
ॐकार व बीजाक्षर साधना व ज्योतिष शास्त्र
मानवी शरीर हे रोगांचे माहेरघर आहे व म्हणूनच ते निरोगी कसे राखावे याचा विचार आमच्या पूर्वजांनी (ऋषीमुनींनी) फार पूर्वी केला आहे.
मानवास भौतिक, अधिभौतिक व अध्यात्मिक अशा प्रकारांपासून होणारे त्रासांपासून मुक्ती वा सुटका होण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. आपल्या पूर्वजांनी याचा सखोल विचार करुन मंत्र, तंत्र व यंत्र यासारख्या उपाय योजना केल्या. यात कंपनशास्त्र हा मूळ गाभा आहे व मूळ शिवस्वरोदय शास्त्रा मधे आहे. यात मानवी शरीर, त्यातील प्राणरुपी चैतन्य, पंचमहाभूतांची तत्वे व त्यांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम याचा सखोल विचार आहे. स्वर म्हणजेच श्री शिवशंकर असून बम्हांड व पिंड या स्वरांमुळेच निर्माण झाले आहे. स्वर आणी श्वास यांचा अतुट संबंध आहे.
शरीरात रोग कधी निर्माण होतो या प्रश्नाचे उत्तर ज्या नाकपुडीतून स्वर ज्यावेळी निघावयास हवा तेव्हा तो तसा त्या नाकपुडीतून न निघणे असे आहे. अशा वेळेस विरुद्ध स्वर वाहू लागतो. तत्त्वांचा क्रम बदलला जातो आणि विपरित स्वर वाहण्यास सुरुवात होते. म्हणून शरीरात रोग उद्भवतो. आपला देह प्राणाच्या सम्यक वहनावर व्यवहार करतो ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवावयास पाहिजे. म्हणूनच तत्त्वाची वेळ व क्रम यांना जागेवर आणल्यास रोग निवारण होईल. अर्थातच माणसाचे खाणे-पिणे, स्वभाव, वागणूक, मानसिक स्थिती या गोष्टींवरसुद्धा माणसाचे आरोग्य अवलंबून असते.
मानवी देहाची यंत्रणा समजून घेतल्यावर, श्वास जरी कोणत्याही नाकपुडीतून वहात असला तरी त्या श्वासाचे स्पर्शावरून शरीरात कार्यरत असलेली वेगवेगळी तत्त्व ओळखता येतात. ते कसे हे पाहू.
श्वास मधोमध वाहत असेल तर पृथ्वीतत्त्व.
श्वास नाकपुडी तळाशी स्पर्श करत असेल तर आपतत्त्व.
श्वास नाकपुडीचे वरच्या भागास स्पर्श करत असेल तर तेज तत्त्व.
श्वास तिरकस असेल तर वायुतत्त्व व
श्वासाचे संक्रमण होत असेल तर आकाशतत्त्व सुरू आहे असे जाणावे.
प्रत्येक वाहणाऱ्या श्वासाची लांबी वेगवेगळी असते.
पृथ्वीतत्त्व – १२ अंगुळे, आपतत्त्व – १६ अंगुळे, तेजतत्त्व – ४ अंगुळे, वायुतत्त्व – ८ अंगुळे, आकाशतत्त्व अस्पष्ट.
निरोगी माणसाचे एका नाकपुडीतून प्राणवायू अडीच घटका म्हणजे एक तास वाहत असतो व तत्त्वेही क्रमवार पद्धतीने सुरू असतात. पृथ्वीतत्त्व = २० मिनिटे, आपतत्त्व = १६ मिनिटे, तेजतत्त्व = १२ मिनिटे, वायुतत्त्व = ८ मिनिटे, आकाशतत्त्व = ४ मिनिटे. सर्व तत्त्वांच्या वेळेची बेरीज साठ मिनिटे म्हणजेच एक तास होते.
या साठ मिनिटात प्रत्येक तत्त्व हे निर्देशलेल्या आपल्या गतीने वाहत असते. या तत्त्वांचा कालावधी कमी-अधिक झाल्यास मानवाचे आरोग्यास तसेच निरोगपणास बाधा निर्माण झाली आहे असे समजावे.
निरोगी माणसाचे बाबतीत स्वरातील तत्त्व वाहण्याचा क्रम असा आहे. प्रथम आकाशतत्त्व, नंतर वायुतत्त्व, नंतर तेजतत्त्व व आपतत्त्वास धरूनच पृथ्वीतत्त्व. परत आकाशतत्त्व असा क्रम सुरू असतो.
पृथ्वी व आपतत्त्व ही तत्त्वे शुभदायक मानली जातात तर उरलेली तीनही तत्त्वे तेज, वायु व आकाश ही शुभकारक मानली जात नाहीत. सर्वसाधारणपणे नीट विचार केल्यास एका तासात फक्त दोनच तत्त्वांचे उदय हे शुभफलदायक असून बाकीचे अशुभ फल देणारे आहेत. यातूनच या शास्त्राचे महत्त्व लक्षात येईल.
वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्या पूर्वजांनी कोणत्या राशीत चंद्र असताना कोणते तत्त्व कार्यरत असावयास पाहिजे ते शोधले त्याबद्दल माहिती खालीलप्रमाणे
पृथ्वीतत्त्व ( भूमी तत्व ) : वृषभ, कन्या, मकर रास.
बीजाक्षर : लं
‘ल’ या बीजाक्षरात रोग्यास निरोगी बनवण्याची शक्ती आहे. या बीजाचा जप केल्यावर पृथ्वीतत्त्व उदय पावते.
आपतत्त्व ( जल तत्व ) : कर्क, वृश्चिक, मकर रास
बीजाक्षर : वं
‘वं’ या बीजाक्षरात चित्ताची एकाग्रता वाढवण्याची शक्ती आहे.
तेजतत्त्व (अग्नी तत्व ) : मेष, सिंह, धनु रास
बीजाक्षर : रं
‘ रं ‘ हे बीजाक्षर तेजतत्त्वाचे असून अग्नीमांद्य असलेल्या रोग्याने सूर्यस्वरात रं बीजाची आराधना केल्यास त्या व्यक्तीस सपाटून भूक लागते.
वायुतत्त्व : मिथुन, तुळ, कुंभ रास
बीजाक्षर : यं
‘यं’ बीज वायुतत्त्वाचे असून त्यामुळे नाकाचे तसेच बरेचसे वायुविकारांपासून सुटका होते.
आकाशतत्त्व : राशी नाहीत
बीजाक्षर : हं
प्रत्येक बीजाचा उच्चार करताना त्यापासून निर्माण होणारी कंपने ही वेगवेगळ्या वारंवारतेची असतात व त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असतो.
अशाप्रकारे विविध बीजाक्षरांचा उपयोग रोग निवारणासाठी आमच्या पूर्वजांनी सांगितला आहे.
ॐकार व बीजाक्षर साधना :
आपले शरीर व जीवन वायूवर अवलंबून आहे. आपण शुद्ध हवा आत घेतो व उच्छ्वासावाटे शरीरातील वायू बाहेर टाकतो. त्यामुळे शरीरातील क्रिया व्यवस्थित चालतात. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे वायू निरनिराळ्या ठिकाणी उपस्थित असतात. शरीरातले अनेक दोषही वायुरूपाने असू शकतात. हे दोष बाहेर काढून शरीर स्वच्छ, शुद्ध कसे ठेवावे व मनःशांती लाभून आनंदाचा उदय होतो. ह्यासाठी ही साधना सांगत आहोत. ( मात्र अखंडत्व राखता आले पाहिजे.)
ॐकार व बीजाक्षर साधना करताना प्राणायाम आपोआपच केला जातो. ही क्रिया व्यवस्थित व नैसर्गिकरीत्या करावयास पाहिजे. त्यात कृत्रिमपणा व आततायीपणा नको. शरीरात काही दोष असे असतात की जे अन्य कोणत्याही औषधाने दूर करता येत नाहीत; ते दोष, ही साधना योग्य प्रकारे व व्यवस्थित चालू असेल, तर दूर होऊ शकतात.
सुरुवातीला पाच मिनिटे जरी साधना केली तरी चालते. नंतर हळूहळू वाढवायला हरकत नाही. श्वास घेताना व श्वास बाहेर सोडताना ध्वनी निर्माण होतो ह्याकडे जाणीवपूर्वक व बारकाईने लक्ष द्यावे.
ॐ श्वास आत घेताना व आपले राशिचे बीजाक्षर श्वास बाहेर सोडताना स्मरावे. ही उपासना हळूहळू वाढवीत एक तासापर्यंत न्यावी. आज एक तास, उद्या अर्धा तास असे बदल कधीही करू नयेत. त्यात खंड पडू देऊ नये. ह्या साधनेचा आपल्या आहारावर परिणाम होतो. कमी आहारावर तृप्ती होते.
ॐकार व बीजाक्षर च्या लहरी एकसारख्या निघाल्या पाहिजेत. त्यातील लयबद्धतेने ध्वनिकंपने निर्माण होऊन त्याचा सुयोग्य परिणाम होतो. उपासनेनंतर शरीर हलके वाटते; तरतरी वाटते, मनाला शांतता व स्वस्थता लाभते. ही साधना करणान्याला हृदयविकार, मेंदूचा विकार, दम्याचा विकार व पोटाचा विकार होणार नाही. काही लोकांना विनाकारण कसली तरी भीती वाटत असते. भीती कशाची आहे ते नक्की सांगता येत नाही; पण या साधनेमुळे भीती निघून जाते व मनात धैर्य निर्माण होते. आपले प्रयत्न जर योग्य दिशेने झाले तर थोडा तरी अनुभव यायलाच हवा.
शुभं भवतु !
-ज्योतिषमित्र मिलिंद
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन साठी संपर्क : (७०५८११५९४७)
For More info Visit : jyotishmitramilnd.in
👌👍🏻
LikeLiked by 1 person
Khup detail information👌👌
LikeLiked by 1 person
Good job 👍
Rahul Indulkar, Pune
LikeLiked by 1 person
Chan mahiti 👍🏻
LikeLiked by 1 person