
विषय : षष्ठी-पूर्ती विधी आणि ज्योतिष शास्त्र
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : रिप्लिकेबल ॲस्त्रॉलॉजी टेक्निक्स
नमस्कार,
वयाची साठ वर्षे हा एखाद्या हिंदू व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. षष्ठी-पूर्ती, म्हणजे ६० वे वर्ष पूर्ण होणे हे हिंदूंमध्ये साजरे केले जाते.
“साठी शांत ” हा विधी हिंदू धर्मीय लोक करतात. ६० वयाची अवस्था येईपर्यंत आपल्या हातून आपल्या सांसारिक, सामाजिक जीवनात ज्या काही जाणते अजाणते पणी चुका, पाप, अयोग्य गोष्टी किंवा दुर्वर्तन आपल्या स्वतःच्या किंवा कुटुंबियांच्या बाबतीत किंवा समाजा संदर्भात घडलं असेल, त्याचं परिमार्जन व्हावं, त्यातून पाप मुक्त व्हाव आणि दोष निवारण व्हावं. अशा प्रकारची भावना या शांती विधी मध्ये असते. आणि यापुढंचंही आयुष्य चांगलं जावं यासाठी प्रार्थनापूर्वक देवाला विनवणं ही भावना त्यात असते.
एकसष्ठी साजरी करण्यामागे केवळ एक प्रथा किंवा काहीतरी “विधी” अशी कुटुंबीयांची भावना असू नये, तर सर्वप्रथम त्यांना नमस्कार करुन, आपल्याला जे जसे वाढवले त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत. त्यांनी ऐन उमेदीच्या काळात आपल्याला सक्षम बनविण्यासाठी उपसलेल्या कष्टांची, प्रसंगी केलेल्या सुखाच्या त्यागाची जाण दाखवावी व कृतज्ञता पूर्वक उत्तम आयुष्य व आरोग्य लाभावे म्हणुन अभिष्टचिन्तन करावे. जोडीस एखादी सुंदर उपयोगी भेटवस्तू द्यावी आणि आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही व केवळ अपेक्षांचे ओझे तुमच्यावर टाकत नाही, उलट आपण प्रेमादरास पात्र असुन आता आमच्याकडुन तुमच्या काय अपेक्षा आहेत ते विचारावे.
एक पथ्य मात्र आवर्जून पाळावे की, कोणत्याही परिस्थितीत, त्यांच्या वाढत्या वयाचा उल्लेख करू नये. उलट आजही तुम्ही आमच्या तेवढेच उपयोगी आहात, तुमचे तुमच्या अनुभवांच्या शिदोरी सकट हवे आहात व आम्हाला तुमचा मोठा आधार आहे असे हे त्यांना सांगा.
हल्ली एकसष्ठी हा एक उत्सव असतो. छान हसत खेळत, आपल्या जवळच्या माणसांसोबत मस्त खात पित हॉटेलिंग करत छान आनंदात वेळ घालवला जातो. आणि काळानुसार त्यात काही गैर ही नाही. त्यामागील योग्य भावना महत्त्वाची आहे.
आपल्याकडे साठी बुद्धी नाठी अशी एक म्हण आहे, जिचा वापर आपण पाणउतारा करण्यासाठी वापरतो. हिंदी भाषेत सठिया गया है असा शब्द प्रयोग केला जातो. खरेच असे शब्द का वापरले जातात. कारण वयाची साठ वर्षे पूर्ण होत असताना आपण सर्वच जण आजूबाजूला असणारे ज्येष्ठ नागरिक बघतो की सर्वसाधारण पणे हळूहळू त्यांची शारीरिक शक्ती कमी होत चालली आहे, दृष्टी, ऐकू येणे, उत्साह मंदावत चालले आहे.
या सार्वत्रिक अनुभवाचा ज्योतिष शास्त्रात काही संबंध आहे का, हे तपासले असता काही तथ्य समोर आले.
६० या आकड्याचे महत्त्व अथवा उपयोग बघितला तर पूर्वीच्या काळी काळ मापणासाठी ६० घटी, ६० विघटी असा केला जायचा. नंतरच्या काळात ६० मिनिटे, ६० सेकंद असा केला जाऊ लागला.
हिंदू ज्योतिषशास्त्रामध्ये १२० वर्षांचे जास्तीत जास्त आयुष्य मानून ९ नक्षत्रांच्या आधारे १२० अंश विभाजित केले गेले. व त्यानंतर परत त्याच क्रमाने १२० अंशाची नक्षत्र साखळी एकूण ३ वेळा मिळून २७ नक्षत्रांसह ३६० अंशाचे राशीचक्र पूर्ण केले.
आपणास माहीत असेल की आकाशात सर्व ग्रह त्यांच्या निर्धारित गतीने परिभ्रमण करत असतात.
लग्न स्थान साधारण २ तास असते, त्यापासून कुंडलीत सूर्य कोणत्या स्थानात किती अंशावर आहे या गणिताने जन्म वेळ समजते.
चंद्र व सूर्याच्या मधील कुंडलीतील अंतरावरून जन्म तारीख अथवा तिथी मोजता येते. ( अमावस्येला चंद्र व सूर्य एकत्र असतात तर पौर्णिमेला प्रतियोग असतो.)
सूर्याच्या परिभ्रमण वरून जन्म महिना मोजता येतो. कारण सूर्य साधारण १ महिना एका राशीत असतो. व १४ जानेवारी दरम्यान मकर राशीत प्रवेश करतो. त्यावरून सूर्य कोणत्या राशीत आहे त्यावरून जन्म महिना समजतो.
तसेच एखाद्याचे वय मोजताना शनी आत्ता कोणत्या राशीत आहे. व जन्मस्थ शनी स्थिती पासून किती पुढे आला आहे यावरून वय समजते. शनी एका राशीत २.५ वर्षे असतो. यात अचूकता साठी शनी व गुरूचे देखील परिभ्रमण विचारात घेतले जाते.
शनि राशी व नक्षत्र चक्र पूर्ण करून मूळ स्थितीला यायला ३० वर्षे लागतात (१२ राशी एक्स २.५ वर्ष) आणि गुरूला १२ वर्षे लागतात.
नीट निरीक्षण केले तर आयुष्याची जास्तीत जास्त मर्यादा १२० वर्षे चा वेळी शनी व गुरू त्याच्या मूळ स्थितीला परत आलेले असतात. त्यापुढे नवीन आयुष्याची सुरुवात होणार असते. यांच्या राशीच्या पूर्ण चक्रातील ही ग्रह स्थिती वयाच्या ६० व्या वर्षी सुद्धा आलेली असते. १२ वर्षे व ३० वर्षे याचा ल.सा.वी.( लघुतम साधारण विभाज्य) ६० येतो. म्हणजेच ६० वर्षे ही आयुष्याची कमीत कमी मर्यादा दर्शवते. म्हणून, व्यक्तीसाठी हा एक प्रकारचा दुसरा जन्म आहे.
आता तुमच्या लक्षात आले असेल की षष्ठी-पूर्तीला हिंदू धर्मात एवढे महत्त्व का प्राप्त झाले आहे. धन्य ते आपले पूर्वज ज्यांनी आयुष्याचा एवढा सखोल अभ्यास ज्योतिष शास्त्र द्वारे केला होता.
(टीप : ग्रहाच्या इतर घटक युती, दृष्टी, वक्री ई. मुळे या मर्यादेच्या अलीकडे, मध्ये व पलीकडे आयुष्य असू शकते. पण सर्वसाधारपणे वरील मर्यादा अनुभवास येते.)
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)