचे अंगावर त्याचा पाय पडला आणि अनावधानाने त्या बाळास गंभीर दुखापत झाली. तर त्या चार वर्षांचे मुलावर कोर्टात खटला भरता येत नाही. व ते कर्म अजाण अवस्थेत घडलेले असल्याने संचितात ही जमा होत नाही.

(२) अजाणतेपणी घडलेली कर्मे.

वेडेपणाचे झटक्यांत एखाद्या माणसाने शिवीगाळ वा मारहाण केली, व कोर्टात त्याचेवर खटला भरला गेला, तरी त्याचे ते कर्म अजाणतेपणे घडलेले असल्याने, कोर्टात त्याला सहसा शिक्षा होत नाही, (Intention is the gist of Crime) व ते संचितातही जमा होत नाही. कदाचित अशावेळी जमलेले लोक शिवीगाळ केल्याने, त्याला थोडीफार मारहाण करतील, व अशा तर्हेने त्याचे ते कर्म त्याला तात्कालिक फल देऊन शांत होईल, असे कर्म जाणीवपूर्वक केलेले नसल्याने संचितात ही जमा होत नाही.

(३) मनुष्येतर योनीत केलेली कर्मे.

मनुष्येतर योनीत केलेली कर्मे संचितात जमा होत नाहीत कारण, मनुष्य योनीशिवाय इतर योनी (पशु-पक्षी, इत्यादि व देवयोनी) या केवळ भोग योनि असतात. या योनी केवळ संचित कर्म प्रारब्धरूपे भोगून समाप्त करण्यासाठी जीवात्म्याला काही कारणाने प्राप्त झालेल्या असतात. त्या जन्माचे निर्धारित प्रारब्ध भोगून झाल्यावर, त्याचा त्या योनीतील देह सुटतो. या योनीत केलेली क्रियमाण कमें संचितात जमा होत नाहीत. घोडा, गाढव, कुत्रा, मांजर, साप, कीटक, पक्षी इत्यादि योनीत असलेले जीवात्मे, केवळ त्या त्या योनीत असलेल्या उपजत बुद्धिनुसार (instinct) वागत असतात. त्या योनीत प्रज्ञेचा (Intellect) भाग नसतो. वाघ-सिंह त्यांच्या त्या योनीतील उपजत बुद्धिनुसार अन्य प्राण्यांची हत्या करतात. विंचू नांगी मारतो, साप डंख मारतो, त्यांत त्यांचा केवल नैसर्गिक आवेग असतो, म्हणून त्यांची ही कर्मे संचितात जमा होत नाहीत. त्यांचे प्रारब्ध संपविण्यासाठी, त्यांची ती कर्मे घडत असतात, व तात्कालिक फळ देऊन समाप्त होतात. गाढवाने कोणाला लाथ मारली तर फार झाले तर त्याच्या पाठीत सोटा बसतो, कर्म फळ देऊन समाप्त होतें. सोटा न बसला तरी त्याचे ते कर्म केवळ नैसर्गिक आवेगाने पडलेले असल्याने, संचितात जमा होत नाही. साप किंवा कुत्रा कोणाला चावला, आणि परिणामतः असा माणूस दगावला, तरी त्या सापावर अगर कुत्र्यावर फिर्याद करता येत नाही कारण फौजदारी कायदा केवळ माणसांसाठी आहे, पशुपक्षांवर त्याचा अमल चालत नाही. गाई-म्हशी कोणाच्या शेतांत शिरून पिकाचे नुकसान करू लागल्या, तर शेताचा राखणदार त्याना मारपीट करून त्याना हाकलून देतो, अगर त्याना पकडून कोंडवाड्यांत त्यांची रवानगी होते, व त्यांचे ते कर्म त्याना  तात्कालिक फळ देऊन समाप्त होते. त्यांच्या या अतिक्रमणाबद्दल दंड होतो तो त्यांच्या मालकाला,  त्याच्या निष्काळजीपणाबद्दल, गाई-म्हशीना अतिक्रमण कायदा (Trespass Act) लागू नाही. याप्रमाणे मनुष्येतर तमाम योनी-पशु-पक्षी सरपटणारे प्राणी-जलचर प्राणी, यांची क्रियामाण कर्मे संचितात जमा होत नाहीत.

देवयोनी ही सुद्धा भोग-योनी समजली जाते. मनुष्याला त्याच्या पुण्यकर्मामुळे देवयोनी प्राप्त होते. पण ती केवळ भोगयोनी असल्याने, त्यात केलेली क्रियमाण कर्मे चांगली वा वाईट संचितात जमा होत नाहीत. जीवात्मे, त्यांच्या पुण्य कर्मानुसार, देवलोक, स्वर्गलोक, इत्यादि ठिकाणी जाऊन दिव्य भोग भोगू शकतात, व पुण्याचा साठा संपला की पुनः या मर्त्यलोकात लोटले जातात. अशा जीवात्म्यानी स्वर्ग लोकांत जरी पुण्यकारक क्रियमाण कर्मे केली, तरी त्यांचा पुण्य साठा वाढत नाही, व त्याना आपला तेथील मुक्काम वाढवता येत नाही.

गीतेत भगवंतानी स्पष्ट सांगितले आहे  :

ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम्

अश्नन्ति दिव्यान्-दिवि देवभोगान् ।। गीता, ९/२०

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मत्र्त्यलोकं विशन्ति ॥ (गीता, ९/२१)

आपण थंड हवेच्या ठिकाणी मौजमजा करण्यास जातो, परंतु द्रव्यपुंजी संपली की, आपल्याला घरी परतावे लागते. अशा ठिकाणी अधिक राहावेसे वाटले, तरी त्या साठी अधिक पैसे मिळविण्याचे साधन नसते. या प्रमाणेच स्वगत पुण्य साठा असे पर्यंतच देवलोकी राहता येते व नंतर पुन्हा या भूतलावर परतावें लागते.

(४) कर्तृत्वाभिमान रहित कर्मे (ज्यांत ‘मी करतो’ हा अभिमान नाही). :

कर्तेपणाच्या अभिमानरहित केलेली कर्मे ‘अकर्म’ समजली जातात व संचितात जमा न होतां त्यांचे फळ भोगण्यासाठी परत देह धारण करावा लागत नाही आणि जन्म-मरणाच्या चक्रात अडकावे लागत नाही. एकाच्या न्यायाधिशाने खुनाच्या आरोपीला आरोप सिद्ध झाल्यावर फाशीची शिक्षा फर्मावली, तर तो एका माणसाची हत्या केल्याबद्दल जबाबदार धरला जात नाही, कारण त्याच्यात कर्तृत्वाची भावना नसते. शिक्षा देण्याचे काम, तो आपले कर्तव्य म्हणून करीत असतो. कायद्याच्या कक्षेत राहून, न्यायदानाचे काम, सरकारचा त्या कामासाठी नेमलेला एक अधिकारी म्हणून करीत असतो. ते कर्म त्याला बंधनकारक ठरत नाही त्याच्या संचितात ते जमा होत नाही.

म्हणूनच भगवंतानी गीतेत अर्जुनाला आश्वासनपूर्वक सांगितले की, या धर्मयुद्धांत तुझ्या हातून कितीही हत्या झाली, तरी ते कर्म कर्तृत्वाभिमान रहित असल्याने, धर्मयुद्धांत, धर्माची बाजू रक्षण करणारा एक योद्धा म्हणून, केवळ कर्तव्य भावनेने केले असल्यामुळे, तुला बंधनकारक ठरणार नाहीं. भगवान श्री कृष्ण सांगतात:

यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न विद्यते । हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निवद्यते ।। गीता, १८/१७

अर्थ :

ज्याचे अंत:करण अहंकार युक्त नसतें, ज्याची बुद्धि फळासक्तिने मलिन झालेली नसते, त्याने या लोकाना ठार मारले तरी, तो मारणारा ठरत नाही, आणि त्या कर्माने बद्धही होत नाहीं.

हे तत्त्व जाणणारा आणि “मी करतो” असा अभिमान ज्याच्यात नाही असा जीव, धर्म- मर्यादेत राहून, न्याय नीतीच्या मार्गाने जी जी कर्मे, स्वतः चे कर्तव्य म्हणून करतो, ती ती त्याच्या हातून केवळ घडत असल्याने, त्याला बंधनकारक ठरत नाहीत, त्या कर्माना तो केवळ निमित्तमात्र असल्याने, जवाबदार ठरत नाही.

नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् । पश्यन् श्रुण्वन् स्पृशन् जिंछन् अश्नन् गच्छन् स्वपन श्वसन् ।। प्रलपन् विसृजन् गृण्हन् उन्मिषन् निमिषम् अपि । इन्दियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ।। गीता, ५/८-९

वास्तविक माणसाच्या सर्व शारीरिक क्रिया, उदाहरणार्थ पाहाणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे-पिणे, चालणे, झोपणे, श्वासोच्छ्वास करणे, बोलणे, मल-मूत्र विसर्जन, ग्रहण करणे, डोळयांच्या पापण्या उघडणे मिटणे, आदि कर्मे इंद्रिये आपापल्या विषयांचे ठिकाणी प्रवृत्त झाल्याने घडत असतात. अज्ञानी मनुष्य त्या ‘मी करतो’ असा वृथाभिमान बाळगतो, ज्ञानी तसा अभिमान धरीत नाही.

बैलगाडी उन्हातून चालली असतां, सावलीसाठी त्या खालून चालणारा कुत्रा थोड्या वेळाने असा अभिमान करू लागतो कीं, गाडीचे ओझे मीच वाढून नेत आहे, वास्तविक बैल ती गाडी ओढत असतात.

अनेक लोक अशा तऱ्हेचा वृथाभिमान बाळगून, आयुष्यांत घडणाऱ्या सर्व घटना माझ्यामुळे घडल्या, मी घडवून आणल्या, असा वृथा कर्तृत्वाभिमान बाळगू लागतात. या मीपणाच्या अभिमानामुळे, त्यांची ती कर्मे त्याना बंधनकारक बनतात, व त्यांचे फळ भोगण्यासाठी त्याना पुनः पुनः देह बंधनात पडावे लागते.

भगवद्गीतेच्या १६ व्या अध्यायांत, स्वतःचे कर्तृत्वाच्या मिथ्या अभिमानाने फुगलेल्या लोकांचे वर्णन आसुरी संपत्तीचे लोक असे केलेले आहे. त्यांचे वर्णन करताना भगवान सांगतात की अशा लोकाना नेहमी वाटत असतें की, मी आज हे मिळविले. माझा हा मनोरथ मी पूर्ण करीन, आज मी इतके धन मिळविले, उद्या आणखी अधिक मिळवीन, आज मी या शत्रूचा नाश केला. उद्या आणखी शत्रूंचा निःपात करीन, मी स्वतः जणू कर्तृत्ववान असा ईश्वरच आहे, मी ऐश्वर्यवान आहे, मी सिद्ध-पुरूष आहे, मी फार बलवान आहे, मी फार सुखी आहे, मीच धनवान आहे, माझा जन्म मोठ्या उच्च कुळांत झाला आहे, माझ्यासमान श्रेष्ठ फक्त मीच आहे. मी मोठा दानधर्म करणारा आहे, मी मोठेमोठे यज्ञ करीन, मी मोठा मान-सन्मान प्राप्त करीन, ई. हजारो इच्छा आकांक्षा असे लोक रात्रंदिवस हृदयाशी बाळगून असतात.

अशा आसुरी वृत्तिच्या लोकांचे भवितव्य सांगताना भगवान म्हणतात, हे अनेक प्रकारचे भ्रम बाळगणारे, मोहरूपी जाळयांत पूर्णपणे गुरफटलेले लोक, विषय भोगात अत्यंत आसक्त असलेले, निश्चितपणे अतीव दुःखदायक अशा रौरव नरकात पडतात, त्याना दुसरी गति नाही.

असे लोक जी जी कर्मे करतात आणि ती बहुधा अशुभच असतात. ती ती कर्मे त्यांच्या संचितात जमा होऊन, त्यांची कटु फळे भोगण्यासाठी त्याना सतत जन्म-मरणाच्या रहाटगाडग्यांत फिरावे लागते.

(५) समष्टिच्या (सर्व लोकांच्या) हितार्थ निष्काम भावनेने केलेली कर्मे.

कित्येक कर्मे जन मानसाच्या दृष्टीने पाप कर्मे ठरत असली, तरी जर ती समष्टिच्या (जगाच्या) कल्याणासाठी केलेली असली, तर पाप कर्मे ठरत नाहीत व संचितात जमा होत नाहीत.

खोटे बोलणे हे पाप समजले जाते, तसेच कोणाला खोटे बोलण्यास भाग पाडणे वा प्रवृत्त करणे, हेही पाप समजले जाते. असे असूनही खुद्द भगवान श्रीकृष्णानी धर्मराजासारख्या, सत्यवक्ता अशी ख्याती असलेल्या राजाला खोटे बोलण्याची प्रेरणा देऊन “नरो वा कुंजरो वा” असे बोलण्यास भाग पाडून, द्रोण पुत्र अश्वत्थामा मेल्याचा आभास निर्माण केला. हें करण्यात श्रीकृष्णाचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. पांडव जिंकले, तर त्याला राज्याचा काही भाग, अथवा काही दलाली मिळणार नव्हती. पण युधिष्ठिर असे बोलला नसता, तर द्रोणाचार्य यांचे मरण असंभव होते. पण द्रोणाचार्यांचा मृत्यू ही समष्टिच्या कल्याणार्थ काळाची गरज होती. आततायी व अन्यायी अशा कौरवांचा नाश करण्यासाठी, लढल्या गेलेल्या धर्मयुद्धांत पांडवांचा जय होणे अत्यावश्यक होते.

 “अश्वत्थामा हतः नरो वा कुंजरो वा” हे अर्धसत्य बोलल्यामुळें युधिष्ठिराच्या, त्रिकाल सत्यवादी या कीर्तीला कलंक लागला, व त्याचे थोडे नुकसान झाले, ही गोष्ट खरी, परंतु व्यक्तिगत नुकसानापेक्षा समष्टिचे कल्याण अधिक महत्वाचे. श्रीकृष्ण जरी युधिष्ठिराला असत्य बोलण्यास लावणाऱ्या कृतीचा प्रणेता ठरला, तरी श्रीकृष्णाचे समष्टि-कल्याणार्थ केलेले ते पापकर्म, त्याच्या संचितात जमा झाले नाही, व त्याला त्याचे फळ भोगावयास लागले नाही.

लहानपणी कृष्णाने लोण्याची चोरी अनेकदां केली, गोपींच्या अनेक खोडया काढल्या, स्यमंतक मणी चोरल्याचा त्याच्यावर आळ आला मोठेपणी अनेकदा संदिग्ध बोलून दुटप्पी वर्तन केले, पण त्याची ही सर्व कर्मे लीलास्वरूपाची होती. मोठेपणी जेव्हा जेव्हा तो खोटे बोलला तेव्हां ते समष्टि कल्याणार्थ होते, त्याचा व्यक्तिगत स्वार्थ, कोणते ही कपट-कारस्थान करताना, नव्हता.

म्हणून गीतेत त्याने स्वतःच असे म्हटले आहे की

।।” जन्म कर्मच मे दिव्यम्” ।।

माझा जन्म व माझी सर्व कर्मे दिव्य आहेत. मला माझ्या व्यक्तिगत लाभासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही, कारण मी पूर्णकाम आहे.

गीतेच्या तिसऱ्या अध्यायांत भगवान श्रीकृष्ण सांगतात :

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन । नानवाप्तमवासव्यं वर्त एव च कर्मणि ।। गीता, ३ / २२ यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ।। गीता, ३/२३

हे पार्था, या त्रैलोक्यांत मला स्वतःला काहीच करावयाचे असे उरलेले नाही. कारण मला मिळालेले नाही किंवा मिळावयाचे आहे, असे काहीच नाही. तरी पण मी कर्म करतच असतो. कारण जर मी असा कर्मात आळस सोडून न वागेन, तर सगळे लोक सर्वथा माझ्याच मार्गाला अनुसरतील व निष्क्रिय आळशी होतील.

भगवंतानी आपला जन्म व सर्व कर्मे दिव्य म्हटली याला मुख्यतः तीन कारणे आहेत :

१) इतर जीवात्म्यांप्रमाणे भगवंतांचा जन्म मातेच्या उदरातून झालेला नाही ते प्रगट झाले.

२) त्यांचा जन्म पूर्व जन्मातील संचित कर्मे प्रारब्धरूपाने भोगण्यासाठी नाही, कारण त्यांची पूर्वीची कोणतीही संचित कर्मेच नव्हती.

३) त्यांच्या अवतार काळांत, त्यानी जीं जीं कर्मे केली ती केवळ लीलास्वरूप आणि समष्टि (जग)  कल्याणार्थ केली. राग, आसक्ति, द्वेषाने प्रेरित होऊन, स्वतःच्या लाभासाठी ते कधीही वागलेले नाहीत. कर्तेपणाच्या अभिमान विरहित अशा वृत्तिने सर्व कर्मे त्यांचे हातून केवळ घडलेली आहेत. यामुळे भगवंतांचे एकही कर्म संचितात जमा होऊन, दुसऱ्या नवीन जन्माचा हेतु (कारण) बनू शकले नाही.

भगवंत म्हणतात मी आप्तकाम आहे, माझ्या इच्छेनुरूप जेव्हा ज्या देहाची जरूर पडेल, तो समष्टिच्या हिताकरतां धारण करू शकतो. संत तुलसीदासानी वर्णन केल्याप्रमाणे भगवंतांचा अवतार म्हणजे केवळ ‘निज इच्छा निर्मित तनू’ आहे.

जगांत झालेले सर्व महापुरूष रामकृष्ण परमहंस, स्वामी रामतीर्थ, विवेकानंद, महात्मा गांधी, येशु क्रिस्त, शंकराचार्य, भगवान बुद्ध, महावीर, महमद पैगंबर ई. या सर्वानी त्यांच्या जीवनकाळ दरम्यान जी जी कर्मे केली ती केवळ “सर्वलोक हिताय” केली. त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ कोणत्याही कर्मात नव्हता म्हणूनच त्याना मुक्त पुरुष मुक्त जीवात्मे समजले जाते.

आज येथेच थांबतो. या पुढील विवेचन आपण पुढील भागांत पाहू.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)