विषय : उपासना काण्ड
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : हिंदू संस्कृती
मूळ लेखक : स्वामी तेजोमयानंद
नमस्कार,
वेदांची मुख्य शिकवण अभ्यासताना मुख्यत: आपल्याला अध्यात्मिक उन्नती व प्रगती चा उहापोह दिसतो. त्यात आपल्याला तीन भाग आढळतात.
१) कर्म काण्ड : ज्याला आपण सर्व साधारण पणे आपण विधियुक्त कर्म मानतो. त्यात इतर ही बरेच काही आहे.
२) ज्ञान काण्ड : हा विभाग परमोच्च श्रेष्ठ आत्मज्ञानाचा आहे.
३) उपासना काण्ड ( जो कर्म काण्ड मधील एक अंतर्भूत भाग आहे.) : यात परमेश्वराच्या ब्रह्मांडाच्या अनेक सृष्टींमधून प्रगट झालेले सगुण रुपांवर ध्यान कसे करायचे व पूजेचे मार्गदर्शन आहे.
मानवातील मनोविकार, मनाची अस्थिरता जी आत्म्या विषयीच्या अज्ञानातून निर्माण झाली आहे ती संभ्रमावस्था दूर करण्यासाठी ही व्यवस्था आहे.
वेदातील “उपासना काण्ड” ची आवश्यकता याविषयी थोडेफार माझ्या अल्प बुद्धीने लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.
उपासना म्हणजे पूजा किंवा शब्दशः जवळ बसणे. उप याचा अर्थ जवळ, आणि आसना म्हणजे बसणे. आता जवळ बसणे याचा अर्थ म्हणजे केवळ शरिरानेच नव्हे तर अंत:करणापासून परमेश्वराच्या सानिध्यात राहणे.
आपण गुरु उपासना ” करतो, म्हणजे गुरूंच्या जवळ जाऊन बसतो एवढाच नसतो. त्याचा अर्थ असा की अनुसंधानाने (मनाने) आपण पूजनीय व्यक्तिजवळ वास करावा. आणि जेव्हां आपण तसे करतो, तेव्हां हळूहळू त्या व्यक्तीचे गुण आपल्या मध्ये उतरतात व आपण त्या गुणांचे अनुसरण करू लागतो.
अग्नि जवळ लाकडाच्या फळी ठेवली असता, हळूहळू लाकडाची फळी उष्ण होते व नंतर त्यातून ज्वाळा निघू लागतात. त्या लाकडाच्या फळीच्या दृष्टीने ही अग्नि उपासना (अग्नि जवळ बसणे) आहे. अग्नीचे गुणधर्म त्या फळीस स्पर्श करू लागतात.
जर थंडी वाजत असेल व आपण शेकोटी जवळ बसलो, तर आपल्याला पण उष्णता जाणवते व ती धग अंगात उतरते.
त्याचप्रमाणे, वेदांतून असे सांगितले गेले आहे की, आपणसुद्धा इष्टदेवतेची (स्वेच्छेने निवडलेल्या देवाची) उपासना करावी. बहुतांशी आपल्याला राम, कृष्ण आणि शिव ई. उपास्य देवांची पूजा व उपासना करताना दिसतात. खरे पाहिल्यास ही केवळ दैवते नसून अति उच्च, अनुकरणीय ध्येये आहेत. प्रत्येक देव हा एका श्रेष्ठ आदर्श ध्येयाचेच (साकार) स्वरूप आहे
काही तथाकथित आधुनिक विचारांचे लोक अकारण प्रतिमा पूजनेचा उपहास करताना आढळतात. कारण त्यांना त्याचा गर्भितार्य कळलेला नसतो.
कुठल्या न कुठल्या स्वरूपात, प्रत्येक व्यक्ति प्रतिमा पूजनच करीत असते. आम्ही जेव्हां ध्वजाला वंदन करतो, तेव्हां आम्ही काय करीत असतो ? वास्तवात तो एका कापडाचा तुकडा आहे, असे जरी दिसत असले तरी, आम्ही खरे वंदन त्या ध्वजामागच्या विधानाला करीत असतो. ध्वज हा आपल्या देशाच्या महत्त्वाकांक्षा, आपल्या उच्च लाक्षणिक मूल्यांचे व संपूर्ण संस्कृतीचे निदर्शन करतो. झेंडा किंवा ध्वज केवळ कापडाच्या तुकड्यापेक्षा, गर्भित मौलिक लक्षणे दर्शवित असतो. म्हणून लोक एका विशिष्ठ देशाचा अथवा व्यक्तीचा विरोध दाखविण्यासाठी त्या देशाचा ध्वज अथवा प्रतिमा जाळतात. अशाप्रकारे कांही संकेत आपण त्या दार्शनिक वस्तूंना लावू शकतो. असा कोण आहे, जो कुठल्या ना कुठल्या रूपांने प्रतिमा पूजन करत नाही ?
प्रतिमा पूजनांचा उपयोग एवढ्याच करता असतो की, त्याने आपले मन एकाग्र होते. आपल्याला प्रतिमेतले आदरणीय वाटणारे सर्व गुण आपल्यात उतरावेत, हाच त्यांतला हेतु असतो. असे करणे म्हणजे दूरदर्शनवर एखादा विशिष्ट केंद्र लावल्यानंतर, जसे त्या केंद्राने प्रसारित केलेले सर्व कार्यक्रम आपल्याला आपोआप दिसू लागतात, तसेच आहे हे.
प्रभू श्रीरामचंद्रावर ध्यान केल्याने, त्याच्या भक्तात देखील श्रीराम कसा उत्कृष्ट राजा, आदर्श पुत्र, पति आणि बंधु होता, तसे गुण हळूहळू आकलन होत जातात.
त्याचप्रमाणे आपणही जशी संगती करतो, तसेच बनत जातो. समजा एखादा मनुष्य आधी धूम्रपान करीत नसणारा, जर अशा लोकांच्या संगतीत राहू लागला की जिथे माणसे सारखी धूम्रपान करीत असतात आणि त्यातील एखाद्याने विचारले की, तू पण कर रे धूम्रपान, काही होत नाही. तर आपल्या मनात मोह निर्माण होतो की, एकदा करून बघावयास काय हरकत आहे ? आपण जेव्हां अशी कुसंगत करू लागतो, तेव्हां क्रमशः हळूहळू त्या वैगुण्यांचे व दुर्गुणांचे आमच्या मध्ये पण आकलन होऊ लागते. आणि व्यसनाधीन व्हायला वेळ लागत नाही . म्हणूनच वडील धारे आपल्याला सतसंगत चा उपदेश देताना आढळतात. ज्यामुळे चांगले गुण आपल्यात अवतरतील.
ज्योतिष शास्त्रात चंद्रास मनाचा कारक मानतात, तसेच पाण्याचा ही कारक मानतात. मनात विचारांच्या व समुद्रात पाण्याच्या लाटा उसळतात आणि सर्व काही ढवळून निघते. पाण्याचा स्वत:चा असा रंग आकार नसतो. ते त्याच्या सान्निध्यात येणारा रंग व आकार धारण करते. तसेच मनाचे ही असते. आता हे आपल्या बुद्धीवर निर्भर करते की, आत्मारूपी सूर्याच्या प्रकाशात उजळून निघायचे की, विकारांच्या ग्रहणाने काळवंडून जायचे.
वेदां मध्ये उपासना भागात, ध्यानासंबंधी सुंदर विवेचन दिलेले आहे. आपल्याला ध्याना करिता, एक प्रतीक दिलेले असते. ते प्रतीक म्हणजे एका श्रेष्ठ, उच्च लक्षणाचे प्रतीक असते, ज्यावर आपले मन स्थिर करावयाचे असते. आपले सर्वत्र धावणारे (परावृत्त असणारे) चित्त अनन्य भावाने एकाग्र केले असता, आपल्याला त्या लाक्षणिक प्रतीकाचे सर्व गुण आकलन होतात आणि अंती आपण त्याच्याशी तादात्म्य साधतो. अशा प्रकारे जेव्हां आपले मन शुद्ध, पवित्र व एकाग्र होते, तेव्हां ते अत्युच्च शक्तीचे प्रचंड भांडार होते. तशा तेजःपुंज चित्ताने कांहीही करणे साध्य होते. कर्म काण्ड आणि उपासना काण्डाच्या अभ्यासाची पराकाष्ठा म्हणजेच आपल्या मनाची आत्मज्ञान प्राप्त करण्याची तयारी स्वानुभवाने अध्यात्मिक साक्षात्कार करण्याची तयारी होय.
जातकाशी चर्चा करत असताना त्यांना उपाय, उपासना सुचवताना मी नेहमी सांगत असतो. देवाला भाव प्रिय आहे.
जसे की संगणक आणि मोठा संगणक ज्याला आपण परम संगणक म्हणतो.
तसेच आत्मा आणि परम आत्मा म्हणजेच परमात्मा. आता परमात्मा कसा असतो तर, निर्गुण म्हणजे सत्व, राज, तम या गुणाच्या परे व निराकार ज्याला आकाराची मर्यादा नाही असा. विज्ञान सांगते कि ज्या गोष्टीला वस्तुमान म्हणजे जडत्व नाही त्याला झिरो (शून्य) मानले जाते. आणि ZERO TENDS TO INFINITY. म्हणजेच शून्यत्व अमर्याद आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीत शून्याला पूज्य व ब्रम्ह म्हटले जाते.
आता अशा या परम आत्न्याचा एक अंश आपल्या शरीरात जन्मत: प्रवेश करतो. म्हणजेच त्या परम आत्म्याच्या त्या आत्म्यास संसार रुपी माया निर्माण होते. त्याला शरीराच्या आकाराची मर्यादा प्राप्त होते. म्हणूनच आपल्या अहं ला आकार प्राप्त होतो, नि तो अहंकार आपल्यावर राज्य करायला लागतो. वास्तविक आपला श्वास आपल्याला सो अहं म्हणजे जो परम आत्म्या जो माझ्या अंतर्यामी वसलेला आहे ते मूळ स्वरूप आहे याचे स्मरण करून देत असतो. पण मायेच्या आवरणामुळे आपण निर्गुण ऐवजी सर्व षड रिपू काम, क्रोध, भय, मत्सर… ई. मध्ये गुरफटलेले असतो.
या अज्ञानातून बाहेर येण्या साठी उपासना महत्वाची ठरते.
आपण आयुष्यात असंख्य चुका करत असतो. पण दुसरे व्यक्ती समोर आपल्याला मान्य करायला अथवा क्षमा मागायला आपला अहंकार आडवा येत असतो.
पण देवासमोर जेव्हा आपण (स्वार्थी हेतूने का होईना) जातो, तेव्हा आपला अहंकार बाजूला ठेवून आपण हात जोडून शरण जातो. व फलश्रुती आपल्या मनाप्रमाणे असावी, या साठी याचना करतो. त्याला नमतो. यालाच सुंदर शब्द आहे नमन. जेव्हा आपल्या आपला अंतरात्मा त्या परमात्म्याच्या सगुण प्रतीकाशी तादाम्य पावतो, तेव्हा माणसाच्या आयुष्यात अमुलाग्र सकारात्मक बदल लीलया घडतात. म्हणूनच देवाला शुद्ध भाव अतिप्रिय असतो.
जे उत्स्फुर्तपणे वाटले ते लिहित गेलो. आशा आहे त्यामागील भाव आपल्या पर्यंत पोहोचेल.
शुभं भवतु !!!
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)