Category: Uncategorized

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे…


विषय : हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे …

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्वयंस्फुर्ती व स्व अभ्यास

खरच भारत हे एकमेव राष्ट्र आहे, जेथे अनेक देवदेवता प्रत्येकाच्या हृदयात वास करतात. या देशाला धर्म कार्याची प्राचीन परंपरा आहे. हेच ते राष्ट्र जेथे अनेक प्रेषित जन कल्याणा चे काम अंत्यंत तन्मयतेने आणि भक्तिभावाने कित्येक शतके पार पाडत आले आहेत.आणि चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचेच प्रकाश दानाचे कार्य व समाजातील अंध रुढींचा नायनाट करण्याचे कार्य लखलखत ठेवणार आहेत.

लाखो देशभक्तीपर गाणी असताना नेमके हेच गाणे का आठवले याचे कारण अगदी सोपे आहे. ज्योतिष अभ्यासक म्हटल्यावर त्याला सगळीकडे चंद्र सूर्य, ग्रह गोल असेच दिसत राहते ना…

अशा या विविधतेतून एकता साधणाऱ्या भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे तिरंगा.

त्यातील पहिला पट्टा आहे केशरी रंगाचा. केशरी रंग प्रतिक आहे त्यागाचा, धैर्याचा, शौर्याचा, ज्ञानाचा.

ज्योतीषी च्या दृष्टीकोनातून केशरी रंग पाहिल्यास सर्व प्रथम डोळ्यासमोर येते ते अग्नी तत्व. अग्नीतत्व आपल्याला असीमित उर्जा दर्शवते. अग्नीतत्वाच्या राशी जरी डोळ्यासमोर आणल्या तर तुम्हाला लक्षात येईल की,

अग्नितत्वाची मंगळाचे अधिकारातील मेष रास जी धैर्य, शौर्य, धाडस प्रदान करते, जी अवघ्या जगाला निक्षून सांगते की येणारा काळात भारताच्या वाटेस जाल तर, अग्नी दिव्यास सामोरे जावे लागेल. कठोर मेहनत, दुर्दम्य आत्मविश्वास, असामान्य धाडस यामुळे आम्हास चंद्र व मंगळ सुद्धा जवळचे वाटू लागतात व अवकाश क्षेत्रातील धडाडी पाहून भलेभले दिग्गज देशसुद्धा अचंबित होताना दिसतात.

अग्नितत्वाची सूर्याचे अधिकारातील सिंह रास जी नेतृत्व गुण, प्रशासकीय योग्यता, ज्ञानसंपन्नता, वैद्यकीय कौशल्य ई. दर्शवते. म्हणून भारत देश हा जगावर नेतृत्व करण्याची क्षमता ठेवतो. फक्त विध्वंसक शस्त्रांनीच नव्हे, तर आज जगाकडे नजर फिरवून बघा आज अमेरिका असू दे, इंग्लंड असू दे नाहीतर आणखीन कोणता देश असू दे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात भारतीय ज्ञान कौशल्याने व प्रशासकीय गुणांनी उच्च पदस्थ म्हणून मिरवताना दिसेल. कोविड सारख्या जागतिक महा संकटात तर भारताने दाखवून दिले की, आमचे औषध निर्माण क्षेत्रातील अफाट बुद्धिमत्ता, वेळेचे व्यवस्थापन, व्यावसायिक कौशल्य व सक्षम नेतृत्व या अंगभूत गुणांनी आम्ही आत्मनिर्भर तर झालोच पण त्या सोबत सूर्याप्रमाणे अवघ्या जगाला मदतीचा हात आम्ही दिला. जे बघून सर्वांचे डोळे दिपले. जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली. आज विविध जागतिक संघटनाच्या व्यासपीठावर, जागतिक राजकारणात भारताची उपस्थिती नोंद घेण्यासारखी आहे.

अग्नितत्वाची गुरुचे अधिकारातील धनु रास जी ज्ञान, गुरु, अध्यात्मिकता, नैतिकता, प्रगती, कीर्ती, आत्मसंयम ई. दर्शवते. यातून आम्ही जगाला हेच दाखवून देतो की, आम्ही सर्व बाबतीत ज्ञान संपन्न असलो, प्रगतीशील असलो, कीर्ती सर्वदूर पसरत असली तरी आम्ही नैतिकतेची आणि आत्मसंयमाची पाठराखण करतो. खुमखुमी म्हणून किंवा लालसेपोटी कधीच आमचे शक्तीचा माज करत नाही. सायकल वर सुट्टे भाग नेऊन आम्ही महाविस्फोटक अणू बॉम्ब बनवण्याची क्षमता राखत असून देखील अणू बंदीचा पुरस्कार करणारे देखील आम्हीच आहोत. शांती चा सूक्ष्म अर्थ आम्हाला शतकानुशतके आमचे दैवत व प्रेषित, संतवचणे आम्हाला बिंबवत आले आहेत. फक्य आमच्या संयमाची परीक्षा पाहायला जाऊ नका. जशास तसे आम्हालाही वागता येते.

केशरी रंग हा तयार होतोच मुळी सूर्य मंगळाच्या लाल व गुरूच्या पिवळ्या रंगाच्या मिश्रणाने.

मधला पट्टा आहे पांढऱ्या रंगाचा. पांढरा रंग प्रतिक आहे निर्मळता, पावित्र्य, सत्य, विचार स्वातंत्र्य, सहिष्णुता, संयम आणि समर्पणाचा.

हे सर्व गुण पाहिल्यावर चंद्र डोळ्यासमोर नाही आला तरच नवल. केशरी रंग जसे तारा बळ दाखवतो तसे पांढरा रंग चंद्र बळ दाखवतो. चंद्र मातृ कारक आहे. सूर्य पित्याचे कर्तव्य पंर पाडतो, तसे चंद्र मातेचे कर्तव्य पार पाडतो. अग्नीतत्व युक्त तेजस्वीपणा जेवढा महत्वाचा, पण त्या तेजाला संवेदनशीलता, हेतूची निर्मळता, विचारांचे पावित्र्य, संयम आणि सहिष्णुता, मातेच्या हृदयाची आपल्या मुलाबाळांसाठी स्वत:स समर्पित करण्याची वृत्ति हे गुण जोडीस असणारी एकमेवाद्वितीय भारतीय संस्कृती आहे. चंद्र भावनांचा कारक ग्रह आहे. सुजलाम सुफलाम अशा या धरणी मातेला व भारत हि माझी मातृ भूमी आहे हे म्हणताना नकळत आपला ऊर भरून येतो.

जलतत्वाची आठवण करून देणारा चंद्र व त्याचा पांढरा रंग.

जलतत्वाची चंद्राचे अधिकारातील कर्क रास जी मातेच्या मायेचा ओलावा, ममता दर्शवते. एकमेकांच्या भावनेचा व विचारांचा आदर करायला शिकवते.

जलतत्वाची मंगळाचे अधिकारातील वृश्चिक रास जी, मुलांच्या मांगल्यासाठी प्रसंगी मायेचा ओलावा सोडून कठोर बोलणे सुचवते. वेदनेचे, दु;खाचे, अपयशाचे कटू घोट पचवल्याशिवाय, विपरीत परिस्थितीशी सामना केल्याशिवाय, ज्ञानरूपी पित्यासारखी प्रगती, कीर्ती, भाग्य लाभणार नाही हेच मंगळाची पण जलतत्वाची ही रास आपल्याला आईच्या आर्ततेने सुचवत असेल.

एवढे करून मातेचे समाधान झाले तर नवल.

जलतत्वाची गुरुचे अधिकारातील मीन रास जी, प्रसंगी माशां सारखी आपली तडफड बाजूला ठेवून सतत आपल्या मुलाबाळांसाठी सेवा वृत्तीने झटत असते. त्यांना हेच ज्ञानरूपी संस्कार करत असते कि, बाळा आपल्या दोन घासातील एक घास गरजूंना द्यावा. गांजलेल्यांची सेवा करावी. कमाई तील काही हिस्सा दान करावा, तर वासनेने बरबटलेले मन निर्मळ व पवित्र होऊन मुक्त होईल.

एकाच मातेचे किती हे विलोभनीय अविष्कार.

पांढरा रंग हा तयार होतोच मुळी सप्तरंग चक्र प्रवाही गतीने फिरवल्यावर.

तिसरा पट्टा आहे हिरव्या रंगाचा. हिरवा रंग प्रतिक आहे सुफलतेचा, समृद्धीचा, प्रगतीचा, धनिकतेचा, बुद्धी प्रगल्भतेचा,

बुधाचा रंग हिरवा. बुधाची मिथुन रास वायुतत्वाची तर कन्या रास भूमी तत्वाची. भारतीयांनी आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर सर्व ऋतू मानांचा सखोल अभ्यास करून, वायुतात्वाचा लहरीपणा सहन करत, त्याचा शुक्राच्या तुळ राशीप्रमाणे तुलनात्मक अभ्यास करून, शनीप्रमाणे कर्मास प्राधान्य देऊन कन्या राशीप्रमाणे हवामान व जनजीवन याची गणिते मांडून वृषभ राशीचा संयम व कठोर परिश्रम अंगी बाळगत जमीन कसली आणि शनीसारखे लांब पल्ल्याचे उद्दिष्ट ठेवून शेवटी बळीराजाने शेतीमध्ये प्राविण्य मिळवत आपल्या धरणी मातेला पाचूचा हिरवा शालू भेट दिला. भारताला ऋषि प्रधान देश म्हणून गणले जाऊ लागले. या सर्व गोष्टींची आठवण करून देणारा रंग. सर्व तत्वांचा एकत्रित बुद्धी कौशल्याने ज्ञानाची जोड देत आकाशाला गवसणी घातली आणि आकाशाप्रमाणे विशाल यश मिळवले, याचे स्मरण करून देणारा हा रंग.

हिरवा रंग हा तयार होतोच मुळी शनीच्या कष्टात ज्ञानाचा पिवळा रंग मिसळून.

या सर्वांच्या मधोमध अशोक चक्र त्याच्या चोवीस आरे सकट विराजमान आहे. आकाशाचा निळा रंग विशालता, शांती दर्शवते, तर २४ आरे असलेले हे चक्र सम्राट अशोकाप्रमाणे धर्म चक्र किंवा काल चक्र दर्शवते. जे आपल्याला संदेश देते की, २४ तास सतत कार्यरत राहा, प्रगती करत राहा, पण आपल्या मूळ धर्माची कास सोडू नका, तरच तुम्हाला शांती व आकाशाप्रमाणे विशालत्व प्राप्त होईल.

आकाशाचा निळा रंग हा मूळ रंग आहे. म्हटले तर आकाशाचा रंग निळा भासतो, पण मुळात आकाश म्हणजे नक्की काय आहे, पोकळी… जी अमर्याद आहे. कुंडलीत सुद्धा आकाशतत्व हे सूक्ष्म रूपाने असतेच.

असाच आपला भारत विविधतेतून समता साधलेला एकमेव देश आहे. त्यास माझे त्रिवार वंदन..

तर असा हा माझ्या अल्प बुद्धीने आपल्या भारताच्या ध्वजाचा ज्योतिष अभ्यासाशी सांगड घालण्याचा एक प्रयास. कदाचित चुकले असेल काही तर क्षमा करा, पण एवढे मात्र नक्की की, आपल्या मातृभूमीच्या जाज्वल्य अभिमानातून व स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण काहीतरी लिहावे या उर्मीतून अंतस्फुर्तीतून हा लेख झरझर उतरत गेला आहे. बस्स…

आपण सर्वांना  स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

जयहिंद… जय भारत !!!

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आर्द्रा नक्षत्र विचार


विषय : आर्द्रा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण आर्द्रा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

६. आर्द्रा नक्षत्र :

आर्द्रा नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील ६ वे नक्षत्र आहे. इंग्रजी नाव ‘ग्यामा जेमिनोरम’ असे आहे.

आर्द्रा म्हणजे ओलावा. सूर्य या नक्षत्री आला की, वसुंधरेला भिजवणारा पाऊस पडून जिकडे तिकडे आर्द्रता येते. तप्त होऊन तहानलेली पृथ्वी शांत होते. म्हणूनच या नक्षत्राला आर्द्रा असे नाव पडले. आर्द्रा नक्षत्राचे तारे कोणते धरावेत याविषयी मतभेद आहेत. काही जण मृग नक्षत्राच्या पुढील दोन पायांपैकी पूर्वेकडील पायाच्या तेजस्वी व लाल रंगाच्या ताऱ्यालाच आर्द्रा म्हणतात. तर काहींचे मिथुन राशीतल्या पाच सरळ रेषेतील ताऱ्यांचे जे दोन पुंज आहेत त्यांनाच आर्द्रा म्हणावे असे मत आहे. हे पुंज म्हणजे जणू काही रुद्राने पसरलेले दोन हातच आहेत अशी कल्पना करून या पुंजास बाहू असे म्हणतात. म्हणून आर्द्रा म्हणजे बाहू असेही समजतात.

आर्द्रा नक्षत्र तीष्ण, दारुण, ऊर्ध्वमुखी, मध्यलोचनी व मनुष्यगणी आहे. नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र असून ४ ही चरण मिथुन राशीत येतात. या ४ चरणांवर अनुक्रमे गुरु, शनी, शनी व गुरुची सत्ता आहे. नक्षत्र स्वामी राहू, राशी स्वामी बुध व दैवत शिव असल्यामुळे या नक्षत्रात राहूचा पराक्रम व कुटीलपणा, बुधाचे चातुर्य व फसवेगिरी व शंकराचा रुद्रावतार व प्रसन्नता अशा सत्व-रज-गुणांचे मिश्रण आढळून येते.

या नक्षत्रामध्ये एकच तारा असून तो तेजस्वी व रंगाने लालभडक आहे. आकृती ठळक (चकाकणाऱ्या) मण्यासारखी आहे. कार्तिक, मार्गशीर्ष किवा पौष महिन्यात ते रात्रभर आकाशात दिसते. तारा तेजस्वी असला तरी हे नक्षत्र साधारण आहे. जाताकांस फार मोठ्या पदाला नेणारे नाही.

नक्षत्र तीष्ण व दारुण असल्याने हे जातक कठोर, निश्चयी, हट्टी, दुराग्रही, कृतघ्न, अविचारी व हिंसक असू शकतात. रंगेलपणा अधिक असू शकतो. प्रसंगी खोटी कामे करण्यास, फसवण्यास व विश्वासघात करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

मात्र बुद्धिमत्तेला व विद्वतेला हे नक्षत्र फारच चांगले. विशेष करून स्मरण शक्ती व पाठांतर शक्ती उत्तम असते. कोणत्याही विषयाचे आकलन यांना चटकन होते. संशोधन करण्याची फार आवड असते. राहूचे नक्षत्र असल्याने यांत्रिक कामाचा उपयोग करावयाचे कलाकौशल्य, फोटोग्राफी, ड्राईंग, कोरीव काम, आर्किटेक्ट यांना चांगले. या नक्षत्राचे दैवत शिव असल्याने शंकराच्या कृपेने (भक्तीने) कृपाप्रसाद देणारे आहे. अचानक लक्ष्मीची प्राप्ती होणे, प्रसंगी एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत मिळणे वा कल्पनेत नसलेली शुभ गोष्ट होणे हे या नक्षत्राचे वैशिष्ट्य आहे. हे जातक बुद्धिमान असले तरी अतिशय स्वार्थी, चैनी, आत्मकेंद्रित, ऐषारामी व लोभी असतात. या व्यक्तींना रेस (घोडे) व पत्त्यांचा जुगार यांचा फार नाद लागू शकतो

या नक्षत्रावर जन्मलेल्या जाताकांची शरीर प्रकृती व बांधा सामान्य असतो. जातक उंच, लांबट, हाडापेराने मजबूत व काटक असतात. शरीरात रक्त व हाडपेर चांगले पण अंगावर मांस कमी असते. सहनशीलता व सोशिकपणा चांगला असतो. शारीरिक शक्ती, जीवनशक्ती व रोग प्रतिकारक शक्ती उत्तम असते. स्त्रियांपेक्षा पुरुषांना या नक्षत्राचे महत्त्व जास्त असते. कारण पुरुषांमध्ये आढळणारे धाडस, साहस, स्वातंत्र्य, प्रेम, शौर्य, धैर्य, अधिकार लालसा व कठोरपणा हे गुण या नक्षत्रांमध्ये दिसून येतात.

स्त्री जातकांना हे नक्षत्र सौंदर्य, स्वभाव व संसाराच्या दृष्टीने फारसे अनुकूल नसते. मात्र शारीरिक व बुद्धिमत्तेच्या दृष्टीने चांगले. बांधा उंच, सडपातळ व काटक असतो. दिसण्यात ऐटबाज असतात. मात्र चेहरा जरा उग्र व रागीट असतो. प्रकृती चिवट असते. डोळे भेदक व तीष्ण असतात. या स्त्रिया स्वभावाने मात्र रागीट व बडबड्या असतात. विशेष करून या नक्षत्रात चंद्र मंगळ किंवा मंगळ बुध एकत्र असता अतिशय हट्टी, भांडकुदळ, तोंडाळ, वाचाळ, मत्सरी व उणेदुणे काढणाऱ्या असतात. क्षुल्लक कारणावरून त्या भांडणे उकरून काढतील व तोंडाचा पट्टा चालू करतील. अशा दोन भांडकुदळ स्त्रिया भांडायला लागल्या, म्हणजे आपल्या कर्कश आवाजाने आजूबाजूचा भाग दणाणून सोडतील. मात्र एखाद्या व्यसनी नवऱ्याला ताळ्यावर आणण्याचे काम त्या चांगल्या प्रकारे करू शकतात.

या नक्षत्राखाली येणारा वर्ग म्हणजे डॉक्टर, आर्किटेक्ट, बँकेत किवा खाजगी कंपनीत काम करणारे हिशेबनीस, फोटोग्राफर्स, हाफकिन इन्स्टिट्यूट किवा इतर वनस्पतीच्या औषधीसंबंधी निरनिराळी संशोधने करणारे संशोधक, रसायनशास्त्रवेत्ते छापखाने, कागद, स्टेशनरी यांचे व्यापारी तसेच लहान

प्रमाणात अधिकार गाजवणारे, अंमलबजावणी खात्यातील लोक, मांत्रिक, चोर, लुटारू, पाकिटमार व दरोडेखोर हे सर्व होत.

टीप : या नक्षत्रामध्ये जे ग्रह किंवा ग्रहांच्या शुभाशुभ युत्या असतील त्यावर वरील फलादेश अवलंबून राहील.

आर्द्रा नक्षत्री रवि फारसा शुभ नसतो. शारीरिक प्रकृती, विद्या, अधिकार योग या सर्व दृष्टीने मध्यमच असतो. स्वभाव क्रोधी व मानासाठी धडपडणारा असतो. बिघडला असल्यास रेस किंवा जुगाराचा नाद लागण्याचा संभव असतो. बऱ्याच वेळा दुःखदायक व अपमानाचे प्रसंग येतात. संकटे फार ओढवतात. आर्द्रा नक्षत्री चंद्र असता बुद्धिमान, हुशार पण स्वार्थी, मतलबी, खर्चिक व चैनी असतो.

आर्द्रा नक्षत्री मंगळ असता हाडापेराने मजबूत काटक असतो. पण स्वभावाने अतिशय कडक, दुराग्रही व हेकेखोर असतो. आर्द्रा नक्षत्री मंगळ शुभ असता स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता अतिशय प्रखर असते. डॉक्टरीकडे जाण्यास हा मंगळ फारच चांगला. त्या खालोखाल आर्किटेक्टला बरा. विद्वत्ता व बुद्धी पण चांगली असते आणि जमाखर्च विषय बरा असतो. मात्र जरा वाचाळ, स्पष्ट व्यक्त, कडक भाषा करणारा व टीकाकार असतो. बिघडला असता स्पष्ट व्यक्त व लोकांना तो फसवणारा असतो.

आर्द्रा नक्षत्री गुरु शरीरप्रकृतीला व धनालाही मध्यम. पण बुद्धिमत्ता व शिक्षणाला चांगला. विशेष करून व्याकरण, भाषा व जमाखर्च या विषयांना, तसेच शिक्षक व ओफेसर या व्यवसायाला बरा असतो. लेखन व प्रकाशन यांनाही बरा.

आर्द्रा नक्षत्री शुक्र शरीरप्रकृती बरी देईल. या व्यक्ती जरा रसिक, आनंदी पण चैनी, विषयासक्त, रंगेल व उधळ्या असतात. शुक्र रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, विज्ञान, आर्किटेक्ट या विषयांना चांगला. प्रेमाची आवड असते. पण प्रेमभंगाचे प्रसंग फार येतात.

आर्द्रा नक्षत्री शनि असता शरीरप्रकृतीने चांगला, सडपातळ, हाडापेराने मजबूत, अतिशय काटक, कणखर व चिवट असतो. बोलण्यात तोतरेपणा अथवा मुकेपणा असा दोष असतो.

आर्द्रा नक्षत्री शनि असता कोपराचा किंवा मनगटाच्या हाडांचा संधिवात. चंद्र-शनि युती असता फुफ्फुसांचा क्षय, दम, पक्षाघात. राहू असता विषारी प्राण्यांपासून दंश वगैरे.

स्त्रीच्या कुंडलीत आर्द्रा नक्षत्री चंद्र बिघडला असता, अनियमित मासिक पाळीचा त्रास व शुक्र बिघडला असता योनिमार्गाचा दाह होतो.

अंकशास्त्राप्रमाणे या नक्षत्रावर ६ किवा ८ या अंकाचे वर्चस्व व कैफियत वाटते. त्यापैकी ८ अंक जास्त पटतो. नक्षत्राचे रत्न राहूचे गोमेद किंवा बुधाचा हिरवा पाचू (पन्ना) आहे. हस्ताक्षर जरा बारीक, ठळक पण टोकदार असते. सरळ रेषेत न काढता जरा तिरके व वेडेवाकडे काढतील. लिहिताना जरा दाबून लिहितील. नक्षत्र मध्यलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती वस्तू दोन महिन्यांनी मिळण्याचा संभव असतो. वस्तू पश्चिमेस सापडू शकते.

मुहूर्त शास्त्रात हे नक्षत्र सर्व शुभ कार्याला वर्ज्य आहे. मात्र हे नक्षत्र दारुण व तीष्ण असल्याने शत्रूचा घात करण्यास, मंत्र तंत्र, जादूटोणा इत्यादी अघोरी विद्या शिकण्यास, पशूंना शिक्षा करण्यास चांगले आहे. नक्षत्र ऊर्ध्वमुखी असल्याने गृह, राजवाडा या संबंधी शोभादायक कृत्ये करणे, घराचा मजला वाढविणे या कार्याला चांगले तसेच सापाचे विष काढणे, लस तयार करणे, विषारी औषधे व केमिकल्स तयार करणे यांनाही चांगले.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

न्यूरो तंत्रज्ञान आणि ध्यान


विषय : न्यूरो तंत्रज्ञान आणि ध्यान

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : मनशक्ती दिवाळी अंकातील श्री. चंदने यांचा लेख

नमस्कार,

काय ध्यान आहे हा मुलगा… ध्यान कुठे आहे रे तुझे… आत मी ध्यानाला बसणार आहे, मध्ये व्यत्यय आणू नकोस… किती सहज हा शब्द आपण बोलण्यात वापरत असतो.

योगाभ्यासात मनाकडून आत्म्या पर्यंतचा प्रवास हा ध्यानाचा हेतू आहे. आजच्या स्पर्धेच्या, धकाधकीच्या जीवनात अनेक ताण आपल्यावर आहेत. दुसऱ्या बाजूने माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मन भरकटलेलं आहे अशी भावना प्रबळ होते आहे. स्वतःची ओळख आपण विसरत चाललेलो आहोत. एका ठिकाणी एकाग्र होण्याची क्षमता कमी झालेली आहे. या सगळ्यातून मार्ग काढून आपण आत्मशोध घ्यायला हवा. आनंद आणि शांती ही मनाच्या खोल गाभाऱ्यात आहे, तो मनाच्या शुद्धीत आहे. अशुद्ध, विकारसहित आत्मा म्हणजे मन, आणि विकार रहित शुद्ध मन म्हणजे आत्मा. मन आणि आत्मा ह्यात गुणात्मक फरक आहे. एखाद्या काचेच्या चकचकीत ग्लासामध्ये काठोकाठ शुद्ध पाणी भरलं तर लांबून त्या ग्लासामध्ये पाणी आहे हे समजत नाही. परंतु त्यात विविध रंग, गढूळता, मचुळता टाकली तर त्या ग्लास मध्ये पाणी आहे हे आपल्याला समजतं. ग्लासमधलं अशुद्ध पाणी म्हणजे मन, पण त्या पाण्यातली गढूळता, मचूळता काढली तर जे शुद्ध स्वच्छ पाणी राहील तो म्हणजे आत्मा, जो आनंदमय, निर्मळ, निरामय आहे.

तैतेरीय उपनिषदात भृगु ऋषींच्या बालपणाची एक सुंदर कथा सांगण्यात आली आहे. एकदा गुरु आणि वडील वरुण ऋषी यांना त्यांचा शिष्य व पूत्र भृगु शंका विचारतो की, आपण सगळे कशाचे बनलेलो आहोत आणि ह्या सृष्टीचे मूलतत्त्व काय आहे? त्यावर वरुण ऋषीनी ज्ञानोपादेश देऊन त्यांस  सांगितले की,’ ते समजण्यासाठी साठी एकांतात कठोर तप करून आत्मशोध घ्यायला पाहिजे. त्यानुसार  भृगुनी एकांतात तपाचारणाद्वारे आत्मशोध घेतला व वडिलांकडे येऊन म्हणाला,

सगळं विश्व हे अन्नमय आहे. हे विश्व कणांचे म्हणजेच जड (matter) चे बनलेले आहे. सगळ्या वस्तुजाताचं पोषण अन्नाद्वारे (पंचमहाभूते) होतं असून पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश यांचं विश्व बनलेलं आहे. आणि त्याचा लयदेखील अन्नात म्हणजे पंचमहाभूतातच होतो.

भृगु चे हे उत्तर ऐकून आपल्या मुलाला स्थूलाच्या मूलभूत गोष्टीचा शोध लागला यामुळे वरूण ऋषि आनंदित झाले. परंतु ते भृगुला म्हणाले की, ज्याचा शोध लागला आहे, त्यापेक्षाही काहीतरी सूक्ष्म आहे, तू त्याचा शोध घे.

वरुण ऋषींच्या सांगण्याप्रमाणे भृगु खूप संशोधन करून बऱ्याच दिवसांनी परत आले व वरुण ऋषींना सांगितले की, अन्नमय कोषावर ती प्राणाची सत्ता आहे. पंच प्राण हे अन्नमय कोषास हलवतात. प्राण, उदान, समान, व्यान आणि अपान या पंच प्राणांनी अवघी सृष्टी व्यापली आहे.

वरुण ऋषि आपल्या मुलाची प्रगती पाहून आनंदित झाले, पण त्यास म्हणाले की, आता ह्या पंच प्राणांच्या मागे अजून एक सूक्ष्म शक्ती ह्या पंच प्राणाच्या माध्यमातून कार्य करते, याचा तू शोध घे.

भृगु परत एकदा कठोर तप, स्वाध्याय करून आले आणि आत्मशोध सांगितला.

‘मन’ हे या सगळ्याचा स्रोत आहे. मन, मनातल्या इच्छा, भावना, विकार हे ह्या प्राणमय आणि अन्नमय कोषाकडून क्रिया करून घेतात. सुख-दुःख, प्रेम-द्वेष, आवड-नावड ह्या आणि अशा अनेक गोष्टीं ज्या मनोमय कोषाच्या भाग आहेत, त्यातून ह्या सृष्टीचे चलन वलन चालते. ‘मन’ अदृश्य असले, तरी पण तेच या सगळ्याला कारणीभूत आहे.

वरुण ऋषी म्हणाले, तू योग्य मार्गावर आहेस, पण आता ह्या मनोमय कोषावर ज्याची सत्ता आहे, त्याचा तू शोध घे. भृगु पुन्हा तपश्चर्या करून सूक्ष्मतेचा शोध घेऊन परत आले.

” ‘ज्ञान’, ‘विवेक’ जो ह्या मनोमय कोशावर नियंत्रण ठेवू शकतो. हा विवेक, संयम, ज्ञान जिथे जागृत होतं ते ‘विज्ञानमय कोश’.

भृगुना अवगत झालेले ज्ञान पाहून वरुण ऋषी खूष झाले व त्यापुढील जी सूक्ष्मता आहे त्याचा अनुभव घेन्यास सांगितले. या वेळेला भृगु तपासाठी गेले आणि ते खूप दिवस उलटून गेले, तरी पुन्हा आलेच नाहीत. आपला मुलगा अजून का आला नाही हे बघण्यासाठी वरुण ऋषी जंगलात गेले आणि भृगुना बघून आश्चर्यचकित झाले. त्यांना भृगु हे पूर्ण आनंदमय, शांत आणि समतेत आणि परमानंदात विलीन झालेले असे दिसले. नक्की काय शोध लागला हे सांगायला भृगुंचं मी पण संपून गेलं होतं. आनंदमय कोशात ते विलीन झाले होते.

भृगुंनी अनुभवलेली आनंदमय, प्रशांत, शांत अशी अवस्था ही आपल्या अस्तित्वाची खरी अवस्था आहे. ही मनाची उत्कट अशी अवस्था आहे. परंतु मनात गडबड झाली कि समस्या निर्माण होते. याबाबत योगशास्त्रात छान विचार आला आहे. प्रकट होणाऱ्या ‘व्याधी’ ही नंतरची पातळी आहे. व्याधींच्या अगोदरची पातळी म्हणजे ‘आधी’ होय. आनंदमय कोशात व्यक्ती ही संपूर्ण आरोग्यपूर्ण, समतोल अशी असते. मनोमय कोशात पहिल्यांदा विकार, आवड निवड, सुख दुःख हा असमतोल निर्माण होतो. मधुमेह असतानाही पथ्यास न जुमानता गुलाबजाम खायचाय ही इच्छा मनात असमतोल निर्माण करते. ह्या प्रकारच्या विकारग्रस्त असमतोल म्हणजेच ‘आधी’. आधीचं मूळ कारण म्हणजे स्वतःच्या संपूर्ण आनंदमय स्थितीचं अज्ञान. ती आनंदमय स्थिती सोडून विकारांच्या आधीन होऊन ज्या मनाचा ताबा घेऊन तशा कृती करायला भाग पाडतात त्या ‘आधी’. ह्या पातळीवर त्याचे शरीरात म्हणजेच अन्नमय आणि प्राणमय कोशात व्याधींच्या रूपाने तत्काळ परिणाम दाखवत नाहीत, पण हळूहळू ह्या ‘आधीं’ चे प्रकटीकरण शरीरात दिसायला लागत. आणि व्याधीत रूपांतर होतं.

आपल्याला जडणाऱ्या व्याधींपैकी सुमारे ८० टक्के व्याधी या सायको सोमॅटिक म्हणजेच मनोकायिक प्रकारात मोडतात. याचा अर्थ अशा व्याधी की, ज्या निर्माण होण्यासाठी कुठलाही बाह्य विषाणूची गरज लागत नाही. केवळ मनातून, ताणातून, विचारातून निर्माण होणाऱ्या व्याधी त्याला मनोकायिक आजार असं म्हणतात.

ज्या शरीरात व्याधी निर्माण होतात ते शरीर ‘जड’ आहे. जर जड शरीराच्या मागे मन, मनातली ऊर्जा किंवा शक्ती नसेल तर ते निर्जीव आहे. ह्या ऊर्जेच्या किंवा शक्तीच्या माध्यमातून तर मन आपल्या इच्छा शरीराच्या माध्यमातून पूर्ण करू शकतं. आपल्या शरीराची रचना बघितली, तर लक्षात येईल की मन हे शरीराचा राजा आहे. तर मेंदू हा शरीराचा प्रधान आहे. सगळ शरीर मज्जारज्जूला जोडलेले आहे. मज्जारज्जू हा मन मेंदू यामार्फत येणाऱ्या आज्ञा शरीराकडे पोहोचवतो आणि शरीराकडून मिळणारी माहिती मेंदूकडे आणि पर्यायाने मनाकडे पोहोचवण्याचे कार्य करत असतो. थोडक्यात संपूर्ण शरीराची आणि मन मेंदूची मध्यस्थी करण्याचं काम मज्जारज्जूकडे आहे.

आपल्या पूर्वजांनी देखील ही गोष्ट बरोबर ओळखली होती. म्हणूनच त्यांनी मज्जारज्जूतील मुख्य स्थाने म्हणजे चक्र यांना महत्व दिलं. योगशास्त्रातील चक्र ही कल्पित आहेत. ती प्रत्यक्ष दिसत नाहीत. योगशास्त्रातील चक्रे आणि शरीरशास्त्रातील प्लेक्सीस ही शरीरातील महत्वाची ठिकाणं, किंवा असे चौक आहेत की, तेथून माहितीचं, आज्ञांचं, शक्तीचं वहन सगळ्यात जास्त होत असतं. ह्या सगळ्या निरोपाची देवाण घेवाण चालते ती विद्युत शक्तीच्या माध्यमातून. इलेक्ट्रिकल इम्पल्स किंवा विद्युत प्रवाहांचं वहन हे पेशी, मज्जापेशी यांच्या माध्यमातून होतं. ह्या विद्युत शक्तीचं वहन चक्र किंवा प्लेक्सिसच्या ठिकाणी सगळ्यात जास्त असतं. त्या त्या चक्रांना किंवा प्लेक्सेसला शरीराचे ठराविक भाग किंवा ग्रंथी आणि त्याची कार्ये जोडलेली आहेत. त्या त्या चक्रांशी संबंधित शारीरिक मानसिक क्षमता ह्या मुख्यतः त्या चक्रांच्या अखत्यारीतला भाग असतो.

षडचक्र आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक स्थितीशी संबंध असतो.

१. मूलाधारचक्र :

संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : अॅडरेनल ग्रंथी, हालचाल ऊर्जा याचा स्त्रोत, पाय, पावले, अस्थी, मोठे आतडे, मज्जारज्जूचा खालचा भाग, रक्ताभिसरण संस्था

शारीरिक व्याधी : स्थूलता, भूक न लागणे मलावरोध, सायटिका, स्टॅमिना कमी होणे, अशक्तपणा, थंडीशी जुळवणूक करण्याची क्षमता कमी, शारीरिक हालचाली करण्यास त्रास, समन्वय व रक्ताभिसरण समस्या

मानसिक समस्या : भित्रेपणा, निरुत्साह, प्रेरणाहीन, लोभीपणा, अशक्तता, कर्मठपणा, वास्तवाचे भान व जुळवणूकीची क्षमता कमी व अकार्यक्षम

मानसिक क्षमता : जगण्याची उमेद, एखाद्या गोष्टी टिकून राहणे, शक्ती स्थिरता याचा मूळ स्त्रोत.

२. स्वाधिष्ठान चक्र :

संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : जनन ग्रंथी, गर्भाशय, जननेंद्रिय, किडणी, मूत्राशय, कंबर ओटीपोटाशी संबंधित अवयव, मोठे आतडे, प्रजननाशी संबंधित अवयव.

शारीरिक व्याधी : जनन व उत्सर्जन संस्था निगडित व्याधी

मानसिक समस्या : सृजनशीलता अभाव, निष्क्रियता, अति कामुकता, अपराध भावना, स्पर्श संबंधित सुख, विवेकशून्य सुख घेण्याची इच्छा, भावनिक आधार शोधणे ई.

मानसिक क्षमता : अति भावनाशीलता, संवेदनशीलता, सृजनशीलता.

३. मणिपुर चक्र :

संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : पेंक्रियाज, अॅडरेनल, पचन संस्था, यकृत, गॉल ब्लॅडर, शक्ती निर्मितीचे केंद्र, अन्न शक्तीचे रसशक्तीत रूपांतर करणारे केंद्र, शरीरातल्या संस्थांशी संबंध, चयापचय, पोट, छोटे आतडे, लिव्हर, पेंक्रियाज प्लिहा, प्रतिकारशक्ती, त्वचा, मज्जासंस्था, व्यवस्थित कार्यरत राहण्यास मदत.

शारीरिक व्याधी : पचन विकार, उच्च रक्तदाब, निरंतर थकवा

मानसिक समस्या : न्यूनगंड, निरुत्साह, भित्रेपणा, निष्क्रियता, संदिग्ध, शरणागती पत्करणारा, आत्म प्रतिष्ठेचा अभाव, बळी गेल्याची भावना, अधिकार नसल्याची भावना

मानसिक क्षमता : आशावाद, उत्स्फूर्तता, समंजसपणा, लवचिकपणा, आनंद, विनोदबुद्धी, हास्य, भावनांचे केंद्र, बल आणि सत्ता नियंत्रण भावना, बदल करण्यासाठीची प्रेरणा देणारे, स्वतःमध्ये तसेच आजूबाजूला बदल साधणारे केंद्र, प्रभुत्व गाजवणे, आक्रमकता, अधिकार गाजवणे.

४. अनाहत चक्र :

संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : थायमस, फुफ्फुसे, हृदय, रक्ताभिसरण संस्था, हात, सात चक्रांचे मध्यवर्ती चक्र, डायफ्राम, हात, तळवे, श्वसन वाढ व विकास

शारीरिक व्याधी : अस्थमा, हृदयविकार, फुफ्फुसाचे विकार

मानसिक समस्या : असंवेदनशील, अक्षमाशील, कोरडेपणा, अलिप्त राहणे, अंतर राखणे, प्रेमातिरेक

मानसिक क्षमता : समतोल, समानता, प्रेम, बदलाला स्वीकाराची क्षमता, बदलाला संलग्न होण्याची क्षमता, काळजी घेणे, इतरांशी संबंध प्रस्थापित करणे, जुळवणूकीची क्षमता, शिस्त, दैनंदिन कार्यामध्ये बांधीलपणा, स्थिरता आणि शिस्त आणणे, व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित सर्व बाजू, स्वतःचा मार्ग शोधण्याची व सांभाळण्याची क्षमता, शांती, सहनशक्ती, स्वप्नदृष्टी, इतरांच्या गरजा व स्वतःच्या गरजा कळणे, आपली दिशा माहीत असणे, आत्मविश्वास, क्षमाशीलता.

५. विशुद्ध चक्र :

संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : थायरॉईड ग्रंथी, पॅराथायरॉईड, घसा, कान, मुख, खांदे, मान, हात

शारीरिक व्याधी : अस्थमा, हृदयविकार, फुफ्फुसाचे विकार, घशाचे विकार, मानदुखी, खांदेदुखी, थायरॉईडच्या व्याधी, मानेचे विकार, कानाच्या समस्या, टॉन्सिल्स

मानसिक समस्या : सृजनशीलता व संवादाचा अभाव, आत्मकेंद्री, नैराश्य, लाजाळू, भिडस्त, समजून व ऐकून घेण्याचा अभाव, अति वाचाळता, अहंगंड, न सुचणे, प्रेरणेचा अभाव, संवाद प्रस्थापित करण्यात अडचणी, व्यक्तित्वात प्रकटीकरण करण्यास अडथळे, व्यक्तित्व दबून राहणे, व्यक्त होण्यास अडचण

मानसिक क्षमता : संवाद, आंतरिक ओळख टेलिपॅथी, वक्तृत्व, सृजनशीलता, आत्मप्रतिष्ठा, संवाद कौशल्य,

६. आज्ञा चक्र :

संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : पीनियल, नेत्र, भुवया, कवटीचा तळभाग

शारीरिक व्याधी : दृष्टी मंदावणे, डोकेदुखी, भयंकर स्वप्न पडणे, दृष्टी मध्ये बिघाड

मानसिक समस्या : निर्णयक्षम नियोजन क्षमतेचा व अंमलबजावणीचा अभाव, वैचारिक गोंधळ, नवकल्पना यांच्याबाबतीत अलवचिक, मनोराज्यात रमणे, अति ध्येयासक्त, विचारांवर मळभ येणे, व्यावहारिक निर्णय घेता न येणे, आंतरज्ञानाची किंवा सहजस्फूर्तीने होणारी संवेदना कमी होणे, भयानक स्वप्न पडणे

मानसिक क्षमता : बुद्धी, समज, विश्वास, समजून घेण्याची कुवत, वास्तवाचे विश्लेषणाची ताकद, अंतर्मुखता, नेतृत्व, नेत्र आणि मेंदूचे जाणीवपूर्वक चालणारे काम यावर प्रभाव असणे, ज्ञानेंद्रियांकडून आलेल्या संवेदनांचे माहितीत रूपांतर करणे, स्मृती आणि नियोजनाचे काम, स्थळकाळाचे भान विसरणे, अधिक उन्नत जाणीव, या चक्रात स्थिर स्वरूपाची शक्ती, आंतरस्फुरण, आंतर प्रेरणा, आंतरज्ञान, दूरदृष्टी आणि कल्पकता.

जेव्हा एखादी शारीरिक व्याधी किंवा मानसिक समस्येचा उद्भव होतो तेव्हा त्याचं मूळ मनात असतं किंवा त्या भावना, विकारांमध्ये असतं पण त्याचं प्रकटीकरण त्या त्या चक्रांशी संबंधित अवयवात किंवा भागात होतं. त्या चक्रात असमतोल निर्माण होतो. तो असमतोल सुधारला, तर ती शारीरिक किंवा मानसिक व्याधी कमी होऊ शकते किंवा संपुष्टात येते. त्यासाठी ह्या चक्रांच्या माध्यमातून शरीरातल्या त्या त्या अवयवांशी, कार्याशी, पेशी समूहाशी आणि पेशींशी संवाद साधायला हवा. तसेच तिथल्या शक्तीचं संतुलन करायला हवं.

न्युरो तंत्रज्ञानाचा वापर करून हे संतुलन साधायला सुलभ जाते. व्यक्तींच्या प्रकृती परीक्षणाद्वारे शारीरिक आणि मानसिक ‘आधी’ ‘आणि ‘व्याधी’ काय आहेत ते तपासलं जातं. कफ, पित्त, वात यापैकी कुठलं प्राबल्य आहे तसेच पंचवायू पैकी कुठला वायू दोष आहे हे तपासलं जातं. प्राण, अपान, समान, व्यान, उदान ह्या पंचवायूचा चक्रांशी सुद्धा संबंध आहे. त्यामुळे ह्या सर्व प्रकृती परीक्षणावरून तसेच स्वभाव परीक्षणावरून कुठल्या चक्राशी संबंधित कमी जास्त पणा आहे हे कळतं. त्यानंतर प्रत्यक्ष ध्यानाची प्रक्रिया सांगितली जाते व शारीरिक मानसिक समतोल साधला जातो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य एका स्थिर पातळीवर येण्यासाठी न्यूरोतंत्रज्ञान उपयुक्त ठरते.

ध्यानाचा मेंदूशी संबंध आहे. आपल्या मेंदूतून सतत मेंदूलहरी बाहेर पडत असतात. इ.इ.जी मशीनवर त्या मोजता येतात. डेल्टा, थिटा, अल्फा, बीटा या मेंदूतून निघणाऱ्या प्राथमिक लहरी आहेत.

१. डेल्टा लहर : १ ते ४ आवर्तन प्रति सेकंद. गाढ झोपेच्या अवस्थेत मेंदूतून निघणारी लहर

२. थिटा लहर : ४ ते ८ आवर्तनं प्रति सेकंद. स्वप्नावस्थेत किंवा ध्यानाच्या अवस्थेत निर्माण होणारी लहर

३. अल्फा लहर : ८ ते १३ आवर्तनं प्रति सेकंद. जागृत, सुख दुःख, जागृत अवस्थेत निर्माण होणारी लहर

४. बीटा लहर : १३ ते ३० आवर्तन प्रति सेकंद संताप, भावनिक उद्विग्नता, चिंता ह्या भावनांमध्ये निर्माण होणारी लहर

ध्यानावस्थेत मेंदूतून निघणाऱ्या लहरींपैकी अल्फा-थिटा लहरीं विशिष्ट प्रमाणात निर्माण होत असतात. ह्या अल्फा-थिटा लहरींचा रेशो मोजला तर, सदर व्यक्ती ध्यानावस्थेत आहे किंवा नाही, तसेच किती प्रमाणात ध्यानावस्थेत आहे हे समजू शकत. बऱ्याच वेळा ध्यान करताना मन भटकत असतं. त्यावेळी अल्फा थिटा रेशो कमी असतो. ज्या वेळी व्यक्ती ध्यानावस्थेत समशांती अनुभवत असते तेव्हा मेंदूलहरीत बदल होतो. अल्फा थिटा रेशो वाढतो. त्यावरून ती व्यक्ती ध्यानावस्थेत आहे किंवा ताणमुक्त समशांत अवस्था अनुभवते आहे, असं समजू शकत.

हे सर्व मोजण्याची यंत्रणा माळवली येथील मनशक्ती केंद्रात उपलब्ध आहे. इ.इ.जी. चा बँड वापरून सहभागी व्यक्तीने ध्यान करायचे असते. ध्यान झाल्यावर ताबडतोब त्या व्यक्तीला प्रत्येक चक्रावर किती टक्के ध्यान झालं, तसंच एकूण किती टक्के ध्यान झाल हे समजतं. त्या व्यक्तीची षड्चक्रांपैकी कुठली चक्र जास्त प्रभावी आहेत, कुठली कमजोर आहेत ते कळतं. कमजोर चक्राच्या ध्यानाची टक्केवारी कमी असते व अशा चक्रावर ध्यान करताना व्यत्यय जास्त येतो आणि मन जास्त विचलित होते. त्या चक्राशी संबंधित साधना करणे, त्या चक्राशी संबंधीत असलेल्या भावना विकारांना संयमित करणे, त्यासाठी त्यागवताचा आधार घेणे अशा उपायांनी व्याधी आणि आधी कमी होतात. बऱ्या होतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

अँजीओप्लास्टी : एक केस स्टडी


विषय : अँजीओप्लास्टी एक केस स्टडी

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्व अभ्यास

नमस्कार,

परवा एका जातकाचा फोन आला की माझी १५ जुलै, २०२३ ला अचानक अंजिओप्लास्टि झाली. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की, अचानक हे सर्व कसे काय घडले? हे योग जन्म कुंडलीत दिसत आहेत का?

त्याची जन्म कुंडली मांडून तपासले असता त्यात काहीसे तथ्य आढळून आले. ते निरीक्षण येथे देत आहे. जाणकारांनी त्यांची निरीक्षणे जरूर मांडावीत, त्यामुळे एक दिशा मिळेल…

सर्वात प्रथम मी अंजिओप्लास्टिची एक जुजबी व्याख्या तयार केली.

असा आजार ज्यात हृदयाकडे रक्त नेणाऱ्या अर्टीलरी अरुंद होतात व पुरवठ्यावर परिणाम होतो, रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे शस्त्र क्रिया द्वारे रुंद करून एक जाळी असलेली नळी (स्टेंट) बसवला जातो.

नंतर या व्याख्येची माझ्या ज्योतिष अभ्यासानुसार मीमांसा केली.

१. हृदय साठी ४ थे स्थान विचारात घ्यावे लागेल.

२. मंगळ लाल रंग, रक्त, शस्त्र याचा कारक ग्रह याचा ४ थे स्थानाशी संबंध

३. शनि आर्टिलरी आकुंचन पावण्याचा कारक ग्रह याचा ४ थे स्थानाशी संबंध

४. या सर्वांचा त्रिक स्थाने (६, ८, १२ शी संबंध)

५. या सर्वांचा मारक स्थाने (२, ७) शी संबंध

६. या सर्व कारक ग्रह संबंधित दशा अंतर्दशा

जन्मकुंडलीचे निरीक्षण केले असता खालील गोष्टी समोर आल्या-

१. वृश्चिक लग्नाची कुंडली त्यामुळे ६ वे स्थानी मंगळाची मेष राशी

२. ३ रे व ४ थे स्थानी शनि ची मकर व कुंभ राशी

३. ४ थे स्थानी ७ व १२ व्या स्थानाचा स्वामी शुक्र गुरूच्या नक्षत्री स्थित

४. ४ थे स्थानी २ व ५ व्या स्थानाचा स्वामी गुरू राहूच्या नक्षत्री स्थित

५. ८ वे स्थानी षष्ठेश मंगळ व तृतीयेश व चतुर्थेश शनि मिथुन राशीत युतीमध्ये

६. अष्टमेश बुध षष्ठात मंगळाच्या मेष राशीत केतूच्या नक्षत्री

व या काळी या सर्व गोष्टींचे कारक ग्रह बुध महादशा शनि अंतर्दशा गुरु प्रत्यंतर व शनि सूक्ष्म दशा चालू होती.

व मंगळाचे मृग नक्षत्र होते.

तर आपण ही आपली निरीक्षणे मांडलीत तर, सर्वांना उपयुक्त ठरतील.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)