विवाह जमवताना…


विषय : विवाह जमवताना

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : धनुर्धारी मधील व.दा. भट सरांचा लेख 

नमस्कार,

धनुर्धारी दीपावली विशेषांकमधील व.दा. भट सरांचा “वधूवर कुंडली मेलन” हा विस्तृत लेख वाचनात आला. अभ्यास करताना त्यातील काही मुद्दे जे मला भावले, तेवढेच आपल्या माहितीसाठी माझ्या शब्दांत व विचारानुरूप येथे देत आहे.

वधू-वरांचे विवाह ठरवताना शिक्षण, उत्पन्न, स्वत:चे घर, सुस्थिती हा व्यावहारिक भाग, समाज जाती व्यवस्था, अनुरुपता अशा अनेक घटकांना सामोरे जावे लागते आणि शेवटी वधू-वरांच्या कुंडल्या ज्योतिषांपुढे येतात. कुंडली जुळते, कुंडली जुळत नाही, असे एखादा ज्योतिषी म्हणतो, तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निकालासारखे त्याला महत्त्व येते. या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीतून पुढे सरकत असताना ज्योतिषी त्यात अजून, मंगळ, गुणमेलन, कु योग यांची भर घालत असतो.

गुरुवर्य व. दा. भट लेखात म्हणतात की, पति-पत्नी किंवा खरे तर इतर नाती ही गतजन्मीच्या ऋणानुबंधावर ठरलेली असतात. अशा व्यक्तींना एकत्र आणण्याचे काम काळ करत असतो.

कै. म.दा. भट सर कित्येक प्रसंगी एखाद्या तरुणाला नेहमी म्हणत असत, तुला मनापासून मुलगी आवडली आहे ना, तिनेही तुला पसंत केले आहे ना, घरातल्या लोकांना मान्य आहे ना, मग कुंडलीबद्दल विचार न करता सरळ लग्न कर. फक्त तेच असे नाही, तर अनेक ज्योतिष ग्रंथकारानीही असे मत व्यक्त केले आहे.

विवाह वृंदावन या ग्रंथात दिलेले आहे –

अर्चितं वचनम् उच्चतं मनो निर्वेशेष सुखदं वपुर्दशाम् ।

अस्ति चेदधरपडमुखी मतिर्लक्षणैः किमपरैनृयोगिताम् ।।

सुंदर सुभाषण, उदार मन, रुप, दृष्टीस सुख देणारी देहाकृति, पापभीरू इतके गुण जर वधू वर ह्यांत असतीळ तर इतर गोष्टी पाहण्याची आवश्यकता नाही.

आपस्तंभ सूत्रानुसार –

यस्मिन्पत्रने मनः सनयने संतोषमृच्छेत्तथा ।

कन्यायामपि यत्र तत्र सकला ऋद्भिर्भवेदित्यतः।।

नान्यलक्षणमाद्वियेत…..

ज्या वराची वा वधूची आकृति देह पाहिल्याने नेत्रांना व मनाला संतोष होतो तेथे सर्व सिध्दी आहेत…….

असाही एक श्लोक आहे :

कन्या वरयते रुपं । माता वित्तं । पिता श्रुतम् । बांधवः कुलम् इंमिच्वंति । मिष्टान्नं इतरे जनः ।

प्रत्यक्ष व्यवहारांत आपण गुणमेलन करतच असतो. ते ३६ गुण असे सांगता येतील –

१) स्वजातिय : ४ गुण

२) रूप-दिसावयास अनुरूप : ८ गुण

३) शिक्षण अपेक्षेप्रमाणे : ८ गुण

४) आर्थिक स्थिती जबाबदाऱ्या : ८ गुण

५) घर वास्तू रहाण्याचे ठिकाण : ४ गुण

६) कुटुंब – आई- वडिल-बहिणी-भाऊ इ. : ४ गुण

  एकूण : ३६ गुण

अशा व्यावहारिक गोष्टींचे मूल्यमापन प्रत्येक जण करत असतोच. तरीसुद्धा विवाह संस्कार, ही आयुष्यातील अति महत्त्वाची घटना असल्यामुळे, भावी काळाबद्दल साशंकता असल्यामुळे म्हणा, व्यक्तीला निर्णय घेताना आणखी एखादा आधार हवा असतो.

अति प्राचिन काळी सुध्दा असे आधार कसे असत, त्याचे एक उदाहरण आपस्तंभ गृह्य सूत्रात सापडते.

वधू परीक्षेसाठी पांच मडक्यात विविध गोष्टी भरून ठेवून झाकण लावत. वधूला एका मडक्याला स्पर्श करण्यास सांगत १) विविध बियाणे २) शेतातील माती ३) स्मशानातील माती ४) गोशाळेतील वगैरे त्यावरून वधू कोणत्या पायगुणाची ते समजते. स्मशानातील माती नवऱ्याचा मृत्यू, चौकातील माती मुले जुगारी, वाळवंटातील माती मुले दरिद्री, यज्ञातील • मुले अध्यात्मिक ई. पद्धती अवलंबत असत.

हल्लीसुध्दा देवीला कौल लावणे, सत्पुरुषांची गुरुची अनुमती घेणे वगैरे गोष्टी आहेतच. भावी काळांत काय होईल ह्यांचा अंदाज देणारे ज्योतिष हे एकच शास्त्र असल्याने, वधू-वरांच्या बाबतीत लोक ज्योतिषाकडे धाव घेतात. गुणमेलन किंवा इतर पद्धतीने भावी संसाराचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत असतात. बहुतेक ज्योतिषी गुणमेलन कोष्टक – मंगळ अभ्यासून हा निर्णय घेतात.

पूर्वकाल होरा ग्रंथ केवळ कुंडली शास्त्रावर जे पंथ आहेत. उदा. पाराशरी, बृहत्जातक, होराशास्त्र,  फलदिपिका जातक पारिजात वगैरे ग्रंथात वधू-वर पत्रिका मेलन हा भाग आढळत नाही. हा विषय ‘मुहूर्त पंथात आढळतो. दहा गुण ३६ गुणाची वाटचाल एकदम झालेली नाही. कालिदासप्रणीत ज्योतिर्विदाभरणम ग्रंथात, वधूवरांना दहा गुण मिळाले तरी विवाह करावा असा उल्लेख आहे. नक्षत्र (तारा) ३,५,७ नको. नाडी, योनि, वर्ग, विश्य युवा, गण वगैरे गोष्टींचा उहापोह केलेला आहे.

भारतात वेदकालापासून केवळ नक्षत्र विचार होता. त्यामुळे वधूवर कुंडली मेलनात नक्षत्रांचे गुणधर्म एकमेकांपासूनची नक्षत्रे (तारा) योनि, गण, नाडी एवढ्या पुरतेच गुणमेलन होते. वराह मिहीरनंतर राशि आल्या आणि गुणमेलन नक्षत्रापुरते मर्यादित न राहता राशी गुणधर्माचा विचार व त्यांना गुण देण्याची प्रथा आली. त्यानंतर अष्टकूट व त्यातील ३६ गुण संख्येने पुढे संपूर्ण भारतात ह्याचाच विचार होऊ लागला. गुणमेलन कोष्टक सर्वत्र अत्यंत लोकप्रिय झाले. आणि गेली ७००-८०० वर्षे ज्योतिषांच्या वापरात आले. कळायला, वापरण्यास सोपे असल्याने ते अत्यंत लोकप्रिय झाले. मग त्यात अनेक गोष्टी समाविष्ट झाल्या.

गण हे स्वभावाचे निदर्शक आहेत, तर नाडीने व्यक्तिची प्रकृति पित्त-वात-कफ कळते, एकनाड म्हणून वर्ज्य धरली असावी. गण ग्रहमैत्री ह्या तीन घटकांपैकी दोन चांगले असतील तर तिसरा घटक अनुकूल नसला तरी विवाह करण्यास हरकत नाही, असे मत वेगवेगळ्या ग्रंथकारांनी व्यक्त केले आहेत. योनि वर्ग, वर्ण, गण, योनि द्विर्द्वादशक, षडाष्टक ई. दोष असताहि ग्रहमैत्री असेल तर विवाह करावा. इतर सर्व कुटे शुध्द असतील तर एकनाडीचाहि दोष जातो. असे विवाहपटलात म्हटले आहे. नक्षत्रगुणधर्म महत्त्वाचे का राशी ग्रहमैत्री महत्त्वाची हा सतत वादाचा मुद्दा राहिला आहे. पुढे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भटोत्कुलोत्पन दामोदरसुत वसंत शर्मा नावाच्या ज्योतिषाने चंद्राच्या नवमांश राशीचा विचार आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. त्यासाठी त्यांनी अनेक संदर्भ दिले ते असे.

पियुषधारेत – वसिष्ठ – राशिनाथे विरूध्देऽपि सबलावंशकाधिपौ । तन्मैत्र्यैऽपि च कर्तव्यं दंपत्यो शुभमिच्छता ।।

वधूवरांच्या राशीचे स्वामी परस्परशत्रू असताहि (मृत्यूषडाष्टक व इतर) जर नवमांश अधिपति सबल असून मित्र असतील तर विवाह करावा.

पुयुष धारेत अत्रि – राशीशयोः सुहृदभावे मित्रत्ते वा प्रशनाथयो । गणादिदौष्ट्ये अपि पुत्रपौत्रप्रवर्धनः ।

राशीस्वामीची किंवा नवमांश स्वामीची मित्रता असेल तर गण अदि दोष असूनही विवाह केल्याने पुत्रपौत्रांची वृध्दि होते .

असो. ज्योतिष शास्त्र दृष्टीने विचार करण्यासारखे घटक म्हणजे वधू वराच्या १) लग्नराशी २) रवि ३) शुक्र-राशी (स्थान) ४) शुक्र ग्रहयोगांत ५) राप्तमेश ६) आयुर्दाय ७) संतति

शुक्र ग्रहयोगांत शुक्राचे नवपंचम, केंद्र, प्रतियोग, युतीयोग हे अति महत्त्वाचे ठरतात.

कुंडलीच्या सप्तमेशचे असेच मूल्यमापन करता येईल. कुंडलीपैकी एखादी कुंडली आयुर्दायाच्या दृष्टीने धोकादायक असेल तर तसे स्पष्ट सांगावे.

संततिच्या बाबतीतहि आपली मते स्पष्ट सांगावी, ह्या दृष्टीने दोन्ही कुंडलीतील गुरुच्या राशीचे मूल्यमापन करावे. गुरु वृषभ तुळ-मकर-कन्या राशीत असता कमीत कमी दुसऱ्याचा तरी चांगला असावा,

पूर्वीच्या काळातील कांही ज्योतिषी वराच्या कुंडलीत त्या त्या राशीत वधूच्या कुंडलीतील ग्रह मांडत असत. त्यामुळे काही गोष्टीची झटकन कल्पना येते. उदा. सिंह रवि व वधूचा सिंह शनि असेल तर ही गोष्ट चटकन लक्षात येते.

वधू वरांच्या कुंडल्याचा तौलनिक अभ्यास करून अनेकांनी कांही मार्गदर्शक नियम दिले आहेत. स्त्री जातक नावाचा एक ग्रंथ पूर्वी होता त्यात व नवाथे ह्यांनी काही मार्गदर्शन केले आहे.

१) दोघांची लग्ने एका राशीची असणे.

२) एकाची लग्न राशी तीच दुसऱ्याची चंद्रराशी

३) दोघांची चंद्र राशी एक असणे.

४) एकाची चंद्रराशी दुसऱ्याच्या चंद्राच्या सप्तमात

५) एकाची चंद्रराशी ती दुसऱ्याची लग्न राशी

६) एकाची चंद्रराशी शुक्र राशी ती दुसऱ्याची लग्न, सप्तम किंवा चंद्र राशी असणे

७) एकाचा लग्नेश दुसऱ्याच्या सप्तमात किंवा उलट असणे.

८) दोघांचे लग्नेश व सप्तमेश एका राशीत वा समसप्तकात

९) दोघांचा शुक्र एका राशीत व समोरासमोर

१०) एकाच्या लग्नातील ग्रह दुसऱ्याच्या सप्तमात

११) दोघांच्या लग्नात व सप्तमात एकच ग्रह

१२) दोघांचे ग्रह एकमेकांच्या शुभयोगात

१३) दोघांचे कुटुंबेशाचे वरीलप्रमाणे योग असणे

१४) एकाचे लग्न दुसऱ्याचा चंद्र

कुंडल्या अभ्यासतांना एक गोष्ट नक्की लक्षात येते ती म्हणजे मानवी प्रयत्नापेक्षा दैव बलवत्तर असते.  कुंडल्या चांगल्या असून सुद्धा विवाह ठरत नाहीत. एखाद्याला नको असलेल्या ग्रहयोगाच्या कुंडल्याच समोर येतात. ज्योतिषी हा सुध्दा दैवाचे एक माध्यम असते. ज्योतिषाच्या तसेच व्यक्तीच्या प्रयत्नांना मर्यादा असतात. हॉस्पीटल काढले, तर हॉस्पीटल मध्ये काही मृत्यू होणारच. कोणीही ज्योतिषी कोणाचे दैव फारसे बदलू शकत नाही. ह्यांची कल्पना आपण काही वेळा द्यावी लागतेच. आणि ही स्पष्ट कल्पना देऊनच हे कार्य करावे.

वधू-वरांचे विवाह सुखाचे होण्याच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रात ‘हमखास असे नियम करता येणे अवघड आहे, असे मला वाटते. कारण मुळात प्रत्येक कुंडली वेगळी असते. आपण फक्त भावी काळाची दिशा दाखवण्याचा प्रयत्न करून मार्गदर्शन करू शकतो. दैव बदलू शकत नाही.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment