Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

मन करा रे प्रसन्न, आरोग्य वृद्धीचे साधन


विषय : मन करा रे प्रसन्न, आरोग्य वृद्धीचे साधन

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्व अभ्यास

नमस्कार,

कुंडलीचा थोडाफार अभ्यास असणाऱ्या सगळ्यांना माहित आहे की, कुंडलीतील ६ वे स्थान आजार दर्शवते. ६ वे स्थानास रिपू किंवा शत्रू किंवा रोग स्थान अशी नावे आहेत. खरतर अर्थ त्रिकोणातील हे एक स्थान आहे. अर्थ त्रिकोणात ६ वे स्थान प्रयत्न, संघर्ष वा नोकरी दर्शवते. १० वे स्थान कर्म अथवा व्यवसाय दर्शवते. आणि २ रे स्थान जे धन स्थान मानले जाते (जे आरोग्यासाठी एक मारक स्थान आहे). आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सर्वच जन भौतिक सुख व पैसा अडका मिळवण्यासाठी प्रचंड धकाधकीचे आयुष्य जगत असतात. व ही दगदग शरीरास असह्य झाली की आजार निर्माण होतात. आपण औषधोपचार घेतो व पटकन बरे व्हायचा विचार करत असतो. पण या सर्व रस्सीखेच शर्यतीत आपण आपल्या मनावर प्रचंड ताण निर्माण करत असतो, त्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो.

एखादा पेशंट हास्पिटलमध्ये अॅडमिट असतो. त्याच्या प्रकृतीत काही केल्या सुधारणा दिसत नसते. नातेवाईक डॉक्टरना विनवत असतात की, “काहीही करून आमच्या पेशंटला बरे करा”. तेव्हा डॉक्टर सांगतात, ‘अहो, आम्ही खूप प्रयत्न करतो आहोत. पण पेशंटचा ” ट्रीटमेंटला रिस्पॉन्सच मिळत नाहीये.”

आता पेशंटचा रिस्पॉन्स नाहीये म्हणजे काय ? याचा अर्थ डॉक्टरांनी नुसती औषधे शरीरात पाठवून उपयोग नसतो. पेशंटने त्या औषधांना प्रतिसाद द्यावा लागतो. तरच औषधांचा परिणाम शरीरावर होतो. पेशंट प्रतिसाद देत नाही म्हणजे पेशंटचे शरीर आणि मनही प्रतिसाद देत नसते. कोणत्याही आजारात, कोणत्याही ट्रिटमेंटमध्ये पेशंटच्या शरीर आणि मनाचा प्रतिसाद उत्तम असणे आवश्यक असते. जर आपण आपल्या मनाची शक्ती वाढवली तर आपल्याला आरोग्यप्राप्ती आणि रोगमुक्ती मिळवता येते. यासाठी आपल्या मनाबद्दल आणि त्याच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊ या.

माणसाला मन असते, पण शरीराच्या आतही कुठे मन नावाचा अवयव नाही. कारण, मनाला भौतिक अस्तित्व नाही. म्हणजे मनाला आकार, वजन नाही. ते डोळ्यांनी दिसत नाही, पण तरीही मनाचे अस्तित्त्व असते. मन आपल्या अनुभवाला येते. या मनाची आपल्या आरोग्यामध्ये फार महत्त्वाची  भूमिका असते, कारण व्यक्ती ही मन आणि शरीर दोन्हींची मिळून बनलेली असते. आपल्या आयुष्यात जे काही घडते ते आपल्या मनाच्या इच्छेमुळे. मनाप्रमाणे शरीरात बदल होतो. जरी आपण म्हणतो की शरीराला इच्छा होते. तरी ते पूर्ण सत्य नाही. माझ्या जिभेला गोड खाण्याची इच्छा झालीय, असे आपण म्हणतो. पण ती इच्छा खरी मनाची असते. जिभेला गोड चव आवडत असती, तर सर्वच व्यक्तींच्या जिभेला ती आवडली असती. पण तसे होत नाही. आवड निवड हे मन ठरवत असते. आपल्याला होणाऱ्या आजाराचे मूळ कारण हे कित्येक वेळेला मन असते. मनोकायिक आजार (सायको सोमॅटिक डिसिजेस) हा शब्द आपण ऐकला असेल. मनाचा परिणाम शरीरावर होऊन निर्माण झालेले आजार. सध्या वाढत्या प्रमाणात असलेले आजार म्हणजे मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, त्वचेचे आजार, श्वसनसंस्थेचे आजार, कॅन्सर असे अनेक आजार मनातील नैराश्य, चिंता, ताण यामुळे होतात, असे संशोधन सांगते. त्यामुळे कोणत्याही आजारामध्ये शरीराला ट्रिटमेंट देण्याबरोबरच त्याला मनाची शक्ती वाढवण्यासाठीच्या उपायांची जोड देणे गरजेचे आहे. मनाचा परिणाम शरीरावर होतो आणि ते रोज आपण अनुभवत असतो.

उदा. आपल्याला जो राग येतो, तो आपल्या मनाला येतो का शरीराला? तुम्ही म्हणाल मनाला, पण मन दिसत नाही, मग राग कसा दिसतो? एखादी व्यक्ती रागावली आहे हे आपल्याला कसे समजते? रागावलेल्या व्यक्तीचा चेहरा संतापाने लालबुंद होतो. डोळे मोठे होतात, तो माणूस मोठमोठ्याने बोलत राहतो. हे वर्णन तर शरीराचे झाले ना. याचाच अर्थ राग मनाला आहे पण त्याचा परिणाम शरीरावर दिसतो आहे. रागावलेल्या व्यक्तीचे हे झाले बाह्य वर्णन, पण रागामुळे. व्यक्तीच्या शरीरांतर्गतही अनेक बदल होत असतात. हृदयाचे ठोके वाढतात, नाडीगती वाढते, रक्त तापते इ.

आता मनातल्या रागाचा जो शरीरावर परिणाम झालेला असतो, त्यामुळे शरीरांतर्गत चाललेली अनेक महत्त्वाची कामे थांबतात. रागामुळे जो बिघाड झालेला असतो, तो दुरुस्त करण्यासाठी शरीरातील पेशींना काम करावे लागते. रागावलेल्या व्यक्तीला या सगळ्याची जाणीव नसते. तिला अस वाटत असत की मी रागावून समोरच्या व्यक्तीला कसं गप्प केलं. पण रागामुळे आपण त्या व्यक्तीच थोड आणि स्वत:चं जास्त नुकसान केलं आहे, हे तिला समजत नाही. जस रागाचं आहे तसं इतर भावनांचंही आहे. आपल्या मनातील प्रत्येक भावनेचा परिणाम: आपल्या शरीरावर होत असतो. नकारात्मक भावनांचा नकारात्मक आणि सकारात्मक भावनांचा सकारात्मक परिणाम होतो. नकारात्मक भावनांमुळे आजार निर्माण होतात. आपण रागावलो की शरीरावर जो परिणाम झालेला असतो, तो शरीर काही वेळात दुरुस्त करते. पण आपण सतत रागवत राहिलो तर शरीरावर त्याचे सखोल परिणाम होत राहातात आणि त्यातून पुढे दीर्घ आजारांची निर्मिती होऊ शकते.

माणूस आयुष्यभर इंद्रियांच्या साहाय्याने बाह्य जगातील सुखाची लयलुट करतो. त्या इंद्रियांना सुखाचे साधन म्हणून वापरतो. बाह्य जगातील भौतिक सुख प्राप्तीसाठी गतीशील राहतो. अशा साधनांकडून मिळालेल्या सुखाची सवय, त्याच्या मनाला लागलेली असल्यामुळे, ते मन प्रतीगतीच्या नियमानुसार सतत दुःख भोगत राहाते. अशाप्रकारे भावना आणि सुखगती यांच्याशी गुंफण घातलेल्या माणसाला, दुःखगतीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. रोगाची निर्मिती हा त्याचाच परिणाम आहे. माणूस मरणाला घाबरतो, यामागील सुप्त कारण कदाचित हेच असेल की त्याला जगण्याची आस असते.

६ वे स्थान वासना देखील दर्शवते. रिपू स्थान म्हणजे शरीराचे किंवा आपले शत्रू यात आपले मन भावनांना, विकारांना, वासनेला, मोहाला, बळी पडून आपला शत्रू बनते हे आपण सोयीस्कर विसरतो.हे षड रिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया. या भावना आपण अतिरेकाने वापरतो. आयुष्यात भावना हव्यातच. पण या सहा भावना संयमाने आणि नियमाने वापरल्या तर त्या आपल्या मित्र ठरतात. आपल्या बाबतीत जे काही चांगले आणि वाईट घडत असतं, तो आपणच निर्माण केलेल्या कारणांचा परिणाम आहे. आपण जे वागतो, निर्णय घेतो, कृती करतो याचा परिणाम म्हणून आपल्याला सुख किंवा दुःख येते. आपल्या सुख- दुःखाला आपणच जबाबदार असतो. आपण आपल्या मनाने ठरविल्याप्रमाणे आपण वागत सुटतो. त्याचे परिणाम आपल्याला स्वीकारावे लागतात. आपल्या आजारांना, दुखांना आपण इतर व्यक्तींना जबाबदार समजत असतो. जो पर्यंत आपण जबाबदार आहोत हे आपण मान्य करत नाही. तो पर्यंत आपल्याला आपले प्रश्न सोडविता येत नाहीत.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी माझ्या अभ्यासानुसार आजारी पडण्याआधीच तुमचा धर्म त्रिकोण बळकट केला तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम आयुष्यावर झालेला दिसेल.

१, ५, ९ हि स्थाने धर्म त्रिकोण दर्शवतात.

१ ले स्थान आपले व्यक्तिमत्व दर्शवते. व्यक्तिमत्त्व हे शरीर व स्वभाव या दोन्हीचे मिश्रण आहे.

शरीर उर्जा टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करा.

मानसिक शक्ती टिकवण्यासाठी स्वत:मध्ये कोणत्या नकारी आणि अतिरेकी भावना बिघडल्या आहेत याचे परीक्षण करा आणि जाणिवपूर्वक त्या भावनांचे संयमन करा.

५ वे स्थान खेळ, क्रीडा, कला, उपासना दर्शवते.

शाररीक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही मैदानी खेळाची आवड जोपासू शकता.

मानसिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही संगीत, कला याचा आधार घेऊ शकता. आजकाल रोगमुक्तीसाठी म्युझिक थेरपी चा वापर केला जातो. तसेच उपासना सुचवण्या मागे हे ही एक कारण असते की, मनातील विकार नाहीसे झाल्याने मन शांत होऊन एकाग्रता वाढीस लागते. मनात सकारात्मक भावना निर्माण झाल्याने आत्मसंयमन करता येते. आपले आजार मन अस्थिर झाल्यामुळे तसेच आपली कृती (६ वे व १० वे स्थान) बिघडल्यामुळे होतात. प्रत्येक माणसाला ५०% सुख आणि ५०% दुःख मिळते. कोणीही अतिदुःखी किंवा अतिसुखी नसतो. आपल्याला काय मिळाले नाही हे आठवून रडत बसण्यापेक्षा काय मिळाले याचा विचार करून समाधानी रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे मन शांत, खंबीर, धैर्यशील होते. म्हणून तुम्ही घेत असलेल्या सावधानी/औषधोपचारांना मनाचा समतोल राखणेसाठी कला, क्रीडा, संगीत, उपासना याची जोड द्या.

९ वे स्थान धार्मिकता अध्यात्मिकता, नीती, उपासना, प्रगती ई. दर्शवते.

भौतिक प्रगती करत असताना, कीर्ती मिळवता असताना समतोल साधण्यासाठी त्यात नीती व्यवहार असणे महत्वाचे असते. तसेच मला काय मिळायला पाहिजे यापेक्षा मी कोणाकोणाचे देणे लागतो याचा विचार करायला हवा. आपले आईवडील, कुटुंब, समाज, देश आणि निसर्ग यांच्याकडून खूप काही मिळत असते. त्यांच्या प्रती आपले देण्याचे कर्तव्य जाणून जाणीवपूर्वक आपण निरपेक्ष काम केले पाहिजे. कुटुंबासाठी आपण करतो, पण समाजाप्रती करायचे राहून जाते. आपल्या श्रमाचा आणि धनाचा नियोजित वाटा दर महिन्याला त्यागरूपाने समाजातील दुःख दूर होण्यासाठी द्यायला हवा.

ध्यान म्हणजे जाणीवपूर्वक स्वार्थी बुद्धीला विश्रांती देणे. ध्यानामुळे आत्मविश्वास व शारीरिक क्षमता वाढतात. ध्यानाचे परिणाम आपल्या मनावर मेंदूवर शरीरांतर्गत कार्यावर अतिशय चांगले होतात. रोज संध्याकाळी साडेसात वाजता दिव्याच्या ज्योतीवर १२ मिनिटांचे ध्यान करावे. यामुळे दिवसभरातील ताणतणावाचे स्वतःवर झालेले दुष्परिणाम दूर होतात. मनशांती वाढते.

तसेच उपासना, देवदर्शन आदि गोष्टी देखील मनाचे पावित्र्य आणि शांती टिकवण्यास उपयुक्त ठरतात. भाग्य स्थान तुम्ही अशा पद्धतीने लिहिले तर श्रमदान सार्थकी लागेल. ( १० वे चे १२ वे स्थान जे श्रमाचे दान दर्शवते.) त्याग, दान आणि सत्कृत्याची जोड माणसाला उन्नती प्रदान करते.

शरीर हे जड माध्यम असल्यामुळे प्रकृतीचे नियम लागू असतात. न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे अॅक्शनला रिअॅक्शन असते. रिअॅक्शन ही अॅक्शनच्या सम प्रमाणात आणि विरूद्ध दिशेने असते. शरीराच्या अॅक्शनमधून मन सुख भोगते. त्यामुळे रिअॅक्शन स्वरूपात दुःख त्याच्याकडे येते. यानुसार सुखाचे दुःखात आणि दुःखाचे सुखात रुपांतर होत असते. आजाराचे दुःख घालवायचे असेल तर औषध उपचार याचे दुःख सकारात्मक भावनेने घ्यायला हवे.

या भावनांवर संयमन न करता आपण आजारात नुसते औषधोपचार केले, तर त्याचा परिणाम नीट होत नाही. म्हणून कोणाचाही आजारामध्ये शरीराबरोबर मनालाही ट्रिटमेंट देणे आवश्यक आहे. मनाला ट्रिटमेंट देण्यासाठी प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जावेच लागते असे नाही. आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करून आजाराच्या आणि दुखाच्या मूळ कारणापर्यंत पोहोचणे, मनातील बिघाड जाणून तो दुरुस्त करणे

गरजेचे ठरते व मग त्यावर इलाज करणे सोपे जाते.

सर्वांना आरोग्यदायी सुखी जीवनासाठी शुभेच्छा !

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ग्रह गती आणि वक्री, स्तंभी, मार्गी ग्रह


विषय : ग्रह गती आणि वक्री, स्तंभी, मार्गी ग्रह

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : सुलभ ज्योतिष शास्त्र

नमस्कार,

आज आपण ग्रहांची गती आणि वक्री, स्तंभी व मार्गी ग्रह या बाबत माहिती घेणार आहोत.

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, आपल्या सूर्यमालेत सूर्याभोवती ७ ग्रह व छाया बिंदू राहू आणि केतू गोलाकार मार्गात फिरत असतात. या प्रत्येक ग्रहाची गती ही वेगवेगळी असते. व प्रत्येक ग्रह फिरताना पृथ्वीशी वेगवेगळे कोण तयार करत असतात. ज्योतिषशास्त्र हे भूमध्य पद्धतीवर आधारित असल्यामुळे पृथ्वीवरून जे काही दिसते, जसे दिसते ते तसेच त्याचे परिणाम पृथ्वीवर होणार या आधारे ज्योतिषशास्त्रातील फलिताची रचना करण्यात आली आहे.

ग्रहांच्या विविध गती : अयन म्हणजे गती. ज्योतिष शास्त्रातील सायन व निरयन अशा दोन पद्धती आहेत. सायन म्हणजे गती सह व निरयन म्हणजे गती वजा करून स्पष्ट ग्रह काढण्यासाठी वापरलेली पद्धत. या साठी ग्रहांच्या वेगवेगळ्या गती माहीत असणे आवश्यक आहे.

चंद्र सोडला तर कोणत्याही ग्रहाची गती २ अंश ४० कलेपेक्षा जास्त नसते.

१. शनिची गती : ३ ते ४ कला असते.

२. गुरूची गती : ६ ते ७ कला असते.

३. मंगळाची गती : ३० ते ३५ कला

४. रविची गती : १ अंश

५. शुक्राची गती : १ अंश १० ते १५ कला

६. बुधाची गती. अर्धा अंश ते २ अंश

७. चंद्राची गती १५ अंश.

ग्रह गती व कोनानुसार ग्रंहांच्या ३ स्थिती तयार होतात.

१. मार्गी ग्रह

२. वक्री ग्रह

३. स्तंभी ग्रह

या तीन स्थिती पैकी मार्गी व वक्री ग्रह या स्थिती फलितासाठी महत्वाच्या आहेत.

१) मार्गी ग्रह : प्रत्येक ग्रह अवकाशात रोज आपल्या विशिष्ट मार्गाने पुढे पुढे जात असतो. म्हणून पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये त्यांच्या अंश, कला दररोज वाढताना दिसतात. त्यालाच ‘मार्गी ग्रह’ असे म्हणतात. ग्रह मार्गी असल्याचे पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये मुद्दाम लिहून दर्शविले जात नाही. रवि आणि चंद्र हे दोन ग्रह कायम मार्गीच असतात व कधीही वक्री होत नाहीत.

२) वक्री ग्रह : जे ग्रह अवकाशात रोज मागे मागे जाताना दिसतात, म्हणजे भासतात, त्यांना ‘वक्री ग्रह’ असे म्हणतात. पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये त्यांच्या अंश, कला दररोज कमी कमी होताना दिसतात.प्रत्यक्षात वक्री ग्रह ही भासमान गोष्ट आहे. ज्या वेळी एखादा मंदगती ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ आल्यास, पृथ्वीच्या जास्त गतीमुळे तो ग्रह मागे मागे जाताना दिसतो म्हणजे भासतो. तो ग्रह प्रत्यक्षात मागे जात नसतो. केवळ तो मागे मागे जात असल्याचा भासतो.

ज्या दिवशी ग्रह वक्री होतो त्या दिवशी पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये स्पष्ट ग्रहांमध्ये त्या ग्रहांसमोर वर किंवा खाली वक्री किंवा कंसात (व) असे लिहिलेले असते व ज्या वेळी तो पुन्हा मार्गी होतो त्या वेळी ‘ मार्गी असे लिहिलेले असते.

रवि आणि चंद्र हे दोन ग्रह कधीही वक्री होत नाहीत, तर  राहू व केतू हे बिंदू नेहमीच वक्री म्हणजे उलट्या दिशेने फिरत असतात, म्हणून त्यांना मार्गीच समजतात व पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये ते ग्रह वक्री असल्याचे लिहिले जात नाही.

बुध साधारणपणे वर्षातून दोन ते तीनदा १० ते १३ दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण २४ ते ३० डिग्री असते.

शुक्र साधारणपणे १८ महिन्यातून ४० ते ४३ दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण ५ ते ८ डिग्री असते.

मंगळ साधारणपणे २ वर्षातून ६० ते ८० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण ८ ते १५ डिग्री असते.

गुरु साधारणपणे १३ महिन्यातून १२० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण ९ ते १५ डिग्री असते.

शनि साधारणपणे वर्षातून १४० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण ६ ते १२ डिग्री असते.

हर्शल साधारणपणे वर्षातून १५० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण २ ते १० डिग्री असते.

नेपच्यून साधारणपणे वर्षातून १६० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण १ ते ३ डिग्री असते.

प्लुटो साधारणपणे वर्षातून १६० दिवसांच्या अवधीसाठी वक्री होतो. व कोनात्मक अंतर साधारण १ ते ३ डिग्री असते.

३ ) स्तंभी ग्रह : मंदगती ग्रह ज्या वेळी मार्गीकडून वक्री होतो किंवा वक्रीकडून मार्गी होतो, त्या वेळी काही काळ एकाच जागेवर स्थिर असल्याचे भासतो. त्यालाच ‘ स्तंभी ग्रह ‘ असे म्हणतात. पंचांगामध्ये किंवा एफिमेरीजमध्ये त्याच्या अंश, कला स्थिर असतात.

कुंडलीतील वक्री ग्रह फलादेशाच्या दृष्टीने विशेष बलवान समजले जातात, कारण त्या ग्रहांचे वास्तव्य एकाच राशीत किंवा एकाच नक्षत्रात बराच काळ असते, तर स्तंभी ग्रहाच्या कारकत्वात न्यूनता निर्माण करतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

पक्षी प्राणी, साप ई. स्वप्न फळ


विषय : पक्षी प्राणी, साप ई. स्वप्नात दिसणे

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्वप्न शृंखला

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

पुष्य नक्षत्र विचार


विषय : पुष्य नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण पुष्य नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

८. पुष्य नक्षत्र :

पुष्य नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील ८ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचे ४ ही चरण कर्क राशीत असल्याने ते चतुष्पादि आहे. नक्षत्राचा स्वामी शनि, राशी स्वामी चंद्र व दैवत बृहस्पती असून ते देवगणी असल्याने या नक्षत्रात शनीचा मुत्सद्दीपणा, चंद्राचे लावण्य व मोद, बृहस्पतीचा उदात्तपणा व न्यायीपणा अशा विविध गुणांचे सुरेख मिश्रण आढळून येते. नक्षत्राच्या ४ चरणांवर अनुक्रमे रवि, बुध, शुक्र व मंगळ यांचे स्वामित्व आहे. तसेच ते ऊर्ध्वमुख, लघु व अंधलोचणी आहे. इंग्रजी नाव ‘डेल्टा कांक्री’ आहे.

पुष्य या नक्षत्राचा अर्थच पुष्ट होणे, भरणे हा आहे. रवि या नक्षत्रात आला की वनस्पती व जीवांचे पोषण होते. कणसे भरून झाडे व सृष्टीवरचे जीव पुष्ट होतात. नवे जीव जन्माला येतात.

एकदा देवाला कोणीतरी विचारणा केली, की तू कोणासोबत आहेस? तेव्हा देवांनी उत्तर दिले की, पुष्य नक्षत्र ज्याचे असेल त्याला देवाचा पाठिंबा आहे. पुष्यात कोणताही ग्रह असला तरी तो शुभ फल देईल. असे हे श्रेष्ठ नक्षत्र म्हणजे नक्षत्रांचा राजाच होय. त्यातून पुष्य नक्षत्रात चंद्र व गुरु असणे म्हणजे दुग्ध शर्करा योगच होय.

प्रजाहितदक्ष श्री प्रभु रामचंद्रांचा चंद्र पुष्य नक्षत्री होता. कर्तबगार व महत्त्वाकांक्षी भूतपूर्व पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे लग्न व शनी पुष्य नक्षत्री होते, तर लोकशाही वाचविण्यासाठी झगडणारे व अंधारातील प्रकाश के. जयप्रकाश नारायण यांचे लग्नही पुष्यच होते. लोकमान्य टिळकांचे लग्नही पुष्यातच होते. सर्वजण निरनिराळ्या पक्षांचे होते. मग असेनात का? नद्यांचे प्रवाह विविध दिशेला जातात, पण नदी शेवटी सागरालाच मिळते. तसेच पुष्य नक्षत्राच्या सर्व व्यक्ती जनसागरातच विलीन होतात. पुष्य नक्षत्र हे लोक प्रातिनिधिक राजनक्षत्र आहे. नदी जशी आपल्या स्वच्छ व वाहत्या पाण्याने आजूबाजूची गावे सुपीक करते, शेत व बागा फुलवते. तशी पुष्य नक्षत्रावरची माणसे लोकांच्या आयुष्यात आनंद फुलवतात.

पुष्य नक्षत्र मात्र थोडेसे प्रसिद्धीविन्मुखच दिसते. कारण आकाशात ते ओळखता येणे कठीणच असते. हे नक्षत्र दिसण्यात थोडे फिकट आहे. या नक्षत्रामध्ये ३ तारे असून ते त्रिकोणासारखे आहेत. रंग पांढरा व पिंगटसर आहे. त्रिकोणाच्या आकाराच्या या नक्षत्रात मध्यभागी एक प्रकाशाचा ठिपका आढळतो. हा एक प्रसिद्ध तारकागुच्छ असून त्यालाच मधाचे पोळे असे म्हणतात. याच्याकडे छोट्या दुर्बिणीतून पाहिल्यास त्यात सुटे ४० तारे दिसतात. तर प्रभावी दुर्बिणीच्या साहाय्याने पाहिल्यास त्यात ३६३ तारे दिसतात. काळोख्या रात्री हे नक्षत्र डोक्यावर आले म्हणजे ही जाळी स्पष्ट दिसते. पौष महिन्यात हे नक्षत्र रात्रभर दिसते. इजिप्शिअन लोकांनी पोळ्याच्या ऐवजी गुरांच्या गव्हाणीची कल्पना दिली असून ग्रीक लोकांच्या मते मनुष्याच्या शरीरात प्रवेश करणारे आत्मे स्वर्गातून पृथ्वीवर उतरताना या द्वारातून उतरतात अशी समजूत आहे. देवगुरू बृहस्पती यांचा जन्म पुष्य नक्षत्रातच झाला. प्रथम या नक्षत्राजवळ गुरु असता हे नक्षत्र दिसत नव्हते, नंतर गुरु पुढे गेल्यावर या नक्षत्राचा शोध लागला.

पुष्य हे नक्षत्र अत्यंत शुभ, देवगणी व सत्त्वगुणी आहे. या नक्षत्रावर जन्मणारे जातक आनंदी, समाधानी, परोपकारी, उदार, न्यायी, नीतिमान, कायदा पाळणारे, सत्यभाषणी, विद्वान, सदाचारी, ईश्वरभक्त, परमार्थी, समाधानी, लोक कल्याणासाठी झटणारे, समयसूचक, दानशूर, लोकांना सन्मार्गाला लावणारे, महत्त्वाकांक्षी, उदात्त आचारविचार असणारे असतात. पुष्य नक्षत्र हे पराक्रमी व अधिकार देणारे व उच्चपदाला नेणारे आहे. सोन्याच्या संग्रहासाठी हे नक्षत्र चांगले. या नक्षत्रात इतकी संपत्ती आहे की एखाद्या पारड्यात पुष्य याची संपत्ती व दुसऱ्या पारड्यात कुबेराचे भांडार टाकले तरी पुष्याचेच पारडे जड राहील असे मानतात. गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असला म्हणजे होणारा गुरुपुष्यामृत योग तर प्रसिद्धच आहे.

पुरुष व स्त्रिया दोघांनाही पुष्य नक्षत्र अनुकुल आहे. या नक्षत्रावर जन्मलेले पुरुष जातक उंच व भरलेले भारदस्त शरीर व प्रमाणशीर बांध्याचे असतात. अवयव मोठे व गोल, चेहरा भव्य व वाटोळा, प्रसन्न व शांत असतो. कपाळ भव्य असते. अवयव मांसल असतात. शारीरिक उर्जा व रोगप्रतिकारक शक्ती ठीक असते. जातक स्वभावाने शांत, आनंदी, हौशी व रसिक असतात. जातक बुद्धिमान व हुशार असून  थोडीशी अधिकारलालसा असते. अधिकार गाजविण्याची किंवा पुढारीपणाची कामे चांगली जमतात.

पुष्य जातक स्त्रियांना तर हे नक्षत्र शरीरप्रकृती, सौंदर्य, संपत्ती, गुण व अधिकार बहाल करते. विशेष म्हणजे हे नक्षत्र स्त्री व पुरुषांत फार भेद करत नाही. कारण या नक्षत्रात स्त्री व पुरुष असे दोघांनाही लागणारे शूर धाडसीपणा, स्वावलंबित्व, कोमलपणा, वात्सल्य, प्रेम इ. गुण प्रदान करते. या नक्षत्रावरच्या स्त्रिया म्हणजे राजाच्या राणी होत. यांचा बांधा उंच व प्रमाणशीर आडवा, भव्य, भारदस्त पण प्रमाणबद्ध, अवयव, पुष्ट, गोलाकार व मांसल असतात. चेहरा सुंदर मोहक, आकर्षक, प्रसन्न, गोड व देवीसारखा असतो. चेहऱ्यावर ज्ञान आणि मोठेपणाची झाक असते. या स्त्रियांचे सौंदर्य त्यांच्या शांत, प्रसन्न व समाधानी चेहऱ्यात असते. स्वभावाने शांत, आनंदी, होशी, रसिक, दयाळू पण वेळप्रसंगी कठोर होणाऱ्या, सत्याची व न्यायाची चाड असणाऱ्या असतात. अंगावर फार ठळक दागिने किवा भरदार वस्त्रे नसली तरी त्यांचे राजतेज लपत नाही. साध्या पोषाखातदेखील त्या सुंदर व आकर्षक दिसतात. विद्येची किंवा अधिकाराची हौस व जागरुक असून वागण्यात विचारीपणा आढळतो. दागिन्यांची किंवा सोन्याची हौस, अनुरूप व योग्य तेवढीच फॅशन करणाऱ्या असतात. असतात. आपले स्त्रीत्व कायम ठेवूनच त्या सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करताना दिसतात. पुष्याची स्त्री म्हणजे एक जगत्माताच आहे.

पुष्य नक्षत्राखाली येणारा वर्ग म्हणजे राजे, युवराजे, सरकारी अमलदार, मोठे अधिकारी, सरकारात मोठ्या पदावर काम करणारा वर्ग, न्यायाधीश, वकील, बरिस्टर्स, सोने, चांदी, हिरे माणकांचे व्यापारी, धनिक शेतकरी, बागवान, शीतपेयांचे व्यापारी, मोठमोठे पुढारी, राजकीय मुत्सद्दी, परदेशी वकील असा धनिक व उच्च अधिकारी वर्ग येतो.

पुष्य नक्षत्री रवि असता शरीरसंपत्ती व अधिकार योगाला चांगला. सदाचारी, ईश्वरभक्त, लोकप्रिय, सार्वजनिक हिताची कामे करणारा, प्रसिद्धी व आपले नाव मागे ठेवणारा होतो.

पुष्य नक्षत्री चंद्र रूप, संपत्ती व सुख अशा सर्वच दृष्टीने अनुकूल असतो. धनवान, हौशी, रसिक व कलाप्रिय असतो. लांबचे प्रवास करणारा असतो.

पुष्य नक्षत्री मंगळ असता शरीर प्रकृतीच्या दृष्टीने कमजोर पण अधिकाराला बरा असतो. गर्विष्ठ, मोठ्यांची निंदा करणारा, भिडस्त असतो. काही वेळा मंगळ इंजिनिअरिंगला चांगला.

पुष्य नक्षत्री बुध असता बांधा फोफसा व आडवा असतो. भक्तिवान, वकील, कायदेपंडित, थोडा ढोंगी, विद्वानांचा द्वेषी असतो.

पुष्य नक्षत्री गुरु फारच चांगला असतो. अवयव पुष्ट व मोठे असतात. चेहरा भव्य व मोठा असतो. पुष्य नक्षत्री शुक्र या नक्षत्रात रूप व धनाच्या दृष्टीने चांगला. मात्र चैनी, विलासी, रंगेल व ख्यालीखुशालीत दंग असणारा असतो. वाहन सौख्यालाही गुरु शुक्र चांगले.

पुष्य नक्षत्री शनी असता शरीरप्रकृती वातुळ असते. साधारण बुद्धिमत्ता, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी, धूर्त पण साहसी, सहनशील, सात्त्विक विचारांचा, नीतिमान व कुटुंबवत्सल असतो. परदेशातील वकिलाती व मुत्सद्दी यांसाठी चांगला.

पुष्य नक्षत्री राहू मात्र फारसा अनुकूल नसतो. शरीरप्रकृती बिघडवतो. त्वचेचे विकार व पोटाच्या विकाराची भीती असते. मानसिक नैराश्य फार येते.

पुष्य नक्षत्री केतू शरीरप्रकृतीला किंवा विदयेला अनुकूल नसतो. केतू हा धार्मिक, दैविक व आध्यात्मिक विधेच्या दृष्टीने चांगला. मंत्रतंत्राची आवड देतो. बुद्धी मंद असते. अति धार्मिक असतो.

पुष्य नक्षत्री हर्षल बुद्धी व संपत्तीच्या दृष्टीने बरा असतो. बुद्धी कल्पक व शोधक असते. चैनी व विलासी असतो.

पुष्य नक्षत्री नेपच्यून शुभ मानला जातो. शरीरकांती चांगली असते. चेहरा भव्य असतो.

पुष्य नक्षत्री नेपच्यून दैविक विद्या, अंतःस्फूर्ती, अंतर्ज्ञान यांना अनुकूल. प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती, कला व संगीत यांना चांगला.

या नक्षत्रावर होणारे आजार फार दाहक नसले तरी दीर्घ मुदतीचे असतात. रोग सुखवस्तू लोकांनाच जास्त होतात. शीत विकार, थंडी, वात, पोटाचे विकार, अपचन, आतड्याचे विकार, मधुमेह, कॅन्सर, स्त्रियांना स्तनाच्या कॅन्सरची संभावना असते. शौचाच्या तक्रारी, जलोदर, पित्त, पंडूरोग, पोटात वात धरणे, आंबट किंवा करपट ढेकर येणे, किंवा रक्तन्यूनतेमुळे येणारा पांडुरता हे संभाव्य आजार होत. खाण्यापिण्यात समतोलता व नियमित व्यायाम ही पथ्ये पाळल्यास आरोग्य चांगले राहते. पाप ग्रह असता अॅपेंडिसायटीस, ट्यूमर किवा आतड्याची कॅन्सरची भीती राहते.

हस्ताक्षर गोल, मोठे व ठळक असते. विशेषतः व, ब, ट, ठ, ळ, श अशा अक्षरातील वळण गोल व मोठे असते. या नक्षत्रावर ४ व ८ या अंकाचे वर्चस्व दिसते. गुरूचा पुष्कराज किंवा चंद्राचा मोती लाभदायक असतो. नक्षत्र अंधलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती वस्तू पूर्वेला शोधल्यास सहज सापडू शकते.

मुहूर्त शास्त्रात या शुभ नक्षत्राचे महत्त्व फार आहे. पुष्य नक्षत्रावर घर किंवा देवालय बांधण्यास आरंभ करणे. राज्याभिषेक, सोने किंवा चांदी, हिरे, माणके, अलंकार अथवा वस्त्रे यांचे नवीन दुकानाचे उद्घाटन, सोने किंवा अलंकार घेणे अथवा धारण करणे. विद्यारंभ, औषध घेणे, मुलांचे नाक व कान टोचणे, नांगर धरणे, बी पेरणे, अग्निहोत्रादी क्रिया, यज्ञमाग, वृक्ष लावणे, मौजी यांना फार चांगले. हे राजनक्षत्र शुभ असले तरी विवाहाला मात्र फारसे अनुकूल नसते. म्हणून पंचांगातही गुरुवारी पुष्य नक्षत्र आले असता गुरुपुष्यामृत सिद्धियोग (विवाहास वर्ज्य) असे लिहिलेले आढळते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)